२००० संशयित जन्म प्रमाणपत्र सापडल्याची केडीएमसी आयुक्तांकडून माहिती
कल्याण : कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म प्रमाणपत्रे तयार केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चर्चा करण्यासाठी माजी भाजप खासदार किरीट सोमैया यांनी शुक्रवारी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली. या बैठकीला कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड, उपमहापौर राहुल दामले, सभागृहनेते वरुण पाटील, गटनेते शशिकांत कांबळे यांच्यासह महापालिकेचे अनेक अधिकारी आणि नगसेवक उपस्थित होते.
या बैठकीत समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या तीन महानगरपालिकांमध्ये १०,००० हून अधिक बनावट जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा संशय आहे. एकट्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २,००० हून अधिक बनावट प्रमाणपत्रे आढळली आहेत. या घोटाळ्यात हजारो बांगलादेशी नागरिकांचाही सहभाग असल्याचा संशय आहे.
या बैठकीनंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी जन्म प्रमाणपत्रे जारी करण्यामध्ये घोटाळा झाल्याचे मान्य केले. संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पुढील १० दिवसांत एक विशेष तपास पथक स्थापन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. हे पथक बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटचा तपास करून गुन्हेगारांना शोधण्यात येईल. भाजप नेते किरीट सोमैया यांनी सांगितले की, त्यांनी यापूर्वी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मुंबईत अशाच एका प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. सोमैया यांनी सांगितले की, मुंबईत अशीच कारवाई करण्यात आली असून, कल्याण-डोंबिवलीतील गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही सोडले जाणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे जारी करण्याशी संबंधित आहे. या प्रमाणपत्रांचा वापर बेकायदेशीर नागरिकत्व मिळवण्यासाठी, सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी आणि इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यातही अंदाजे १५,००० बनावट जन्म प्रमाणपत्रांची नोंद झाली असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
