मेश औताडे
मुंबई: श्री छत्रपती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अंतर्गत पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल १७-१८ वर्षे उलटूनही न्याय मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पुढील सात दिवसांत संयुक्त बैठक आयोजित करून प्रलंबित प्रश्नांवर निर्णय घ्यावा, नाहीतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गृहनिर्माण विभागाने दिलेल्या निर्देशांचे अभियांत्रिकी विभागाकडून कथितपणे पालन न करता प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर सनय छत्रपती शासन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मुंबई अध्यक्ष सर्जेराव निकम व मुंबई सरचिटणीस महेश महादेव लाड यांनी संस्थेचे पदाधिकारी अरविंद घाग मुख्य प्रवर्तक व मोहन पांचाळ सह प्रवर्तक एस आर ए चे सचिव शदत्तात्रेय नवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
स्थलांतर झाल्यानंतर ३ ते ४ वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असलेला पुनर्वसन प्रकल्प आजही रखडलेला असून, रहिवाशांचे पुनर्वसन, कायदेशीर हक्क आणि न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. संबंधित प्रशासनाने विलंब न करता तातडीने योग्य निर्णय घेऊन प्रलंबित प्रश्न निकाली काढावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
