– शहापूरात हिरव्यागार रानभाज्यांचा
बाजार फुलला आदिवासींना मिळाली रोजीरोटी !
अविनाश उबाळे
ठाणे : शेवळी,तेलपाट,ससेकांद, कोळु ,अळू ,कोरडु ,पेंढरं खुरनासनी ,तेरा ,लोत,या दुर्मिळ अशा दाट जंगलात खास पावसाळ्याच्या मोसमातील मिळणाऱ्या रान भाज्या विक्रीसाठी आदिवासी शहापूर बाजारपेठेत आता दाखल झाले आहेत. या रानभाज्यांच्या विक्रीतून स्थानिक आदिवासी महिलांना रोजगार मिळाला आहे. कशासाठी तर वितभर पोटासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी रानो रान भटकंती करुन मिळविलेल्या या हिरव्यागार रानभाज्यांनी गरीब आदिवासींना रोजीरोटी दिली आहे.पावसाळ्यात या रानभाज्या आदिवासींना वरदान ठरल्या आहेत.
सतत पडत असलेला अवकाळी पावसाने माळरान व जंगलात या रानभाज्या लवकरच उगविल्याने आदिवासींनी या रानभाज्या पावसाच्या आगमना अगोदरच या रानभाज्या विक्रीसाठी बाजारपेठेत आणल्या आहेत.शहापूर तालुक्यातील वासिंद ,किन्हवली, डोळखांब, ,खर्डी,कसारा ,या परिसरातील दऱ्याखोऱ्यांत वास्तव्य करणारे आदिवासी पुरुष,महिला जंगलात भटकंती करुन रानभाज्या गोळा करुन पावसाळ्याच्या मोसमात शहरात विक्रीसाठी घेऊन येतात या रानभाज्या मिळविण्यासाठी पहाटेच आदिवासी पुरुष ,महिला घराबाहेर पडतात जंगलातील डोंगर दऱ्या खोऱ्यात तर रानमाळ पठारावर जमा केलेल्या या रानभाज्या एका टोपलीत भरुन नंतर पळसाच्या द्रोणात ठेवून विक्रीसाठी आणल्या जातात विशेष म्हणजे फक्त पावसाळ्यातच मिळणाऱ्या या दुर्मीळ अशा रानभाज्यांना आयुर्वेदिक महत्व असल्याने या भाज्यांची लज्जत चाखण्यासाठी या रानभाज्यांना ग्रामीण भागातील ग्राहकांकडून प्रचंड मागणी असते या रानभाज्या विक्रीसाठी येताच खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होते आहे १० रुपये वाटा याप्रमाणे ,कंटोली,शेवळी ,तेलपाट ,ससेकांद ,कोळु अळू ,कोरडु ,पेंढर ,खुरासनी तेरा , या रानभाज्यांंची विक्री केली जाते या रानभाज्यांच्या विक्रीतून पुर्ण दिवसभरात २०० ते ३०० रुपयांची कमाई होते असे आदिवासी महिलेने सांगितले या रानभाज्या शहापूरसह कल्याण ,डोंबिवली ,ठाणे ,येथील बाजारपेठेत आदिवासी विक्रीसाठी आणतात या रानभाज्यांच्या विक्रितून पावसाळ्यात निदान दोन वेळच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटत असल्याचे आदिवासी सांगतात पावसाळ्यातील चार महिने रानभाज्या आदिवासींना रोजगार देत असल्याने या रानभाज्या खऱ्या अर्थाने गरीब आदिवासींसाठी वरदानच ठरल्या आहेत.
