मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळ चारकोप कांदिवली या सामाजिक संस्थेच्या वतीने १० वी, १२ वी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा वार्षिक गुणगौरव सोहळा नुकताच सिंधुदुर्ग भवन येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली ३२ वर्षे विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या या संस्थेचा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम होता. संस्थेच्या वतीने गेली २० वर्षे सातत्याने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात येतो. यावर्षी शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भरत नाईक होते. संस्थेचे सल्लागार श्रीकांत कवठणकर यानी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार लाडोबा पिंगुळकर, गृहनिर्माण संस्था फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, मुख्याध्यापक सदानंद खानोलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संस्थेचे सचिव प्रकाश परब यांनी केले. पालकांनी आणि उपस्थितांनी या गुणगौरव सोहळ्याचे विशेष कौतुक केले. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.
