मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील घरावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या सहा गुंडाविरोधात न्यायालयात १७०० पानांचे आरोपपत्र दाखल केले.
सागर पाल, विक्की गुप्ता, सोनू कुमार बिश्नोई, हरपाल सिंह उर्फ हॅरी, मोहम्मद रफिक चौधरी आणि अनुज थापन यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (मोक्का) तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील थापनने पोलीस कोठडीत असताना आत्महत्या केली होती. या प्रकरणी डझनभर साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. सलमान आणि त्याचा भाऊ अरबाज खान यांचे ४ जून रोजी जबाब नोंदवण्यात आले होते. त्यांच्या जबाबांचाही आरोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय, टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई, त्याचा भाऊ अनमोल बिश्नोई आणि टोळीचा प्रमुख सदस्य रोहित गोधारा यांचाही या प्रकरणात सहभाग असून त्यांना याप्रकरणी पाहिजे आरोपी दाखवण्यात आले आहे. सध्या परदेशात असलेल्या इतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचा प्रयत्न गुन्हे शाखा करेल, असे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
गेल्या १४ एप्रिल ला सकाळी अभिनेत्याच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर सागर पाल व विक्की गुप्ता यांनी गोळीबार केला होता. त्याप्रकरणी गुन्हे शाखेने विवि राज्यातून सहा जणांना अटक केली. गुन्हे शाखेच्या तपासानुसार, हा हल्ला साबरमती तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून करण्यात आला होता. त्याने यापूर्वीही सलमान खान याला धमकी दिली होती. बिश्नोई, त्याचा धाकटा भाऊ अनमोल कॅनडामध्ये लपून बसल्याचा संशय आहे.
बिश्नोई लोकप्रिय अभिनेत्याला धमकावून आणि हल्ला करण्याचा प्रयत्न करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याप्रकरणी मोक्का कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लवकरच लॉरेन्स बिश्नोईची याला अटक करून गुन्हे शाखा चौकशी करण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *