कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या जन्म, मृत्यू दाखले ऑनलाईन माध्यमातून देण्याच्या कार्य प्रणालीमध्ये शासन निर्देशानुसार बदल केले जात आहेत. या बदलाच्या कार्य प्रणालीची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत पालिकेकडून देण्यात येणारे जन्म, मृत्युचे दाखले विलंबाने मिळू शकतात. नागरिकांनी याकामी सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी केले आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेच्या जन्म, मृत्यू नोंदणी विभागात सध्या कार्यरत असलेल्या सीआरएस प्रणालीमध्ये बदल करण्यात आला आहे. ही प्रणाली प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी थोडा विलंब होत आहे. त्यामुळे पालिकेकडून देण्यात येणाऱ्या जन्म, मृत्यू दाखले देण्यात थोडा विलंब होऊ शकतो, अशी माहिती डॉ. शुक्ल यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या सुधारित प्रणालीप्रमाणे एक वर्षापूर्वी नोंदणी न केलेल्या घटनांसाठी न्यायालयाच्या आदेशाऐवजी तहसीलदार यांचे लिखित आदेश आता प्रमाणित केले जाणार आहेत. सीआरएस प्रणाली शिवाय अन्य कोणत्याही मार्गाने नियमबाह्य पध्दतीने जन्म, मृत्यू घटनांची नोंदणी करण्यात येऊ नये अथवा ठेवण्यात येऊ नये असे शासनाचे निर्देश आहेत.
खासगी रुग्णालयांनी करावयाची करावयाची नोंदणी, पालिकेला द्यावयाची माहिती, विविध प्रकारच्या दुरुस्ती तसेच शुल्क आकारणी इत्यादी संदर्भात महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पालिकेच्या जन्म, मृत्यू विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात येऊन आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली पालिकेची जन्म, मृत्यू विभागातील नोंदणी विलंबाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही दाखले मिळण्यास विलंब होण्याची शक्यता नाकारत येत नाही, असे डॉ. शु्क्ल यांनी म्हटले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *