मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा
नागपूर : विधानसभा निवडणूकीसाठी सगळ्याच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु असली तरी महायुतीला मोर्चबांधणीसोबतचत मंत्रमंडळ विस्ताराचे शिवधनुष्यही पेलायचे आहे. गेल्या आठवड्याभराता राज्याचे मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीवारी करून आल्यानंतर आज तडकाफडकी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातमीने राज्यात जोर धरला आहे.
दोन दिवसा आधीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे देखील दिल्लीला जाऊन आले होते. तर त्या आधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काही तासांसाठी दिल्ली वारी केली होती. एकीकडे राज्यात सुरू असलेले मराठा ओबीसी वाद आणि जातीय समीकरण जोपासत विभागनिहाय मंत्रिमंडळ विस्तारावर भर असणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यात परत एकदा मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहत असल्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवार १० जुलै रोजी काही तासांसाठी दिल्लीला गेले होते. ते एका कृषी सन्मान सोहळ्यासाठी दिल्लीला गेले असले तरी यावेळी त्यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी होणाऱ्या गाठीभेटींकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दिल्लीतील कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा तब्बल अडीच तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे. याचवेळेत एकनाथ शिंदे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेट घेत गुप्तं खलबतं केल्याचे बोलल्या गेलंय. त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीच्या निकाल आल्या आल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दिल्लीवारी करत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पाठोपाठ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीवारी केलीय. आज संध्याकाळी फडणवीस नागपूर विमानतळावरुन दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय,गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे.
