जालना : एकीकडे मराठा समाजाशी गोड गोड बोलायचं आणि दुसरीकडे ओबीसी नेते मराठा समाजाच्या अंगावर घालायचे हा फडणवीस साहेबांचा डाव दिसतो. फडणवीस यांनी इतके छिचोरे चाळे का करायला पहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांनी. महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवली होती की मराठ्यांविषयी प्रत्येकाला द्वेष ओकायला लावताय, असे म्हणत जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही पत्रकार परिषद घेऊन, राज्यात 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणाच केली. तसेच, सगेसोयरे ही भेसळ असून राज्य सरकारने घाईघाईने दिलेली कुणीबी प्रमाणपत्र रद्द करावीत, अशी मागणीच अॅड. प्रकाश आंबेडकर  यांनी केली आहे. आता, या सर्वच घडामोडींवर मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली आहे. तसेच, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवरही त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

“सगे सोयरे ही भेसळ आहे. ओरिजनल मंडल कमिशनची यादी जोडल्या गेली होती. 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिले गेले, ते शाबूत आहे. मात्र इतर मार्गाने सध्या काही जण मिळवू पाहात आहेत. घाई घाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा, अशी मागणीच प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. यावेळी, राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. तर, दुसरीकडे राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेली 1 महिन्यांची मुदत संपल्याने आता पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग जरांगे यांनी अवलंबला आहे. 20 जुलैपासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याच, अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीक केली.

एक महिन्याचा वेळ आम्ही सरकारला दिला होता. आता, 20 जुलैला आमरण उपोषण करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे, ते उपोषण कठोर करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटले. तसेच,

प्रकाश आंबेडकरसाहेब प्रत्येकवेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून औषध घालतील तेच सांगायचे. आज हे इतकं शॉकिंग वाटतंय की आता तेच म्हणाले सगेसोयरेंची अंमलबजावणी करु नका, त्यांचा पक्ष म्हणतोय की नोंदी रद्द करा. पण, एससी-एसटी आरक्षणाची मागणीच नाही मराठ्यांची, असे म्हणत जरांगे यांनी प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेवर भाष्य केलं. फडणवीस साहेब तुम्हाला हे राज्य रक्तबंभाळ करायचं आहे का?. नेमकं तुमचं काय चाललंय हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना, मराठ्यांना त्रास द्यायचा. म्हणजे तुम्ही आमच्या सोयऱ्यांना त्रास देणार, फडणवीस साहेब तुमचे पण सोयरे आहेत, असेही जरांगे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *