ठाणे : गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी लोणावळा नूसी रिसॉर्ट येथे २० व २१ जुलैला मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची सभा संपन्न झाली.  या मिटिंगमध्ये  बंदर व गोदी कामगारांच्या वेतन कराराबाबत होणारी दिरंगाई, गोदी कामगारांना घरे, मुंबई बंदर परिसरातील कंत्राटी कामगारांना संघटित करून सभासद संख्या वाढविणे,  इत्यादी महत्त्वाच्या विषयावर कामगार नेत्यांची  पदाधिकाऱ्यांसोबत  सविस्तर चर्चा झाली.  याप्रसंगी ज्येष्ठ कामगार नेते ॲड .एस. के. शेट्ये यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, पूर्वी ४२ हजार कामगार होते. आता ३  हजार कामगार शिल्लक राहिले असून,  ३६  हजार पेन्शनर आहेत.
गोदी कामगारांची संख्या सेवानिवृत्तीमुळे व भरती बंद असल्यामुळे दिवसेंदिवस कमी होत चालली असून कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चालली आहे. कंत्राटी कामगारांना संघटित करणे,  हे आपल्यासमोर एक मोठे आव्हान असून, त्यासाठी कामगारांची एकजूट महत्वाची आहे.  युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी सांगितले  की केंद्र सरकारचे धोरण कामगार विरोधी असून  ४४  कामगार कायद्याचे रूपांतर  ४  कामगार कायद्यात केले आहे. अडीच वर्ष झाले तरी,  गोदी कामगारांचा अद्याप वेतन करार झालेला नाही,  त्यामुळे गोदी कामगारांमध्ये खूप असंतोष आहे. वेतन करार लवकर होण्यासाठी लोकशाही मार्गाने आपणास लढा द्यावा लागेल.  याप्रसंगो कार्याध्यक्ष डॉ. यतिन पटेल, सेक्रेटरी विद्याधर राणे, दत्ता खेसे यांनी  मार्गदर्शन केले, तर या चर्चेत सेक्रेटरी विजय रणदिवे, मनीष पाटील, खजिनदार विकास नलावडे , प्रसिद्धीप्रमुख मारुती विश्वासराव, उपाध्यक्ष अहमद  काझी, शीला भगत, प्रदीप नलावडे, रमेश कुऱ्हाडे, संघटक चिटणीस निसार युनूस, अप्पा भोसले, प्रवीण काळे, संतोष कदम इत्यादी पदाधिकाऱ्यांनी चर्चेत सहभाग घेतला. गुरू पौर्णिमेनिमित्त सर्व पदाधिकाऱ्यांना गुरुस्थानी असलेले ज्येष्ठ कामगार नेते ॲड . एस. के. शेट्ये यांचा युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, कार्याध्यक्ष डॉ. यतिन पटेल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि गोदी कामगारांतर्फे पुष्पहार घालून सत्कार केला.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *