मुंबई : राज्यभरात झिकाच्या रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राज्यात झिका व्हायरसचे  ८८ रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे ६६ रूग्ण हे पुणे शहरातील आहेत, तर पुण्यापाठोपाठ पुणे ग्रामीण त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये कमी रूग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार पसरताना दिसत आहेत. झिकाचे  सर्वाधिक ६६ रुग्ण पुणे शहरातील आहेत. त्यानंतर पुणे ग्रामीणमध्ये ५, पिंपरी- चिंचवडमधील २, अहमदनगरमधील ४, सांगलीमधील १, कोल्हापूरमध्ये १ आणि सोलापूरात १ अशी रूग्णसंख्या आहे.

झिकाचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी रूग्ण आढळलेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्यात आजवर झिकाच्या पार्श्वभूमीवर १ लाख ६७ हजार ४११ घरांची तपासणी करण्यात आली आहे. उद्रेकग्रस्त भागातील १४५७ जणांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ८० जणांना झिका व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ८० पैकी ३१ गर्भवती महिलांचा समावेश आहे.

झिकाने व्हायरसने  ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये सांधेदुखी, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलटी होणे, अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसून येतात. डोकेदुखी, ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टेही दिसतात. शहरात आढळलेल्या झिकाच्या रूग्णांमध्ये ताप, उलट्या, जुलाब, अशक्तपणा अशी लक्षणे सर्व रुग्णांना सारखी आढळून आल्याची माहिती आहे.

झिकापासून बचाव करण्यासाठी आरोग्य विभागाने नियमावली जाहीर केली आहे. घरामध्ये डास होणार नाही, याची काळजी घ्या. घरात स्वच्छता ठेवा. मच्छरदाणीचा जास्तीत जास्त वापर करा. घरात साठवलेले पाणी जास्त काळ ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दरवाज्यांना जाळी लावा. आपल्या परिसरातदेखील स्वच्छता बाळगण्याचं आवाहन झिका आणि डेंग्युच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलं आहे.

झिका व्हायरसचा  धोका गर्भवती माता आणि तिच्या गर्भाला जास्त असल्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाने भर दिला आहे. झिकाच्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक प्रमाण हे गर्भवती मातांचे आहे.

झिका विषाणूपासून  बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका. पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. घरामध्ये डास शिरणार नाही याची काळजी घ्या. डास चावणार नाही याची काळजी घ्या. घरात डास आले तर त्यासाठी कडुलिंबाचा पाला जाळा. संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका. कापूराचा वापर करून तुम्ही 15 ते 20 मिनिटात डासांना दूर पळवू शकता. कडुलिंब आणि नारळाचं तेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा. दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *