मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी  एक कोटींपेक्षा जास्त अर्ज आले आहेत. या योजनेला मिळालेला वाढता प्रतिसाद पहाता राज्य सरकारने १५ ऑगस्टची मुदत वाढवून आता ३१ ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. पण ज्यांनी अर्ज केला आहे आणि तो पात्र ठरलाय अशा लाडक्या बहीनीं येत्या १७ ऑगस्टलाच दोन हप्ता मिळणार असल्यामुळे तीन हजार रुपयांनी श्रीमंत होणार आहेत. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर येत आहेत. त्यामध्ये, महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत. तर, प्रलिंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार आहेत. तर, नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असून त्यापैकी 1 कोटी अर्जांची छानणी ही पूर्ण झालेली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असून आता त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. या योजनेचा पहिला हप्ता ररक्षाबंधनच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3 हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 17 ऑगस्ट रोजी जमा होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *