ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला कल्याणकारी राज्याची पार्श्वभूमी आहे. या संकल्पनेनुसार शासन आणि प्रशासन सदैव लोककल्याणासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल पंधरवडा गुणगौरव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, अर्चना कदम, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उमेदच्या प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, तहसिलदार डॉ.आसावरी संसारे, रेवण लेंभे, उमेश पाटील, राहुल सारंग, राहुल सूर्यवंशी, डॉ.संदीप थोरात आणि प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी शिनगारे म्हणाले की, हा गुणग्राहकतेचा, गुणगौरवाचा सोहळा आहे. महसूल विभाग कोणत्याही परिस्थितीत सदैव कार्यरत असणारा विभाग आहे. जनमानसिकतेबरोबरीने आता प्रशासनही बदलत आहे. शासन विविध लोकोपयोगी योजना गतिमानतेने राबवित आहे आणि लोकसेवक प्रशासन म्हणून आपण सर्व दुवा म्हणून काम करीत आहोत. लोककल्याणाची कामे गतिमानतेने राबविणे, ही काळाची गरज आहे. त्याप्रमाणे आपण विविध योजना लोककल्याणाची कामे गतिमानतेने राबवितही आहोत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी आपण सारे कटिबद्ध आहोत.
मला अभिमान वाटतो की, ठाणे जिल्हा प्रशासन लोकोपयोगी कामे करण्यात सदैव अग्रेसर राहिला आहे. येथील अधिकारी-कर्मचारी सर्वसामान्यांसाठी संवेदनशीलतेने जबाबदारीने काम करताना दिसून येतात. कोणत्याही आपत्तीत महसूल विभाग तत्परतेने पुढे येऊन काम करतो आणि त्याला जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचीही मोलाची साथ मिळते. यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर करण्यास आपणास यश मिळते.
तलाठी संवर्गातील 51 उमेदवारांना तर अनुकंपा तत्त्वावरील 9 जणांना मिळाली शासकीय नोकरी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर तलाठी संवर्गातील 51 उमेदवारांची नवनियुक्ती करण्यात आली असून 9 उमेदवारांना अनुकंपा तत्वावरीलही नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी नियुक्तीपत्र मिळणे, ही मोठी बाब आहे. ज्यांना नियुक्तीपत्र मिळाले आहे त्यांनी नेहमी प्रामाणिकपणाने चांगले काम करावे. त्याचप्रमाणे अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत, त्यांच्यासोबत आहोत आणि यापुढेही सोबत राहणार आहोत, तुम्ही चांगले काम करा. जिल्हाधिकारी महोदयांनी शेवटी सर्व अधिकारी- कर्मचाऱ्यांचे ते चांगले काम करीत असल्याबाबतचे कौतुकोद्गगार काढले. सर्वांचे विशेष कौतुक केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामाचे केले विशेष कौतुक
शासनाचे उपक्रम, योजनांची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे योगदान निश्चितच प्रशंसनीय असल्याचे जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी याप्रसंगी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी लोकाभिमुख प्रशासन असणे, हे आपले सर्वांचे कर्तव्यच असल्याचे सांगितले. ते म्हणाले, जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यामध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी खूप चांगल्या प्रकारे होत आहे, याचा एक भाग होता येत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.गोपीनाथ ठोंबरे यांनी महसूल दिनाचे महत्त्व विषद केले. संपूर्ण महसूल पंधरवड्यात ठाणे जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांची,कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या आपत्ती व्यवस्थापन पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.चारुलता धनके यांनी केले, उत्कृष्ट सूत्रसंचालन अनेक वर्षांपासून करीत असल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवही करण्यात आला. शेवटी तहसिलदार डॉ.संदीप थोरात यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *