अनिल ठाणेकर
ठाणे : मुंब्रा-कौसामध्ये अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने अनधिकृत बांधकामे जोरात सुरु असल्याचा आरोप ट्विटरवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व स्थानिक आमदार जितेंद्र यांनी केला आहे.
अकरा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुंब्रा-कौसामधील लकी कंपाऊंड येथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली. या दुर्घटनेत ७४ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला , अनेकजण तुरूंगात गेले. या घटनेनंतर जवळपास ८ वर्षे मुंब्रा, कौसा भागात एकही अनधिकृत बांधकाम उभे राहिले नव्हते. आता मात्र अधिकारी आणि बिल्डर यांच्या संगनमताने इतक्या अनधिकृत इमारती बांधल्या जातात की त्या इमारतींच्या संख्येवर विश्वासही बसणार नाही. एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवे होते. पण, अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत. अवघ्या चार – चार दिवसात स्लॅब भरणे हे एल अँड टी ला शक्य नाही. ते येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत. आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पहात आहोत, असेच हे सर्व पाहून वाटते. आज ना उद्या मरणारच आहेत तर हे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून मेले तर काय फरक पडतो, अशीच भावना महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची झाली आहे, असेही आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव हे नवीन आहेत. त्यांना काही समजण्याच्या आत कामे पूर्ण करा, असा संदेश अधिकारीच एकमेकांना देत आहेत. पण आताचे ठामपा आयुक्त सौरव राव हे अत्यंत कर्तव्यदक्ष तसेच नियमांच्या बाहेर कोणतेही काम न करणारे आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. म्हणूनच, खालच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावर जाऊ नका, लाखोंचे नुकसान होईल. वाचवायला कुणीच येणार नाही.
