डोंबिवली : कल्याण, डोंबिवलीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे संध्याकाळी नोकरदार वर्ग घरी परतण्याच्या वेळी गणपती आगमन मिरवणुका ढोल ताशांच्या गजरात काढत असल्याने या संथगती मिरवणुकांमुळे काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवली शहरे सकाळ, संध्याकाळ कोंडीत अडकत आहेत. गणेशोत्सव मंडळांनी रात्री साडे अकरा ते पहाटे पाच वेळेत आपले सार्वजनिक गणपती घेऊन जावेत, अशा अनेक जाणकार नागरिकांनी सूचना केल्या आहेत. त्याला न जुमानता आपला गणपती नागरिकांना दिसला पाहिजे, आपल्या मंडळात भाविकांची गर्दी वाढली पाहिजे यासाठी मंडळे हेतुपुरस्सर संध्याकाळच्या वेळेत गणपती आगमन मिरवणुका काढून शहरात अभूतपूर्व वाहन कोंडी करत आहेत.
या मिरवणुका काढताना पोलीस, वाहतूक पोलीस यांना कोणतीही पूर्वसूचना मंडळे देत नाहीत. त्यामुळे मिरवणूक जात असलेल्या परिसरातील रस्ते वाहन कोंडीत अडकत आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजता डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील आप्पा दातार चौक येथून एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती मखराच्या दिशेने नेण्यात येत होता. नोकरदार वर्ग घरी जाण्याच्या तयारीत असताना या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. या मिरवणुकीसाठी फडके रस्त्यावरून नेहरू मैदानकडे जाणारी, येणारी वाहतूक ठप्प झाली होती. मदन ठाकरे चौकातून गणपती नेत असताना टिळक रस्त्यात उत्साही मंडळ कार्यकर्त्यांनी रस्त्यात दुचाकी आडवी लावून वाहतूक बंद केली. यामुळे टिळक रस्त्यावर टिळक पुतळ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या कोंडीत एमआयडीसीत जाणाऱ्या केडीएमसीच्या निवास बस, कामगार वाहू बस, रिक्षा, खासगी वाहने अडकून पडली. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवासी बसना या कोंडीचा फटका बसला.
रिजन्सी भागात जाणाऱ्या खासगी बस या कोंडीत अडकल्या. निवास बस कोंडीत अडकल्याने बाजीप्रभू चौकात एकही बस नसल्याने प्रवाशांच्या एक किमीच्या रांगा लागल्या होत्या. या सगळ्या प्रकाराबद्दल प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत होते.
शहरात प्रशासन शिल्लक आहे की नाही, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. वाहतूक बंद ठेवण्याचा अधिकार गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला कोणी, असे प्रश्न प्रवासी करत आहेत. उल्हासनगरमध्ये एका गणेशोत्सव मंडळाने गणपती मिरवणुकीच्या वेळी वाहन कोंडी केल्याने त्यांच्यावर उल्हासनगर वाहतूक विभागाने गु्न्हा दाखल केला आहे. अशीच कृती कल्याण, डोंबिवली वाहतूक विभागाने करण्याची मागणी नागरिक करत आहेत. बुधवारी सकाळी वर्दळीच्या टंडन रस्त्याने एक सार्वजनिक गणपती कोपर पुलाच्या दिशेने नेण्यात येत होता. यावेळी टंडन रस्त्यावर कोंडी झाली होती. डोंबिवली पश्चिमेतील द्वारका हाॅटेल जवळील चौकात गेल्या आठवड्यापासून दररोज सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीच्या निमित्ताने वाहन कोंडी होत आहे. सततच्या वाहन कोंडी वाहतूक पोलीस बेजार आहेत. कल्याणमध्ये सहजानंद चौक, मुरबाड रस्ता, संतोषमाता रस्ता, लालचौकी, पारनाका, टिळक चौक, कल्याण पूर्व भागातील नागरिक आगमन मिरवणुकांमुळे होणाऱ्या वाहन कोंडीने हैराण आहेत. यासाठी वाहतूक विभागाने एक नियमावली तयार करावी, अशी मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *