ठाणे : दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला जात असतानाच आशियाँ फाऊंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि स्री सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.
सध्या राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या घटनांवर मात करण्यासाठी “भावाला संस्कार द्या… बहिणी सुरक्षित राहतील” ही संकल्पना राबविणारे अभियान आशियाँ फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहसीन शेख आणि सरचिटणीस दिपा सावंत – खोत यांनी राबविण्यास सुरूवात केली आहे. त्याच अनुषंगाने भिवंडीतील व-हाळदेवी तलाव येथे गणेश विसर्जनाचे औचित्य साधून पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्याद्वारे रित्विश्व ग्रुपने शाळा , कार्यालये, बाजार आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे लैंगिक शोषण आणि मुलींना आत्मरक्षण, पालकांची भूमिका, कायदे या विषयी गौतम सोनवणे , साक्षी मंचेकर, अस्मिता मोरे, प्रमोद गायकवाड , मृण्मय जाधव यांनी पथनाट्याद्वारे प्रबोधन केले. हे पथनाट्य सादर करण्यात रितेश जाधव आणि मिरेश उजगरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या पथनाट्याला गणेश विसर्जनासाठी आलेल्या नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
