महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
ठाणे : पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा ठाणेकरांनी सकारात्मकपणे स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक मूर्तींसाठीही त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आतापासूनच तयारीला लागावे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
कृत्रिम तलाव, टाकी विसर्जन व्यवस्थेप्रमाणेचे सहा फिरत्या विसर्जन व्यवस्था यंदा ठाणे महापालिकेने भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यांना ठाणेकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. फिरत्या विसर्जन व्यवस्थेचे आणखी काटेकोर नियोजन करून त्यांची संख्या वाढवावी. त्याबद्दल जनजागृती करावी. आपल्या सोसायटीच्या दारातच मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्याची सोय उपलब्ध झाली तर नागरिक त्याचा निश्चितपणे स्वीकार करतील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
सोमवारी, माजिवड्याच्या नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत आयुक्त राव यांनी यंदाच्या विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विभागप्रमुख या बैठकीस उपस्थित होते. उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे यांनी या बैठकीत सादरीकरण केले.
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याची संवेदनशीलता मूर्तीकार, भाविक यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवी संघटना, मूर्तीकारांची संघटना यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे महापालिकेने आयोजन करावे, अशी सूचनाही आयुक्त राव यांनी केली.
यंदाच्या संपूर्ण विसर्जन व्यवस्थेची माहिती देणारा अहवाल सादर करण्यात यावा. त्यात, शाडू माती, पिओपी यांच्या मूर्तींचा संख्या किती होती, याचे विवरण असावे. त्या संख्येचा अभ्यास करून पर्यावरणपूरक मूर्तींच्या जागृतीसाठी धोरणाची आखणी करता येईल. त्याचबरोबर, टाकी विसर्जन व्यवस्थेसह पुढील वर्षी फिरत्या विसर्जन व्यवस्थांमध्ये वाढ करावी, असेही आयुक्त राव यांनी सांगितले.
येत्या काळात दसऱ्याला देवींच्या मूर्तीचे विसर्जन होईल. तसेच, छट पूजेसाठीही दोन-तीन दिवस रायलादेवी, कोलशेत, मासुंदा येथे भाविक येतील त्यांचीही चांगली व्यवस्था केली जावी, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.