नागपूर : राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या शपथविधीला कोर्टात आव्हान देणार असल्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी जाहीर केले. राज्यपाल हे भाजप कार्यकर्त्यासारखे काम करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
जेंव्हा आमचे सरकार होते तेंव्हा आमची यादी तत्कालीन राज्यपाल कोश्यारींना दिली होती. मात्र त्यावेळी त्याला मंजुरी दिली नव्हती आणि आता लगेच मंजुरी दिली, हे चुकीचे आहे. या विरोधात महाविकास आघाडी तर्फे याला कोर्टात आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती ही अनिल देशमुख यांनी दिली.
काटोलची जागा राष्ट्रवादीकडेच!
काटोलमध्ये काँग्रेसचे नाव सध्यातरी दिसले नाही. काटोलची जागा राष्ट्रवादी कडे आहे आणि ती आम्हालाच मिळणार. सलील देशमुख किंवा मी तेथे लढण्याबाबत आम्ही मिळून ठरवू. कोण कुठे लढणार? हे ठरवू, असेही ते म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री केवळ ठाणेकडेच पाहतात, हा टोल माफी केवळ निवडणुकी पुरतीच राहणार का? अशीही चर्चा आहे. निवडणूक झाल्यावर टोल वसुली सुरू होईल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे यावर पुढील काळात सत्य कळून येणार असेही ते म्हणाले.
