अनिल ठाणेकर
ठाणे : महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या प्रचारार्थ शंकर मंदिर, दर्गाह, अचानक नगर, सावरकर नगर, पाईप कंपाउंड, पिंट्या कंपाउंड, शबनम अपार्टमेंट, दारूल फलाह आदी परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती. माजी विरोधीपक्ष नेते शानू पठाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष मर्जिया पठाण, शाकीर शेख, साकिब दाते आदी या रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला.
ही पदयात्रा ज्या गल्लीत , ज्या भागात जात होती. त्या भागात नागरिकांकडून डाॅ. आव्हाड यांचे जोरदार स्वागत केले जात होते. सर्वात महत्वाचे म्हणजे अनेक ठिकाणी नागरिकांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर पुष्पवृष्टी केली. अचानक नगर परिसरात डाॅ.जितेंद्र आव्हाड हे माईक हातात घेऊन आपले निवडणूक चिन्ह सांगत असतानाच, एक महिला त्यांच्यासमोर आली. “कशासाठी तुम्ही फिरताय? तुम्ही आम्हाला तुमच्या कामांतून दररोज दिसत असता. आमच्या मुंब्रा, कौसाचा कायापालट तुम्ही केला आहे. त्यामुळे आम्हीच तुमचे प्रचारक आहोत; विजय तुमचाच आहे,” असे म्हणत नागरिकांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, दुपारी बारा वाजता भर उन्हात ही पदयात्रा सुरू झाली होती. तरीही, विविध स्तरातील नागरिक, तरूण, वृद्ध, महिला या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मुंब्रा – कळवा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रचाराचा कळवा पूर्वेत झंझावात पहायला मिळाला. गल्लीबोळात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दुचाकीवरून तसेच चालत नागरिकांशी संवाद साधला. गेल्या पंधरा वर्षात डाॅ. आव्हाड यांनी कळवा पूर्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे डाॅ.जितेंद्र आव्हाड हे विजयाचा चौकार मारतील, अशा शब्दात येथील स्थानिक नागरिकांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना विजयाबद्दल आश्वस्त केले.
