भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे प्रतिपादन
राजेंद्र साळसकर
मुंबई : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी जीवनाची वाटचाल ध्येय्याप्रती, मुल्यांप्रती, कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सर्वाना सोबत घेऊन आदर्श राजकारण काय असते ते पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत, पक्षाचे नेतृत्व करताना दाखवून दिलेय. वाजपेयी यांची कार्यसंपदा, साहित्य मोठं होते. राजकारणात त्यांनी घालून दिलेले आदर्श, पाळंमुळं कुणालाही विसरता येणार नाहीत, अशा शब्दांत भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरवर्षीप्रमाणे आजही कांदिवली (पूर्व) येथे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सन्मान सप्ताहनिमित्त प्रतिमेला माल्यार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्यासह माजी राज्यपाल राम नाईक, उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, जिल्हाध्यक्ष गणेश खणकर, आमदार अतुल भातखळकर, आ. योगेश सागर, आ. मनिषा चौधरी, बोरिवलीचे आ. संजय उपाध्याय आणि पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. प्रविण दरेकर म्हणाले की, राजकारणात आदर्श घ्यावीत अशी काही निवडक व्यक्तिमत्व आहेत. त्यात अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनाची वाटचाल ध्येय्याप्रती, कुठल्याही प्रकारची तडजोड न करता सर्वाना सोबत घेऊन आदर्श राजकारण काय असते ते वाजपेयी यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत, पक्षाचे नेतृत्व करताना दाखवून दिलेय. वाजपेयी यांची कार्यसंपदा, साहित्य मोठं होतं. राजकारणात त्यांनी घालून दिलेले आदर्श, पाळंमुळं कुणालाही विसरता येणार नाहीत. म्हणूनच आज देशभर वाजपेयी यांचा जयंती उत्सव साजरा होत असल्याचे दरेकर म्हणाले.
तसेच गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबईत विकास करत असताना अशा काही गोष्टी उभ्या केल्यात त्या चिरकाळ टिकणाऱ्या आहेत. शताब्दी येथे उभारलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे येथे उभारलेले स्मारक. हे स्मारक जर नसते तर कुठल्यातरी हॉलमध्ये फोटो लावून वाजपेयी यांची जयंती साजरी करावी लागली असती. एका कल्पकतेने, थोरपुरुषांचे आदर्श, त्यांच्या स्मृती चिरंतर ठेवण्याचे काम गोपाळ शेट्टी यांनी केलेय. त्याबाबत त्यांना धन्यवाद देत असल्याचेही दरेकर म्हणाले.
0000
