ठाणे : कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबींची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय अंगीकृत करणे, नियमितपणे वापर करणाऱ्या कुटूंबांना प्रोत्साहन देणे, त्यांचे अनुकरण करण्याकरीता इतर ग्रामस्थांना, कुटूंबधारकांना त्यांच्याप्रमाणे वैयक्तिक स्वच्छता सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये १ ते २० जानेवारी या कालावधीत ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन (प्रा.) टप्पा २ अंतर्गत कुटूंबस्तरावर वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यात ज्या कुटुंबानी वैयक्तिक शौचालय वापर, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा, परसबाग, पाझर खडा, घनकचरा व्यवस्थापनाकरीता कंपोस्ट खतखड्डा अथवा घरगुती खतखड्डा तसेच कुटुंबस्तरावर कचराकुंड्या या बाबतची उपलब्धता करून घेतले, अशा कुटुंबांना प्रोत्साहन देत इतरही कुटुंबांनी त्यांचे अनुकरण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कुटुंबाने पुढाकार घेणे, घरगुती स्तरावर कचऱ्याचे वर्गीकरण करणे, कुटुंबस्तरावर सुका, ओला कचराकुंड्यांमध्ये वर्गीकरण करणे, वर्गीकरण केलेल्या घरगुती कचऱ्याचे कंपोस्ट खतखड्डा किंवा घराच्या परिसरात व्यवस्थापण करणे, परसबाग, पाझरखड्डा, शोषखड्याद्वारे घरगुतीस्तरावर सांडपाणी व्यवस्थापनावर अभियानात विशेष भर देण्यात येत आहे. सर्व प्रथम अभियानाची माहिती दवंडी देऊन, गावातील सूचना फलकांवर लावून गावात ग्रामस्थांना माहिती देण्यात येत आहे. दि. २१ ते २४ या कालावधीत पाणी पुरवठा व स्वच्छता समिती मार्फतीने वैयक्तिक स्तरावर शौचालयाचा वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करणाऱ्या कुटूंबांची पडताळणी करून कुटूंबांची निवड करण्यात येणार आहे. ज्या कुटूंबाची निवड करण्यात येणार, त्यांच्याकडे किंवा परिसरात घरगुती खतखड्डा, परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा, पाझर खड्डा, वैयक्तिक शौचालय, घरगुती कचराकुंड्या आदी सुविधा असणे आवश्यक आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटंबांना दि. २६ जानेवारी, २०२५ रोजी ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांचे संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र, श्रीफळ, पुष्प देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. ‘स्वच्छ माझे अंगण’ अभियान अंमलबजावणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) प्रमोद काळे यांचे नेतृत्वात करण्यात येत आहे. सर्व पंचायत समितीस्तरावर गटविकास अधिकारी यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून गावस्तरावर स्वच्छ माझे अंगण अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येत आहे.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *