श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त
२३ फेब्रुवारीला भव्य सामूहिक गीतगायन
५१ लाख विद्यार्थी व १.५ लाख शिक्षकांचा सहभाग
कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आवाहन
अशोक गायकवाड
नवी मुंबई: शिखांचे नववे गुरु, “हिंद दी चादर” परमपूज्य श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक उपक्रमात कोकण विभागातील सुमारे २० हजार शैक्षणिक संस्था, ५१ लाख विद्यार्थी आणि १.५ लाख शिक्षक व कर्मचारी एकाच वेळी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांना केले आहे. जागतिक विक्रमाची नोंद… या विशेष उपक्रमाची दखल ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’ या संस्थेकडून घेतली जाणार आहे. “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजींच्या स्मृतीनिमित्त २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील ओवे मैदानात मुख्य ‘शहिदी समागम’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने प्रसिद्ध गायक सरताज सिंग यांनी गुरुजींच्या जीवनावर आधारित एक प्रेरणादायी गीत गायले असून, हेच गीत २३ फेब्रुवारी रोजी कोकण विभागातील सर्व शैक्षणिक संस्थांमधून सकाळी ९.०० वाजता गायले जाणार आहे. स्पर्धा परीक्षेचे आयोजन… सामूहिक गायनानंतर, श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित एक ऐच्छिक स्पर्धा परीक्षा देखील आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन गुरुजींच्या बलिदानाची आणि शौर्याची माहिती घ्यावी, असे आवाहन डॉ. सूर्यवंशी यांनी केले आहे. विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांना या उपक्रमाचे नियोजन प्रभावीपणे करण्याचे निर्देश दिले आहेत. “या उपक्रमातून नवीन पिढीला राष्ट्रीय एकात्मतेची शिकवण मिळेल. कोकण विभागातील प्रत्येक विद्यार्थ्याने आणि नागरिकाने या राष्ट्रभक्तीच्या कार्यात सहभागी व्हावे.” असे आवाहनही डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर जिल्हाधिकारी, कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त फरोग मुकादम, अपर आयुक्त रवींद्र पवार, अपर आयुक्त (विकास) डॉ.माणिक दिवे, सह आयुक्त (नगर परिषद प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त (नगर परिषद प्रशासन) डॉ. सागर घोलप, सहायक आयुक्त (विकास) डॉ.प्रदीप घोरपडे, शिक्षण विभागाचे कोकण विभागीय उपसंचालक डॉ.स्वरूप कंकाळ, कोकण विभागीय प्र.माहिती उपसंचालक मनोज सानप, तहसिलदार गजानन धुमाळ, कोकण महसूल विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, तहसिलदार, शिक्षणाधिकारी यांच्यासह सर्व जिल्हा माहिती अधिकारी तसेच इतर विविध विभागाचे अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शैक्षणिक संस्था काटेकोर नियोजन करीत आहेत.या कार्यक्रमाचे कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमधून संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून सोशल मीडियाद्वारे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *