कांदा दरासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
चांदवडला बेमुदत उपोषणाला सुरुवात
हरिभाऊ लाखे
नाशिक : कांदा व मक्याच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे कांदा व मका उत्पादक शेतकरी आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत योग्य बाजारभावाच्या मागणीसाठी सोमवारपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत बेमुदत उपोषण सुरू केले. खासदार भास्कर भगरे यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते जयंत पाटील यांच्याशी मोबाइलवरून चर्चा करून शेतकऱ्यांचा दराचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची विनंती केली.
चालू अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरू, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. सध्या बाजारात कांद्याला प्रतिकिलो केवळ ७ ते ८ रुपये दर मिळत आहे, तर मक्याची सुरू असलेली शासकीय खरेदी अतिशय धिम्या गतीने सुरू असून, तातडीने उपयोजना कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र करून जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
…या आहेत मागण्या
-कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा
-आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्यास प्रतिक्विंटल पंधराशे रुपये प्रमाणे अनुदान द्यावे
-कांद्यासह इतर शेतीमालास योग्य बाजारभाव मिळण्यासाठी उपाययोजना कराव्यात
-कांदा निर्यातीसाठी वाहतूक अनुदान देण्यात यावे व रेल्वे वाहने उपलब्ध करून द्यावी
-शेतकऱ्यांना मका हमीभावाचा फरक देण्यात यावा
‘तो’ निर्णय शेतकरीविरोधी राज्य कांदा उत्पादक संघटनेची भूमिका
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने आरओडीटीईपी (निर्यात उत्पादनांवरील शुल्क आणि करांची सवलत) योजनेतील दर ५० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी निषेध केला आहे. ‘आरओडीटीईपी’दर कपातीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, कृषी व कृषी प्रक्रिया उत्पादनांसाठी स्वतंत्र उच्च दर निश्चित करावा. कांदाप्रक्रिया उद्योगासाठी किमान ४ टक्के ‘आरओडीटीईपी’दर लागू करावा व निर्यात प्रोत्साहन धोरणात स्थैर्य आणावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *