– दा. कृ. सोमण यांचा निसर्ग संवर्धनाचा संदेश

कळवा: निसर्ग, आकाश आणि वन्यजीव यांच्यातील नातं अधिक संवेदनशीलतेने जपण्याची गरज अधोरेखित करत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. ‘राजाराम साळवी गौरव विचारमंच’तर्फे आयोजित ‘वन्यजीव-निसर्ग-साहस’ या विशेष व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मनीषा विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात हा बहुआयामी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी साळवी व पाटील यांच्या अभ्यासपूर्ण वन्यजीव आणि वनस्पती छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना सोमण यांनी पक्ष्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला. “धारदार मांज्यामुळे अनेक पक्षी जखमी होतात. आकाश जसं आपलं आहे, तसंच ते पक्ष्यांचंही आहे,” असे सांगत त्यांनी पर्यावरणाबद्दल संवेदनशीलतेची गरज व्यक्त केली. “आकाश हे उघडं पुस्तक आहे; जसं जंगल वाचायला शिकायला हवं, तसंच आकाशही वाचता आलं पाहिजे,” असे सांगत त्यांनी खगोल आणि निसर्ग यांचा सुंदर मेळ घातला. तसेच लोणार अशनी विवर आणि भास्कराचार्यांचे जन्मस्थान पाटण (चाळीसगावजवळ) या स्थळांना भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. शहापूर येथील ठाकूर बंधूंनी उभारलेले तारांगण व वेधशाळा पाहण्याचा आग्रह त्यांनी यावेळी धरला.
कार्यक्रमात वन्यजीव प्रेमी साधना वझे यांनी ‘अर्जुन’ या बिबट्याचे दत्तकत्व घेतल्याचा अनुभव सांगितला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दत्तक योजनेद्वारे त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले. वन्यजीव अभ्यासक शैलेंद्र पाटील यांनी ‘वन्यजीव भटकंती, साहस व निसर्ग फोटोग्राफी’ या विषयावर मार्गदर्शन करताना “जंगल रीडिंग”चे महत्त्व अधोरेखित केले. प्राण्यांच्या पाऊलखुणा, कॉल्स आणि वॉर्निंग सिग्नल्स ओळखणे ही जंगल अनुभवण्याची खरी किल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. “वाघाच्या मागे धावण्यापेक्षा जंगल अनुभवणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले. त्यांच्या सादरीकरणातील स्लाईड शोने उपस्थितांना जंगलातील थरारक अनुभव दिला.
यावेळी प्रदीप साळवी यांनी वनसंवर्धनावर भाष्य करत “झाडे टिकली तरच जंगल टिकेल” हा संदेश दिला, स्वतः.पक्षी अभयारण्य तयार करण्याचा मनोदय व्यक्त केला . कार्यक्रमात भटकंती छायाचित्र प्रदर्शन, लाईव्ह टॉक शो आणि साहसी मोहिमांचा स्लाईड शो यामुळे हा उपक्रम केवळ व्याख्यान न राहता एक समृद्ध ‘अनुभवयात्रा’ ठरला.
हिमांशु प्रदीप साळवी यांनी विचार संवादाची संकल्पना मांडली तर प्राचार्य डॉ.धनंजय पष्टे यांनी प्रास्ताविक केले. उपवनसंरक्षक ठाणे यांचे विशेष सहकार्य लाभले. वन्य अधिकारी नरेंद्र मुठे (RFO) व अनेक वन सहाय्यक अधिकारी यांच्यासह वाइल्ड लाइफ वेलफेर असोसिएशन तसेच प्रा. मेधा सोमण, नगरसेविका अपर्णा साळवी, शोभा वेलफेअर असोसिएशन डॉ.. किरण पष्टे, सौ. लता साळवी अनेक मान्यवर उपस्थित होते.
