मिरा -भाईंदर :निवडणुकीपूर्वी पाणी देणार असं आश्वासन देणारे आज दिसत नाहीत आणि गरिबांना, आदिवासीना पाणी मिळत नाही, असं म्हणत श्रमजीवी संघटनेच्या सुलतान पटेल यांच्या नेतृत्वाखाली हंडा / मडक मोर्चा काढण्यात आला. महापालिकेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करत पाण्यासाठी घोषणाबाजी करण्यात आली. सुलतान पटेल आयुक्ताना भेटायला गेले असता त्यांना भेट मिळू शकली नाही, असा त्यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला.
वर्षानुवर्षे आम्ही पाण्यासाठी आंदोलन करत आहोत पण आमची मागणी पूर्ण होत नाही. आयुक्ताची मनमानी सुरू आहे, विरोधक नसल्याने सत्ताधारीसुद्धा मनमानी करत आहेत. यात गरिबांचे मरण होत आहे असं ते पुढे म्हणाले.
मंत्री प्रताप सरनाईक यांचं दुर्लक्ष
या आंदोलना वेळी मंत्री प्रताप सरनाईक बाजूलाच हाकेच्या अंतरावर उपस्थित होते. पण त्यांनी या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल. स्वतःच्या वॉर्डमधील आदिवासी पाड्यात पाण्याचं दुर्भीक्ष आहे आणि मंत्री तिकडे लक्ष देत नाहीत, फक्त पत्रकारांसमोर मोठमोठ्या गप्पा मारतात असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
