कल्याण : दि.ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत “ठाणे तालुका” मतदारसंघातून युवा नेतृत्व आकाश पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून सहकार क्षेत्रात नव्या पिढीच्या नेतृत्वाला संधी मिळाल्याची भावना व्यक्त होत असून विविध स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आकाश पाटील हे उच्चशिक्षित, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाते. आधुनिक व्यवस्थापन, वित्तीय नियोजन आणि विकासाभिमुख विचारसरणी यांचा उत्तम समन्वय साधत त्यांनी सामाजिक, व्यावसायिक आणि सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांशी असलेला त्यांचा घनिष्ठ संपर्क, जनसामान्यांच्या प्रश्नांप्रती असलेली संवेदनशीलता आणि विकासासाठीची बांधिलकी यामुळे त्यांना सर्व स्तरांतून मोठा पाठिंबा लाभला. तर माजी अध्यक्ष बाबाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाचा वारसा लाभलेल्या आकाश पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक कारभार, शेतकरी व सभासद-केंद्रित धोरणे आणि बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ठोस दृष्टीकोन मांडला आहे.
आकाश पाटील याचे आजोबा स्व.बाळाराम पाटील हे १९८६ पासून ते २००८ पर्यंत बँकेवर संचालक मंडळावर होते आणि ते ४ वेळा अध्यक्ष होते.आकाशचे वडील बाबाजी पाटील हे सुद्धा २००८ ते २०२६ पर्यंत संचालक मंडळावर होते आणि ते दोन वेळा अध्यक्ष होते. आकाश पाटील यांच्या रूपाने पाटील कुटुंबीयची तिसरी पिढी बँकेच्या राजकारणात सक्रिय झाली आहे.
आपल्या निवडीबद्दल बोलताना आकाशने सांगितले की, “ही निवड माझ्या वैयक्तिक यशाची नसून ठाणे तालुक्यातील सभासद, शेतकरी, सहकारी संस्था आणि सर्व कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या विश्वासाचा विजय आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अधिक सक्षम, आधुनिक, पारदर्शक आणि लोकाभिमुख बनविण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने कार्य करेन. युवा शक्ती, तंत्रज्ञान आणि सहकार यांचा संगम घडवून बँकेच्या प्रगतीस नवी दिशा देण्याचा माझा प्रयत्न राहील.
