ठाणे : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून ठाण्यातील तरुण जलतरणपटू ३ आणि ४ मे रोजी ‘रामसेतू’ तलाईमन्नार (श्रीलंका) आणि धनुष्कोडी (भारत) हे २१ किलोमीटरचे अंतर रिले पद्धतीने पोहून पार करणार आहेत. अयोध्येतील भगवान रामाला त्यांच्या कर्मस्थानी मानवंदना देण्यासाठी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम ठाण्यातील पहिली आंतरराष्ट्रीय जलतरण मोहीम आहे. यामध्ये अर्णव पाटील, अभीर साळसकर, स्वरा हंजनकर, वंशिका अय्यर, रुद्र शिराळी, शार्दुल सोनटक्के, अथर्व पवार, अपूर्व पवार, साविओला मस्कारेन्हस, स्वरा सावंत, लौकिक पेडणेकर, मीत गुप्ते असे १२ तरुण जलतरणपटू ‘पाल्क स्ट्रेट’ ओलांडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी संपूर्ण टीमने घंटाळी मंदिरात घंटाळी देवी आणि प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेतले. प्रभू रामचंद्रांना पवमान अभिषेक करून घंटाळी मंदिराचे पुजारी ओंकार चिक्षे गुरुजी यांनी मंत्रोच्चारासह आशीर्वाद दिले. यावेळी जलतरणपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विनय सहस्रबुद्धे, मृणाल पेंडसे, विकास घांग्रेकर, अश्विनी बापट, वरदराज बापट, अमोल फडके, क्षमा पातकर, मंगेश ओक, रामचंद्र चिवकुल याचबरोबर मुख्य प्रशिक्षक नरेंद्र पवार, प्रशिक्षक भारती सावंत, तसेच माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आरती प्रधान व अनेक मान्यवर उपस्थित होते.
