मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

मुंबई : मुंबईची तहान भागविणा-ऱ्या गारगाई प्रकल्पाला आता वेग येणार आहे. या प्रकल्पाला आवश्यक असलेली परवानगी मिळाल्याने बहुतांशी पेच सुटणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईला ४०० दशलक्ष लिटर जादा पाणी मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत या प्रकल्पाची मदत होणार आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबईकरांची पाण्याची मागणी वाढते आहे. सध्या मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार व भातसा अशा सात धरणांमधून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याची कमतरता भासते आहे. दररोजच्या पाणीपुरवठ्यातील असलेली तूट भरून काढण्यासाठी पालिकेचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला आहे.

परवानग्या आणि इतर काही समस्यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. आता सरकारची आवश्यक परवानगी तसेच बाधित होणारी शेतजमीन, येथील चार गावातील रहिवाशांचा या प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे रखडलेल्या प्रकल्पाचा आता वेग येणार असल्याचे सांगण्यात आले.

पाणी पुरवठा वाढवण्यासाठी राज्य सरकारने डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीने शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार मुंबई महानगर पालिकेने मध्य वैतरणा प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर गारगाई प्रकल्पाचे काम हाती घेतले होते. मात्र मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पामुळे गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प बाजूला पडला. मात्र पालिकेने आता पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

नियोजित गारगाई प्रकल्प पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये ६९ मीटर उंचीचे, ९७२ मीटर लांबीचे धरण बांधणे, आदान मनोर्‍याचे बांधकाम, गारगाई ते मोडकसागर जलाशयाच्या दरम्यान अंदाजे २.० किमी लांबीच्या बोगद्याचे काम नियोजित आहे. या प्रकल्पामुळे येथील रहिवाशांचे पुनर्वसन करावे लागणार आहे, यासाठी येथील झाडे हटवावी लागणार आहेत.

प्रकल्पात पर्यावरणाच्या अडचणी दूर करण्यासाठीही अभ्यास केला जाणार आहे. यावर अभ्यास करून उपाययोजनाही सूचवणार असल्याचे सांगण्यात आले.

पुनरावलोकन होणार

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात वाढ झाल्याने होणारे फायदे, पर्यावरण रक्षणासाठी अतिरिक्त उपाय सुचवणे, प्रकल्पामुळे किती झाडे बाधित होतील, झाडे कापल्यास पर्यावरणाची हानी कशी भरून काढणार, बुडित क्षेत्रावर होणारे परिणाम, उपाय य़ाबाबींचे पुनरावलोकन केले जाणार आहे. अभ्यासानंतर अहवालातील शिफारशींनुसार निर्णय घेतला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *