मुंबई : चार जूनला लोकसभेचे निकाल काहीही लागू देत, आम्ही एकच लक्ष विधानसभा क्षेत्र हा मंत्र घेऊन महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे राष्ट्रवादी अजिपवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज जाहीर केले.
राज्यभरात पुन्हा एकदा संघटना वाढीसाठी आणि संघटना अधिक गतीमान करण्यासाठी विधानसभा क्षेत्रानुसार जिल्हानिहाय आढावा घेऊन पावले उचलली जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२७ मे रोजी सकाळी ११ ते १ यावेळेत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक गरवारे क्लब हाऊसमध्ये होणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय नेते अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मंत्री, आमदार, पक्षाचे लोकसभा उमेदवार, सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
२७ मे रोजी आमची आढावा बैठक जरी असली तरी आम्ही संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम देणार आहोत. १० जून रोजी पक्षाचा वर्धापन दिन असून त्यानुसार मुंबई, दिल्ली याठिकाणी कार्यक्रम करण्याची तयारी व नियोजन होणार्या बैठकीत कोअर कमिटीच्या ग्रुपमध्ये चर्चा केली जाणार असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
या बैठकीला महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या, राजकारणाला कलाटणी देणारा हा प्रवेश होणार आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणूक लढलो त्यामध्ये बारामती, रायगड, शिरुर, धाराशीव आणि परभणी जी जागा मित्रपक्ष रासपला दिली. तिथल्याही पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि निवडणुकीचा आढावाही घेतला होता. मावळ, पुणे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, व मुंबईतील काही मतदारसंघ, पालघर अशा लोकसभा मतदारसंघात मी दौरे केले आहेत. एकंदरीत राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी महायुतीचे नेते पदाधिकारी यांच्याशी समन्वय करत प्रचाराच्यादृष्टीने बैठका घेण्याचा प्रयत्न केला असल्याचेही सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.
लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करुन महायुतीच्या समन्वय समितीची बैठक लवकर बोलावण्यात येणार आहे. यामध्ये निवडणूकीचा आढावा आणि पुढचे नियोजन यासंदर्भात पावले उचलावीत यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिक सक्रियदृष्ट्या दक्ष राहून अधिक ग्रामस्तर ते राज्यपातळीवर काम करण्याचे नियोजन करत आहे. परवा होणार्या पक्ष प्रवेशानंतर देशभरात आणि राज्यभरात ताकद अधिक वाढली जाईल असा विश्वास व्यक्त करतानाच त्याचा फार मोठा परिणाम आगामी निवडणुकीत होऊ शकतो असा दावा सुनिल तटकरे यांनी केला.