मुंबई : मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा, भाईंदर आयोजित २१ दिवसांच्या उन्हाळी निवासी कुस्ती, संस्कार शिबिराचा सांगता समारंभ नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला. या शिबिरात ४० पेक्षा जास्त युवा कुस्तीपटू सहभागी झाले होते. त्यामध्ये काही मुलींचा देखील समावेश होता. विशेष म्हणजे कर्नाटक, म्हैसूर येथील काही कुस्तीपटूंनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात एन. आय. एस. कुस्ती प्रशिक्षक विवेक नयकल, महेंद्र जाधव, वैभव माने, कोमल देसाई, वस्ताद रूपचंद माने यांनी कुस्तीपटूंना मार्गदर्शन केले. शिबिरातील सर्व कुस्तीपटूंना प्रमाणपत्र, चषक, ट्रेक सुट देऊन गौरविण्यात आले. यंदाचे शिबिराचे दुसरे वर्ष होते. शिबिरातील कुस्तीपटूंची २१ दिवस नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय सुभाष घाटवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. शिबिराच्या समारोप सोहळ्याला शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नझरुद्दीन नायकवडी, व्यापारी हुकमीचंद जोशी, डॉ. जितकुमार यादव, उद्योजक श्री. यादव, पै. राजाराम पाटील, प्रकाश वाठारकर, गणपती जाधव (मुंबई पोलीस), माणिक पाटील NSG कमांडो, सुधाकर गायकवाड, श्री साई ज्वेलर्सचे मालक आदी प्रमुख मंडळी उपस्थित होती. यावेळी एशियन क्रीडा, आरोग्य , नर्सरी प्रकल्प शिंदे स्पोर्ट्स , टिळक रोड , पुणे यांच्यावतीने वस्ताद वसंतराव पाटील यांना “महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार २०२४” मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ शिक्षक बलराज बागल सर यांनी केले.
