Author: bittambatami.com

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग

वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग कसोटी, जिद्द आणि विश्वासाच्या जोरावर उभा राहिला एक ब्रँड पर्यावरणाशी नाते जोडून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झाला उद्योग योगेश चांदेकर पालघरः  वय, शिक्षण अनुभव याचा उद्योग उभारणीत कोणताही अडथळा येत नाही. नवे काही करण्याची तयारी आणि ग्राहकाला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणाशी नाते जोडणारे देण्याची तयारी या त्रिसूत्रीवर उद्योगाचे यश अवलंबून असते. डहाणू तालुक्यातील घोलवड येथील साठ वर्षीय विश्वास नेरुरकर यांनी  नवीन उद्योग सुरू करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड हे महाराष्ट्र शासनाने,घोषित केलेले महाराष्ट्रातील तिसरे मधाचे गाव असुन, याचा वसा घेऊन उद्योगात यशस्वी झेप घेऊन  संकल्प हनी चा मुख्य उद्देश घेऊन स्थानिकांना,  थोड्याफार रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा नेरूरकर यांचा प्रयत्न आहे. निसर्गातूनच घेऊन माणसाला नैसर्गिक देण्याची जिद्द यातून ‘संकल्प हनी’चा उद्योगाचा जन्म झाला. आज या उद्योगांना शंभर नव्हे, तर १०१ टक्के गुणवत्तेची हमी दिली आहे. गुणवत्ता, दर्जा आणि नैसर्गिक हेच त्यांच्या यशाचे गणित आहे. नोकरीऐवजी उद्योगात रमले मन विश्वास नेरूरकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरीत त्यांना रस नव्हता. विद्युत संबंधी व्यवसाय काही काळ केला; परंतु लोकांच्या आरोग्याची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भेसळ त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे स्वतःच शंभर टक्के पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण डहाणू तालुक्यातील कोसबाड येथे घेऊन मधाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. केवळ स्वतः पुरती मध निर्मिती न करता इतरांना सहभागी करून घेतले व संकल्प घेऊन संकल्प हनीची निर्मिती केली. संकल्पातून ‘संकल्प हनी’…

 ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’तर्फे ‘आयटीआय मुंबई १’ येथे ‘आरसीबी–आयटीआय इनोव्हेशन लॅब’चे भव्य उद्घाटन मुंबई : ‘रोटरी क्लब ऑफ बॉम्बे’ (आरसीबी) तर्फे शनिवारी, २४ जानेवारीला ‘आयटीआय मुंबई १’ येथे इंडस्ट्री ४.० सुसज्ज…

 राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय, अंबानीला एक न्याय!

राज्यातील शेतकऱ्यांना एक न्याय, अंबानीला एक न्याय! शेतकऱ्यांसाठी न्यायाचा तराजू कायमच हलका का रमेश औताडे मुंबई : राज्यातील शेतकरी आजही निसर्गाच्या लहरीपणाशी, बाजारभावाच्या अस्थिरतेशी आणि कर्जाच्या ओझ्याशी झुंज देत आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीड आणि उत्पादन खर्च वाढूनही हमीभावाची हमी नाही. पीक विमा वेळेवर मिळत नाही,कर्जमाफीची आश्वासने हवेत विरतात. अशा स्थितीत शेतकऱ्यांसाठी न्यायाचा तराजू कायमच हलका का ठरतो, असा सवाल शेतकरी करत आहेत. याच राज्यात आणि देशात मोठ्या उद्योगसमूहांसाठी मात्र धोरणे वेगळी भासतात. जमीन, वीज, पाणी, करसवलती, कर्जपुनर्रचना सगळे काही वेगाने मंजूर होते. प्रकल्प रखडले तरी दंड नाही; तोटा झाला तरी सवलत. मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच नियम कठोर का? शेतकऱ्यांचे कर्ज थकले की नोटीस, जप्ती आणि मानसिक ताण; पण उद्योगपतींच्या कर्जावर पुनर्गठन आणि सवलती मिळतात हा दुहेरी न्याय का? विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकरी कर्जाच्या चक्रातून बाहेर पडू शकलेले नाहीत. आत्महत्यांची आकडेवारी धोक्याची घंटा वाजवत असताना, सरकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. “आम्हाला दया नको, समान न्याय हवा,” अशी आर्त हाक शेतकरी वर्गातून उठते आहे. शेती हा उद्योग मान्य करूनही त्याला उद्योगासारख्या सवलती का नाहीत? उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव, वेळेत पीक विमा, सरळ आणि पारदर्शक कर्जमाफी, वीज-पाणी सवलती या मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. दुसरीकडे, मोठ्या उद्योगांसाठी धोरणांची लालफीत क्षणार्धात कापली जाते. हा फरकच शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असे एका शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सरकारला प्रश्न केला. राज्यातील जनमत आज स्पष्ट आहे. कायद्याचे निकष समान हवेत. शेतकऱ्यांना न्याय देताना तसूभरही कमीपणा नको. देश अन्नदाता शेतकऱ्यांवर उभा आहे; त्याच अन्नदात्याच्या जगण्याचा प्रश्न दुर्लक्षित ठेवून विकासाची गाडी पुढे जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना एक न्याय आणि उद्योगपतींना दुसरा—हा अन्याय आता थांबायलाच हवा, अशी ठाम मागणी राज्यभरातून शेतकरी करत आहेत.

उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील

उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारणे हा लोकशाहीचा अपमान -ॲड. विक्की पाटील ठाणे : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत यंदा उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेश नाकारला गेला. हा एकप्रकारे लोकशाही व्यवस्थेचा अपमान आहे.असा आरोप अपक्ष उमेदवार ॲड. विक्की पाटील यांनी रविवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना केला.याविरोधात आम्ही जनहीत याचिका दाखल करण्याचा विचार सुरु केला आहे. अशी माहिती ॲड. विक्की पाटील यांनी दिली. नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ (अ) मधून  अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या ऍड.विक्की पाटील यांनी १० हजारहून अधिक मत घेतली होती.यात त्यांचा थोडक्यात पराभव झाला. याबाबत सविस्तर बोलण्यासाठी विक्की पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली होती.यावेळी बोलतांना विक्की पाटील म्हणाले की २०१० पासून मी सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. सातत्याने शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून नागरिकांची काम करत होतो.पण यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची युती झाली. परिणामी प्रभाग क्रमांक ४ (अ )येथे मी इच्छुक असताना जागावाटपात ती जागा भाजपाच्या वाट्याला गेली. मात्र जनसेवेचा वसा मी घेतला असल्याने नागरिकांच्या सेवेकरिता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उमेदवारी दाखल करत निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. माझ्याकडे प्रचारासाठी खूप कमी अवधी होता. त्यातही माझ्यामागे पक्षाचे कोणतेही पाठबळ नव्हते. तरीही मी सुरुवातीपासून दारोदारी जाऊन  प्रचार करण्यावर भर दिला. मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद ही मला प्रचारादरम्यान मिळत होता.माझ्या मतदारसंघात अनेक उच्चभ्रू सोसायटी ही येतात. पण या निवडणुकीत माझ्या मतदार संघातील अनेक उच्चभ्रू सोसायटीमध्ये उमेदवारांना प्रचारासाठी प्रवेशच नाकारला जात होता. या येथे अनेक उमेदवारांना मतदारापर्यंत पोहचूच दिले गेले  नाही.याचा अनुभव मी माझ्या प्रचाराच्यावेळी स्वतः त घेतला आहे. आम्हाला प्रचारादरम्यान सोसायटीच्या प्रवेशद्वारावर रोखले जात होते. हा एक प्रकारे लोकशाहीचा अपमान आहे.असा आरोप विक्की  पाटील यांनी यावेळी बोलतांना केला.ही पद्धत लोकशाहीला घातक अशी आहे. हे रोखण्यासाठी  यासंदर्भात लवकरच आपण एक जनहित याचिका  न्यायालयात  दाखल करण्याचा   विचार सुरू केला आहे. अशी माहिती ऍड.विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना दिली.तसेच माझा या निवडणुकीत पराभव झाला असला तरी यापुढे मी एस. के. पाटील या माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरूच ठेवणार आहे. असे ही विक्की पाटील यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

नमुंमपा मुख्यालयात मतदार शपथ सामुहिकरित्या ग्रहण

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयात मतदार शपथ सामुहिकरित्या ग्रहण नवी मुंबई : भारत निवडणूक आयोग यांचेमार्फत प्राप्त निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्र सभागृहात सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिवसाची सामुहिक शपथ २३ जानेवारी रोजी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्यासमवेत सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक यांनी ग्रहण केली. नुकतीच नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारी रोजी सुव्यवस्थित रितीने पार पडलेली आहे व ५७.१५ टक्के नागरिकांनी मतदानात सहभाग नोंदविलेला आहे. जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असणारा भारत देश १०० कोटी मतदार नोंदणीकडे वाटचाल करत असून यावर्षीच्या १६ व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची ‘My India, My Vote’ ही संकल्पना घोषित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने देशातील प्रत्येक मतदाराने मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड, परिमंडळ २ चे उपआयुक्त संजय शिंदे, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव, कार्यकारी अभियंता प्रविण गाडे, सहा.आयुक्त अरुण पाटील तसेच महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक सुरेश वांदिले आणि महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक व युवक मोठया संख्येने उपस्थित होते. ‘आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणूकांचे पावित्र्य राखून व प्रत्येक निवडणूकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू’ – अशा आशयाची सामुहिक शपथ उपस्थितांनी ग्रहण केली.

नागरी संरक्षण दल प्रथमच प्रजासत्ताक दिन संचलनात

नागरी संरक्षण दल प्रथमच प्रजासत्ताक दिन संचलनात चीफ वॉर्डन आमदार संजय केळकर यांची माहिती अनिल ठाणेकर ठाणे : येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ठाण्यात होणाऱ्या संचलनात नागरी संरक्षण दलाचा (सिव्हिल…

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांचा सत्कार अनिल ठाणेकर मुंबई: न्यायप्रिय व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर असतील, तोपर्यंत आपल्या संविधानाला आणि लोकशाहीला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या सन्मानार्थ मुंबई उच्च न्यायालयात आयोजित भव्य सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. आधी अवघा ९ टक्के असलेला महाराष्ट्राचा दोषसिद्धी दर आज ४५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे आणि तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे,” सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.याचवेळी, कोल्हापूरच्या बहुप्रतीक्षित सर्किट बेंचला त्यांच्या कार्यकाळातच पूर्ण बेंचचा दर्जा देण्याची विनंती त्यांनी सरन्यायाधीशांकडे केली. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना न्याय अधिक जलद आणि सुलभपणे मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.मुंबई उच्च न्यायालयाच्यावतीने आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी न्याय, संविधान आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित भारताच्या न्यायव्यवस्थेचा गौरव केला. “न्यायमूर्ती सूर्यकांत यांचे कार्य सूर्याप्रमाणे प्रकाशमान असून सामान्य नागरिकांना न्यायाची ऊर्जा देणारे आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या शौर्यपरंपरेचा उल्लेख करत शिंदे यांनी दोन्ही भूमींच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशावर भाष्य केले. “देश आज सुरक्षित आहे, कारण आपल्या सीमांवर जवान डटून उभे आहेत आणि शेतकऱ्यांच्या श्रमातून समृद्धी निर्माण होत आहे,” असे त्यांनी सांगितले.हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि न्यायनिष्ठेच्या बळावर देशाच्या सर्वोच्च न्यायपीठापर्यंत मजल मारल्याचे नमूद करत, शिंदे यांनी त्यांच्या जीवनप्रवासाला प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी ठरवले. धारा ३७० रद्द करण्याचा निर्णय, वन रँक वन पेन्शन योजना, मतदार याद्यांशी संबंधित महत्त्वाचे आदेश, महिलांसाठी आरक्षणासंदर्भातील निर्देश तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत दिलेले ठाम निर्णय यांचा उल्लेख करत त्यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या न्यायनिष्ठेचे कौतुक केले. “आपल्या निर्णयांमुळे जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे,” असे ते म्हणाले.पर्यावरणपूरक विकासावर भर देताना शिंदे यांनी चारधाम प्रकल्पासारख्या निर्णयांचे उदाहरण दिले. “विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे हीच आजची खरी गरज आहे. पर्यावरण संवेदनशील विकासाची दिशा आपल्या निर्णयांतून स्पष्टपणे दिसते,” असे शिंदे यांनी नमूद केले.राज्यातील न्यायव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, २०२२ पासून राज्यात ३२ नवीन न्यायालयांची स्थापना करण्यात आली असून त्यात १४ अतिरिक्त सत्र न्यायालयांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी नव्या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दोषसिद्धी दराबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “या आधी महाराष्ट्राचा कन्विक्शन रेट केवळ ९ टक्के होता. आज तो ४५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, येथेच न थांबता तो ६० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ वाढवण्यावर सरकार भर देत आहे.” लोकशाहीतील न्यायपालिकेच्या महत्त्वावर भाष्य करत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाबाबतचे विचार उद्धृत केले. “संविधान कितीही चांगले असले तरी ते अंमलात आणणारे लोक न्यायप्रिय असतील, तरच लोकशाही अधिक बळकट होते,” असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या उत्तम आरोग्य आणि यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि मुंबई उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीश आणि वकील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते या सर्व पदांवर भाजपचा दावा – संदिप लेले

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते या सर्व पदांवर भाजपचा दावा – संदिप लेले शिवसेनेने भाजपचा यथोचित सन्मान ठेवावा – आमदार निरंजन डावखरे अनिल ठाणेकर ठाणे : ठामपात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदे भाजपकडेच राहावीत, यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत आहे, असे जाहीर उद्गार ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी काढले. तर सत्तेतील मित्रपक्षाने( शिवसेनेने) यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे, असे मत आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. ठाणे वर्तकनगर येथील भाजपच्या मुख्य पक्ष कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होते.या बैठकीत भाजपच्या गटनेतेपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या २७ जानेवारी रोजी भाजपच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. तसेच महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारे पद परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपला सामावून घ्यावे, भाजप पक्षामध्ये देखील अनुसुचित जाती प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आले आहेत. सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचासुद्धा विचार मित्रपक्षाने करावा, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

‘मुस्कान ऑपरेशन’ अंतर्गत हरवलेल्या मतिमंद बालकाचा पालकांशी यशस्वी पुनर्मिलाप

‘मुस्कान ऑपरेशन’ अंतर्गत हरवलेल्या मतिमंद बालकाचा पालकांशी यशस्वी पुनर्मिलाप ठाणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत चाइल्ड प्रोटेक्शन युनिट (CPU) यांनी “मुस्कान ऑपरेशन” दरम्यान हरवलेल्या एका मतिमंद विशेष बालकाचा यशस्वी शोध घेऊन त्यास त्याच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द केले आहे.सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव,सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे (शोध–२) यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली चाइल्ड प्रोटेक्शन युनिट (CPU), ठाणे येथील म.पो.उपनि. शिंदे व मपोशि ७०२२ / यादव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. १९ जानेवारी रोजी सुमारे १७ वर्षांचा मुलगा हा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे विना पालक आढळून आला होता. त्यानंतर त्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात दाखल करण्यात आले होते. ९ जानेवारी रोजी पोलीस हवालदार तानाजी गायकवाड यांनी बालगृहास भेट दिली असता सदर बालकाबाबत सविस्तर माहिती प्राप्त झाली.सदर बालक मतिमंद असल्याने तो नीट बोलू शकत नव्हता. मात्र, त्याच्याकडून मिळालेल्या मर्यादित माहितीतून – वडिलांचे नाव आलमगीर, नमाजची ओळख व मुंब्रा परिसराचा अंदाज – CPU पथकाने शोधकार्य सुरु केले. मुंब्रा व शिळ–डायघर पोलीस ठाण्यात तपास केला असता कोणतीही तक्रार नोंद नसल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर स्थानिक मशिदींचे मौलवी, धार्मिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शाळांचे व्हॉट्सॲप गट तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून बालकाचा फोटो व माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली. समाजमाध्यमांद्वारे प्राप्त माहितीनुसार २३ जानेवारीला बालकाची आई मोहीबोनीसा यांनी CPU, ठाणे येथे संपर्क साधला. त्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे मुलाची ओळख मोहम्मद इमरान आलमगीर अशी पटवून दिली. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे बालकानेही आपल्या आईस ओळखले.त्यानंतर सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून डेव्हिड ससून बालगृह, माटुंगा येथे बालकास बालकल्याण समिती (CWC), मुंबई समोर सादर करण्यात आले व समितीच्या आदेशानुसार त्यास त्याच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.ठाणे पोलीस आयुक्तालय नागरिकांना आवाहन करते की, कोणतेही हरवलेले किंवा बेवारस बालक आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क करावा.

अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा

अशोक गायकवाड रायगड- कर्जत : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांनी शुक्रवार, २३ जानेवारीला कर्जत येथील प्रशासकीय भवनातील उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) कार्यालय व तहसील कार्यालयास भेट देऊन निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सुरू असलेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक प्रक्रियेसंदर्भात विभागप्रमुख, क्षेत्र अधिकारी व टीम लीडर्स यांच्यासोबत बैठक घेतली. तसेच कर्जत तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्या बरोबर थेट संवाद साधून निवडणूक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. क्षेत्रीय यंत्रणेला कामकाजादरम्यान भेडसावणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यास प्रशासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या पाहणी व बैठकीदरम्यान कर्जत निवडणूक निरीक्षक तथा अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, कर्जत उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, कर्जत तहसीलदार डॉ धनंजय जाधव कर्जत पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड, कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, कर्जत पंचायत समिती गट विकास अधिकारी सुशांत पाटील, निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत, अधीक्षक माथेरान सुरेंद्रसिंग ठाकूर, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटूंबे, कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सह दुय्यम निबंधक कर्जत-१, श्रीमती शरयु सावंत, पुरवठा निरिक्षण अधिकारी रविंद्र दळवी, महसूल सहायक संदीप गाढवे, महसूल सहायक जगन्नाथ उबाळे, महसूल सहायक जयंत दबडे, रायगड जिल्हा ग्राम महसूल संघाचे माजी अध्यक्ष तथा मंडळ अधिकारी कळंब, संतोष जांभळे, महाराष्ट्र राज्य ग्राम महसूल संघाचे महिला प्रतिनिधी तथा मंडळ अधिकारी पाथरज, श्रीमती किरण बेलोसकर, तालुका अध्यक्ष प्रवीण गवई, ग्राम महसूल अधिकारी, सजा नांदगाव निलेश पवार, मंडळ अधिकारी चिंचवली श्रीमती वैशाली पाटील, मंडळ अधिकारी कर्जत, श्रीमती शितल मोरे, मंडळ अधिकारी नेरळ, विश्वास गडदे, मंडळ अधिकारी कडाव, अशोक बनसोडे तसेच तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी संबंधित कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार असून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुस्थितीत खोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच मतदारांच्या सोयीसाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध असून, त्याद्वारे मतदारांना आपले नाव व मतदान केंद्राची माहिती सहज मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कर्जत तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी गट संख्या ६ व पंचायत समितीसाठी गण संख्या १२ असून एकूण २२० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. तालुक्यातील एकूण मतदारसंख्या १ लाख ७० हजार ७०२ इतकी असून त्यामध्ये ८४ हजार ७७७ पुरुष व ८५ हजार ९२५ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूणच अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) विकास खरगे यांच्या भेटीमुळे व मार्गदर्शनामुळे निवडणूक यंत्रणेत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन मिळाले असून ही भेट सर्वांसाठी प्रेरणादायी व उपयुक्त ठरल्याची भावना व्यक्त करण्यात आली.