Author: bittambatami.com

ठाण्याहून नाशिक, पुण्याचा प्रवास होणार सुसाट

वडपे महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात ठाणे : माजिवडा पुलापासून सुरू झालेला ठाणे-वडपे महामार्ग लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. ठाणे वडपे हे अंतर २२ किलोमीटरचे आहे. त्यातील १३ किलोमीटर रस्ता रुंदीकरणाचे काम रात्रंदिवस सुरू आहे. माजिवडा ते साकेत पुलापर्यंत रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आगामी दहा-पंधरा दिवसांत नाशिककडे जाणाऱ्यांना तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्यामुळे मुंबई, अहमदाबाद, नवी मुंबईतून माजिवडामार्गे नाशिककडे जाणाऱ्या मार्गावरील कोंडीचा तिढा सुटणार आहे. साधारणतः गेल्या दोन वर्षांपासून ठाणे-वडपे महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. दुतर्फा १२ पदरीचा हा महामार्ग आहे. त्यात दोन्ही बाजूला दोन-दोन पदरी सेवा रस्त्याचा समावेश आहे. यापैकी नाशिककडे जाणाऱ्या लेनचे काम जलदगतीने पुढे सरकत आहे. माजिवडा ते साकेत पुलाच्यादरम्यान असलेल्या मार्गाचे दोनपदरी सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झाले आहे. लोढा संकुलजवळ रस्त्याखाली सुरू असलेल्या मोठ्या गटाराचे कामसुद्धा पूर्ण झाले आहे. त्यावरून नाशिककडे जाणारी वाहतूक सुरू आहे. दरम्यान, याच मार्गिकेला लागून आणखीन दोनपदरी काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे कामदेखील रात्रंदिवस सुरू आहे. येत्या दहा-पंधरा दिवसांत ते होणार असल्याचे रचना कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सांगण्यात आले आहे. तर, ठाणे ते वडपेदरम्यान सुरू असलेल्या या मार्गाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गावरून नाशिककडे जाणारी वाहतूक सुरू आहे. हे काम करण्यासाठी ४०० हून अधिक मनुष्यबळ कार्यरत आहे. ठाणे-वडपे मार्गाच्या खालून ६० नाले जात असून त्यांचे काम पूर्ण झाले आहे. या नाल्यांतील पाण्याला भूमिगत मार्गाने पुढे जाण्यासाठी रस्त्याखाली मोठे नाले बांधले आहेत. तर, रस्त्याच्या खालून वाहनांना पलीकडे जाण्यासाठी सहा भूमिगत भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. खारेगाव टोलनाका पूर्णपणे सपाट खारेगाव टोलनाका पूर्णपणे सपाट केला आहे. या ठिकाणी चारपदरी रस्ता रुंद केला आहे. येथूनच पुण्यासाठी वेगळा रस्ता निर्माण केला आहे. त्या रस्त्याचे ३०० मीटरचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने तो पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला केला आहे. खारेगाव टोलनाक्यापासून हा मार्ग मुंब्रा बायपासने पुढे पुण्याकडे जातो. नाशिककडे जाणाऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नाशिककडून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गाचे काँक्रीटीकरण आणि रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात येणार आहे. कोट कंपनीने हाती घेतलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दिवस-रात्र कामगारांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेत काम केले जात आहे. या मार्गावर सुमारे ७०-८० टक्के काम पूर्ण झाले आहे. – सचिन पाटील, अभियंता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव आमची पॅशन – जितेंद्र आव्हाड

ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे ज्या पक्षात आहेत, त्यांच्या मातृसंस्थेने संविधानाला विरोध केला होता. आता शहांच्या विधानाने भाजपच्या मनात काय आहे, ते उघडकीस आले आहे, अशी टीका राष्ट्रवादी…

मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार

मुंबई : राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणे पहाटेच्या वेळी गोठवणारा गारठा मुंबईत फारसा नसला तरी मागील दोन तीन दिवसांपासून गारवा जाणवत आहे. तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज…

– वरळीतील महिलांचा शौचालयासाठी आंदोलनाचा इशारा

 सागरी किनारा बांधून होतो, पण शौचालयाला मुहूर्त नाही मुंबई : वरळीतील महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टीवासियांनी सार्वजनिक शौचालयाच्या मागणीसाठी रविवारी आंदोलन केले. विशेष म्हणजे ही झोपडपट्टी सागरी किनारा मार्गाला लागूनच आहे. एकाबाजूला महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सागरी किनारा बांधला, तर दुसरीकडे वर्षभरापासून झोपडपट्टीवासियांसाठी शौचालय बांधण्याचे काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे हा विरोधाभास रविवारी या आंदोलनाच्या निमित्ताने स्पष्ट दिसून आला. वरळी येथील महात्मा फुले नगरमधील झोपडपट्टीत सुमारे बाराशे कुटुंबे राहतात. या परिसरातील शौचालयाचे बांधकाम मुंबई महापालिकेने वर्षभरापूर्वी बंद केले. येथील रहिवाशांसाठी मुंबई महापालिकेने एक तात्पुरते फिरते शौचालय दिले आहे. मात्र या शौचालयाची स्वच्छता केली जात नाही, या शौचालयात पाण्याची सुविधा नाही, तसेच शौचालयाचा परिसरही अस्वच्छ आहे. त्यामुळे या परिसरात रोगराई पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीला कंटाळून येथील रहिवाशांनी रविवारी या परिसरात मोर्चाचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी न दिल्यामुळे रहिवाशांनी पोलिस ठाण्यात निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. या शौचालयाचे काम तीन दिवसांत सुरू करावे आणि एक महिन्याच्या आत शौचालयाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी या परिसरातील महिलांनी केली आहे. मुंबईतील ६० टक्के जनता झोपडपट्टीत राहते. येथील नागरिकांना सार्वजनिक शौचालयांशिवाय (कम्युनिटी टॉयलेट) पर्याय नसतो. मात्र बहुतांशी ठिकाणच्या शौचालयांची दूरवस्था झाली आहे. काही ठिकाणी शौचालये मोडकळीस आली आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याचीही शक्यता असते. शौचकूपांची संख्या कमी असल्यामुळे एकेका शौचकूपाचा वापर मोठ्या संख्येने होतो. यावर उपाय म्हणून पालिकेने वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत वस्त्यांमधील शौचालयांची संख्या वाढवण्याचे ठरवले आहे. गेल्यावर्षी पालिकेने लॉट ११ या उपक्रमांतर्गत २२ हजार शौचकूप बांधण्याचा संकल्प सोडला होता. त्यापैकी बहुतांशी कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी लॉट १२ अंतर्गत आणखी शौचालये बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हाडाचीही शौचालये ताब्यात घेण्यात येणार असून त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे. एकमजली शौचालयांची पुनर्बांधणीही करून त्याजागी दुमजली शौचालये बांधण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी नव्याने शौचालय बांधले जाणार आहे. त्याकरीता लॉट १२ अंतर्गत पहिल्या टप्प्यात ५५९ शौचालये बांधण्यात येणार असून त्यामुळे संपूर्ण मुंबईत एकूण १४,१६६ नवीन शौचकूपांचे बांधकाम केले जाणार आहे. मात्र काही ठिकाणी कंत्राटदार शौचालय बांधणीसाठी उशीर करतात व त्यामुळे रहिवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागतो.

एसटीत इलेक्ट्रिक बस सुरू करणार – प्रताप सरनाईक

ठाणे : एसटी बस महामंडळात टप्याटप्याने इलेक्ट्रिक बस सुरू करणार आहोत. अगदी ग्रामीण भागात देखील इलेक्ट्रिक बस सुरू केल्या जातील. त्यासाठी ग्रामीण भागात सुद्धा चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती परिवहन…

उत्पादन घटल्याने अर्ली द्राक्षांना अधिक दर

 निर्यातीतील अडथळे कायम हरिभाऊ लाखे नाशिक :अवकाळी पावसाने उत्पादनात घट झाल्यामुळे हंगामपूर्व द्राक्षांना (अर्ली) प्रति किलोस १४० ते २०० रुपयांपर्यंत दर मिळत आहेत. आखाती देशांसह रशियात निर्यात सुरू झाली असताना लाल समुद्रातील तणावाने व्यापारी मार्गात अडचणी कायम आहेत. त्यामुळे युरोपीय बाजारात पोहोचण्यासाठी जहाजांना केप ऑफ गुड होपला वळसा घालावा लागत असल्याने अधिक दिवस लागत आहेत. जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव आणि देवळा या तालुक्यांमध्ये हंगामपूर्व द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यंदा पावसाळा अधिक लांबला. त्यातच अवकाळीने नुकसान झाले. परिणामी, द्राक्ष उत्पादनात घट होणार असल्याकडे महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी लक्ष वेधले. हंगामपूर्व द्राक्ष उत्पादनातून ते दिसून येत असून उत्पादन कमालीचे घटल्याने या द्राक्षांना गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के अधिक दर मिळत आहे. लाल रंगाच्या क्रिमसनला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळाल्याचे बागलाण येथील उत्पादक खंडू भुयाने यांनी सांगितले. अन्य द्राक्षांना १४० ते १७५ रुपये दर आहे. या भागातील हंगामपूर्व द्राक्षे नाताळसाठी जगातील बाजारात पोहोचतात. युरोपीय देशांसह ब्रिटनमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. लाल समुद्रातील तणावामुळे जहाजांना केप ऑफ गुड होपमार्गे जावे लागते. आधीच्या (लाल समुद्रातील) मार्गाने द्राक्षमाल सुमारे दीड हजार डॉलर (प्रति कंटेनर) भाड्यात २० दिवसांत युरोपीय बाजारात पोहोचत असे. आता दुसऱ्या मार्गाने माल पोहचण्यास ३५ ते ५० दिवस लागतात. शिवाय दुपटीहून अधिक भाडे मोजावे लागत असल्याचे मॅग्नस फार्म फ्रेशचे लक्ष्मण सावळकर यांनी सांगितले. मागील वर्षी लाल समुद्रातील मार्ग अकस्मात बंद झाला. अन्य मार्गाने माल जाण्यात बराच कालापव्यय होऊन काही माल खराब झाला. वाढीव वाहतूक खर्चाचा भुर्दंड पडला. या नुकसानीमुळे जहाज कंपन्यांशी करार करताना निर्यातदारांनी सावध पवित्रा घेतला. घटलेले उत्पादन व वाहतुकीचे प्रश्न यामुळे चालू हंगामात आतापर्यंत १०० कंटेनर द्राक्ष निर्यात झाले. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण बरेच कमी आहे. निर्यातीला प्रोत्साहन देणारी केंद्र सरकारची अनुदान योजना बंद आहे. या संदर्भात द्राक्ष निर्यातदार संघटना सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. कोट प्रारंभी उत्पादनात काहीशी घट असली तरी फेब्रुवारी आणि मार्चनंतर नियमित द्राक्ष हंगाम सुरळीत होईल. एकूण उत्पादनाच्या तुलनेत १० टक्के द्राक्ष निर्यात होतात. त्यामुळे भारतीय द्राक्षांच्या एकूण निर्यातीवर कुठलाही परिणाम होणार नाही. जहाज कंपन्यांनी पर्यायी मार्गाने ३० ते ३५ दिवसांत कंटेनर युरोपात पोहचविण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे गतवर्षीसारखा त्रास होणार नाही, कमी वेळेत माल जाईल. मागील वर्षी १४ हजार ६०० कंटेनरमधून द्राक्ष निर्यात झाली होती. यावेळी निर्यातीचे प्रमाण तितकेच असेल, अशी सध्याची स्थिती आहे. -विलास शिंदे (प्रमुख, सह्याद्री फार्म्स, नाशिक) 00000

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचले उल्हासनगरच्या २६ विद्यार्थ्यांचे प्राण,

मद्यधुंद खासगी बस चालकावर कारवाई   कल्याण : उल्हासनगर येथील २६ खेळाडू विद्यार्थ्यांना विरार येथे घेऊन जाणाऱ्या खासगी बसच्या चालकाने मद्य सेवन केले होते. या बसचा चालक शुक्रवारी उल्हासनगर येथून निघून कल्याण शहरातून बस घेऊन जात होता. बस चालक वेडीवाकडी बस चालवत असल्याचे कल्याणमधील वाहतूक पोलिसाच्या निदर्शनास आले. पोलिसाने तात्काळ त्या बसला रोखून बस चालकाची मद्यसेवन तपासणी केली. चालकाने मद्य सेवन केले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मद्यधुंद अवस्थेत बस चालकाने ही बस विरारपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला असता तर वाटेत या बसची दुर्घटना घडण्याची शक्यता होती, अशी भीती वाहतूक पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी तात्काळ या बस चालकाला बसमधून उतरवून त्यांना मद्य सेवन करून बस चालविल्याबद्दल दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला, अशी माहिती कल्याण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली. वाहतूक पोलिसांनी दिलेली माहिती, अशी उल्हासनगर येथील एक खासगी बस जग्गु ॲकेडमीतील २६ विद्यार्थ्यांना घेऊन विरार येथे फूटबाॅल खेळण्यासाठी चालली होती. विरार येथील ग्लोबल शाळेत फूटबाॅल स्पर्धा होत्या. शुक्रवारी उल्हासनगर येथून विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली खासगी बस कल्याणमध्ये वालधुनी पुलावरून सुभाष चौकाकडे येत होती. रस्त्यावर वाहतूक नियोजनाचे काम करत असलेल्या वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांना खासगी बस चालक वाहतूक कोंडी नसताना बस वेडीवाकडी, वाहतुकीचे नियम तोडून चालवित असल्याचे लक्षात आले. वाहतूक पोलीस पाटील यांना बस चालका विषयी संशय आल्याने वाहतूक पोलिस पाटील यांनी तात्काळ पुढे जाऊन उल्हासनगरहून आलेल्या बस चालकाला बस थांबण्याचा इशारा केला. बस रस्त्याच्या बाजुला घेऊन वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांनी जवळील ब्रेथ ॲनालायझरच्या साहाय्याने खासगी बस चालक सुरेंद्र प्रसाद गौतम यांची मुख तपासणी केली. या तपासणीत चालक गौतम यांनी मद्यसेवन केले असल्याचे आढळले. वाहतूक विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खासगी बस चालकाच्या मालकाला ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही असे नियोजन करून उल्हासनगरची खासगी बस कल्याणच्या वाहतूक विभागाने जप्त केली. वाहतूक पोलीस सुरेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. वाहतूक विभागाच्या वरिष्ठांनी पाटील यांच्यासह पथकाचे कौतुक केले. उल्हासनगर मधील एक खासगी बसचा चालक विद्यार्थी घेऊन विरार येथे जात होता. या बसच्या चालकाने मद्यसेवन केले असल्याने त्यांच्यावर दहा हजार रूपये दंडाची कारवाई करून बस जप्त करण्यात आली. हवालदार पाटील यांच्या हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने मोठी दुर्घटना टळली. राजेश शिरसाट वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग. कल्याण.

 ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनीच स्विकारावे

 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची इच्छा   ठाणे : जेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले. तेव्हापासून ठाणे जिल्ह्याला विकासाची नवी झळाळी मिळाली. ठाणे जिल्हा विकासाकडे जाऊ लागला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्याला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून ठाणे जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद एकनाथ शिंदे यांनाच मिळावे अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. पालकमंत्री पदावरून महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे, गणेश नाईक आणि प्रताप सरनाईक यांना मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात कोणाला पालकमंत्री पद मिळेल यावरून चर्चा सुरू आहे. रविवारी खोपट आगाराच्या पाहाणी वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पद स्विकारावे अशी इच्छा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. जेव्हापासून एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आले. तेव्हापासून ठाणे जिल्ह्याला विकासाची नवी झळाळी मिळाली. ठाणे जिल्हा विकासाकडे जाऊ लागला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जिल्ह्याला करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून ठाणे जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यामुळे शिंदे यांनीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्विकारावे आणि ठाणे जिल्ह्याचा विकास करावा असे सरनाईक म्हणाले. 00000

 राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पहिल्याच दिवशी ॲक्शन मोडवर

 खोपट बस स्थानकाची केली पाहणी   ठाणे : नुकतेच राज्याच्या मंत्रिमंडळाचे खाते वाटप करण्यात आले. राज्याच्या परिवहन मंत्री पदाची प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली. लगेच रविवारी सकाळी प्रताप सरनाईक यांनी खोपट येथील बस स्थानकाचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे यांनी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी खोपट बस आगार येथे इलेक्ट्रिक बस सेवा उद्घाटन प्रसंगी परिवहन सेवा, बस आगार व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा सुधारण्याकरिता काही सूचना दिल्या होत्या. सदर सूचनांची अंमलबजावणी प्रत्यक्षात झाली की नाही हे पाहण्याकरिता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी खोपट बस आगार भेट देऊन तेथील सेवा, व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधांबाबत आढावा घेतला.प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी तसेच कर्मचाऱ्यांना कामाचे सुसज्ज वातावरण देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना दिल्या. बस आगारात स्वच्छता गृह, प्रतीक्षालय आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उभारण्याचे निर्देश दिले. तसेच तेथील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.खोपट बस आगारातील अतिक्रमण तसेच गर्दुल्ले यांचा वावर त्वरित थांबवण्यात यावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या. तसेच राज्यातील सर्वच बस आगारांना भेट देऊन तेथील नियोजन व समस्यांचा आढावा घेणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ०००००