Author: bittambatami.com

स्वच्छता सायक्लॉथॉनमध्ये 500 हून अधिक सायकलपटूंचा सहभाग

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनीही सायकल चालवित घेतला प्रत्यक्ष सहभाग स्वच्छतेप्रमाणेच पर्यावरणहिताय उपक्रमांवरही ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भर देण्यात येत असून ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आयोजित करण्यात आलेली ‘स्वच्छता सायक्लोथॉन’ 500 हून अधिक सायकलपटूंच्या सहभागाने यशस्वीरित्या संपन्न झाली. विशेष म्हणजे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वत: सायकल चालवित या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वच्छता व पर्यावरणाचा संदेश प्रसारित केला. नमुंमपा मुख्यालयाच्या आयकॉनिक इमारतीपासून सुरू झालेली ही स्वच्छता सायक्लोथॉन मुख्यालयासमोरील सर्व्हिस रोडवरून पामबीच मार्गाने टीएसचाणक्य चौकापर्यंत गेली व तिथून वळून पुन्हा पामबीच रस्त्याने मुख्यालयासमोर सायक्लोथॉनची सांगता झाली. या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यात आला तसेच सायकलसारख्या इंधनविरहित वाहनाचा वापर वाढवून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचे तसेच स्वआरोग्य जपणुकीचे महत्वही प्रसारित करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, माजी आमदार संदीप नाईक, प्रशासन विभागाचे उपआयुक्त शरद पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ.संतोष वारूळे, सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे व शशिकांत तांडेल, कार्यकारी अभियंता राजेश पवार व इतर मान्यवर आणि सायकलपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुक्त महोदयांसमवेत उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ घेऊन प्रारंभ झालेल्या या स्वच्छता सायक्लोथॉनमध्ये सहभागी सायकलपटूंना सहभाग पदके देऊन सन्मानीत करण्यात आले. 7 वर्षांच्या लहानग्या सायकलपटूपासून 68 वर्षांपर्यंतचे 500 हून अधिक सायकलपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये सहभागी महिला सायकलपटूंची संख्याही लक्षवेधी होती. लेट्स सेलिब्रेट फिटनेस आणि द लर्नयार्ड या संस्थांच्या सहयोगाने आयोजित या सायक्लोथॉनव्दारे स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाचा संदेश प्रसारित करण्यासोबतच सायकल सारखे वाहन चालवून प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी असाही संदेश देण्यात आला. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत सोमवार, दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7 वा. महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन्सची सखोल स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली असून मंगळवार, 4 सप्टेंबरला सकाळी 8 वाजल्यापासून मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसीच्या सर्व मार्केट्समध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी याप्रसंगी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

वीजबिल सवलतीपोटी महावितरणला ४२ कोटी

मुंबई, ता. २१ : महावितरणकडून राज्यभरातील कृषीपंपधारकांना वीजपुरवठा केला जातो. अनुसूचित जाती घटकांना या दरात दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या रकमेच्या प्रतिपूर्तीसाठी महावितरणला सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून ४२ कोटींचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे वीजबिल थकबाकीचा सामना करणाऱ्या महावितरणला दिलासा मिळणार आहे. कृषीपंप ग्राहकांना वीजबिलात सवलत योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता चालू आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारने ११५ रुपयांची तरतूद केली आहे. त्यानुसार महावितरणही सातत्याने अनुसूचित जाती घटकातील कृषीपंपधारक ग्राहकांना सवलतीच्या दराने वीज पुरवते. त्यामुळेच सरकारने या बिलाची रक्कम महावितरणला देण्याबाबत निर्णय घेतला आहे. दरम्यान, महावितरण इतर गटांतील वीज ग्राहकांनाही सवलतीच्या दराने वीजपुरवठा करते; मात्र सवलतीची रक्कम वेळेत मिळत नसल्याची माहिती महावितरणच्या एका अधिकाऱ्याने दिली.

बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी समितीला ८ दिवसांची मुदत

 धारावी मशीद प्रकरण मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील धारावीमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीएमसी कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीरपणे मशीद पाडल्याच्या आरोपावरून येथे वाद निर्माण झाला. या विरोधात शेकडो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सध्या बीएमसीची टीम तेथून रवाना झाली आहे. याप्रकरणी पालिकेने बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी मशीद समितीला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तोपर्यंत बीएमसी मशिदीवर कोणतीही कारवाई करणार नाही. मात्र त्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मशिदीवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी मुस्लीम समुदाय न्यायालयात धाव घेणार आहे. त्याचवेळी स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. धारावीचे रहिवासी समरुद्दीन शेख म्हणाले, “मी धारावीत जन्मलो आणि लहानाचा मोठा झालो, ज्या इमारतीला बीएमसी आणि इतर अधिकारी बेकायदेशीर म्हणत आहेत, ती एका दिवसात बांधली गेली नव्हती. बांधायला अनेक दिवस आणि महिने लागले, मग अधिकारी कुठे होते? आज ते संरचनेला मशिदीचे स्वरूप आले आहे, त्यामुळे आता ते मशीद पाडणार असल्याचे सांगत आहेत. मुंबईतील धारावी येथील मेहबूब सुभानी मशिदीचा काही भाग बेकायदेशीर असल्याचे सांगत बीएमसी पाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. ही मशीद खूप जुनी असल्याचे येथील लोक सांगतात. अशा स्थितीत मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी बीएमसीचे अधिकारी पोहोचले तेव्हा आंदोलकांनी त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ००००  

दिवाळीपूर्वी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार ग्रॅच्युइटीच्या थकबाकीचे पैसे

 आयुक्त विकास ढाकणे यांचे आश्वासन उल्हासनगर – मृत्यूपूर्वी ग्रॅच्युइटी, रजा रोखिकरन आणि 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाची एकत्रित रकम आमच्या पदरात पडणार काय?अशी हाक देण्यासाठी शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दोन दिवस आंदोलन केल्यावर उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी दिवाळीपूर्वी ग्रॅच्युइटीच्या थकीत रकमेपैकी दरमहा 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे सेवनिवृत्तांनी कायद्याने वागा लोकचळवळचे राज असरोंडकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेले मृत्यूपूर्वीच्या आंदोलनाच्या लढ्याला यश आले आहे. तसेच आयुक्त विकास ढाकणे यांनी सोमवारी 23 तारखेला 7व्या वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेबाबत बैठक बोलावली असून त्यात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशी मिळायला हवी असलेली ग्रॅच्युइटी, सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि इतर लाभांची देणी पाच-दहा वर्षांपासून थकलेली होती. प्रशासनाकडून केवळ दरमहा दोन हजार रुपये देऊन या थकबाकीची तुटपुंजी भरपाई केली जात होती. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणारे सेवानिवृत्त कर्मचारी ‘कायद्याने वागा’ लोकचळवळीचे राज असरोंडकर, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली हक्क मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. कर्मचाऱ्यांनी संतप्त होऊन, ‘जर उपोषणा दरम्यान आमचा मृत्यू झाला तर आमच्या कुटुंबाला एकरकमी थकबाकी मिळावी,’ अशी मागणी केली होती. यामुळे परिस्थिती आणखी तणावपूर्ण होण्याची शक्यता होती. भाजपा आमदार कुमार आयलानी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष भारत (गंगोत्री) राजवानी, राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी आणि इतर नेत्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी आंदोलकांसोबत आयुक्त विकास ढाकणे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांना एकरकमी रक्कम मिळावी अशी मागणी केली.

देशामधील सर्वच मंदिरांतील प्रसादासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करा

 ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनची मागणी मुंबई : देशभरातील सर्वच मंदिरामध्ये वितरित करण्यात येणाऱ्या प्रसादाची उच्चस्तरीय तपासणी करावी, तसेच प्रसादाला विशेष दर्जा देऊन तो बनविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (एफएसएसएआय) पत्र पाठवून केली आहे. तिरुपतीस्थित श्री वेंकटेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटप केल्या जाणाऱ्या लाडवांच्या नमुन्यांमध्ये प्राण्याची चरबी आढळल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानमने स्पष्ट केले. देवस्थानमने भाविकांच्या भावना व विश्वास याच्याशी खेळ केला आहे. या प्रकरणाने देशभरातील भाविकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. तिरुपतीप्रमाणे देशातील विविध मंदिरांमध्ये प्रशासनाकडून लाडूच्या प्रसादाचे वाटप केले जाते. तिरुपती येथील प्रकरणानंतर या सर्व मंदिरांमधील प्रसादाची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच मंदिरांमधील लाडूच्या प्रसादाची उच्चस्तरीय समितीमार्फत तपासणी करावी. तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण त्यांच्या नियमांमध्ये सुधारणा करून प्रसादाला विशेष दर्जा द्यावा, तसेच प्रसाद बनविण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करावी. मुख्यत्वे प्रसादामध्ये कोणत्या घटकांचा वापर करू नये याची यादी जाहीर करावी. ही मार्गदर्शक तत्त्वे सात दिवसांमध्ये जाहीर करावी. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनने ‘एफएसएसएआय’ला पाठवलेल्या पत्रात केली आहे. तसेच यासंदर्भात तातडीने कार्यवाही न केल्यास या मुद्द्यावर न्यायालयात धाव घेण्यात येईल, असा इशाराही ऑल फूड ॲण्ड ड्रग लायसन्स होल्डर फेडरेशनचे अध्यक्ष अभय पाण्डेय यांनी दिला आहे. मंदिरात पुरवठा करण्यात येणारे तूप, दूध व अन्य पदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसते. तसेच त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून बाहेरील सुविधेचा वापरही केला जात नाही. मंदिराला साहित्य पुरवठा करणारे पुरवठादार त्याचाच फायदा घेत असल्याचे तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या प्रकरणातून उघडकीस आले आहे. त्यामुळे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणने स्थानिक अन्न व औषध प्रशासनाला त्यांच्या राज्यातील मंदिरांमध्ये अशा प्रकारे बनविण्यात येणाऱ्या प्रसादाची अधूनमधून तपसाणी करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणीही अभय पाण्डेय यांनी केली.

विरुद्ध दिशेकडील वाहतुक रोखण्यासाठी ठाण्यात ‘टायर किलर’

ठाणे : विरुद्ध दिशेने होणारी वाहतुक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने ठाण्यातील रस्त्यांवर टायर किलर (टोकदार उपकरणे) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हे ‘टायर किलर’ बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या भागात दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. घोडबंदर रोड तसेच अंतर्गत रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शुक्रवारी बैठकीचे आयोजन महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्र येथे करण्यात आले होते. या बैठकीस ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, महापालिका उपायुक्त दिनेश तायडे, शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, घोडबंदर रोडचे नोडल अधिकारी आणि कार्यकारी अभियंता संजय कदम यांच्यासह मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. विरुद्ध दिशेने वाहने चालविल्याने अपघात, वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर ‘टायर किलर’ बसवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अशी ठिकाणे वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत. त्यानंतर तेथे महापालिकेतर्फे टायर किलर बसवण्यात येतील. हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल. टायर किलर बसविल्याबाबतचे माहिती फलक १०० ते २०० मीटर अंतरावर लावण्यात येतील. या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाशझोत असल्याची खात्री केली जाईल. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचे निश्चित केल्यानंतर हे उपकरण बसवले जातील. या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल, असे महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. मागील दोन आठवड्यांत घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे. वाहतूक कोंडीपासून मुक्तीसाठी करीत असलेल्या या उपाययोजनांचा सातत्याने आढावा घेतला जात असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीच्या समस्येची तड लावण्यासाठी झालेल्या पहिल्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलेल्या कृती आराखड्यानुसार विविध यंत्रणांनी एकमेकाशी समन्वय राखून उपाययोजना केल्याची आल्याची माहिती वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली. तसेच, सध्या असलेल्या अडचणी व त्यावरील संभाव्य तोडगे यांचे विवेचनही त्यांनी केले. त्याचबरोबर, १२.५ टन वजन क्षमतेच्या पुढील वाहने ही अवजड वाहने आहेत. त्यात सरसकट सर्व मालवाहू वाहने येत नाहीत. त्यामुळे तशी काही मालवाहू वाहने दिसली तर गैरसमज होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. गायमुख घाट, भाईंदर पाडा ते गायमुख या पट्ट्यामध्ये अजूनही वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली. दीडशे ते दोनशे टन वजनाची वाहने गायमुख घाटातून जातात. त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो. येथे काँक्रिटीकरणाची आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता तांबे यांनी दिली. हा मार्ग आता मीरा-भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर, कापूरबावडी- माजीवडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेने असलेल्या वळण रस्ता, विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मेट्रो मार्गिकेलगत सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामामुळे तेथील मार्गिका अरुंद झाल्या आहेत. त्यामुळे सेवा रस्ते दुरूस्त करावेत अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली. त्यावर सेवा रस्त्यावरून अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आधी सेवा रस्त्याचे सक्षमीकरण करावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे “मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत”  “ठाणे विकास परिषदेचे” उद्घाटन संपन्न

Untitied-3   ठाणे : विकसित शहर घडविण्यासाठी प्रत्यक्ष अडचणी काय आहेत, यावर अभ्यास करून त्यावरील उपाययोजना शोधून त्या प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी,  “ठाणे विकास परिषद-2024”चे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या कार्यक्रमाचे डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर “मित्रा” चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, “मित्रा” चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर व अमन मित्तल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन.पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, एमएमआरडीचे विक्रमकुमार कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदू राणी जाखड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेने वापर करुन नियोजनबध्द आराखडा केला जात आहे. यानुषंगाने या विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विकास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी “ठाणे strategic प्लॅन” चे सादरीकरण केले. तद्नंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर आणि ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. “मित्रा” संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांनी  परिषदेच्या उद्देश व उद्दिष्टांची माहिती दिली. या विकास परिषदेत सर्वांसाठी घरे (Housing For All), माहिती व तंत्रज्ञान (Information and Technology), उद्योग 4.0 (Industries 4.0), पर्यावरण (Environment), आणि रोजगार निर्मिती (Employment Generation) या प्रमुख पाच मुद्द्यांवर शासनाचे अधिकारी व संबंधित क्षेत्रातील मान्यवरांमध्ये चर्चासत्रही संपन्न झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले.

वाढवण बंदराविरुद्ध एकजुटीने लढा उभारला पाहिजे-  रघुनाथदादा पाटील

Untitied-2   ठाणे : केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी व कष्टकरी कामगारांचे खूप नुकसान झाले आहे. वाढवण बंदरामुळे अनेक गावे प्रस्थापित होणारा असून मच्छीमार समाजाचे खूप नुकसान होईल,  त्यामुळे वाढवण बंदर रद्द करण्याच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे. असे स्पष्ट उद्गार शेतकऱ्यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी जाहीर सभेत काढले. भारतीय जीवन व पृथ्वी रक्षक चळवळीचे निमंत्रक ॲड. गिरीश राऊत यांनी १९ सप्टेंबर २०२४  रोजी दादर येथील धुरु हॉलमध्ये वाढवण बंदर रद्द करा या व इतर मागण्यांसाठी देशातील मान्यवरांची  एक संयुक्त सभा आयोजित केली होती. पर्यावरण अभ्यासक  ॲड. गिरीश राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, वाढवण बंदर,  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, बारसू रिफायनरी अशा महाकाय प्रकल्पामुळे पृथ्वीच्या पर्यावरणात दुरुस्त न होणारा हस्तक्षेप होणार आहे.  विकासासाठी राजकीय क्षेत्राने औद्योगिकीकरणाच्या रूढ चौकटीत विचार केल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही.  विकासाचे मॉडेल म्हणून देशापुढे ठेवलेले गुजरात बुडाले व बडोदा जाम नगरातील उच्चभृ वस्त्यांसह इतरही शहरात मगरीचा संचार सुरू झाला ही गोष्ट बोलकी आहे. महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे उपाध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी वाढवण येथे खोल समुद्र असल्यामुळे चांगल्या प्रकारची मच्छी मिळते. वाढवण बंदर झाल्यास मच्छीमारांचे खूप नुकसान होणार आहे. त्यामुळे मच्छीमार समाज या वाढवणं बंदराला शेवटपर्यंत  विरोध करणार आहे.सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. शशिकुमार मेनन यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की,  आम्ही नरीमन पॉइंट ते पालघर या समुद्रकिनाऱ्याचा संपूर्ण अभ्यास केला असून पालघर येथे होणारे वाढवण पोर्ट करू नये असा अभ्यासकांचा व शास्त्रज्ञांचा अहवाल असतानाही वाढवण बंदराचे भूमिपूजन झाले आहे. या ठिकाणी समुद्रात ३०  मीटर पाण्याची खोली असल्यामुळे मोठ्या बोटी लागू शकतात, त्यामुळे केंद्र सरकारने वाढवणे येथे पोर्ट बनविण्याचा विचार केला आहे. मात्र या पोर्टमुळे मच्छीमार समाज व स्थानिक लोकांचे खूप नुकसान होणार आहे. महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे  माजी सरचिटणीस सूर्यकांत बागल यांनी सांगितले की, समुद्रात भर घालून या बंदरासाठी पाच हजार एकर जागा सरकारने ताब्यात घेतली असून, या ठिकाणी वाढवण बंदर झाल्यास आवश्यक असणारी रस्ते वाहतूक व इतर सुखसोयी जमिनीवरच होणार आहेत, त्यामुळे अनेक गावे प्रस्थापित होतील. या सभेला ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये, पोर्ट  ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जनार्दन जंगले, प्रा. डॉ. सचिन बनसोडे, आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रणाली राऊत यांनी मानले.

कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे वाङमयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठवा – प्रा. डॉ. प्रदीप ढवळ

अनिल ठाणेकर ठाणे : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. सन २०२३ – २४ साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोकणातील सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त सभासदांनी पुस्तके पाठविण्याचे आवाहन कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे. या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे अकरा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी प्रथम श्रेणीच्या पुरस्कारासाठी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि द्वितीय व विशेष पुरस्कारासाठी प्रत्येकी तीन हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान केले जाणार आहे. यामध्ये प्रथम श्रेणी पुरस्कारात र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कविता संग्रह पुरस्कार, धनंजय कीर स्मृती आत्मचरित्र पुरस्कार, श्रीकांत शेट्ये स्मृती चरित्र पुरस्कार,  प्रभाकर पाध्ये स्मृती समीक्षा पुरस्कार, भाई भगत चित्रपट – नाट्य – विषयक पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्र. श्री. नेरुरकर स्मृती बालवाड्.मय पुरस्कार, वि. कृ. नेरुरकर स्मृती संकीर्ण पुरस्कार, फादर स्टीफन सुवार्ता वैचारिक पुरस्कार यांचा समावेश आहे. तर विशेष पुरस्कारामध्ये वि. वा. हडप स्मृती कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत स्मृती कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत स्मृती कविता पुरस्कार, अरुण आठल्ये स्मृती संकीर्ण पुरस्कार, रमेश कीर नाटक – एकांकिका पुरस्कार व सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी कोकणासह गोवा – कारवार – बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाणार आहे. पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी केंद्रीय कार्यवाह, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड ता. जि. रत्नागिरी – ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या पुरस्कारासाठी लेखक, कवी हे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई) या परिसरातील आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे आजीव सभासद असणे आवश्यक असून, तशा प्रकारचे कोमसाप जिल्हाध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत यासोबत जोडणे आवश्यक आहे. पुस्तकाचा वाङमय प्रकाराचा स्पष्ट निर्देश लेखकाने पुरस्कारासोबत करावयाचा आहे. वरील पुरस्कारासाठी पुस्तके ही १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत.

रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ठाणे लेक सिटीतर्फे

राष्ट्रीय हिंदी दिवस ठाण्यात संपन्न ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम व ठाणे लेक सिटीच्या सहकार्याने राष्ट्रीय हिंदी दिवस काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला. कालिदास लिखीत शाकुंतलम नाटकातील एका अंकाचे प्रख्यात लेखक पद्ममश्री शरद जोशी यांनी  लिहीलेल्या विनोदी नाट्य अंकाचे यावेळी वाचन करण्यात आले. शरद जोशी यांची कन्या रिचा यांचा यावेळी रोटरीच्या वतीने गर्व्हनर दिनेश मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रिमीयमच्या अध्यक्षा डॉ. सोनल बांगडे, रोटरी क्लब ऑफ लेकसिटीचे अध्यक्ष जगदीश चेलारामानी व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही रोटरी क्लबतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला रसिकानी भरभरून प्रतिसाद दिला. लेखिका दिग्दर्शक प्रीता माथुर ठाकुर, अतुल माथुर, रमेश कुमार, अमन गुप्ता, दुर्गेश बक्शी, लता संजय यांनी नाट्य प्रयोगाचे सादरीकरण केले. रोटरी क्लबच्या वतीने दरवर्षी हिंदी दिवस साजरा केला जातो, त्याचाच भाग म्हणून या नाट्य अंकाचे सादरीकरण प्रेक्षकांसाठी करण्यात आले. हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तिचा सन्मान आपण राखला पाहिजे, जेव्हा भाषेचा वापर दैनंदिन जीवनातून कमी व्हायला लागतो त्यावेळी आपण आपली संस्कृती, इतिहास विसरू लागतो, तेव्हा आपल्या भाषेचा अभिमान आपल्याला हवा असे मत रोटरीचे गर्व्हनर दिनेश मेहता यांनी व्यक्त केले. सुरूवातीला प्रास्ताविक डॉ. सोनल बांगडे यांनी केले तर, आभार जगदीश चेलारामानी यांनी मानले. रोटरीच्या विविध उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या  सहकाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.