Author: bittambatami.com

कपिल पाटील यांचे शहापूरला जादा पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे शहापूर : नागरीकरण वेगाने होणाऱ्या शहापूर शहराला जादा पाणीपुरवठा होण्यासाठी भातसा नदीतून वाढीव आरक्षण मंजूर करण्यासाठी माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले असून, शहापूरवासियांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहापूरमधील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी नगरपंचायतीमार्फत नवी पाणीयोजना साकारण्यात आली आहे. मात्र, भातसा नदीवरुन शहापूर शहरासाठी पाणी आरक्षण कमी असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याधिकारी शिवराज गायकवाड यांच्यासह नगरसेवकांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची काल शुक्रवारी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शहरासाठी वाढीव पाणीआरक्षण मंजूर करण्याची विनंती केली. सध्या शहापूर नगरपंचायत क्षेत्रासाठी भातसा धरणातून १.१८६ दशलक्ष घन मीटर पाणी आरक्षण मंजूर केलेले आहे. शहरात प्रती माणशी दैनंदिन १३५ लिटर वापर गृहीत धरला आहे. तर वाढत्या लोकसंख्येनुसार भातसा नदीवरुन ३.१२५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण देण्याचा प्रस्ताव नगरपंचायतीमार्फत जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आला आहे. भातसा नदीच्या क्षेत्रातील पाणी स्थानिक नागरिकांसाठी उपलब्ध करण्याची तरतूद आहे. त्यानुसार वाढीव पाणी आरक्षणासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे. शहापूरमधील नागरिकांची पाण्याची गरज भागविण्यासाठी कटीबद्ध असून, आपण या विषयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू. तसेच शहापूरवासियांना न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शहापूर नगरपंचायतीच्या शिष्टमंडळाला दिले. राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहापूरमधील वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी नगर पंचायतीमार्फत नवी पाणीयोजना साकारण्यात आली. मात्र, भातसा नदीवरुन शहापूर शहरासाठी पाणी आरक्षण कमी असल्यामुळे नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा गायत्री भांगरे, उपनगराध्यक्ष विजय भगत, भाजपाचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर, मुख्याधिकारी  शिवराज गायकवाड यांच्यासह नगरसेवकांनी माझी काल शहापूर येथे भेट घेतली. तसेच शहरासाठी वाढीव पाणीआरक्षण मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करण्याची विनंती केली. या मागणीसंदर्भात फडणवीस जी यांच्याबरोबर संपर्क साधला असून, लवकरच हा प्रश्न सुटेल. तसेच शहापुरातील प्रत्येक घरात पुरेसे पाणी उपलब्ध होईल.  

 कॅन्सर मुक्त रुग्णांसाठी `रोझ डे’ कार्यक्रम

ठाणे –  दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. सतीश कामत यांच्या आशा कॅन्सर ट्रस्ट तर्फे कॅन्सर मुक्त रुग्णांसाठी `रोझ डे’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत थोरले बाजीराव पेशवे हॉल, बेडेकर कॉलेज, चेंदणी नाका, ठाणे (प.) येथे होणाऱया या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 7304059239 या क्रमांकावर संपर्क साधावा.

मुंबईत स्वच्छतेचा जागर

Photo-6    मानवी साखळी, जनजागृतीपर पथनाट्यांचे आयोजन मुंबई : महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागात ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२४’ अंतर्गत शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. राडारोडा, घनकचरा संकलनाबरोबरच स्वच्छता प्रतिज्ञा, स्वच्छता संवाद, स्वच्छता फेरी, मानवी साखळी, जनजागृतीपर पथनाट्य आयोजित करून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच, स्वच्छता कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, विविध पर्यटनस्थळांवर शून्य कचरा मोहीम राबविण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार, महानगरपालिकेने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचे आयोजन केले आहे. यावर्षी स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांत शनिवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याअंतर्गत रस्ते – पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच दुभाजकांची स्वच्छता, सार्वजनिक भिंती – कचराकुंड्यांची स्वच्छता, बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण, फेरीवाला विरहित क्षेत्र, राडारोडामुक्त परिसर आदी कार्यवाही करण्यात आली. डी विभागात श्रीमद् राजचंद्रजी मार्ग (ऑपेरा हाऊस), बाळाराम मार्ग, एफ उत्तर विभागात वडाळा येथील बरकत अली नाका, शांतीनगर, जी दक्षिण विभागात लालबाग येथील गणेश गल्ली, एच पूर्व विभागात वांद्रे – कुर्ला संकुल, के – पूर्व विभागात मुळगाव डोंगरी येथील मेस्त्री औद्योगिक वसाहत, एल विभागात सम्राट अशोक मार्ग, बंटर भवन, एम पूर्व विभागात देवनार वसाहत, संविधान चौक, एम पश्चिम विभागात माहुल गाव, एन विभागात घाटकोपर पश्चिम येथील माता रमाबाई आंबेडकर नगर, पी दक्षिण विभागात मुख्य जोड रस्ता, अंतर्गत रस्ते, पी उत्तर विभागात मंडपेश्वर लेणी, आर दक्षिण विभागात काडसिद्धेश्वर मार्ग, एस विभागात कन्नमवार नगर, टी विभागातील मुलुंड पश्चिम येथील प्रभाग क्रमांक १०७ आदी ठिकाणी शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मुंबई स्वच्छ व सुंदर करण्याबरोबरच मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मुंबईला देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना मुंबईकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छता ही प्राथमिक गरज असून ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. यासाठी मुंबईकर नागरिकांची साथ आणि सहभाग महत्त्वाचा आहे. त्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले. मुंबईतील चौपाट्यांवर विशेष स्वच्छता मोहीम आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे जुहू, स्वराज्य भूमी, दादर, चिंबई, वेसावे, मढ व गोराई चौपाटीवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याबरोबरच बधवार पार्क, गेट वे ऑफ इंडिया, जमशेद बंदर, मार्वे किनारा, कार्टर मार्ग किनारा, माहीम रेतीबंदर, बँड स्टँड आदी ठिकाणीही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

शिंदे सरकारची नुसतीच घोषणा, अंमलबजावणी नाही

 अंगणवाडी सेविका पुन्हा आझाद मैदानावर मुंबई : वेतनवाढीची अंमलबजावणी रखडल्याने अंगणवाडी सेविकांनी उद्यापासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे. २५ सप्टेंबर रोजी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. उद्या सकाळी १० वाजता आझाद मैदानावर समितीमधील ७ घटक संघटनांचे २५ नेते बेमुदत उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. नेत्यांना पाठिंबा देण्यासाठी रोज १५० अंगणवाडी कर्मचारी २४ तासांच्या साखळी उपोषणाला बसणार आहेत. २५ सप्टेंबरला राज्यातील अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदान येथे कर्मचारी जेल भरो आंदोलनात सहभागी होणार आहेत. राज्यभरातील अंगणवाडीसेविकांना ३ हजार, मदतनिसांना २ हजार वेतनवाढ देण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विकास विभागाने घेतला होता. या निर्णयाला वित्तविभागाने वेतनवाढीच्या प्रस्तावाला मान्यताही दिली होती. मात्र, त्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती उपोषणाला बसणार आहेत. गिरणी कामगार देखील आंदोलन करणार गिरणी कामगार घरांसाठी २६ सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. २६ सप्टेंबरपासून गिरणी कामगार संघर्ष समितीकडून भारतमाता, लालबाग येथे धरणे व निदर्शने केली जाणार आहेत, तर २ ऑक्टोबर रोजी गिरणगावात लाँग मार्च काढण्यात येणार आहे. मफतलाल मिलसमोर खटाव मिलची जमीन मिळावी, मफतलाल गिरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सुरू करावी, घरासाठी जमीन मिळावी म्हणून मॅरेथॉन टॉवरसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.

बुधवारी जिल्हा परिषद शाळा बंद

 शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बदलापूर: शासनाच्या प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणात विरोधात राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात आंदोलनाचा निर्णय घेतला असून ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक येत्या बुधवार, २५ सप्टेंबरला सामूहिक रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या दिवशी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार आहेत. १५ मार्च रोजी शिक्षक संच मान्यता आणि ५ सप्टेंबरच्या कंत्राटीत शिक्षक भरती संदर्भातल्या शासन निर्णयामुळे २० पट असलेल्या शाळेमध्ये एक कायम तर एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. आधारवर संचमान्यता होत असल्याने दुर्गम भागात विद्यार्थी अधिक आहे. मात्र आधार नोंदणी नसल्याने अनेक शिक्षकांची पदे कमी होणार आहे. त्यामुळे शासनाचे हे धोरण डोंगरी दुर्गम भागातील तसेच वाडी- वस्तीवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहेत. शासनाच्या या निर्णयाविरोधात विद्यार्थी, शिक्षक पालकांमध्ये असंतोष आहे. तसेच शिक्षकांच्या अनेक मागण्या देखील आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा आणि शासकीय धोरणांचा विरोध करण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी त्रिस्तरीय असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या बुधवारी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद राहणार आहेत, अशी माहिती शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष संजय घागस यांनी दिली आहे. 000000

रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा

Photo-3   डोंबिवली : डोंबिवलीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुक्रवारच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या बदनामीचे आणि सामाजिक तेढ निर्माण करणारे फलक काही समाजकंटकांनी गुरूवारी मध्यरात्री डोंबिवली शहराच्या विविध भागात लावले होते. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री उघड होताच, वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरात दाखल झाले. हे फलक छपाई करणाऱ्या उल्हासनगरच्या जॉली प्रिंटर्सच्या मालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस असल्याने भाजपसह सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या शुभेच्छांचे फलक डोंबिवलीत लावले होते. रंगशाळा पब्लिसिटीचे संचालक आणि भाजप कार्यकर्ते विनय पालव यांनीही शहरातील मुख्य रस्ते, कमानी, चौक भागात शुभेच्छा फलक लावले होते. काही समाजकंटकांनी मंत्री चव्हाण यांना डिवचण्यासाठी ‘२० सप्टेंबर, हॅप्पी खड्डे-डोंबिवलीकर’ असा मजकूर असलेले फलक गुरुवारी मध्यरात्री घाईघाईने लावून मंत्री चव्हाण यांची, डोंंबिवलीकर सामाजिक संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती संचालक विनय पालव यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे फलक लावणाऱ्यांविरुध्द कारवाईची मागणी केली. हे फलक सामाजिक तेढ निर्माण करणारे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांची बदनामी करणारे असल्याने पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी डोंबिवलीत दाखल झाले. हे फलक उल्हासनगर येथील जॉली प्रिंटर्सच्या कामगारांनी लावले असल्याचे रंगशाळा पब्लिसिटीमधील कर्मचारी अजय डावरे यांनी पाहिले होते. पालव, डावरे यांनी ही माहिती पोलिसांना दिली. तातडीने विष्णुनगर पोलिसांचे एक पथक उल्हासनगरला गेले. रात्रीच जॉली प्रिंटर्सच्या मालकाला डोंबिवलीत आणले. तोपर्यंत रंगशाळाचे संचालक पालव आणि कामगारांनी समाजकंटकांनी शहरात लावलेले बदनामीकारक फलक काढले. हे फलक कोणाच्या सांगण्यावरून छापले याची माहिती जॉली प्रिंटर्सचे चालक पोलिसांना देण्यास टाळाटाळ करत होते. अखेर मंत्री चव्हाण यांची बदनामी करणे, समाजात तेढ निर्माण करणारे फलक लावणे आणि शहराचे विद्रुपीकरण केल्याने जॉली प्रिंटर्सच्या चालक, मालका विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात रंगशाळेचे विनय पालव यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. या फलकांवरून डोंबिवलीत गुरुवारी मध्यरात्री दोन ते सकाळी सहा वाजेपर्यंत तणावाचे वातावरण होते. एका हुन्नरी युवा नेत्याच्या इशाऱ्यावरून हे फलक लावण्यात आले असल्याची जोरदार चर्चा डोंबिवलीत सुरू आहे. डोंबिवलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण करून हा नेता तीर्थाटनासाठी शहराबाहेर निघून गेल्याची चर्चा आहे. या युवा नेत्यामागे एका वजनदार लोकप्रतिनिधीचा हात असल्याची शहरात चर्चा आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही राजकीय मंडळी मंत्री रवींद्र चव्हाण यांना आव्हानात्मक राजकीय परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामधुनच हा प्रकार घडला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. भाजप, शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी याविषयी गप्प आहेत.

माकपचा शहापूर तहसील कार्यालयावर “धडक मोर्चा”

अनिल ठाणेकर ठाणे : भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या. वतीने, नुकताच जमीन, पाणी, रोजगार, रेशन, वीज, या गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर हा मोर्चा काढण्यात आला होता. शहापूर बस स्थानक येथून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयात येऊन धडकला. जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेले होते. पोलिस अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाचा गेट बंद केला होता. परंतु आंदोलकांच्या आक्रमकतेपुढे शेवटी पोलिस अधिकाऱ्यांना गेट खोलावा लागला. वन जमिनी कसणाऱ्यांच्या १० एकर नावे वनपट्टे मंजूर करून सातबारा तयार करा, पेसा कायद्याप्रमाणे १७ संवर्गात असलेल्या सर्व रिक्त जागा त्वरित भरा, शेतीसाठी आणि पिण्यासाठी धरणांचे पाणी शेतकऱ्यांना पुरवा, रेशन व्यवस्थेचे सार्वत्रिकीकरण करा. रेशन कार्ड व रेशन संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करा, शेतकरी-शेतमजुरांचे कर्ज सरसकट माफ करा, अजनुप ग्रामपंचायत मधील वनदावे जे पडून आहेत त्याची पूर्तता करून ताबतोब निकाली काढण्यात यावे, अघई व दहिगाव ग्रामपंचायत मधील अंगणवाडी इमारत बांधकाम करा तसेच राजपुरी व शिरोळ ग्रामपंचायत मध्ये अंगणवाडी सुरू करा व अंगणवाडीतील आहाराचा दर्जा सुधारा, बेलनाला ते दहीगाव रस्त्याचे काम चालू करा, दहिगाव ग्रामपंचायत मधील तळवाडा, शिसवली, मनाचाआंबा, तुंबडेपाडा व काहडोल पोही ह्या लाईट देऊन तालुक्यात सर्व खेड्यापाड्यावर लाईटची व्यवस्था करा, धसई ग्रामपंचायत मधिल घरे तोडण्यासाठी  फॉरेस्ट खात्याने लावलेल्या नोटीसा तात्काळ रद्द करा, पेसा कायद्याप्रमाणे पेसा गावांना सर्व खेड्यापाड्यात सर्व सुविधांची व्यावसथा करा, शहापुर तालुक्यातील ७२ गावाना लावलेला ग्रीन झोन कायदा रद करा, खर्डी गावातील अखरपडीत जगेंचा घरांसाठी गावठाण द्या,  आदिवासी आश्रम शाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व अंघोळी साठी गरम पाण्याची व्यवस्था करा, आवाळे ग्रामपंचायत मध्ये ५% पेसा निधी व १५ वा वित्त आयोग निधीमध्ये केलेल्या भ्रष्टाचारांवर लवकरात लवकर कारवाही करा. ह्या मागण्यांना घेऊन पक्षाच्या शिष्टमंडळाने माकप तालुका सचिव भरत वलंबा, किसान सभा तालुका सचिव कृष्णा भावर, एसएफआय जिल्हा आधक्ष भास्कर म्हसे, डीवायएफआय तालुका अधक्ष नितिन काकरा, सीटू तालुका अधक्ष विजय वीशे, जनवादी महिला संघटना तालुका सचिव निकिता काकरा, नंदू खांजोडे, श्याम नीखडा, सोनू वाघ, दिलीप बोंगे यांनी तहसीलदार कासकोले, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, धसई रेंज RFO ठाकूर, पाणी पुरवठा अधिकारी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा होऊन लेखी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती दिली. आंदोलनाला माकप जिल्हा सचिव कॉ.किरण गहला, किसान सभा जिल्हा सचिव चंदू धांगडा, तालुका सदस्य आनंद रोज, मनोज काकवा, अशोक विशे, मनीष फोडसे,देवजी पनगा,बंडू खर्डीकर आदींनी उपस्थित राहून संबोधित केले.

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे, आपले ठाणे विकासाचं खणखणीत नाणे !

Photo-2    महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे इंजिन, तर एमएमआर महाराष्ट्राचे – एकनाथ शिंदे अनिल ठाणेकर ठाणे : महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन आहे. तर आपलं ठाणे विकासाचे खणखणीत नाणे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच येथे काढले. डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे “मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत” “ठाणे विकास परिषद-२०२४” चे आयोजन करण्यात आले  होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, “मित्रा” चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, महाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजू जैस्वाल मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, “मित्रा” चे सह मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील खोडवेकर व अमन मित्तल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पर्यटन विभागाचे संचालक बी.एन.पाटील, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, अतिरिक्त विकास आयुक्त प्रदीप चंद्रन, एमएमआरडीचे विक्रमकुमार, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदूराणी जाखड, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनु गोयल, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अजय वैद्य, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त अनिल पवार, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ आदी मान्यवरांची उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आपण मुंबई महानगर प्रदेशात पाच सेक्टर्समध्ये जर धोरणात्मक काम केले तर आपली अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता या मुंबई महानगर प्रदेशात आहे. यामुळे सर्वांना उद्योग, सर्वांना रोजगार, सर्वांना घरे, हरित ठाणे अशा सर्व गोष्टी साध्य करु शकतो. ठाण्यामध्ये काही गोष्टी सुरु होतात, मग नंतर त्या इतर सर्व ठिकाणी सुरु होतात, असा हा ठाण्याचा इतिहास आहे. महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होईल, इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. ते म्हणाले, शेतीनंतर रिअल इस्टेट जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. महाराष्ट्र आता जीडीपी मध्ये, परदेशी गुंतवणूकीत, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात अशा विविध क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आहे. देशाची जी एकूण गुंतवणूक आहे,त्यापैकी ५२ टक्के ही एकट्या महाराष्ट्राची आहे. अटल सेतू मुळे आपण आता मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त २० मिनिटात करू शकतो. या प्रकल्पाबाबत आधी फ्लेमिंगो पक्षी नाहीसे होतील अशी टीका करण्यात आली. मात्र पर्यावरण विषयक काम करर्णाया संस्थांनी प्रत्यक्षात फ्लेमिंगोंची संख्या दुप्पट झाल्याचा अहवाल दिला आहे. अटल सेतू हा मार्ग एक गेम चेंजर प्रकल्प ठरला आहे. समृध्दी महामार्गामुळे 8 तासात आपल्याला नागपूरला पोहोचता येते. लवकरच ठाणे ते बोरिवली प्रवास आपण 20 मिनिटात करू शकणार आहोत. ईस्टर्न फ्री वेचा विस्तार करण्यात येत आहे. विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरु होत आहे. असे विविध प्रकल्प साकारताना, विकासकामे करताना जास्तीत जास्त प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञान वापरले जात आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम लवकर पूर्ण होणार आहे. पालघरला  तिसरे विमानतळ तयार करीत आहोत. आपल्याकडे उद्योगासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी असल्यामुळे उद्योग आपल्या राज्यात येत आहेत. दाओसला जावून 1 लाख 37 कोटींच्या करारांवर स्वाक्षरी केली आहे. त्यातील बहुतांश उद्योगांचे कामही सुरु झाले आहे. ३ लाख ५० हजार कोटींच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत. नुकताच इलेक्ट्रॉनिक्स  सेमिकंडक्टर  चीप बनविण्याचाही प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. लवकरच इलेक्ट्रॉनिक्स  सेमिकंडक्टर  चीप बनविण्याच्या प्रकल्पासाठी 84 हजार कोटींचा करार होतोय. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पॉवर, स्टील, औषध निर्माण अशा विविध क्षेत्रातील उद्योग येत आहेत. मी सर्व अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत की, उद्योग क्षेत्रातील कोणतीही तक्रार येता कामा नये. माझ्याकडे तक्रार आलीच तर मी त्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करतो. राज्यात जास्तीत जास्त उद्योग आले तर राज्याची प्रगतीही जास्तीत जास्त होईल, यावर माझा ठाम विश्वास आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे की, ज्याने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थीला विद्यावेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. काही देश हे पर्यटन व्यवसायावर चालतात. आपल्या राज्याला तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. आपण विकासाची वर्गवारी केली आहे. त्यामुळे आपल्या राज्याचा विकास जलद होणार आहे. हे शासन विकासाला चालना देणारे आहे. ठाणेमधील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्या इमारतींमधील सर्वांना क्लस्टर  डेव्हलपमेंटच्या माध्यमातून हक्काचे घर देण्याचे काम सुरु केले आहे. सिडको आणि ठाणे महानगरपालिका हे काम करीत आहे. पहिल्या टप्प्यातील 17 हजार घरे बांधण्याचे  काम वेगाने सुरु आहे, असेही ते म्हणाले.पर्यावरण रक्षणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेने 1 लाख 25 हजार झाडे लावली आहेत. 21 लाख हेक्टरमध्ये बांबू  लागवड करीत आहोत. बांबू हा सर्वात जास्त ऑक्सिजन देतो. त्यामुळे बांबू लागवड पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त सिद्ध झाला आहे. आपल्या सर्वांना पर्यावरणाचे संतुलन राखावे लागेल, ही काळाची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. हे स्वप्न साकार करावयाचे असेल तर नीती आयोगाच्या अहवालातील सूचनांप्रमाणे काम करणे आवश्यक आहे. याबाबतीत “मित्रा” संस्थेने पुढाकार घेवून त्याप्रमाणे दिशा देण्याचे  काम केले आहे. ठाणे जिल्हयाची 48 बिलियन डॉलर अर्थव्यवस्था आहे, सन 2030 पर्यंत ती 150 बिलियन डॉलर होणे हे आपले उद्दिष्ट आहे. ठाण्याचा जीडीपी 7.5 टक्के आहे, हा जीडीपी 20 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठाण्यामध्ये विविध लोकोपयोगी प्रकल्प राबविण्यात येत आहे. यातूनच खड्डेमुक्त रस्ते, सेंट्रल पार्क, ब्लू सी, एसटीपी प्लँट, प्रदूषणमुक्त पाणी यासारखे विविध उपक्रम सुरु आहेत, असे सांगून ते म्हणाले की, विकास आणि कल्याणकारी योजना राबविणारे तसेच राज्याच्या प्रगतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अहोरात्र काम करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रशांत रोडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील उद्योजक, विद्यार्थी, अधिकारी आणि सामान्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 0000

‘भारत’ विश्र्व शांतीचे ‘उगमस्थान’ व आधारस्तंभ

जगात भारताला शांतीचे प्रतीक मानल्या जाते.विश्र्वशांतीची सुरूवात भारतानेच केली आणि पुढेही विश्र्व शांतीची जोत भारताकडून अशीच प्रज्वलित होत राहील हे आपल्याला जी-२० शिखर परिषदेवरून लक्षात येते.आज जगात शांती कशी प्रस्थापीत…

‌‘सेबी‌’प्रमुखांची चोहोबाजूंनी कोंडी

दखल कैलास ठोळे‌ ‌‘हिंडेनबर्ग‌’ने ‌‘सेबी‌’च्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्यावर केलेले ताजे आरोप, ‌‘सेबी‌’च्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविरोधात केलेले आंदोलन, आणि केलेले आरोप, एकाच वेळी लाभाच्या तीन पदांवर राहून त्यांनी घेतलेला फायदा,…