Category: होम

देशाच्या अमृतकालमध्ये प्रत्येक महिलेला उच्च शिक्षण देता यावे- कुलगुरु उज्वला चक्रदेव

मुंबई : देशात येत्या 25 वर्षात अमृतकाल साजरा करू, त्यावेळी आपल्या देशातील एकही महिला अशिक्षित राहणार नाही, प्रत्येक महिलेला हवे ते उच्च शिक्षण देता यावे, यासाठी आपली आणि एसएनडीटी विद्यापीठाचीही क्षमता वाढावी असे आपण स्वप्न पाहू या, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले. विद्यापीठातील डॉ. बाबाासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉ. संजय शेडमाके, विद्यापीठ कर्मचारी परिषदेचे पदाधिकारी, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. चक्रदेव पुढे म्हणाल्या, महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां महापुरूषांनीसमाज बदलायला हवा हे जाणले, यासाठी प्रत्येकानी विविध मार्ग स्वीकारले त्यात महिला ही एक केंद्रबिंदू आहे. शिक्षणाचे महत्व केवळ समाज बदलदंड होणे या पलीकडे माणूस बदलणे हा एक आहे. मी कोण आहे, माझे काय अधिकार आहेत, हे यातून कळते, यातून शिकता येते. भगवतगीतेतील दहाव्या अध्यायातील ३४व्या श्लोकातील तिसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्णाने महिलांसाठी सात गुण सांगितलेले आहेत. हे सात गुण आपण जाणलो नाही तर आपण आपले अधिकार जाणू शकत नाही, यामुळे आपले महत्व जाणून घेणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. महिलांच्या सबलीकरणासंदर्भात कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या, सबलीकरण हे आतून येते ते शिक्षणातून घडते. आपल्या विद्यापीठात शिक्षणातून महिलांचे सबलीकरण तोच विद्यापीठाचा उद्देश आहे. मात्र, यासाठी सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडून सहकार्य करावे, ज्यावेळी संधी मिळते, त्यावेळी तिचा पूर्ण लाभ, काळाचा उपयोग करून घ्यावा, महिलांच्या मनामध्ये तू सबल आहेस, तुझ्यासारख्या अनेक महिला भारताममध्ये आहेत, त्यांना तुझी गरज आहे, असे सांगणे आवश्यक असून हाच आपल्या विद्यापीठाचाही उद्देश असल्याचेही त्या म्हणाल्या.

 शेअर रिक्षांच्या भाडेवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी

ठाणे : दिवा शहरातील जवळपास 90% वाहतूक व्यवस्था ही रिक्षा वाहतुकीवर अवलंबून आहे. सुरवातीपासूनच दिव्यात शेअर पध्द्तीनुसार रिक्षा भाडे आकारणी केली जात आहे. नुकतेच दिवा शहरातील शेअर रिक्षा वाहतुकीचे दर हे रिक्षा युनियन कडून वाढवण्यात आले. ज्याची अंमलबजावणी दिनांक २१ एप्रिल २०२४ पासून करण्यात आलेली आहे. रिक्षा युनियनकडून करण्यात आलेल्या या दरवाढीला सर्वसामान्य नागरिकांकडून होत असलेला विरोध, भाडेवाढीवर नाराजी ही व्हॉट्स ॲप आणि फेसबुक या सामाजिक माध्यमांवरून दिसून येत आहे. तर रिक्षा युनियनला ही फोन करून व प्रत्यक्ष भेटून नागरिकांनी ही रिक्षा भाडेवाढीला विरोध दाखवला आहे. वास्तविक पाहता दिवा शहरातील मुख्य लोकवस्ती ही साधारणपणे दिवा रेल्वे स्थानकापासून एक ते साडे तीन किलोमीटरच्या पट्यात पसरलेली आहे. उदा. दिवा स्टेशन ते आगासन फाटक (3 किमी), दिवा स्टेशन ते बेडेकर नगर (2.1 किमी), दिवा स्टेशन ते गणेश नगर (1.9 किमी), दिवा स्टेशन ते ग्लोबल शाळा (1.6 किमी), दिवा स्टेशन ते दातिवली फाटक (1.7 किमी), दिवा स्टेशन ते विठ्ठल मंदिर- दातिवली (1.5 किमी), दिवा स्टेशन ते साबे जीवदानी मंदिर (1.5 किमी) प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) ने ठरवून दिलेल्या निर्देशाप्रमाणे मीटर नुसार रिक्षा वाहतुकीचे भाडे पहिल्या दिड किलोमीटर साठी 23 रुपये आकारले जाते. त्यानुसार जर साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळे पर्यंतचे अंतर हे अनुक्रमे 1 किमी आणि 1.6 किमी आहे. नवीन दरानुसार साबे- जीवदानी मंदिर आणि ग्लोबल शाळेपर्यंत 15 रुपये दर करण्यात आला आहे. तीन सीट प्रमाणे त्याचे मूल्यमापन केल्यास रिक्षाचालकला साधारणपणे 45 रु. मिळतात. मार्च 2020 लॉकडाऊन पूर्वी ग्लोबल शाळेकडून दिवा स्टेशनसाठी सीटमागे प्रत्येकी 10 रुपये आकारले जात होते. पण शासनाने त्यावेळी परिस्थिती अनुरूप रिक्षा मध्ये फक्त दोन प्रवासी बसवण्याची सक्ती केली होती म्हणून रिक्षा चालकांकडून 10 रुपयांच्या ऐवजी 15 रुपये आकारण्यास सुरवात करण्यात आली. नागरिकांनीही त्यास विरोध केला नाही, कारण त्यावेळची परिस्थिती तशी होती. पण काळानुरूप जेव्हा परिस्थिती सामान्य होऊन पूर्वीप्रमाणे रिक्षा प्रवासी संख्या सुरू करण्यात आली; तेव्हा मात्र रिक्षाचे वाढवण्यात आलेले भाडे तसेच ठेवण्यात आले, असे नागरिकांचे म्हणणे आहे. डोंबिवली स्टेशन पासून रिजेन्सी अनंतम गेट पर्यंत साधारण 20 रुपये शेअर ऑटोचे भाडे आकारले जाते. किलोमीटनुसार पाहायला गेल्यास हे अंतर अंदाजे 3 किलोमीटर आहे. त्या हिशोबाने दिव्यात नक्कीच रिक्षा भाडेवाढ जास्तच असल्याने नागरिक उघडपणे विरोध दाखवत आहेत. तर डोंबिवली सारखे दिव्यातील शेअर ऑटोचे दर देखील आकारले गेल्यास दिव्यातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच इतर शहारांप्रमाणे दिव्यातही मीटरनुसार रिक्षा सेवा वाहतूक विभागाने सुरू केल्यास त्याचा फायदा रिक्षा चालक आणि प्रवासी या दोघांनाही होऊ शकेल, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. ज्यांना शेअर भाडे जास्त वाटत असेल ते मीटर प्रमाणे रिक्षा वापरू शकतील. तर प्रादेशिक परिवहन विभागाने दिव्यातील दोन्ही रिक्षा युनियन आणि प्रवाशांशी चर्चा करून यावर सर्वसहमत असा मार्ग काढण्याची मागणी दिव्यातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

ठाण्याची हवा समाधानकारक

हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ च्या आत ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने शहरातील हवेच्या गुणवत्तेची तपासणी केली असून त्यात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. हवा प्रदुषण रोखण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि त्यातच वातावरणात झालेले बदल यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी दिवाळीच्या काही दिवस आधी मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खालावला होता. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेऊन पालिकांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार ठाणे महापालिकेने बांधकाम प्रकल्पांना नोटीसा बजावून धुळ प्रदुषण रोखण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरु केली होती. शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळून त्याद्वारे प्रदुषण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर शहरातील रस्ते पाण्याने धुण्यात येत होते. याशिवाय, सर्वंकष स्वच्छता मोहिम शहरात राबविण्यात येत होती. यामध्ये रस्ते आणि गल्लीबोळात साफसफाई केली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम काही दिवसांपुर्वी दिसून आले होते. शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १३० पर्यंत आले होते. यामुळे हवेची नोंद मध्यम गटात झाली होती. त्यापाठोपाठ आता शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ६५ ते ८५ दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शहरातील खालवलेला हवेचा स्तर आता काहीसा सुधारताना दिसून येत असून ठाणे शहरातील हवा गुणवत्तेची नोंद आता समाधानकारक गटात झाल्याचे दिसून येत आहे.

आम्ही आमचा झेंडा घेऊन लढणार – जमशेद अमीर खान

मुंबई :सर्व राजकीय पक्षांची ७० वर्षांची गुलामगिरी संपवून आता आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन ” अखिल भारतीय मुस्लिम लिग ( सेक्युलर ) ची लोकसभा लढाई लढणार आहोत. हिंदू , मुस्लिम, शीख, इसाई इतर सर्व धर्माचे पंथाचे सामान्य लोक एकत्र येऊन या लिग ची स्थापना केली आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी दिली. मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्या जोगव्यासाठी वापर केला जात आहे. आमचा आवाज संसद मधे कोण उठवणार ? हा प्रश्न आम्हाला वेळोवेळी सतावत होता. त्यामुळे आता आम्ही अखिल भारतीय मुस्लिम लिग ( सेक्युलर ) या पक्षाच्या माध्यमातून आमचाच पक्ष, आमचाच झेंडा, आमचाच उमेदवार अशी आम्ही लढाई सुरू केली आहे असे खान यांनी सांगितले. हायातुल्ला अब्दुल्ला शेख, मनान अब्दुल हक, निजाम खान, इमतियाझ, अली रहीम शेख असे पाच उमेदवार लोकसभेसाठी मुंबईतून उभे केले आहेत अशी माहिती लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी यावेळी दिली.

‘कोटपा’ कारवाईत  ई- चलनानेच व्यसनमुक्ती

रमेश औताडे मुंबई : तंबाखूच्या सेवनाचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम, तंबाखू कंपन्याकडून तरुण वर्ग आणि शालेय विद्यार्थ्याना ग्राहक म्हणून लक्ष्य करणे सुरु आहे. त्यामुळे सार्वजनिक धूम्रपान विरोधात ” कोटपा ” कारवाईची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच शासनाने कोटपा कारवाईत ई- चलन अंतर्भूत करावे, अशी आग्रही मागणी राज्यभरात तंबाखूच्या दुष्परिणामावर कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थाच्या समन्वय बैठकीत शासनाकडे करण्यात आली. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद, विटाल स्ट्रॅटेजिस्ट, टाटा मेमोरिअल सेंटर, राज्य राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोटपा कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी राज्यभरातील अशासकीय संस्थांची समन्वय बैठक मंगळवारी टाटा मेमोरिअल सेंटर खारघर येथे संपन्न झाली. या बैठकीत आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ.दिनेश सुतार, डॉ. प्रकाश गुप्ता, नगरपरिषद प्रशासन उपायुक्त सुवर्णा शिंदे, डॉ. राणा सिंग, डॉ. अर्जुन सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन भाषणात राज्यात सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी तसेच कोटपा २००३ कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अशासकीय संस्थानी सहकार्य करावे. कोटपाची कारवाई करताना चलनाचा प्रश्न निर्माण होतो. त्याबाबत शासन स्तरावर ई चलन कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ. दिनेश सुतार यांनी सांगितले. या बैठकीत राज्यभरातील तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाच्या जनजागृतीसाठी कार्यरत संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी तंबाखू कंपन्यांकडून सुरु असलेल्या छुप्या जाहिराती विरोधात जनहित याचिका दाखल करण्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच तंबाखूमुक्त शाळा, शैक्षणिक संस्था, परिसर करण्यासाठी कृती आरखडा तयार करण्यात आला. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत.  सार्वजनिक धूम्रपान गुन्हा आहे. तसेच कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना चलनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी ई चलन प्रक्रिया शासनाने सुरु करावी अशी मागणी करण्यात आल्याचे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था  प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले यांनी सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ पूर्ण

रत्नागिरी : अशोक गायकवाड रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार असून, यासाठी प्राप्त मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण राहुल यादव…

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या सोयगांव शाखेत पैशांचा ठणठणाट

सोयगांव : शेतकऱ्यांची हक्काची बॅक म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ची ओळख असून हीच बॅक आता शेतकरीवर्ग ला शाप ठरत आहे.सोयगांव शहरातील बॅके च्या शाखेत आपले हक्काचे पैसे पदरात पाडून घेण्यासाठी शेतकरीवर्ग ला चार ते पाच दिवसाचा कालावधी लागत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गा ला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्य सरकार ने सोयगांव तालुका दुष्काळग्रस्त घोषित केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने एक कोटी ७३ लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात दुष्काळग्रस्त अनुदान जमा केले तसेच श्रावण बाळ योजनेंतर्गत असलेल्या निराधारांच्या बॅक खात्यात एक कोटी ८० लाख रुपये अनुदान वाटप करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँके च्या सोयगांव शाखेत गेल्या पंधरा दिवसांपासून शासनाने जमा केले आहेत. परंतु बॅकेत पैशांचा ठणठणाट असल्यामुळे पंच्याहत्तर टक्के शेतकरी , निराधार लाभार्थी ना दिवसभर बॅकेत पैशे काढण्या साठी नंबर लावून घरी रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. त्या मुळे शेतकरी , निराधाराना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. बॅके च्या वतीने शेतकरी , निराधारांसाठी व्यवस्था नाही — सोयगांव शहराचे तापमान सध्या  , ४२ डिग्री सेल्सिअस तापमान आहे.  दुष्काळग्रस्त शेतकरीवर्ग व निराधार जेष्ठ नागरिक शासनाकडून आलेले अनुदान काढण्या साठी सकाळ पासूनच सोयगांव जिल्हा बॅक शाखेत नंबर लावून दिवसभर बसत आहे. बॅके च्या वतीने कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे उच्च तापमानात शाखे च्या बाहेर बसावे लागत आहे. त्यामुळे चक्कर येऊन पडणे अशा घटना घडत आहे. व त्यातच चार ते पाच दिवस बॅकेत पैसे मिळत नसल्यामुळे शेतकरी व निराधार जेष्ठ नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.एकंदरीतच शेतकऱ्यांची बॅक म्हणून ओळख असलेली जिल्हा मध्यवर्ती बँक आता शेतकरीवर्गाला शाप ठरत आहे. मुख्यालया कडूनच पैशांचा पुरवठा कमी सोयगांव  शाखे साठी आम्ही दररोज संभाजीनगर मुख्यालया कडे एक कोटी रुपयांची मागणी करतो. जेणेकरून शेतकरीवर्ग व निराधार जेष्ठ नागरिकांना वेळेवर अनुदान वाटप होईल. परंतु मुख्यालया कडून कमी प्रमाणात कॅश उपलब्ध होत असल्यामुळेच बॅकेत व ए.टी.एम मशीन वर पैशांची टंचाई जाणवत आहे. असे जिल्हा बॅक सोयगांव शाखेचे व्यवस्थापक  अनिल पाटील सोयगाव

महाकाय तुळई समुद्रात स्थापन,

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी मुंबई : किनारी रस्ता आणि वांद्रे – वरळी सागरी सेतूला सांधणाली पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत आज शुक्रवार, २६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी ही तुळई जोडण्यात आली. मध्यरात्री सुरू केलेल्या या कामाच्या वेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते. खुल्या समुद्रात भरती-ओहोटीचा अंदाज घेऊन तुळईद्वारे या दोन मार्गांना जोडण्याचे नियोजनमहानगरपालिकेने हाती घेतले होते. भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्याने महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पहाटे २ वाजल्यापासून सुरू झालेले हे काम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडले. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गगराणी यांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प पथकाचे अभिनंदन केले. एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूची सांधणी. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध योजना तयार केली. या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) गुरुवारी २५ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतू जवळ आणली होती. संयम आणि कौशल्य पणाला लावणारी १ तास २५ मिनिटे प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेवून पहाटे २ वाजेपासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानंतर बार्जच्या मदतीने टप्प्याटप्प्याने तुळई मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या मधोमध आणली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावत सुयोग्य स्थितीत तळईला स्थिर केले. मुंबई किनारी रस्त्याच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या मेटींग युनिटमध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटींग कोन ठिक ३ वाजून २५ मिनिटांनी अचूकपणे बसविण्यात आले. चारही मेटींग कोन आणि मेटींग युनिटची सांगड बसताच उपस्थित अधिकारी, अभियंते आणि कामगारांनी ‘हिप हिप हुर्रे’ म्हणत आणि टाळ्यांचा गजरात मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर तुळई खाली असलेला रिकामा तराफा बाजूला करण्यात आला. तुळईचा अंबाला ते मुंबई प्रवास ही महाकाय तुळई वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली आहे. तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून, १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे छोटछोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. तेथून तब्बल ५०० ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग दाखल आले. सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणली. तुळईवर होणार सिमेंट क्राँक्रिटीकरण मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.

सेवानिवृत्त सनदी अधिकारी अरविंद रेड्डी यांचे दुःखद निधन

पुणे : पुण्याचे निवृत्त साखर आयुक्त श्री. अरविंद रेड्डी यांचे आज पुणे येथे दुःखद निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यामागे आनंद आणि अमर ही दोन  मुले आहेत. त्यांनी ठाणे आणि धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले. पुण्यातील भव्य साखर आयुक्तालय उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते उत्तम खेळाडू होते. सेवानिवृत्तीनंतर ‘मुंबई मॅरेथॉन’च्या आयोजनाचे काम त्यांनी दोन दशके केले. उद्या त्यांच्यावर कोरेगाव पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

मुंबई – गोरखपूर, दानापूर १२ विशेष रेल्वेगाड्या

मुंबई : मध्य रेल्वे उन्हाळ्याची सुट्टी आणि निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना जाता यावे यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध केली आहे. प्रवाशांच्या मागणीला आणि अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दादर -गोरखपूर, एलटीटी – गोरखपूर आणि सीएसएमटी – दानापूरदरम्यान १२ अतिरिक्त अनारक्षित उन्हाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०१५ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २७ एप्रिल, १ मे आणि ४ मे रोजी दादर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०१६ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी गोरखपूर येथून २९ एप्रिल, ३ मे आणि ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता दादर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२७ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २६ एप्रिल, १ मे रोजी रात्री ११.५० वाजता एलटीटीवरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता गोरखपूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२८ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २८ एप्रिल, ३ मे रोजी गोरखपूरवरून दुपारी ३.३० वाजता सुटेल आणि एलटीटी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२.२५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५१ अनारक्षित विशेष रेल्वेगाडी २८ एप्रिल रोजी सीएसएमटी येथून रात्री ११.२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता दानापूर येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५२ अनारक्षित विशेष गाडी रेल्वेगाडी ३० एप्रिल रोजी दुपारी १.३० वाजता दानापूर येथून सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजता पोहोचेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.