Category: होम

निवडणूक आयोग इन अॅक्शन मोदी, राहुल गांधीना नोटीस

नवी दिल्ली : आदर्श आचार संहितेचे उल्लंगण केल्याप्रकरणी अखेर केंद्रीय निवडणूक आयोग इन अक्शन आल आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी या दोघांनाही आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस…

जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय

मुंबई : ॲन्टॉप हिल येथे एका जुन्या मोटरगाडीत दोन चिमुकल्यांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत्यू झालेले दोघे भाऊ-बहीण असून ते बेपत्ता झाल्याची तक्रार बुधवारी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मोटरगाडीत गुदमरून मुलांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. चिमुकल्यांच्या मृत्युमुळे परिसरात शोकाकुल वातावरण आहे. साजीद शेख (७) व मुस्कान (५) अशी या मुलांची नावे आहेत. वडील मोहाब्बत शेख व आई मुस्कान यांच्यासोबत ते ॲन्टॉप हिल परिसरात वास्तव्यास होते. ते दोघे बुधवारी दुपारी एकत्र खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ झाला तरी ते घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. मुले कुठेच न सापडल्याने अखेर त्यांच्या आई – वडिलांनी ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मुले बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मुले बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ त्यांचा शोध सुरू केला. मुले राहात असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासून आणि आजूबाजूच्या परिसरात शोध घेण्यात आला. मात्र मुले कोठेच सापडली नाहीत. अखेर सायंकाळी ७.४५ च्या सुमारास एका महिला पोलिसाने मोबाइलमधील टॉर्चच्या साह्याने जुन्या मोटरगाडीत पाहिले असता आत मुले असल्याचे आढळले. मोटरगाडीचा दरवाजा उघडला असता मुले बेशुद्धावस्थेत आढळली. त्यांना तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलीस मुलांच्या शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोन्ही मुलांचा मृत्यू गुदमरून झाल्याची शक्यता असल्याचे उपायुक्त (परिमंडळ-४) प्रशांत कदम यांनी सांगितले. चौकशीनुसार दोन्ही मुले दुपारी २ च्या सुमारास खेळायला घराबाहेर पडली. तेव्हापासून ती बेपत्ता होती. ती जुनी मोटरगाडी मुलांच्या घरापासून ५० फुटांच्या अंतरावर आहे. ती मुले नेहमी त्याच परिसरात खेळायची. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या तपासणीतही त्या काळात तेथे कोणी तिसरा व्यक्ती आलेला दिसत नाही. तरी पोलीस सर्व शक्यता पडताळणून पाहत आहेत. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

नवीन परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र नसल्यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील परीक्षा भवनाच्या नवीन इमारतीत (छत्रपती शिवाजी महाराज भवन) छायांकित प्रत केंद्र (झेरॉक्स सेंटर) नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना तत्काळ कागदपत्रांची छायांकित प्रत हवी असल्यास परीक्षा भवनापासून दूरवर असलेल्या छायांकित प्रत केंद्रांजवळ रिक्षाने जावे लागत आहे. कलिना संकुल तब्बल २४३ एकर जागेवर उभे आहे. या संकुलात ५० हून अधिक विविध शैक्षणिक विभाग आहेत. परंतु एवढ्या मोठ्या संकुलात आरोग्य केंद्र, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्र (पूर्वीचे आयडॉल), जवाहरलाल नेहरू ज्ञान स्त्रोत केंद्र म्हणजेच ग्रंथालय या तीनच ठिकाणी छायांकित प्रत केंद्रे आहेत. ही तीनही छायांकित प्रत केंद्रे जवळपासच आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या कलिना संकुलातील परीक्षा भवनाच्या नव्या इमारतीत छायांकित प्रत केंद्र नाही. परीक्षाविषयक विविध कामांसाठी मुंबईसह ठाणे, कल्याण – डोंबिवली, नवी मुंबई, तसेच कोकणासारख्या ग्रामीण भागातूनही बहुसंख्य विद्यार्थी परीक्षा भवनात येत असतात. विद्यार्थ्यांना तत्काळ कागदपत्रांची छायांकित प्रत हवी असल्यास संकुलातील व संकुलाबाहेरील छायांकित प्रत केंद्रांमध्ये रिक्षानेच जावे लागते. १ रुपयाच्या छायांकित प्रतीसाठी विद्यार्थ्यांना येऊन – जाऊन रिक्षाचे ४६ रुपये भाडे मोजावे लागत आहे. तसेच विद्यार्थ्यांना संकुलातील छायांकित प्रत केंद्राची माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा भवनात छायांकित प्रत केंद्र सुरू करावे. तसेच कागदपत्रांच्या छायांकित प्रतींची आवश्यकता भासणार नाही, अशी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी. – संजय वैराळ, माजी अधिसभा सदस्य

खाद्यपदार्थांची तपासणी करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा अविश्वास

सर्वेक्षणातून माहिती उघडकीस मुंबई : मसाल्यांमध्ये कर्करोग होणारे घटक असल्याचा दावा करीत सिंगापूर आणि हाँगकाँगने भारतीय कंपन्यांच्या काही मसाल्याच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. यावरून देशातील भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात देशातील अन्न सुरक्षा संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत नागरिकांनी अविश्वास दर्शविल्याचे उघडकीस आले आहे. भारतीय कंपन्यांच्या मसाल्यामध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण जास्त आढळून आले असून, त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असल्याचा दावा करीत हाँगकाँग आणि सिंगापूरने या मसाल्यांवर बंदी घातली आहे. खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत आणि अन्न नियामक संस्थांच्या कार्यप्रणालीबाबत सर्वसामान्य नागरिकांचे मत जाणून घेण्यासाठी एका खासगी संस्थेने महाराष्ट्रासह देशभरात ऑनलाईन सर्व्हेक्षण केले. या सर्वेक्षणात देशातील २४ हजार नागरिक सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रातील ३ हजार ६४४ नागरिकांचा समावेश होता. एकूण सहभागी नागरिकांपैकी ३६ टक्के ग्राहकांनी त्यांचा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर विश्वास नसल्याचे म्हटले. तर ३७ टक्के नागरिकांनी फारच कमी विश्वास असल्याचे, तर २४ टक्के नागरिकांनी या संस्थांच्या कार्यप्रणालीवर ५० टक्के विश्वास असल्याचे सांगितले. मात्र तीन टक्के नागरिकांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण आणि अन्न व औषध प्रशासनावर पूर्णपणे विश्वास दर्शविला. हाँगकाँग आणि सिंगापूरमधील घटनेबाबत नागरिकांना प्रश्न विचारला असता महाराष्ट्रातील १ हजार ८२९, तर देशातील १२ हजार ३६१ नागरिकांनी चिंता व्यक्त केली. १८ टक्के नागरिकांनी ही घटना माहीत आहे, परंतु त्याबाबत चिंता व्यक्त केली नाही. १० टक्के नागरिकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या कंपनीचे मसाले आपण वापरत नाही असे स्पष्ट करीत १० टक्के नागरिकांनी या प्रकराबाबत चिंता व्यक्त केली.

डोंबिवलीत आयरे गावातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

मढवी बंगल्याजवळील सात माळ्याच्या बेकायदा इमारतीवर कारवाई डोंबिवली: येथील पूर्व भागातील ग प्रभाग हद्दीतील आयरेगाव सरस्वती शाळेच्या मागील बाजूस भूमाफियांनी उभारलेल्या बेकायदा चाळी, चाळींसाठी बांधलेले १४ जोते ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण नियंत्रण पथकाने मंगळवारी जमिनदोस्त केले. याशिवाय म्हात्रेनगर मधील राजाजी रस्ता भागातील मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे, शिव यादव या भूमाफियांनी सात माळ्याची बेकायदा इमारत उभी केली आहे. या इमारतीत व्यापारी आणि निवासी असे दोन भाग आहेत. या बेकायदा इमारतीवर यापूर्वी दोन वेळा तोडण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात आली होती. आता पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहेत. हे पाहून भूमाफिया प्रवीण म्हात्रे यांनी तोडलेल्या इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरू केले होते. ही माहिती समजताच साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांनी पोलीस बंदोस्तात ही बेकायदा इमारत तोडण्याचे काम सुरू केले आहे. या इमारतीच्या चारही बाजला वाहन जाण्याची सुविधा नसल्याने कामगारांच्या साहाय्याने या इमारतीचे तोडकाम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. आयरेगाव सरस्वती शाळेच्या मागे भूमाफियांनी बेकायदा चाळी आणि नवीन चाळींसाठी १४ हून अधिक जोते बांधले आहेत, अशी माहिती साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी मिळाली होती. याविषयी तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खात्री केल्यावर ग प्रभागाच्या तोडकाम पथकाने जेसीबीच्या साहाय्याने बेकायदा चाळी आणि जोते साहाय्यक आयुक्त कुमावत यांंच्या उपस्थितीत जमीनदोस्त केले. यावेळी भूमाफिया घटनास्थळावरून पळून गेले होते. राजाजी रस्ता मढवी बंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे यांनी बांधलेल्या बेकायदा इमारतीवर यापूर्वी दोन वेळा तोडकामाची कारवाई करूनही त्यांनी पुन्हा बेकायदा इमारतीचे काम सुरू केले आहे, अशी माहिती मिळताच, तोडकाम पथकाने या बेकायदा इमारतीवर कामगारांच्या साहाय्याने तोडकामाची कारवाई सुरू केली आहे. या बेकायदा इमारतीला पालिकेच्या कोणत्याही परवानग्या भूमाफिया प्रवीण म्हात्रे यांनी घेतल्या नाहीत. पालिका आणि महसूल विभागाचा महसूल बुडवून प्रवीण यांनी बेकायदा इमारत उभारल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई पालिकेकडून केली जाणार आहे. या इमारतीच्या बाजुला सामासिक अंतर सोडण्यात आलेले नाही. या इमारतीमुळे आजुबाजुच्या इमारतींचा पाणी पुरवठा, मलनिस्सारणावर परिणाम झाला होता. त्यामुळे ही बेकायदा इमारत जमीनदोस्त करावी, अशा तक्रारी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे तक्रारदारांकडून प्राप्त झाल्या होत्या. आयुक्त डॉ. जाखड यांच्या आदेशावरून कुमावतयांनी ही कारवाई सुरू केली आहे. या कारवाईने मढवी बंगला परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आयरेगाव हद्दीतील बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. मढवी बंंगल्याजवळ प्रवीण म्हात्रे यांनी उभारलेली सात माळ्याची बेकायदा इमारत भुईसपाट करण्याच्या कामास सुरूवात केली आहे. या इमारतीजवळ जाण्यास जेसीबी किंवा अन्य वाहन रस्ता नाही. कामगारांच्या साहाय्याने हे बांधकाम जमीनदोस्त केले जाईल. या भूमाफियावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे.

कोपर रेल्वे स्थानकाजवळील कोंबड्याचा खुराडा तोडण्याचे आदेश

कल्याण : डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला दिवा बाजुने कोंबड्यांच्या खुराड्यासाठी बांधण्यात आलेल्या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे दोन दिवसात हा खुराडा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. कोपर रेल्वे स्थानकाजवळ पश्चिम बाजुला भूमाफियांनी हरितपट्ट्यावर बेकायदा बांधकाम करून तेथे एक बेकायदा बांधकाम केले होते. या ठिकाणी निवासी वस्ती सुरू करण्यासाठी भूमाफिया प्रयत्नशील असल्याचे दृश्य होते. परंतु, या बांधकामात कोंबड्यांचा खुराडा सुरू करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रवाशांना समजताच त्यांनी या खुराड्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करून हा खुराडा तात्काळ पालिका आणि रेल्वेने तोडून टाकावा अशी मागणी केली होती. अतिशय लपूनछपून करण्यात आलेले हे बेकायदा बांधकाम ‘लोकसत्ता’ ठाणे सहदैनिकाने उघडडकीला आणले आहे. आयुक्त डाॅ.इंंदुराणी जाखड, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त अवधूत तावडे यांंनी या बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश ह प्रभाग अधिकाऱ्यांना दिले होते. ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी बुधवारी कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा बांधकामाची पाहणी केली. हे बांधकाम श्रीकांत पाटील या भूमाफियाने या भागातील हरितपट्टा नष्ट करून बांधला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांंगितले. या बेकायदा बांधकामाला कोपरमधील पश्चिम मंडळातील एका पदाधिकाऱ्याचा आशीर्वाद असल्याच्या तक्रारी आहेत. कोपर मधील एका स्थानिक ज्येष्ठ राजकीय नेत्याने मात्र या बेकायदा बांधकामाला कडाडून विरोध केला आहे. उच्चपदस्थ रेल्वे अधिकाऱ्यांनीही या बेकायदा बांधकामाची पाहणी केली असल्याचे समजते. रेल्वे स्थानकाजवळ कोंंबड्याचा खुराडा सुरू झाला तर कोपर रेल्वे स्थानक भागात कोंंबड्यांच्या विष्ठेची दुर्गंधी पसरेल. फलाटावर प्रवाशांना उभे राहणे मुश्किल होईल आणि परिसरातील रहिवाशांंनाही या दुर्गंधीचा त्रास सहन होणार होता. साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना स्वताहून हे बांधकाम काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा पालिकेकडून हे बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करून पाडकामाचा खर्च प्रशासन वसूल करील, अशी तंबी साहाय्यक आयुक्त सावंत यांनी भूमाफियांना दिली आहे. हे बेकायदा बांधकाम वाचविण्यासाठी भूूमाफियांची एक फळी गेल्या काही दिवसांंपासून सक्रिय आहे. कोपर रेल्वे स्थानकाजवळील हरितपट्ट्यावरील बेकायदा बांंधकाम संबंधितांंना स्वताहून काढून घेण्याची सूचना केली आहे. स्वताहून हे बांधकाम तोडले नाहीतर पालिकेकडून पोलीस बंदोबस्तात हे बेकायदा बांधकाम भुईसपाट केले जाईल. तसे नियोजन करण्यात आले आहे. राजेश सावंत (साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग, डोंबिवली)

एम देवेंदर सिंह यांनी रायगड लोकसभेचे निरीक्षक संजीवकुमार झा यांचे केले स्वागत

रत्नागिरी : ३२- रायगड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी संजीवकुमार झा यांची नियुक्ती झाली आहे. झा यांचे येथील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्ह्यातील २६३- दापोली व २६४- गुहागर या दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या पूर्व तयारीबाबत सिंह यांनी त्यांना माहिती दिली. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड यांनीही यावेळी पुष्पगुच्छ देऊन झा यांचे स्वागत केले.

मतदान टककेवारी वाढ होण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे-डॉ .महेंद्र कल्याणकर

अशोक गायकवाड रायगड : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ .महेंद्र कल्याणकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, रेवती गायकर, जोस्ना पाडियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बढे, निवासी उजिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यासह विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कामकाजाचा आढावा घेताना विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर मार्गदर्शन करताना म्हणाले, जिल्ह्यातील शहरी भागाबरोबरच आदिवासीक्षेत्रातील मतदारांचे मतदान देखील महत्त्वाचे आहे याकडे लक्ष दिले जावे. मोठी गावे, शहरांमधील गर्दीची प्रभाग येथे मतदारांची संख्या मोठी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा अधिक मतदान व्हावे, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी दिव्यांग मतदार, ८५ वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक यांना आयोगाने घरून मतदान करण्याची ( होम वोटिंग)सुविधा दिली आहे. याची अंमलबजावणी जिल्ह्यात व्हावी. दिव्यांग मतदारांचे १००% मतदान होईल या दृष्टीने काम केले जावे. दिव्यांगांना सहजतेने मतदान करता यावे यासाठी त्यांना द्यावयाच्या सुविधा सर्व मतदान केंद्रांपर्यंत उपलब्ध करण्यात याव्यात. विभागीय आयुक्त पुढे म्हणाले, पोस्टल व होम वोटिंग द्वारे होणारे मतदान मतपत्रिकेवर होणार आहे या दृष्टीने यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांचे आवश्यक प्रशिक्षण काळजीपूर्वक केले जावे. सी-व्हीजील, आचारसंहिता कक्ष, जिल्हा निवडणूक सन नियंत्रण कक्ष याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी सोडविण्यासाठी सतर्कता राखण्यात यावी.अशा सूचना डॉ. कल्याणकर यांनी दिल्या. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, निवडणूक उन्हाळ्यात होत असल्याने मतदान दिवशी मतदान केंद्रांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, मतदारांच्या रांगांसाठी सावली असलेल्या जागा, वरंडा अथवा मंडप, शेड याद्वारे निर्माण करण्यात याव्यात, दिव्यांग मतदारांचे मतदान सहज होण्यासाठी समाजसेवी संस्था ची मदत घेतली जावी. होम वोटिंग साठी जाणाऱ्या पथकांनी मतपत्रिकेद्वारे होणारे मतदान गोपनीय राहील या दृष्टीने दक्षता घेतली जावी. मागच्या लोकसभा निवडणुकीत मतदार संघात ६२% मतदान झाले होते यावर्षी त्यात वाढ अपेक्षित असून देण्यात आलेल्या निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी असे जावळे म्हणाले. यावेळी निवडणूक विषयक विविध समितीनिहाय कामकाजाची माहिती सादर करण्यात आली. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्ष, मतदार जागृकता व सहभागिता कार्यक्रम (स्वीप), सी व्हिजील ॲप, सक्षम ॲप, ईव्हीएम, ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार यांचे मतदान, पोस्टल मतदान व होम वोटिंग प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र सरमिसळ प्रक्रिया, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक प्रशिक्षण यासह विविध बाबींची माहिती देण्यात आली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विभाग विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक मतदान पूर्वतयारी बाबत माहिती सादर केली. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती, अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. चौकट रायगड लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यापूर्वी स्ट्राँग रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँग रूमची सुरक्षा, पायाभूत सुविधा, पॉवर बॅकअप आणि त्या ठिकाणी असलेल्या इतर सुविधांच्या आढावा कल्याणकर यांनी यावेळी घेतला. कायदा व सुव्यवस्था व पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

वेल्फेअर साठी…

मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव रमेश औताडे मुंबई : मुंबई जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संयुक्त जयंती उत्सव समिती आयोजित भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि  विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पार पडला.प्रमुख पाहुणे म्हणून  न्यायमूर्ती शमकरंद कर्णिक,  न्यायमूर्ती  सारंग कोतवाल , न्यायाधीश श्अभय आहूजा ,  न्यायमूर्ती शशर्मिला देशमुख , उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यामागे या समितीचे अध्यक्ष शरद साळवे,  कार्याध्यक्ष रवी पवार,  सचिव संजय शेलार सल्लागार चंद्रकांत बनकर खजिनदार किरण कांबळे तसेच कार्यकर्ते निलेश तायडे प्रशांत दाभाडे व इतर  कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. अशाप्रकारे जयंतीचे कार्यक्रम दरवर्षी आयोजित झाले पाहिजे असे  न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी  केले. याप्रसंगी न्यायमूर्ती श्रीमती शर्मिला देशमुख  म्हणाल्या ‘आज मी जी  न्यायमूर्ती आहे ती केवळ या महामानवामुळे आहे. तसेच  मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अभय आहूजा यांनी या तिन्ही महापुरुषाबद्दल गौरवउद्गार काढले आणि  आपल्या सर्वांवर यांचे कसे उपकार आहेत त्याची जाणीव करून दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय शेलार यांनी तर प्रास्ताविक  शरद साळवे यांनी केले आणि आभार प्रदर्शन  चंद्रकांत बनकर यांनी केले.

परळ येथे राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा

मुंबई : येत्या २९ आणि ३० एप्रिल रोजी परळच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य ज्युनियर, सब ज्युनियर, क्लासिक पुरुष आणि महिला गटाच्या पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि मुंबई शहर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रारंभ होईल. तर ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचा बक्षिस समारंभ होईल. या स्पर्धेतून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे संघ निवडण्यात येतील.  स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सुर्यकांत गद्रे, मोबाईल : ९८६९७३६७११ अथवा प्रशांत सरदेसाई, मोबाईल : ९८२०३७०४९७ यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धेत २०० पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रथम तीन क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना पदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात येईल. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सरकार्यवाह संजय सरदेसाई आणि त्यांचे सहकारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत.