Category: होम

शहापूर तालुक्यातील नडगाव येथे शेतकरी मेळावा संपन्न

ठाणे : 12 डिसेंबर 2024 रोजी अग्रणी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणे, मार्डेफ ट्रस्ट, पुणे व आर्थिक साक्षरता केंद्र, ठाणे यांच्यावतीने मौजे नडगाव ग्रामपंचायत, नडगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथील…

 “पन्नाशीतील ग्रंथाली”चा बहारदार कार्यक्रम संपन्न

वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने आयोजित ठाणे : मराठी साहित्य विश्वातील लोकप्रिय “ग्रंथाली”या संस्थेला 25 डिसेंबर 2024 रोजी पन्नास वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने वैष्णो व्हिजन संस्थेच्या वतीने गुरुवार, 19 डिसेंबर रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे (प.) येथे “पन्नाशीतील ग्रंथाली”या विशेष गप्पा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचांगकर्ते, खगोलशास्त्र अभ्यासक श्री.दा.कृ. सोमण हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस.एम.सी. इन्फ्रास्टक्चर संचालक श्री.सुहास मेहता तर विशेष निमंत्रित म्हणून मराठी भाषा विभाग संस्था, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे संचालक डॉ.शामकांत देवरे, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप, माहिती संचालनालयाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ हे उपस्थित होते. या कार्यक्रमात माजी राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री.कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार, संपादक श्री.दिनकर गांगल, ग्रंथालीचे संपादक श्री.अरुण जोशी, ग्रंथाली संस्थेच्या विश्वस्त डॉ.लतिका भानुशाली व डॉ.मृण्मयी भजक यांनी ग्रंथाली संस्थेच्या पन्नास वर्षांच्या वाटचाल आणि विविध टप्प्यांवरील अनुभव उपस्थितांसमोर कथन केले. त्याचप्रमाणे मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथालीसारख्या संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही केले. या कार्यक्रमात मुलाखतकार म्हणून मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि मुंबई दूरदर्शनचे माजी सहाय्यक संचालक माध्यम सल्लागार जयु भाटकर यांनी मान्यवरांना गप्पांमध्ये गुंफले. यावेळी कुमार केतकर म्हणाले की, ग्रंथालीने तळागळातल्या प्रतिभावंत लेखकांना एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. साहित्य क्षेत्रासाठी हे अत्यंत महत्वपूर्ण योगदान आहे. दिनकर गांगल म्हणाले की, ग्रंथालीने पुस्तक प्रकाशनाबरोबर अनेक सामाजिक व सांस्कृतिक चळवळी राबविल्या आणि त्यातून मराठी वाचकांचे, रसिकांचे विधायक प्रबोधन झाले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी ग्रंथालीच्या समाजातील योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करून ग्रंथाली व वैष्णो व्हिजन संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आजच्या पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये जिल्हा माहिती कार्यालयही सक्रीय सहभाग घेईल, असे आश्वासीत केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यातील साहित्यिक अनंत देशमुख, अशोक बागवे, अनुपमा उजगरे, चांगदेव काळे आणि डॉ.निर्मोही फडके या साहित्यिकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कारही करण्यात आला. वैष्णो व्हिजन संस्थेच्या संस्थापक व कार्यकारी निर्माती पद्मा भाटकर यांनी प्रास्ताविकपर भाषणात ग्रंथालीच्या पन्नास वर्षातील कारकिर्दीचा गौरवपर उल्लेख केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अस्मिता पांडे यांनी केले. 00000

मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी राजकीय नेते एकवटले

 पोलिस उपायुक्तांची घेतली भेट   कल्याण : कल्याण पश्चिमेतील योगीधाम मधील मराठी कुटुंबाच्या मारहाणीचे प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले असून, या प्रकरणी राजकीय पक्षांसह सामाजिक संस्था, व्यापारी संघटना आणि सोसायटीमधील रहिवाशांनी कल्याण परिमंडल 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेत आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला त्वरित अटक करून त्याचे निलंबन करण्यात यावे, गुन्हा दाखल करण्यास उशीर करणाऱ्या एपीआय लांडगे यांचे पण निलंबन करा आदी मागण्या यावेळी या नगरिकांनी केल्या. आरोपीला अटक न केल्यास उद्या दुकाने बंद करून कल्याण मुरबाड रोड  बंद करणार असल्याचा इशारा यावेळी पोलिसांना देण्यात आला. या शिष्टमंडळात मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर, मनसेच्या महिला शहर अध्यक्षा कस्तूरी देसाई, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी, रुपेश भोईर, माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जाधव, सचिव अतुल सरगर, योगीधाम व्यापारी संघटनेचे उमेश वाघ, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, जिल्हा संघटक छाया वाघमारे, शहर संघटक नेत्रा उगले, गणेश जाधव, अनघा देवळेकर, मराठा क्रांती मोर्चाचे धनंजय जोगदंड आदींसह प्रमुख पदाधिकारी यांच्यासह योगीधाम येथील स्थानिक नागरिकही उपस्थित होते. खडकपाडा पोलिसांनी या अखिलेश शुक्लाला पाठीशी घालण्यासह या मारहाणीत गंभीर जखमी कुटुंबाला मात्र अन्याय वागणूक दिल्याचे गंभीर आरोप या शिष्टमंडळाने केले. या प्रकरणी आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी वेगळीच कलमे दाखल केली तसेच शुक्ला पोलीस ठाण्यात येऊनही त्याला ताब्यात न घेता पळून जाण्यासाठी मदत केल्याचा गंभीर आरोपही यावेळी बैठकीत करण्यात आला. देशमुख कुटुंबावर भ्याड हल्ला करणाऱ्या शुक्लाचा निषेध करण्यात येत असून, मुख्य आरोपीला अटक न केल्यास उद्या योगिधाम परिसर बंद ठेवण्यात येणार असून या बंदचे काही विपरीत परिणाम झाल्यास त्याला सर्वस्वी पोलिस प्रशासन जवाबदार असेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला. अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात अधिकारी असल्याने पोलिस प्रशासन त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. 48 तास होऊन देखील अखिलेश शुक्ला याला अटक होत नाही. या प्रकरणामुळे  मराठी माणूस भडकला तर इथे राहणाऱ्या प्रत्येक परप्रांतीयाला धोका निर्माण होऊ शकतो. पोलिसांनी 109 कलम न लावल्याने त्यांची पक्षपाती भूमिका दिसून येत असून हे कलम न लावल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी दिला. तर या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी देशमुख कुटुंबावर हल्ला करणाऱ्या अखिलेश गुप्ता याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करत राडा करणारे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मनसेला पराभव पचवता आला नसल्याने मनसेने या प्रकरणात मराठी परप्रांतीय वाद केल्याची टीका देखील अरविंद मोरे यांनी केली आहे. दरम्यान योगिधाम येथील माय मराठी प्रतिष्ठान आणि योगिधाम व्यापारी संघटना यांनी या प्रकरणी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचे आणि कलमे देखील कमी लावल्याचा आरोप केला आहे. शुक्ला याला अटक करण्यासह त्याला पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाईची मागणी केली. 000

विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

नवी मुंबई : गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तकी शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात असून नमुंमपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले…

 बंड्या मारुती, अमर क्रीडा यांची चुरशीच्या लढतीनंतर उपांत्यपूर्व फेरीत धडक.

 बळीराम क्रीडा मंडळ ५१वा कबड्डी महोत्सव मुंबई:- बंड्या मारुती मंडळ, अमर क्रीडा(काळाचौकी) यांनी संघर्षपूर्ण लढती नंतर पुरुष प्रथम श्रेणी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली. शिवशक्ती मंडळ, लायन्स स्पोर्टस् देखील उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले. बळीराम क्रीडा मंडळाच्या विद्यमाने “५१व्या कबड्डी महोत्सवानिमित्त” आंबेवाडी, काळाचौकी येथील बळीराम मंडळाच्या पटांगणावर हे सामने सुरू आहेत. काळाचौकीच्या अमर मंडळाने शिवनेरी सेवा संघाचा कडवा प्रतिकार ३२-३१ असा मोडून काढला. पूर्वार्धात लोण देत २०-१४ अशी आघाडी घेणाऱ्या अमरला उत्तरार्धात मात्र शिवनेरीने लोण ची परतफेड करीत चांगलेच जेरीस आणले. पण संघाला विजयी करण्यास ते असमर्थ ठरले. करण सावर्डेकर, आकाश डोंगरे अमर मंडळाकडून, तर यश राक्षे, जतिन विंदे शिवनेरी कडून उत्कृष्ट खेळले. दुसऱ्या उत्कंठावेधक लढतीत बंड्या मारुती मंडळाने सिद्धीप्रभा फाउंडेशनला २५-२४ असे चकवित आपली धोडदौड सुरूच ठेवली. क्षणक्षणाला काळजाचे ठोके चुकविणाऱ्या या सामन्यात पहिल्या डावात १२-११ अशी नाममात्र आघाडी बंड्या मारुती संघाकडे होती. शेवटी याच गुणाचा त्यांना फायदा झाला. प्रणित देसाई, शुभम चौगुले यांच्या संयमी व धूर्त खेळीला या विजयाचे श्रेय जाते. सिद्धीप्रभाच्या ओमकार पवार, रुपेश साळुंखे यांनी अंतिम क्षणापर्यंत निकराची झुंज दिली. पण त्यांचे प्रयत्न वाया गेले. याच गटात शिवशक्ती मंडळाने यंग प्रभादेवीला ३१-२१ असे रोखत आगेकूच केली. विश्रांतीपर्यंत चुरशीने खेळाला गेलेला हा सामना नंतर मात्र थोडासा एकतर्फी झाला. वैष्णव सूर्यवंशी, विराज सोहनी यांच्या विश्रांतीनंतरच्या जोशपूर्ण खेळामुळे शिवशक्तीला हा विजय मिळविता आला. यश पवार, रुपेश किर यांनी यंग प्रभादेवी कडून विश्रांतीपर्यत उत्तम लढत दिली. नंतर मात्र त्यांचा खेळ कमी पडला. शेवटच्या सामन्यात लायन्स स्पोर्टस् ने जय दत्तगुरुचा ३६-२५ असा पाडाव केला. लायन्स संघाने दोन्ही डावात एक एक लोण देत आपला विजय निश्र्चित केला. मध्यांतराला १४-१२ अशी लायन्स कडे आघाडी होती. राज आचार्यच्या चतुरस्त्र खेळामुळे हे शक्य झाले. जय दत्तगुरुचा ऋतिक नागले चमकला.

 भातसानगर येथे नवोदय विद्यालयासाठी आमदार निरंजन डावखरे आग्रही

 विधान परिषदेत मागणी   ठाणे : शहापूर तालुक्यातील भातसानगर येथे नवोदय विद्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज नागपूर येथे विधान परिषदेत अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केली. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्यामार्फत ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र नवोदय विद्यालय स्थापन करण्यास मंजुरी दिली असून, याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भातसानगर येथे नवोदय विद्यालयासाठी जागा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ नवोदय विद्यालय सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात स्वतंत्र नवोदय विद्यालयासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. ग्रंथपालांना दिलासा देण्याची मागणी राज्य सरकारने ग्रंथपालपदासाठी शाळेत १ हजार विद्यार्थ्यांची अट ठेवली आहे. त्यामुळे अनेक ग्रंथपाल अतिरिक्त झाले आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील पटसंख्या सातत्याने घसरत असल्यामुळे शाळेत १ हजार ऐवजी ७०० विद्यार्थ्यांची अट ठेवावी. तसेच सहावी ते बारावीऐवजी पाचवी ते बारावीपर्यंतची विद्यार्थी संख्या निश्चित करावी, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली. वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक नेमावेत पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे जुन्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांवर परिणाम होत असून, नव्या महाविद्यालयासाठी प्राध्यापकांची भरती करावी, अशी मागणीही आमदार डावखरे यांनी केली.

 आज ‘राजगृह ते चैत्यभूमी मार्च’

अमित शाह यांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर अवमान वक्तव्याच्या निषेधार्थ अनिल ठाणेकर मुंबइ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केले आहे, या अवमानकारक विधानाचा निषेध करण्यासाठी आज दुपारी ३.३० वाजता, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर पूर्व येथील निवासस्थान राजगृह येथे जमून ‘राजगृह ते चैत्यभूमी मार्च’ काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, छायाचित्रे घेऊन संविधान, लोकशाही, धर्मनिरपेक्षता मुल्यांवर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रेम करणार्या नागरिकांनी, तसेच लेखक, कलावंत, साहित्यिक, पत्रकार आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक शाम गायकवाड, प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, राजू कोरडे, अजित पाटील, सुबोध मोरे, उर्मिला पवार, राहुल गायकवाड, शाहीर संभाजी भगत, वृषाली माने, रवी भिलाणे, सुनील कदम, जयवंत हिरे यांनी केले आहे. परभणीतील दडपशाही, सोमनाथ सुर्यवंशी कस्टडी मृत्यू याचा सर्व संविधानप्रेमी, समतावादी, पुरोगामी संघटना कडून देशभरात निषेध होत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करुन गृहमंत्री अमित शाह हे संविधान मुल्यांच्या विचारांच्या विरोधातील अवैज्ञानिक, मनुवादी विचारांचाच पुरस्कार छुप्या पद्धतीने करीत आहेत.ते ज्या संविधानाची शपथ घेऊन गृहमंत्री बनले त्या संविधानाशी विसंगत त्यांचे वर्तन आहे.त्यांच्या या अवमानकारक विधानाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.त्यांनी यासाठी राज्यसभेतच देशाची जाहीर माफी मागावी, अन्यथा गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही करीत आहोत.मुंबई मध्ये या अवमानकारक विधानाचा निषेध करण्यासाथी आज दुपारी ३.३० वाजता, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर पूर्व येथील निवासस्थान राजगृह येथे जमून ” राजगृह ते चैत्यभूमी मार्च ” निघणार आहे.या मार्चमध्ये प्रागतिक रिपब्लिकन आघाडी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष,दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती,लाल निशाण ( लेनिनवादी) लाल निशाण ,भारताचा कम्युनिस्ट पक्ष ( माले) लिबरेशन,ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक,संविधान संवर्धन समिती,लोकांचे दोस्त, आंबेडकरी स्त्री संघटना,राष्ट्रीय धर्मनिरपेक्षता आंदोलन,वाघिणी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती  आणि विविध आंबेडकरी, पुरोगामी, समतावादी, युवा , विद्यार्थी, महिला आणि आंबेडकरी, समतावादी लेखक, कलावंत, सांस्कृतिककर्मी यांचा सहभाग असणार आहे. ०००००

सर्वेक्षणाअभावी बेघर झालेल्या 18 झोपडीधारकांना न्याय द्या

 आमदार बाळा नर यांची विधानसभेत मागणी   केतन खेडेकर जोगेश्वरी गुंफा परिसरात गेल्या 50 वर्षापासून अस्तित्वात असलेली जयंत चाळ ही सन 2004 मध्ये पुनर्वसनाकरिता निष्कासित करण्यात आली होती. याठिकाणी महानगरपालिकेतर्फे सर्व्हेक्षण करण्यात आले.जोगेश्वरी गुंफे परिसरात झोपडयाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्योवळी घरे अगोदरच निष्कासित केलेली असल्यामुळे आणि तेथे ते राहत नसल्याने त्यांचे सर्व्हेक्षण शासनामार्फत करण्यात आले नाही. त्यामुळे या 18 रहिवाश्यांना पात्र ठरविण्यात न आल्यामुळे सध्यस्थितीमध्ये 18 रहिवाशी बेघर झालेले आहे. गेली 50 वर्षे राहत असलेल्या रहिवाश्यांचे केवळ सर्व्हेक्षण न झाल्यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आलेली आहे. रहिवाश्यांवर होत असलेला अन्याय पाहता शासनाने तातडीने त्यांना न्याय दयावा याकरिता  औचित्याच्या मुददयाद्वारे शासनास आमदार बाळा नर यांनी मागणी केली आहे. 000000

 मुंबईत सातशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करा

 आमदार अजय चौधरी यांची मागणी   केतन खेडेकर मुंबईसाठी मराठी माणसाने दिलेले बलिदान लक्षात घेता मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकून राहावे आवश्यक आहे. पुनर्विकासानंतर मालमत्ता कर परवडत नसल्याने मराठी माणसे घर विकून टाकतात. त्यामुळे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जाऊ नये यासाठी मुंबईत सातशे चौरस फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी आज  विधानसभेत केली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे अजय चौधरी यांनी हा प्रश्न मांडला. मुंबईतील मराठी माणूस घर विकून मुंबईबाहेर जाऊ नये आणि मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकावे, म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका क्षेत्रात ५०० चौरस फूटांच्या निवासी घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ केला. मुंबईतील लाखो सदनिकाधारकांना याचा फायदा झाला. मुंबईतील वाढते पुनर्विकास प्रकल्प आणि विकास नियंत्रण नियमावलीतील सुधारित तरतुदींचा विचार करता, सध्या मुंबईतील जुन्या चाळींच्या तसेच म्हाडा इमारतींच्या समुह पुनर्विकासातही विकास नियंत्रण निमयावलीतील तरतुदीनुसार ५५० ते ६०० चौरस फूटांपर्यंत घर उपलब्ध होते. पुनर्विकास प्रकल्पात बहुतांश मराठी कुटुंबे राहतात. पण मालमत्ता करामध्ये त्यांना सवलत मिळत नाही. शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर पूर्णपणे माफ करण्याची विनंती केली. वाढीव मालमत्ता कर परवडत नसल्याने अनेकदा घर विकून ते मोकळे होतात. त्यामुळे मुंबईतील मालमत्ता कर ७०० चौरस फुटांपर्यंत माफ करणे आवश्यक आहे. अभ्युदयनगर पुनर्विकासात ६००. चौरस फुटांपेक्षा मोठे घर देण्याचे सरकारने घोषित केले आहे. यातील मराठी माणसे याच परिसरात टिकवणे गरजेचे आहे. मुंबईतील गोरगरीबांना न्याय मिळावा म्हणून सातशे चौरस फूटांपर्यंतच्या घरांना आणि निवासी गाळ्यांना मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली. 0000