Category: होम

अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात जगत्पुरिया मुख्य अतिथी

संभाजीनगर : विख्यात कवी, समीक्षक, ज्येष्ठ पत्रकार डी. बी. जगत्पुरिया हे नागपूर येथे 28 व 29 डिसेंबरला होणार्‍या अक्षरक्रांती आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात मुख्य अतिथी म्हणून सन्मानित होणार आहेत. कथाकार सुरेश…

 विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल -२५ सांस्कृतिक महोत्सव १० ते १३ जानेवारीपर्यंत ठाण्यात भरणार –

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची उपस्थिती ठाणे : विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल -२०२५ हा सांस्कृतिक महोत्सव १० ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान उपवन तलाव येथे संपन्न होणार आहे. या फेस्टिव्हलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही उपस्थित राहणार आहेत. या फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य आणि वाद्य यांचा अनोखा संगम अनुभवायास मिळणार आहे, अशी माहिती या फेस्टिव्हलचे चेअरमन, आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलच्या दोन प्रमुख प्रवेशद्वारास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ नावे देण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना या फेस्टिव्हलमध्ये अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. फेस्टिव्हल यावर्षी आकर्षक आणि बहूरंगी स्वरुपात साजरा केला जाणार आहे. तरंग स्टेज, मुद्रा स्टेज, विरासत स्टेज असे विविध रंगमंच कलाविष्कारासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. फेस्टिव्हलमध्ये स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हस्तकला प्रदर्शन, खाद्यपदार्थांचे स्टाॅल्स, कार्यशाळा, विविध मनोरंजनात्मक उपक्रम यांचा समावेश असणार आहे. पद्मश्री शुभा मुदगल, विदूषी आरती अंकलीकर टिकेकर, पंडित रितेश- रजनीश मिश्रा, संजू राठोड, अभिजित भट्टाचार्य, पंडित ब्रिज नारायण, केतकी माटेगावकर, पद्मश्री शाहीद परवेज, मिका सिंग, रणजित रजवाडा आदी मान्यवर गायक, वादक, विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये आपली कला सादर करणार आहेत. कुचिपुडी, भरतनाट्यम, ओडीसी,  मणिपूरी आदी शास्त्रीय नृत्यांबरोबरच विविध राज्यांतील लोकनृत्याचा आनंदही रसिक प्रेक्षकांना येथे घेता येणार आहे. महत्वाचे म्हणजे बदलत्या ठाण्याचा अनुभवही यावेळी घेता येणार आहे. विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हल हा ठाणेकरांसाठी महत्वाचा सांस्कृतिक सोहळा असून यंदा हा फेस्टिव्हल अधिक भव्य स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. या फेस्टिव्हल च्या माध्यमातून ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक गडद होईल. तसेच पर्यटकांचे आकर्षणही वाढेल. यामुळेच सर्व ठाणेकरांनी व पर्यटकांनी या फेस्टिव्हल मध्ये आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ००००

ठाण्यातील काही भागात दोन दिवस टप्प्याटप्प्याने होणार पाणीपुरवठा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला मे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दि.१३/१२/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा ते शनिवार दि.१४/१२/२०२४ रोजी सकाळी ९.०० वा पर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेऊन देखभाल,…

 म्हणींवर आधारित ११ बालनाट्य रंगभूमीवर

 एका वर्षात मुक्तछंद नाट्यसंस्थेचे यशस्वीरित्या सादरीकरण   ठाणे : मुक्तछंद नाट्यसंस्था बालरंगभूमीवर सातत्याने वेगवेगळे आणि प्रयोगशील उपक्रम करणारी नाट्यसंस्था म्हणून ओळखली जाते. ‘मुक्तछंद नाट्यसंस्था’ बालरंगभूमीवर एक आगळा-वेगळा आणि बालनाट्य विश्वात पहिल्यांदाच घडणारा नावीन्यपूर्ण बालनाट्य प्रयोग म्हणजेच म्हणींवर आधारित बालनाट्यांची शृंखला घेऊन आली आहे. या म्हणींवर आधारित बालनाट्य सादर करण्याच्या संकल्पनेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. म्हणी सांगतात कहाणी या धर्तीवर आधारित ‘मुक्तछंद नाट्यसंस्था डिसेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या एका वर्षात संदीप गचांडे लिखित म्हणींवर आधारित एकूण ११ बालनाट्य सादर केली आहेत. पेरावे तसे उगवते, करावे तसे भरावे, गर्वाचे घर खाली, एका माळेचे मणी, अळी मिळी गुपचिळी, अति तिथे माती, नाचता येईना अंगण वाकडे, थेंबे थेंबे तळे साचे, इकडे आड तिकडे विहीर, लहान तोंडी मोठा घास आणि दुरून डोंगर साजरे अशी सादर केलेल्या ११ बालनाट्याची नावे आहेत. प्रत्येक ‘म्हण’ एक कहाणी सांगत असते आणि त्या कहाणीतून एक उपदेश म्हणा किंवा संदेश देत असते. आजच्या पिढीला म्हणींचे महत्व सांगून त्याची पुन्हा नव्याने ओळख पटवून देण्यासाठी तसेच त्यांना मराठी भाषेची गोडवी कळावी व ती लागावी या प्रांजळ उद्देशाने ‘मुक्तछंद नाट्यसंस्था’ म्हणींवर आधारित बालनाट्याची शृंखला (Series) सादर करीत आहे. मुक्तछंद नाट्यसंस्था अभिनय कार्यशाळा ठाणे, परळ आणि काळाचौकी शाखेतील शिबिरार्थ्यांनी बालक-पालक व प्रेक्षकांच्या भरघोस प्रतिसादात सदरचे प्रयोग सादर केले. म्हणींवर आधारित बालनाट्य सादर करण्याची शृंखला मुक्तछंद नाट्यसंस्था इथून पुढेही अशीच अविरत सुरु ठेवणार आहे, असे मत संस्थेचे संस्थापक व लेखक संदीप गचांडे यांनी व्यक्त केले आहे. 0000

 सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याची आयआयटी-मुंबईमार्फत होणार फेरआखणी

वाहतुकीच्या पुढील पाच वर्षांतील आव्हानांचा होणार अभ्यास   ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे २०१८मध्ये तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेश वाहतूक आराखड्याची आताच्या बदललेल्या स्थितीनुसार फेरआखणी करण्यात येणार आहे. आयआयटी, मुंबईच्या ‘जीआयएसई हब’च्या मदतीने फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. मूळ आराखडा सन २०१८चा मेट्रो रेल्वेच्या नियोजनाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेतर्फे संपूर्ण महापालिका क्षेत्राचा सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्यात आला होता. २०१०पासून या आराखड्याचे काम सुरू करण्यात आले. २०१८मध्ये त्यास अंतिम स्वरूप देण्यात आले. त्यात, मेट्रो मार्गांचे आरेखन, ठाणे पूर्व येथील सॅटीस प्रकल्प, ठाणे-मुलुंड दरम्यानचे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक, आनंद नगर ते साकेत कोस्टल रोड, भुयारी मार्ग आदींबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. ठाणे शहराची वाढ लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले होते. महापालिका आयु्क्त सौरभ राव यांच्या दालनात, आयआयटी, मुंबईतील जीआयएसई हबचे प्रा. सुमीत सेन यांच्यासोबत यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीस, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, टीएमटीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, उपायुक्त शंकर पाटोळे, उपनगर अभियंता विकास ढोले, सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता धनाजी मोदे आणि भगवान शिंदे उपस्थित होते. वर्षभरात होणार फेरआखणी या आराखड्यातील तरतूदी आणि सद्यस्थिती तसेच भविष्यातील आव्हाने यांचा अभ्यास करून आराखड्याची फेरमांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. २०१८मधील या आराखड्याची फेरमांडणी करून २०३०पर्यंतच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी, आयआयटी, मुंबईतील ‘जीआयएसई हब’ या विज्ञान आणि अभियांत्रिकी यांची सांगड घालणाऱ्या तज्ज्ञ गटांच्या मदतीने पुढील वर्षभरात फेरआखणीचे काम करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली. फेरआखणीचा उद्देश शहरातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याचा अभ्यास करणे, त्यात सुचवण्यात आलेल्या उपायांच्या अमलबजावणीचा आढावा घेणे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आवश्यक ते उपाय व सूचना करणे हा या फेरआखणीचा मुख्य उद्देश आहे. आयआयटी, मुंबईतील ‘जीआयएसई हब’मधील तज्ज्ञ आणि अभ्यासक हे उपलब्ध माहिती, नव्याने प्राप्त झालेल्या अत्याधुनिक मॉडेल्सच्या मदतीने ही फेरमांडणी करणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. याचा होणार अभ्यास ही फेरमांडणी करताना, त्यात वाहतुकीचे बदलेले पॅटर्न, शालेय बसेस तसेच इतर गाड्यांची वाढलेली वाहतूक, घनकचऱ्याची वाहतूक, बांधकामातील राडारोड्याची वाहतूक यामुळे वाहतुकीवर येणारा ताण याचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच, सायकल ट्रॅक, केवळ पादचारी वाहतुकीसाठीची व्यवस्था यांचाही विचार केला जाणार आहे. ठाणे शहरालगत असलेल्या खाडीचा जल वाहतुकीसाठी कसा उपयोग करता येईल याबद्दल त्यात अभ्यास करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली आहे. मेट्रो, रेल्वेपर्यंत ये-जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्थेची रचना, पार्किंग व्यवस्था, तीन हात नाका येथील वाहतूक कोंडीबाबत सूचना यांचाही या फेरमांडणीत अभ्यास करण्यात येणार आहे. नागरिकांचा प्रतिसाद नोंदवणार ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयाने हा अभ्यास करण्यात येणार असून त्यासाठी गठीत करण्यात येणाऱ्या अभ्यास गटात, वाहतूक पोलीस, मेट्रो, एमएमआरडीए, रेल्वे, पर्यावरण विषयक तज्ज्ञ यांचाही सहभाग घेण्यात येईल, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, या फेरआखणीचा मसुदा अंतिम करण्यापूर्वी नागरिकांचा प्रतिसादही जाणून घेण्यात येणार आहे. ००००

आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धा राकेश, विलास, अभिषेक, विशालची विजयीदौड

मुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्यीत कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती मिल कामगार कॅरम स्पर्धेत इंदू मिलचा राकेश कोचरेकर, एनटीसीचा विलास काळे, टाटा मिलचा अभिषेक कदम, पोद्दार मिलचा विशाल सागवेकर, आरएमएमएसचे हरीश देठे व ओमकार हडशी आदींनी विजयीदौड केली. प्रारंभापासून आघाडी घेत अचूक सोंगट्या टिपणाऱ्या राकेश कोचरेकरने इंदू मिलच्या तयलू जांबीचे आव्हान १०-४ असे संपुष्टात आणले आणि उद्घाटनीय लढत जिंकली. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते व खजिनदार निवृत्ती देसाई यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. परेल येथील आरएमएमएस सभागृहात अप्रतिम फटक्यांची आतषबाजी करीत एनटीसीच्या विलास काळेने टाटा मिलच्या हरिहर यांना पुनरागमनाची संधीच दिली नाही. परिणामी विलास काळेने २५-४ असा विजय मिळवीत जोरदार आगेकूच केली. अन्य सामन्यात टाटा मिलच्या अभिषेक कदमने विनायक शिंदेचा १३-० असा, पोद्दार मिलच्या विशाल सागवेकरने किशोर पांचाळचा १३-४ असा, आरएमएमएसच्या हरीश देठेने इंदू मिलच्या गंगाराम गावडेचा २५-० असा तर आरएमएमएसच्या ओमकार हडशीने पोद्दार मिलच्या सुभाष घाडगेचा ११-४ असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, माजी प्रादेशिक संचालक प्रदिप मून, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर व सरचिटणीस गोविंदराव मोहिते आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ०००००

 बंदर व गोदी कामगारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळे यश

गोदी कामगार वेतनकरारास केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची मंजुरी अनिल ठाणेकर ठाणे : भारतातील बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन  करार २७  सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे संपन्न झाला असून, या वेतन कराराला केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मंजुरी दिली असल्याचे मंत्रालयाचे सचिव सुजित कुमार यांनी लेखी आदेशाने कळविले आहे, अशी माहिती कामगार नेते मारुती विश्वासराव यांनी दिली. तर बंदर व गोदी कामगारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळे हे यश प्राप्त झाले आहे, असे मत ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी व्यक्त केले. झालेल्या वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित करण्यासाठी भारतातील प्रमुख बंदारांमध्ये सर्व कामगार संघटनांनी एकजुटीने आंदोलन केले.  मुंबई बंदरात ५ व १० डिसेंबर २०२४  रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड  एम्प्लॉईज असोसिएशन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, शोअर अँड  फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन,  मुंबई पोर्ट  प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समिती,  मुंबई पोर्ट ट्रस्ट  एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन,  यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई बंदरातील सेवेत असलेले  कामगार,  सेवानिवृत्त कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी आंबेडकर भवन आणि  मुंबई  पोर्ट  प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र  निदर्शने केली होती. भारतातील मान्यताप्राप्त सहा गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आणि बंदर व गोदी कामगारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळे हे यश प्राप्त झाले आहे, असे मत ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स ) जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी व्यक्त केले. ००००

रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या घटली

अनिल ठाणेकर ठाणे : कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने, समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ८८ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार २३ होती तर नोव्हेंबर २०२४ रोजी अखेर (तीव्र कुपोषित) सॅम २२ तर मध्यम कुपोषित (मॅम) ६२ कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आले आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम १ हजार ६४७ अंगणवाडीतील ८३ हजार ४२७ बालकांसाठी राबवण्यात येत आहे. तसेच दत्तक पालक योजना, पालकसभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ठ आणि तितकेच सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबई सारख्या नामांकित संस्थाचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडीओ मार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली आहे. गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते. तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात. त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व सहा महिन्यांनंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून गरोदर व स्तनदा मातांना बाळंतवीडा, कुपोषित मुलांना पोषकवडी, स्तनदा मातांना पाळणा इ. नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्याचबरोबर विविध स्वंयसेवी संस्था (उदा.स्नेहा फाऊंडेशन, अन्नदा फाऊंडेशन इ.) च्या मदतीने डोळखांब/ शहापूर प्रकल्पातील कुपोषित बालकासाठी कामकाज करण्यात येत आहे. परिणामी प्रतीवर्ष कुपोषीत बालकांमध्ये सुधारणा टक्केवारीत वाढ होत आहे. चौकट जिल्ह्यातील मागील तीन महिन्यातील कुपोषित बालकांची संख्या : सप्टेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ८८ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार २३, ऑक्टोबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ७६ तर मध्यम कुपोषित (मॅम) १ हजार ९, नोव्हेंबर २०२४ रोजी अखेर तीव्र कुपोषित (सॅम) ६६ तर मध्यम कुपोषित (मॅम) ९६१ आहेत.

प्रा.  डॉ प्रमोद वानखडे यांची मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : १३७ वर्ष उच्चतंत्र शिक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या माटूंगा मुंबई  येथील व्हीजेटीआय  या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये बहुजन कामगारांच्या न्याय हक्कासाठी  मागील ३० वर्षांपासून लढणाऱ्या व्हीजेटीआय मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी प्रा डॉ प्रमोद वानखडे…

 आयकर, रिझर्व्ह बँक उपांत्य फेरीत

 कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी स्पर्धा महिला गटात शिरोडकर, शिवशक्तीची आगेकूच   मुंबई –  राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात जोरदार विजयांसह डॉ. शिरोडकर, शिवशक्ती, विश्वशांती आणि स्वामी समर्थ या संघांनी उपांत्य फेरी गाठली तर पुरूषांच्या व्यावसायिक गटात आयकर विरुद्ध श्री स्वामी समर्थ, रिझर्व्ह बँक विरुद्ध रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब (आरबीएससी) अशा उपांत्य लढती रंगतील. पुरुषांच्या अ गटात विजय क्लब- लायन्स स्पोर्ट्स क्लब आणि एसएसजी फाऊंडेशन – जय भारत यांच्यात अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी संघर्ष होईल. राष्ट्रीय मिल मजदूर संघाने (आरएमएमएस)  कामगार महर्षी आंबेकरांच्या स्मृतीनिमित्त ना.म.जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर आयोजित केलेल्या कबड्डी महोत्सवात महिलांच्या गटात बलाढ्य शिवशक्ती महिला संघाने गोल्फादेवी प्रतिष्ठानचा ४३-७ असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली. विश्वशांतीनेही जिजामाता स्पोर्ट्स क्लबवर ४३-१० अशी सहज मात करीत अंतिम चार संघात आपले नाव पक्के केले. आता डॉ.शिरोडकर- स्वामी समर्थ आणि विश्वशांती- शिवशक्ती अशा तुल्यबळ उपांत्य लढती रंगतील. पुरूषांच्या व्यावसायिक गटात आरबीएससीने ओमकार, आर्यन ढवळे आणि सागर जगताप यांच्या वेगवान चढायांच्या जोरावर गंधेकर इलेक्ट्रिकलचा ४४-२० असा फडशा पाडला. तसेच रिझर्व्ह बँकेनेही ओमकार थोटे आणि संग्राम साळुंखे यांच्या तूफानी चढायांमुळे रुबी कन्स्ट्रक्शनचे आव्हान ३४-२३ असे संपुष्टात आणले. श्री स्वामी समर्थने सीबीसी संघाचा ३२-१६ असा सहज पराभव करत उपांत्य फेरी गाठली. आयकरने बीपीसीएलचा ३७-३२ असा पराभव करत सर्वांनाच धक्का दिला. पुरूषांच्या स्थानिक गटात विजय क्लबसमोर अंकूर स्पोर्ट्स क्लबचे काहीएक चालले नाही. विजयने एकतर्फी सामन्यात ४२-२८ असा विजय नोंदवत उपांत्य फेरीत धडक मारली. लायन्स स्पोर्ट्स क्लबने हर्ष मोरे आणि राज आचार्य यांच्या चढायांच्या बळावर गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबचा २८-२६ असा पराभव केला. गुड मॉर्निंगकडून साहिल राणे आणि शार्दुल पाटील यांनी संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण ते अपयशी ठरले. तसेच जय भारतने उपांत्य फेरीत धडक मारताना बंड्या मारुतीचे आव्हान २९-१७ असे मोडीत काढले तर एसएसजी आणि श्रीराम क्रीडा मंडळ यांच्यातला थरार ३०-२७ अशा अवस्थेत संपला. अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धां उपाध्यक्ष क्रीडा प्रमुख सुनिल बोरकर यांच्या आयोजनाखाली पार पडणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे‌ सहकार्य लाभत आहे. 00000