Category: होम

कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर   उल्हासनगर – महानगरपालिकेने उल्हासनगर विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी कंबर कसली असून त्याकरिता शहरातील 4 नामचिन कॉलेज व डॉक्टरांवर जनजागृतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयुक्त विकास ढाकणे, स्वीप नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी स्थायी समिती सभागृहात विधानसभा निवडणूकित जनजागृतीची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यात चांदीबाई कॉलेज, आरकेटी कॉलेज,एसएसटी कॉलेज आणि वेदांत कॉलेजचे प्राध्यापक, विद्यार्थी यांच्यासह सहायक आयुक्त विशाल कदम, मयुरी कदम,जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी, दिव्यांग अधिकारी, समाजसेविका उपस्थित होते. या बैठकीत विकास ढाकणे, किशोर गवस यांनी सर्व सदस्यांनी निवडणुक जनजागृती निमित्ताने विविध लक्षवेधक नियोजन करून त्याप्रमाणे जास्तीत जास्त परिणामकारक उपक्रम राबवून महापालिका क्षेत्रातील मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश उपस्थितांना दिले. यासोबतच महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याकडूनही मतदान जनजागृतीची शपथ घेण्यात आली असून शालेय विद्यार्थीही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. 0000

 मध्य रेल्वेने मारली बाजी

अखिल भारतीय आंतर रेल्वे खो-खो स्पर्धा रामजीक कश्यपला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मुंबई : १८ वी अखिल भारतीय आंतर रेल्वे खोखो स्पर्धा बिलासपूर, छत्तीसगड येथे संपन्न झाली. या स्पर्धेत सहा संघांनी भाग घेतला होता व हि स्पर्धा तीन दिवस सुरु होती. त्यामध्ये दक्षिण मध्य रेल्वे, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, उत्तर रेल्वे, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांचा समावेश होता. या स्पर्धेत रेल्वेच्या विविध भागातून १३ अधिकाऱ्यांसह ८८ खेळाडूंनी भाग घेतला होता. तर हि स्पर्धा नीट पार पाडण्यासाठी रेल्वे बोर्डाने १४ पंचांची नियुक्ती केली होती. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी रेल्वे बोर्डाने ४ निरीक्षकांची नियुक्ती केली होती. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान व गतविजेत्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूरचे कडवे आव्हान मध्य रेल्वे, मुंबईला होते. सुरवाती पासूनच अतिशय चुअराशीचा खेळ पाहायला मिळाला परंतु शेवटी मध्य रेल्वे मुंबईने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचा १४-१३ असा जवळ जवळ तीन मिनिटे राखून विजेतेपदाला गवसणी घातली. या सामन्यात क्षणा-क्षणाला दोन्ही संघांची कामगिरी वरचड ठरत होती. मध्यंतरला ७-७ अशी बरोबरी पाहायला मिळाली व प्रत्येक खेळाडू “कांटे कि टक्कर” देत होता व ते आपआपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत होते. दुसऱ्या डावात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरला प्रथम आक्रमण करताना सहाच खेळाडू बाद करण्यात यश आल्याने मध्य रेल्वे, मुंबईला विजय नजरेच्या टप्प्यात येत असल्याचे लक्षात आले. त्यावेळी मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी जिंकू किंवा मरू या अविर्भावात संरक्षण करताना दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खेळाडूंच्या तोंडाला फेस आणला. एक एक गुण मिळवण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या खेळाडूंना झगडावे लागत होते. तर सामन्याच्या शेवटी आक्रमण करताना मध्य रेल्वेच्या खेळाडूंनी कमालीचा खेळ उंचावत ७ खेळाडू जवळ जवळ तीन मिनिटे राखून बाद केले व मध्य रेल्वेने विजयाचा जल्लोष साजरा केला. या सामन्यात मध्य रेल्वेच्या रामजी कश्यप (२, १.१० मि. संरक्षण व ५ गुण), विजय हजारे (१.५०, २ मि. संरक्षण व १ गुण), संकेत कदम (१.३०, १.४० मि. संरक्षण),  दिलीप खांडवी (१.३०, १.३० मि. संरक्षण व १ गुण) व अवधूत पाटील (नाबाद १.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी विजेतेपद खेचून आणताना दमदार खेळ केले व मध्य रेल्वेला विजयी केले. तर पराभूत दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या अरुण गुणकी (१.२०, १ मि. संरक्षण व २ गुण), निलेश (१.४० मि. संरक्षण व १ गुण), आदित्य गणपुले (१.१०, १.१० मि. संरक्षण) व स्वामी (१.१०, १.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी दिलेली कडवी लढत गत वर्षीचा इतिहास घडवण्यास अपुरी ठरली. सामना संपल्यावर मध्य रेल्वेचे प्रशिक्षक सुधीर म्हस्के व संघ व्यवस्थापक योगेश मोरे यांनी समाधान व्यक्त करताना खेळाडूंनी विजयश्री खेचून आणल्याचे सांगितले. तृतीय क्रमांकाच्या सामन्यात पश्चिम रेल्वेने दक्षिण मध्ये रेल्वेला हरवत तिसरा कमांक पटकावला. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचे पारितोषिक रामजी कश्यपला तर उत्कृष्ट आक्रमकाचे पारितोषिक रंजन शेट्टी व उत्कृष्ट संरक्षकाचे पारितोषिक अरुण गुणकीला देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण समारंभ रेल्वे महाप्रबंधक मीनु इटियेरा यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी महाप्रबंधकांनी विजेत्या संघाचे व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत खेळलेले सर्व संघ हे रेल्वे परिवाराचे असून सर्वच संघांनी चंगल्या व उच्च दर्ज्याच्या  खेळाचे प्रदर्शन केल्याचे सांगितले.

आणि जीव भांड्यात पडला रेल्वे पोलिसांच्या तत्परतेने बारा तासात बॅग सापडली

मुंबई : लोअर परळ स्थानकात अज्ञात इसमाने मोहिणी कांबळे यांचा मोबाईल हिसकाविण्याच्या प्रयत्न केला. या घटनेत मोहिनी या चालत्या रेल्वेतून खाली पडल्या. त्यांना किरकोळ मुका मार लागला असून मुंबई सेंट्रल…

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांची ऐरोली विधानसभा निवडणूक कार्यालयास भेट

नवी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 150 ऐरोली व 151 बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपला…

 रिझवान -मधुराला प्रथम मानांकन

 रोटरी क्लब रॅपीडो कॅरम स्पर्धा मुंबई : रोटरी क्लब ऑफ डोंबिवली आयोजित तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व ठाणे डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व रोटरी भवन, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या रॅपिडो कॅरम सुपर सिक्स स्पर्धेत पुरुष एकेरी गटात मुंबई उपनगरच्या रिझवान शेख तर महिला एकेरी गटात ठाण्याच्या मधुरा देवळेला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेचे उदघाटन शनिवार दिनांक २६ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता करण्यात येईल. यानंतर पुरुष एकेरी गटाने सामन्यांना सुरुवात होईल. तर महिला एकेरी गटाचे सामने २७ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळविण्यात येतील. महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या सामान्यांचे थेट प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय विजेत्या खेळाडूंना रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने १ लाख १० हजारांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे. पुरुष एकेरी : १) रिझवान शेख (मुंबई उपनगर ), २) योगेश परदेशी ( पुणे ), ३) विकास धारिया ( मुंबई ), ४) सागर वाघमारे (पुणे), ५) झैद अहमद फारुकी ( ठाणे ), ६) संजय मांडे (मुंबई), ७) पंकज पवार ( ठाणे), ८) महम्मद घुफ्रान ( मुंबई ) महिला एकेरी : १) मधुरा देवळे ( ठाणे ) २) समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) ३) केशर निर्गुण (सिंधुदुर्ग ), ४) प्राजक्ता नारायणकर (मुंबई उपनगर), ५) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ), ६ ) उर्मिला शेंडगे ( मुंबई ), ७) अनिता कनोजिया ( रायगड ), ८) संगीता चांदोरकर (मुंबई ) ००००

शाश्वत कोकण परिषदेच्या जाहीरनाम्यातील मुद्द्यांची दखल घेणार – उद्धव ठाकरे

अनिल ठाणेकर मुंबई : शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा करण्यामागची कारणे,  प्रक्रिया  व जाहिरनाम्यातील मुद्दे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संक्षिप्तपणे माहिती देण्यात आली. उध्दव ठाकरे यांनी, शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा लक्षपूर्वक पाहिला आणि या जाहीरनाम्याचे सादरीकरण व डिझाईनचे कौतुक केले. तसेच त्यात घेतलेल्या कोकणातील मुद्द्यांची दखल घेतली जाईल असे सांगून जाहिरनाम्याच्या आणखीन प्रती देण्याचे आवाहन केले .शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बारसु- सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेने मंगळवारी भेट घेतली आणि त्यांना शाश्वत कोकण परिषदेचा जाहीरनामा सुपूर्द करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धोरणे ठरवताना शाश्वत कोकण परिषदेचा जाहिरनाम्यातील मुद्द्यांचा उद्धव ठाकरे हे नक्कीच विचार करतील असा आशावाद शाश्वत कोकण परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव व आमदार मिलिंद नार्वेकर, सचिव व माजी खासदार विनायक राऊत, राजापूर लांजा विधानसभेचे आमदार राजन साळवी, राजापूर तालुका संपर्क प्रमुख अनिल भुवड, बारसु सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेतर्फे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर, सरचिटणीस नरेंद्र जोशी, आदेश भोवड, सूर्यकांत सोडये, विनायक शिंदे, संतोष तिरलोटकर, स्वप्नील सोगम, गोपीनाथ घाडी, तुळशीदास नवाळे, महेंद्र गुरव, अमित नेवरेकर, शाश्वत कोकण परिषदेचे सत्यजीत चव्हाण, नाणारचे माजी सरपंच ओमकार देसाई, पाळेकर वाडी (नाणार) चे प्रमुख सत्यवान पाळेकर व धनाजी वालम आदी मान्यवर उपस्थित होते. चौकट कोकणातील जनतेच्या, मुंबई, वसई, सावंतवाडी, चिपळूण, चिंचणी (पालघर) व पेण येथील झालेल्या परिषदांच्या विचारमंथनातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणच्या निसर्ग व संस्कृती यांच्या शाश्वत अस्तित्त्वासाठी कोणती धोरणे अंमलात आणावी, कोणते प्रकल्प हवेत – नकोत याची स्पष्ट दिशा दर्शविणारा कोकण परिषदेचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात प्रस्तावित न करणे , ग्रीनफिल्ड व शक्तीपीठ महामार्ग रद्द करणे, सिडको व एम एस आर डी सी यांना कोकण किनारपट्टी भागातून नियोजनाचा अधिकार देणारे अध्यादेश रद्द करणे, जंगलतोड बंदी, दोडामार्ग तालुक्याचे संरक्षण, जांभ्याच्या सड्यावरील जैव विविधतेचे संरक्षण, अवैध एल इ डी , परसिनेट मासेमारीवर कृती अशा मागण्यांना धोरणात्मक निर्णयात सामील करण्याचे म्हंटले आहे.प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय , विद्यापीठ , अंगणवाडी -आशा वर्कर्स  यांना वाढीव अनुदान, कातळशिल्प संरक्षण , बोली भाषेचे जतन, स्वयंरोजगारावर भर, कृषी प्रक्रिया केंद्रे, कोकण रेल्वेचे थांबे वाढवणे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. या जाहीरनाम्यात कोकणी जनतेने अजून भर घालावी अशी अपेक्षा आहेच तरीही हा जाहीरनामा राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ते आणि कोकणातील  सर्वच जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा असे आवाहन करण्यात येत आहे. शाश्वत कोकण  परिषदचे समन्वयक सत्यजीत चव्हाण व शशी सोनावणे यांचेद्वारा प्रस्तुतचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला आहे.

उमेदवार, पक्षीय कार्यालयांसमोरील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे कल्याण-डोंबिवली शहरे वाहन कोंडीत

कल्याण : कल्याण डोंबिवली शहराच्या विविध भागात विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपली जनसंपर्क, निवडणूक कार्यालये सुरू केली आहेत. अनेक ठिकाणी पक्षीय कार्यालये हीच निवडणूक कार्यालये करण्यात आली आहेत. या कार्यालयांच्या बाहेर दररोज सकाळ, संध्याकाळ पक्षीय नेते, पदाधिकारी सार्वजनिक रस्त्यावरील वाहनांचा विचार न करता कार्यालयासमोरील रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी करत असल्याने शहरातील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. निवडणूक कार्यालयात आलेल्या नेते, पदाधिकाऱ्याला वाहन बाजुला करून घ्या, असे सांगण्यास जाणाऱ्या वाहतूक पोलिसाला उलटसुलट उत्तरे मिळण्याची शक्यता असल्याने ते आव्हान न स्वीकारता वाहतूक पोलीस, सेवक आहे त्या परिस्थितीत पक्षीय कार्यालयांसमोरील कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. डोंबिवली पूर्वेत सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावर मंगळवारी संध्याकाळी एका पक्षीय कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होती. यावेळी बहुतांशी पदाधिकाऱ्यांची वाहने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर उभी करण्यात आली होती. या वाहनांमुळे बस, ट्रक अशी वाहने त्या भागातून पुढे जाऊ शकत नव्हती. त्यामुळे अर्धा ते एक तास वाहने मानपाडा रस्ता, इंदिरा चौक, फडके रस्ता, रामनगर, टिळक रस्ता, केळकर रस्ता भागात अडकून पडली होती. नोकरदारांची कामावरून घरी परतण्याची वेळ आणि त्याच वेळेत ही कोंडी झाल्याने प्रवासी रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या पदाधिकारी, नेत्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत होते. वरिष्ठ पक्षीय नेत्यांनी नागरिकांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने पक्षीय कार्यालयापासून दूर अंतरावर किंवा पालिकेच्या, खासगी वाहनतळावर वाहने उभी करून मगच पक्षीय कार्यालयात नेते, पदाधिकाऱ्यांना येण्याच्या सूचना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. अशीच परिस्थिती कल्याणमधील विविध भागात आहे. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील कोंडी झाल्याने ही कोंडी सोडविताना वाहतूक पोलीस, सेवकांची दमछाक झाली होती. पक्षीय नेत्यांना वाहने थोडी बाजुला उभी करा, असे सांगणार कोण, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला आहे. दिवाळी सणामुळे बाजारपेठा गजबजून जातील. खरेदीसाठी नागरिक अधिक संख्येने बाहेर पडतील. त्याचवेळी निवडणूक बैठकांसाठी नेते, पदाधिकारी आपल्या पक्षीय कार्यालयांमध्ये हजेरी लावणार आहेत. या नेत्यांनी आपली वाहने नागरिकांना त्रास होणार नाहीत अशा पध्दतीने उभी करण्याची नागरिकांची मागणी आहे. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भाग, शिवाजी चौक, सहजानंद चौक, गुरुदेव हाॅटेल चौक भागातील कोंडीने नागरिक हैराण आहेत. 00000  

निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार आणि ज्योती मीना यांची माध्यम कक्षास भेट

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार आणि ज्योती मीना यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.* जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिरातीचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते. यासह निवडणुकीची मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या कक्षाचा सहभाग आहे या बाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली. राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच विविध दैनंदिन अहवाल बाबत पाहणी त्यांनी केली. निवडणूक निरीक्षक राजेश कुमार आणि श्रीमती ज्योती मीना यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिली. तसेच पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे. उमेदवाराच्या प्रचारावर आणि प्रसिद्धी साहित्यावर होणारा खर्च, खर्च पथकाला विहित नमुन्यात सादर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 0000

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी घेतला पेण विधानसभेचा आढावा

अशोक गायकवाड रायगड : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी पेण विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. तसेच पेण येथील स्ट्रॉगरूमला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी पेण कार्यालयात जिल्हाधिकारी यांनी पेण विधानसभा मतदार संघात निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीस पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार, पेण तहसीलदार तानाजी शेजाळ, उत्तम कुंभार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निवडणूकीमध्ये प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी चोख पणे पार पाडावी. आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जावळे यांनी यावेळी सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील विविध कक्षांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी जावळे व पोलीस अधीक्षक घार्गे यांनी ईव्हीएम यंत्राचे वाटप व मतमोजणीच्या दिवशी स्ट्रॉगरूममधील जागेचे नियोजन याची माहिती घेतली. ईव्हीएम सुरक्षेच्यादृष्टीने स्ट्राँगरूमचे ठिकाण व परिसराची पाहणी केली. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचा आढावा घेतला. 0000

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे गुरुवारी कल्याण, डोंबिवलीत

कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटातील एका प्रभावी गटाने महायुतीच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांचे काम करण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत महायुतीत बंडाचे वारे वाहत असतानाच, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरूवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणमध्ये येत असल्याने शिवसेनेतील बंडाच्या तयारीत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना हा सूचक इशारा मानला जात आहे. कल्याण पूर्वेत आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांचेच काम करायचे आहे. कोणीही अपक्ष निवडणूक लढवू नये किंवा बंडखोरीचा पवित्रा घेऊ नये, अशी तंबी शिवसेनेच्या वरिष्ठांनी स्थानिकांना दिल्याचे समजते. या तंबीनंतर बंडाच्या पवित्र्यातील काही जण शांत तर काही जण अद्याप अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करत आहेत. सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याची भूमिका शिवसेनेतील कल्याण पूर्वेतील काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या पदाधिकाऱ्यांना सुलभा गायकवाड याच महायुतीच्या उमेदवार असतील आणि मोठ्या मताधिक्याने त्या निवडून येतील, असा सूचक इशारा देण्याच्या व्यूहनितीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पूर्वेत येण्याचा निर्णय घेतला आहे. सुलभा गायकवाड गुरुवारी महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपब्लिकन, इतर घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महायुतीचा जनसागर गुरूवारी सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना लोटलेला असेल. तुल्यबळ असा उमेदवार समोर नसल्याने त्यांचा विजय नक्की होईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. पती आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागात केलेली विकास कामे. आपण येत्या काळात करणारी विकास कामे हा अजेंडा लोकांसमोर ठेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी सांगितले. राज ठाकरे डोंबिवलीत मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान डोंबिवलीत येणार आहेत. मानपाडा चौक येथून उमेदवार राजू पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीला सुरूवात होईल. ही मिरवणुक वाजत गाजत डोंबिवली एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे जाणार आहे. राज ठाकरे यांनी स्वताहून आपण राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने मनसेतर्फे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.