Category: होम

ठाण्यातील खोपट बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

ठाणे : लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्ज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वांनी न चुकता दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन खोपट परिसरातील बसस्थानकावर करण्यात आले. 148 ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूकविषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपट परिसरातील बसस्थानकावर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या जनजागृती मोहिमेत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघाचे मतदान जनजागृतीबाबत लावण्यात आलेले मोठे फलक हे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी स्वीपच्या पथकाने बसस्थानकावरील प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात ठाणे परिवहन बसस्थानक येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रवासी सहभागी झाले होते. यावेळी ‘मतदान जनजागृती’विषयक “माझं मत माझा अधिकार”, “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” आणि “जागरूक मतदार लोकशाहीचा आधार” या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या.

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य

ठाणे : विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून मतदान करण्यासाठी, ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव आहे, अशा मतदारांकरिता भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य…

मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या जाहिरातींना ‘एमसीएमसी’चे प्रमाणिकरण बंधनकारक

ठाणे : कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दि.20 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच…

निवडणूक विशेष पोलीस निरीक्षकांनी घेतला कोकण विभागाचा आढावा

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीची मतदान प्रक्रिया 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागातंर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांच्या तयारीचा आढावा आज निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक दीपक मिश्रा यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीदरम्यान घेतला. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून या कर्तव्यात कोणतीही कसूर राहणार नाही. या दृष्टीने विधानसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस प्रशासन यांनी सतर्क राहण्याचे आदेश देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना बैठकीत दिल्या. आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक विशेष पोलीस निरीक्षक यांनी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पालघर, रायगड, रत्नागिरी, ‍सिंधुदूर्ग येथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते. सुरूवातीला ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ठाणे जिल्हयातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रे, मतदानाची तयारी याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली. तसेच कोकण ‍विभागातंर्गत इतर जिल्ह्याबाबतही त्यांनी जाणून घेतले. ‍प्रत्येक जिल्हयात तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रुमच्या माध्यमातून मतदानाच्या एक दिवस आधी 19 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रियेची अभिरुप चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतील.‍ मतदान केंद्रावर मतदानासाठी येणारे उमेदवार हे मतदान झाल्यानंतर मतदान केंद्राच्या बाहेर 100 मीटर परिसरात रेंगाळणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे श्री.मिश्रा यांनी नमूद केले.  मतदान केंद्रावर येणाऱ्या वयोवृद्ध मतदारांसाठी जास्तीत जास्त व्हीलचेअर उपलब्ध करण्यात याव्यात, जेणेकरुन मतदारांना मतदान केंद्रावर ताटकळत उभे रहावे लागणार नाही, यासाठी आपल्या विभागातील रुग्णालय, सेवाभावी संस्थांशी संपर्क साधून व्हीलचेअरची पुरेशी उपलब्धतता प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. एखाद्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण होवून मतदान प्रक्रिया थांबली किंवा अन्य काही अडचण उद्भवली तर त्याचे वृत्त हे दिवसभर विविध वाहिन्यांवर दाखवले जाते. त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाल्यावरसुध्दा ती बातमी तशीच सतत सुरू असते याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी ‍याबाबतची माहिती घेवून संबंधित वाहिन्यांशी संपर्क साधून वस्तूस्थिती तात्काळ कळविण्याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, जेणेकरुन निवडणूक विभागाची बदनामी होणार नाही, या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही श्री.दीपक मिश्रा यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भरारी पथकाच्या माध्यमातून सुरू असलेली वाहनांची तपासणी देखील काटेकोरपणे करण्याचे निर्देश निवडणूक विशेष पोलीस‍ निरीक्षक दीपक मिश्रा यांनी पोलीस प्रशासनाला दिले. ‍कोकण विभागातील सर्व जिल्हयांची मतदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात असून एखादी समस्या उद्भवल्यास तात्काळ निवडणूक आयोगाशी समन्वय साधावा असे नमूद करीत त्यांनी निवडणूका ‍नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे पार पाडण्यासाठी सर्व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

मतदानाकरिता मतदान यंत्रे तयार करण्याची प्रक्रिया

 जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील चार मतदारसंघात पार पडली ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून मतदानाकरिता लागणारी मतदान यंत्रे मतदानाकरिता तयार करण्याची प्रक्रिया…

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी पाच जणांना पोलीस कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी गोळीबार करणारा मुख्य आरोपी शिवकुमार गौतमसह पाच जणांना सोमवारी न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मुंबई गुन्हे शाखा आणि उत्तरप्रदेश विशेष कृती दलाने रविवारी शिवकुमार आणि इतर चार जणांना उत्तर प्रदेशमधील बहराईच जिल्ह्यातील नानपारा येथून अटक केली. शिवकुमार याला आश्रय दिल्याप्रकरणी तसेच नेपाळला पळून जाण्यास मदत केल्याबद्दल अनुराग कश्यप, ज्ञानप्रकाश त्रिपाठी, आकाश श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रताप सिंग या चौघांना अटक करण्यात आली होती. गुन्हे शाखेने आरोपीला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी विनोद पाटील यांच्यासमोर उपस्थित केले. या प्रकरणातील आर्थिक बाबी तसेच गुन्ह्यादरम्यान वापरण्यात आलेले शस्त्र कसे मिळवले, याची चौकशी करायची असून शिवकुमारला देण्यात आलेल्या पैशांचा स्रोतही तपासण्याची गरज आहे, असे सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे त्याला पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली. आरोपीचे वकील अमित मिश्रा यांनी, शिवकुमार तपासात सहकार्य करत असल्याचा दावा केला. तसेच, अन्य चौघांवर केवळ शिवकुमारला आश्रय दिल्याचा आणि पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे, असा युक्तिवाद मिश्रा यांनी न्यायालयात केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने पाच जणांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यांच्या छातीवर दोन गोळ्या लागल्याने उपचारासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, दाखल करण्यापूर्वीच सिद्दिकी यांचा मृत्यू झाला होता.

मुंबईच्या विकासासाठी महापालिका, महापौरांना अधिक अधिकार हवेत,

‘मुंबई फर्स्ट’च्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांची भूमिका मुंबई : मुंबईच्या विकासासाठी सर्वात आधी मुंबई महापालिकेची निवडणूक घ्यायला हवी. सर्वोच्च न्यायालय गेली दोन वर्षे फक्त तारखांवर तारखा देत आहे. प्रभागांची संख्या कितीही असू द्या आधी निवडणूक घ्या, कोणीही जिंकेल, पण निवडणूक झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी मांडली. आमचे सरकार आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला प्राधान्य असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर मुंबईचा विकास करायचा असेल तर मुंबई महापालिकेला आणि महापौरांना अधिक अधिकार द्यायला हवेत. मुंबई महापालिकेवर नुसत्याच जबाबदाऱ्या नकोत, तर अधिकारही हवेत, असेही मत ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच एमएमआरडीएसारख्या जबाबदारी नसलेल्या प्राधिकरणांची मुंबईला आवश्यकता नसल्याचे मतही त्यांनी मांडले. ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिटिकल टाऊन हॉल’ अंतर्गत एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चगेटच्या इंडियन मर्चंट चेंबरमध्ये झालेल्या या चर्चासत्रात वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार खासदार मिलिंद देवरा सहभागी झाले होते. देवरा आणि ठाकरे यांच्यात लढत होणार असून हे दोघेही या चर्चासत्रात सहभागी झाले होते. पण उभय उमेदवार एकत्र आले नाहीत. देवरा यांनी आधी भूमिका मांडली. ते निघून गेल्यावर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. मुंबईमध्ये महापालिकेव्यतिरिक्त १८ विविध प्राधिकरणे आहेत. मात्र नियोजन प्राधिकरण म्हणून मुंबई महापालिकेलाच आणि महापौरांना अधिकार दिले पाहिजेत, असे मत यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. मुंबईतील कोणत्याही गोष्टीची जबाबदारी महापालिकेवर टाकली जाते, पण त्या तुलनेत महापालिकेला अधिकार नाहीत, असे ते म्हणाले. धारावी प्रकल्पाला विरोध नाही धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबतही ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. या प्रकल्पासाठी संबंधित कंपनीला धारावीची ५४० एकर जागा दिली आणि मुंबईतील विविध ठिकाणच्या जमिनीही दिल्या आहेत. तसेच अधिमूल्यातून सवलतीही दिल्या आहेत. जास्तीचे चटई क्षेत्रफळ निर्देशांक दिले आहे. त्यामुळे धारावीतील रहिवाशांची संख्या दुप्पट, तिप्पट वाढणार आहे. एवढ्या लोकसंख्येला सामावून घेण्याची क्षमता मुंबईत आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला छत्तीसगडमधून अटक;

५० लाखांची मागितली होती खंडणी मुंबई : गेल्या महिन्यात माजी मंत्री बाब सिद्दिकी यांची हत्या झाल्यापासून अभिनेता सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहरुख खानलादेखील जीवे मारण्याची धमकी आली होती. आता या प्रकरणात कारवाई करत मुंबई पोलिसांनी छत्तीसगडमधून संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या आरोपीची चौकशी करत आहेत. गेल्या आठवड्यात वांद्रे पोलीस ठाण्यात फोन करत शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावेळी आरोपीने ५० लाखांची खंडणीही मागितली होती. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करत मुंबई पोलीसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रायपूरला रवाना झाले होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपीबाबतीची अधिकची कोणतीही माहिती उघड केलेली नाही. शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी येण्यापूर्वी अभिनेता सलमान खानलदेखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशात २४ ऑक्टोबर रोजी बिश्नोई टोळीच्या नावाखाली सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी जमशेदपूरमधून अटक केली होती. या आरोपीने सलमानकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सलमान-शाहरुखची सुरुक्षा वाढवली या सर्व घडामोडींनंतर मुंबई पोलिसांनी दोन्ही अभिनेत्यांची सुरक्षा वाढवली आहे. एप्रिलमध्ये सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर त्याला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमानच्या गॅलेक्सी या घराबाहेर गोळीबार करणारे आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. यापूर्वी सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले होते की, “ही सर्व योजना लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल याने आखली होती. १५ मार्च २०२४ रोजी पनवेलयेथे हत्यारं आल्यानंतर अनमोलने हल्लेखोरांना सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यास सांगितले होते. त्यानंतर अनमोलच्या सांगितल्याप्रमाणे सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला. या घटनेच्या कालावधीत हल्लेखोरांना तीन लाख रुपये देण्यात आले होते.”

ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात हजारो कोट्यवधी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प आणि सार्वजनिक वाहतुकीचे राष्ट्रीय प्रकल्प उभारले जात असले तरी जिल्ह्यातील प्रामुख्याने कल्याण ग्रामीण आणि पश्चिम, डोंबिवली, ठाणे शहर, भिवंडी ग्रामीण आणि पश्चिम याचबरोबर शहापूर या विधानसभा मतदारसंघांमधील अंतर्गत आणि बाह्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या जटील आहे. परंतु विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेले आणि स्वतःला भावी आमदार म्हणून भूषण मिरवणाऱ्या सर्व उमेदवारांनी वाहतूक कोंडीच्या मुद्द्याला प्रचारात पूर्णपणे बगल दिली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्याच्या प्रचारातून वाहतूक कोंडीचा मुद्दाच हरवला असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वच उमेदवारांकडून निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. यंदा जवळपास सर्वच पक्षातील उमेदवारांकडून मोठी विकासकामे, आर्थिक मदतीची घोषणा, महापुरुषांची स्मारके तर विविध समाजासाठी भव्य वास्तू यांसारख्या अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रश्न असलेल्या आणि दिवसेंदिवस अधिक त्रासदायक होत असलेल्या वाहतूक कोंडीच्या विषयाला सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचार मुद्द्यातून बगल दिली असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे जिल्ह्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई – बडोदा राष्ट्रीय महामार्ग, मालवाहतुक विशेष रेल्वे मार्ग, ऐरोली – काटई उन्नत मार्ग, कल्याण रिंग रोड यांसारखे काही हजार कोटी…

शंभराव्या आयडियल बुध्दिबळ स्पर्धेचे सर्वत्र कौतुक

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ग्रुपतर्फे बालदिनाचे औचित्य साधून परेल येथील आरएमएमएस वातानुकुलीन सभागृहात झालेल्या शंभराव्या यशस्वी बुध्दिबळ स्पर्धेचे महाराष्ट्रातून सर्वत्र कौतुक होत आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत…