Category: होम

धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन आणि नियमित करण्यासाठी समिती

मुंबई : धारावी पुनर्विकासअंतर्गत धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि नियमित करण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आता राज्य सरकारने सात सदस्य समिती गठित केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहे. रखडलेला धारावीचा पुनर्विकास आता अखेर प्रत्यक्ष मार्गी लागणार आहे. सध्या धारावीतील झोपड्यांचे, बांधकामाचे सर्वेक्षण सुरू आहे. रहिवाशांची पात्रता निश्चिती केली जात आहे. दरम्यान धारावीत मोठ्या संख्येने धार्मिक स्थळे आहेत. त्यात धारावीत अनधिकृत धार्मिक स्थळेही मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळांचे निष्काषन आणि स्थलांतराचा प्रश्न गंभीर झाला आहे. धारावीत एक अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यावरून नुकताच तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार धारावीतील अनधिकृत धार्मिक स्थळांचे निष्कासन, स्थलांतर आणि ती नियमित करण्यासाठी राज्य सरकारने एक सात सदस्य समिती स्थापन केली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार ही समिती अनधिकृत धार्मिक स्थळांबाबतचा प्रश्न मार्गी लावणार आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे. समितीत मद्रास उच्च न्यायालयाचे माजी अतिरिक्त मुख्य न्यायाधीश जी. एम. अकबर अली, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी, मुंबई; सह सचिव, उप सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई; सह सचिव, उप सचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय; सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था); उपजिल्हाधिकारी आणि सक्षम प्राधिकारी, मुंबई (सर्व सदस्य) यांचा समावेश आहे.

विधानसभेसाठी मराठा समाजाचा ‘मराठा पॅटर्न’

 महिनाभर मराठा जोडो अभियान ठाणे : मराठा समाजाबाबत सर्वच राजकिय पक्षांची उदासिनता पाहता आगामी काळात मराठा एकजुटीची ताकद दाखवुन देण्यासाठी येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने “मराठा पॅटर्न” राबवण्याचा यल्गार केला आहे. या अनुषंगाने आगामी एक महिना “मराठा जोडो अभियान” ठाण्यातील चारही विधानसभा क्षेत्रात राबवणार असल्याची माहिती ठाणे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ॲड. संतोष सुर्यराव आणि प्रविण पिसाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नसल्याने मराठा समाज आक्रमक होत आहे. ठाण्यातही सकल मराठा समाजाच्या बैठकींचा रतीब सुरू झाला असुन आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी मराठा क्रांती मोर्चाने ठाणे शासकिय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन भूमिका आपली स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेला प्रविण पिसाळ, प्रविण कदम, दत्ता चव्हाण, दिनेश पवार, रमेश चौधरी, संतोष पालांडे आदीसह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना, समन्वयक ॲड. सुर्यवंशी यांनी, यापूर्वी राणे समितीच्या अहवालावरून दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले नाही, नंतर युती सरकारने दिलेले आरक्षण उच्च न्यायालयात टिकले पण, सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही.तेव्हा, आम्हाला केवळ गृहित धरले जाते, असे असंविधानिक आरक्षण देण्याऐवजी ५० टक्यांच्या आतच आरक्षण द्यावे. यासंदर्भात सरकारने नेमलेल्या गायकवाड आयोग तसेच शिंदे समितीनेही अनुकुल अहवाल दिला असे असतानाही ४० वर्ष झाली तरी मागण्या मान्य होत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेव्हा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आपल्या मागण्यासाठी कोणत्याही राजकिय पक्षाशी बांधिलकी न ठेवता मराठा पॅटर्न राबवणार आहे. तसेच आगामी एक महिना ठाण्याच्या चौकाचौकात “मराठा जोडो अभियान” राबवुन मराठा समाजाला जागरूक करणार आहे.   ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघासह चारही विधानसभा क्षेत्रात मराठा समाजाची मोठी ताकद असल्याने मराठा उमेदवार देणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे विधानसभेत १ लाख ३५ हजार मराठा मतदार तर ओवळा – माजीवडयात ५ लाख मतदारांपैकी १ लाख ५० मराठा, कोपरी- पाचपाखाडीत ८० हजार आणि कळवा – मुंब्रा मतदारसंघात ३५ हजार मराठा मतदार आहेत. याकडेही मराठा समन्वयकांनी लक्ष वेधले. चौकट मराठा समाजाच्या मागण्या * कोपर्डी अत्याचारातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. * ५० टक्याच्या आत टिकणारे आरक्षण हवे. * जातनिहाय जनगणना झाली पाहिजे * ओबीसीसह सर्व जातींचे फेर सर्वेक्षण व्हावे * सारथी उपकेंद्र ठाण्यात उभारून त्याची व्याप्ती वाढवावी * ठाण्यात मराठा हॉस्टेल व मराठा भवन व्हायला हवे * सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी नेमकी कशामुळे अडली हे स्पष्ट करावे. * मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

माथेरानमध्ये जंतुनाशक फवारणी

माथेरान : गावातील काही भागातील नागरिकांची स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसल्याने काही ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला असून काही दिवसांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विषयक सावधगिरी बाळगून गावातील भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून उत्तम प्रशासक तथा कार्यक्षम मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या सूचनेनुसार जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. गावातील उघडी गटारे आणि त्यातूनच वाहून जाणारे सांडपाणी आणि स्वच्छतेच्या बाबतीत मानसिकता नसलेल्या नागरिकांनी उघड्या गटारात टाकलेल्या ओल्या कचऱ्यामुळे सुध्दा डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नागरिकांना आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. डेंग्यू सारखे आजार बळावले तर एखाद्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता आहे. यासाठी स्वच्छता राखणे हे नागरिकांचे सुध्दा कर्तव्य आहे.घनकचरा व्यवस्थापनाच्या कचरा वेचक महिला नियमितपणे कचरा गोळा करण्यासाठी घरोघरी जाऊन कचऱ्याचे संकलन करीत असतात परंतु जे नागरिक अनेकदा घरातील कचरा उघड्या गटारात टाकत आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास वचक बसून स्वच्छता राखण्यास मदत होऊ शकते.

घोडबंदर खाडी किनाऱ्यावर उभारणार आकर्षक ग्लास स्कायवॉक

 १०० कोटींचा निधी मंजूर-प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर / अरविंद जोशी भाईंदर : ऐतिहासिक घोडबंदर किल्ल्याचे जतन – संवर्धन होण्याच्या दृष्टीने काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे.  घोडबंदर  खाडी किनारा विकासाचे कामही लवकरच सुरु होत आहे. याच शेजारी असलेल्या जागेत भव्य ‘शिवसृष्टी’चे कामही मंजूर झाले आहे. त्याजवळ हा खाडी किनारा विकास सुरु होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार आहेत.  आता वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या दुसऱ्या टप्प्यात, मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील घोडबंदर खाडी किनारा व घोडबंदर किल्ल्याला जोडणाऱ्या स्काय वॉक तयार करण्यासाठी १०० कोटींच्या कामास निधीसह राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे.जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा ग्लास स्काय वॉक असेल. हा तयार होणारा ग्लास स्कायवॉक आकर्षक डिझाईनचा असणार असून फक्त मीरा भाईंदरच नाही तर मुंबई महानगरातील पर्यटकांच्या पसंतीस तो उतरेल असा विश्वास आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यात घोडबंदर खाडी किनारा विकास म्हणजेच वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटचे काम आता सुरु होत आहे. दुसऱ्या टप्प्यात येथे खाडी किनाऱ्यावरून थेट किल्ल्यात , शिवसृष्टीला जोडणारा स्काय वॉक असावा अशी संकल्पना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडली. त्याला राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने निधीसह मंजुरी दिली आहे.  घोडबंदर येथे खाडी किनारा विकासाचे काम जिथे पूर्ण होईल त्या खाडी किनाऱ्यापासून तिथपासून घोडबंदर किल्ला वरील भागात म्हणजे उंचावर आहे. खाडी किनाऱ्यावरून उंचावरील किल्ल्यात व पुढे तयार होणाऱ्या शिवसृष्टीत जाण्यासाठी एक आकर्षक स्काय वॉक तयार करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. या स्काय वॉकचा बराचसा भाग हा पारदर्शक काचेचा असणार आहे. ‘ग्लास स्कायवॉक’ किंवा ‘ग्लास ब्रिज’ म्हणून त्याची ओळख होईल. जे पर्यटक खाडी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येतील त्यांना थेट किल्ल्यात किंवा शिवसृष्टीत जाण्यासाठी हा काचेचा स्कायवॉक मदत करेल. जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा स्काय वॉक असेल. खाडी किनाऱ्यावरून जाणारा हा स्कायवॉक म्हणजे पाण्याच्या वरून जाण्याचा अनुभव पर्यटकांना घेता येईल. त्यात काचेचा स्काय वॉक असल्याने त्याचे विशेष आकर्षण अधिक वाढेल. या स्काय वॉकचे संकल्पचित्र बनवले जात असून आकर्षक आगळेवेगळे व लक्षवेधी असे ग्लास स्कायवॉक चे डिजाईन असेल. शिवाय या काचेच्या स्काय वॉकवरून आजूबाजूच्या परिसराची दृश्ये पाहता व टिपता यावीत यासाठी ‘व्यूइंग डेक’ तयार करण्याचाही आमदार सरनाईक यांचा विचार आहे. घोडबंदर खाडी किनारा ते किल्ला – शिवसृष्टी असे दोन पॉईंट या स्काय वॉकने जोडले जातील.घोडबंदर खाडी किनारा ते घोडबंदर किल्ला साधारणतः ४५० मीटर लांबीचा स्काय वॉक असेल तर तिथून पुढे शिवसृष्टीपर्यंत जोडण्यासाठी ५०० मीटर असा जवळपास १ किलोमीटर लांबीचा हा ग्लास स्कायवॉक असणार आहे. स्काय वॉक बरोबर परिसर सुशोभीकरणही केले जाईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु विद्यालयातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी आंदोलनाचा इशारा

राजेंद्र साळसकर मुंबई : शिवाजी नगर गोवंडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु विद्यालयातील कथित भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराबाबत गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे वारंवार तक्रारी करूनही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या विरोधात ९ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश राजाराम गुंडेट्टी व श्रीहरी महेश गुंडेट्टी यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या,  ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आपला तेजोमय आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू विद्यालयात काही समाजकंटकांनी ही संस्था ताब्यात घेऊन कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी  केला आहे. या कथित समाजकंटकांनी भायखळा येथील रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले.त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली.निबंधकानी संस्थेचे बँक खाते गोठविले.त्यामुळे शिक्षेकत्तर कर्मचारी ३ महिने पगारापासून वंचीत राहिले. याबाबत आम्ही शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडे तक्रार केली परंतु तक्रारीची दखल घेतली नाही.अखेर न्याय मिळत नसल्याने आम्ही सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ ऑक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार – बबनराव मदने

रमेश औताडे मुंबई : धनगर व धनगड या शब्दातील ‘ड’ या अक्षरामुळे गेल्या ६८ वर्षापासून धनगर समाज आजही आरक्षणापासून वंचित राहिला आहे. सरकारने जर आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर राज्यभरातील शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार असा इशारा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. धनगर एस टीआरक्षण अंमलबजावणी, आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून धनगर समाजातील प्रतिनिधीनां संधी मिळावी. १९५६ च्या एस टी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमे ३६ वर धनगर अशी नोंद आहे. मात्र देवनागरी लिपीत इंग्रजीमधून धनगरचे स्पेलिंग धनगर   याऐवजी धनगड असे लिहिले आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ घेवून गेल्या ६८ वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. धनगर समाज कोणाच्या ताटातले आरक्षण मागत नाही जे घटनेत आरक्षण दिले आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असे बबनराव मदने म्हणाले. यावेळी पक्षाच्या स्वामिनिताई चव्हाण, महेंद्र साळुंखे, श्रीकांत मयेकर, भूषण नागवेकर, समर्थ भाईंदरकर, ललन पाल, सुरेश बोहोत, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मुरबाडमध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार— शैलेश वडनेरे

राजीव चंदने मुरबाड : ‘मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता, पाणी,आरोग्य योजनेचा बोजवारा उडाला असून पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला एक संधी दिली आणि मी आमदार झालो तर मुरबाड मध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार’, असे प्रतिपादन शैलेश वडनेरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये केले आहे, मुरबाड हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असून माता भिमाईचे जन्म स्थान आहे. आज पर्यंत आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड तालुक्यातील आंबेटेबें येथील भिमाई भुमीला भेट दिली नसून भीमअनुयायीनां उपेक्षित ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे,असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) उमेदवार शैलेश वडनेरे यांनी उपस्थित पत्रकारांना चर्चा करत असताना त्यांनी सांगितले मी आमदार झालो तर सर्वप्रथम भिमाई भुमीचा विकासाचा काया पालट केल्या शिवाय राहणार नाही,तसेच तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा विकास काम हे माझे धोरण आहे, मुरबाड विधानसभा क्षेत्रा मधील अनेक वाडया पाड्यात रस्ते झाले नाही,विज पुरवठा मध्ये चाललेला सावळा गोधळ,पिण्याच्या पाण्याची समस्या असे अनेक रखडले  विकास काम पहिल्यांदा करणार असे दै, बित्तंबातमीशी बोलताना सांगितले.

पेजर वॉरच्या निमित्ताने…

खास बात दीपक शिकारपूर अलिकडे गोंधळ माजवणाऱ्या, जगाचे लक्ष वेधणाऱ्या आणि मोठी हानी पोहोचवणाऱ्या ‌‘पेजर बॉम्ब‌’च्या निमित्ताने युद्धाचे वेगळे आणि हायटेक स्वरुप समोर आले. या माध्यमातून लेबनॉनमध्ये अनेक पेजरमध्ये स्फोट…