Category: होम

शहापूर मतदारसंघात 9 हजार मतदारांची वाढ

ठाणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सरू आहे, तर दुसरीकडे लोकशाहीच्या या उत्सवासाठी जिल्हा प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. त्यानुसार नुकतेच जिल्हा प्रशासनाकडून १८ विधानसभा…

 नाशकातून आता नव्या वेळेत झेपावणार विमाने

‘इंडिगो’चे हिवाळी वेळापत्रक जाहीर; २- २७ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी   हरिभाऊ लाखे नाशिक : इंडिगो कंपनीने नाशिक विमानसेवेचे हिवाळी सत्रातील वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार नाशिकच्या विमानांच्या वेळांत काही बदल करण्यात आले आहेत. काही शहरांतून नवी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीही उपलब्ध होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक विमानतळावरील इंदूर, गोवा, नागपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, नवी दिल्ली, हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यांपैकी काही शहरांच्या विमानांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. बेंगळुरूसाठी एक तास आधी, तर हैदराबादसाठी दोन तास आधी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंदूरची वेळ तीन तास उशिरा, तर अहमदाबाद विमानाची वेळ दुपारऐवजी सायंकाळची करण्यात आली आहे. नवी दिल्ली विमानाच्या वेळेत मात्र कोणताही बदल नाही. दि. २७ ऑक्टोबरपासून नाशिक येथून जयपूरसाठी (व्हाया इंदूर) विमानसेवाही सुरू होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार नाशिकला अबूधाबी, बँकॉक, कोलम्बो, शिकागो, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, मॉरिशस, वॉशिंग्टन यांसारख्या ४२ देशांतील शहरांना दररोज आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. वेळांतील बदल नाशिक- गोवा : दुपारी १२.०५ ऐवजी १२ वाजता उड्डाण, १.५० ऐवजी १.४० ला लॅण्डिंग नाशिक-अहमदाबाद : सकाळी १०.४५ ऐवजी सायंकाळी ५.४५ ला उड्डाण, दुपारी १२.१० ऐवजी सायंकाळी ६.५५ ला लॅण्डिंग नाशिक नागपूर : सायंकाळी ४.२० ऐवजी ४.३५ ला उड्डाण, सायंकाळी ६.१० ऐवजी ६.०५ ला लॅण्डिंग नाशिक-हैदराबाद : दुपारी २.२५ ऐवजी १२.३० ला उड्डाण, सायंकाळी ४.२० ऐवजी दुपारी २.१० ला लॅण्डिंग नाशिक-बेंगळुरू : सायंकाळी ४.५० ऐवजी ३.४० ला उड्डाण, सायंकाळी ६.३५ ऐवजी ५.३० ला लॅण्डिंग नाशिक-इंदूर : दुपारी ११.०५ ऐवजी २.४० ला उड्डाण, १२.२० ऐवजी ३.५० ला लॅण्डिंग गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर लॅण्डिंग गोव्यात आता उत्तर गोवा विमानतळाऐवजी दाबोलिम विमानतळावर नाशिक विमानाचे लॅण्डिंग होणार आहे. या विमानतळावर सेवा शुल्क कमी असल्याने प्रवाशांच्या विमानभाड्यात काहीशी कपात होणार आहे.

 कल्याणकडे ‘मनसे’ लक्ष;

 ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता   कल्याण : २०१९च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय मिळालेला एकमेव मतदारसंघ अशी कल्याण ग्रामीण मतदार संघाची ओळख आहे. आगरीबहुल असा हा मतदारसंघ असून मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा हा मतदार संघ असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. या मतदारसंघातून राजू पाटील हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणारे हे निश्चित असले तरी मनसे प्रमुख राज ठाकरे या मतदारसंघात नेमका कोणता पवित्रा घेणार, याविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत माघार घेऊन निवडणूक न लढवणारे माजी आमदार सुभाष भोईर शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याने ही लढत चुरशीची ठरणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे महापालिकेतील काही भाग, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुक्यातील काही भाग, नवी मुंबईतील गावे तसेच कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसर अशा विस्तृत परिसरात कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विस्तार आहे. या मतदारसंघात आगरी मतदारांचे प्राबल्य असल्याने सर्वच राजकीय पक्षाकडून या मतदाराच्या मतांचे दान मिळविण्यासाठी आगरी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र काहीही असले तरी यावेळी मातब्बरांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मतदारसंघाने यापूर्वी दोनवेळा मनसेच्या बाजूने कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेकडून मनसेला विधानसभेत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर खासदार शिंदे यांच्या प्रचारात राजू पाटील पुढाकार घेतला होता. त्यामुळे या मदतीची परतफेड शिवसेना आणि डॉ. शिंदे यांच्याकडून होईल, अशी मनसेला अपेक्षा आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत भोईर यांना उमेदवारीपासून दूर ठेवळे होते. मात्र शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर भोईर हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार झाले आहेत. मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या मताची जोड त्यांना मिळणार असल्याने महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे. महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात असून भाजपाचे नंदू परब उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप करत आहेत. तर शिवसेनेकडून डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ठाणे महापालिकेचे उप महापौर रमाकांत मढवी आणि कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्यात चुरस वाढली आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाला सुटल्यास ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून भोईर यांच्या मतामध्ये विभाजन करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गत निवडणुकांची पार्श्वभूमी २००९च्या निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेकडून रमेश पाटील यांची लढत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यामध्ये बरोबरी होती. मात्र त्यावेळी मनसेच्या लाटेत रमेश पाटील यांचा विजय झाला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत रमेश पाटील यांच्यावर शिवसेनेच्या सुभाष भोईर यांनी मात करत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यावर मात करत हा मतदारसंघ जिंकला. सुभाष भोईर यांनी यावेळी शांत राहण्याचा घेतलेला निर्णय काहीसा मनसेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा होती. २०१९ च्या निवडणुकीत मनसेने हा मतदारसंघ जिंकला असला तरी आता परिस्थिती बदलली आहे. 0000

 देवनार डम्पिंगवरील पुनर्वसनाचा मुद्दा वादात

 मानखुर्द मतदारसंघात उमेदवारांना डोकेदुखी   मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडच्या काही भागावर धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत मानखुर्द विधानसभा क्षेत्रात गाजण्याची चिन्हे आहेत. देवनार विभागाचा काही भाग अणुशक्ती नगर मतदारसंघात, तर डम्पिंगचा भाग मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे मानखुर्द-शिवाजीनगर भागातून उभ्या राहणाऱ्या  महायुतीच्या उमेदवारासाठी पुनर्वसनाचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. देवनार  डम्पिंग ग्राउंडच्या काही भागावर धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकाराने दोनच दिवसांपूर्वी घेतला. त्यामुळे देवनार पुन्हा चर्चेत आले आहे. देवनार डम्पिंग बंद करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. मात्र, डम्पिंग ग्राउंड अजून बंद करण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. वीज निर्मितीतून  ६०० मेगावॅट वीज – देवनार डम्पिंंग येथे वीज निर्मितीचा प्रकल्पही सुरू केला जाणार आहे. दोन टप्प्यांत सुरू केल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून ६०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. – डम्पिंग ग्राउंडच्या एकूण क्षेत्रफळापैकी काही भागांत पुनर्वसन आणि काही भागात वीज निर्मिती प्रकल्प अशी योजना आहे. सोयी-सुविधांवर भार अनेक वर्षे देवनार डम्पिंंगवर कचरा साठवला जात असल्याने या भागातील जमिनीची गुणवत्ता ढासळली आहे. शिवाय हा भाग प्रदूषितही झाला आहे. अशा ठिकाणी लोकांसाठी घरे बांधणे संयुक्तिक नाही, असा सूर उमटत आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे या भागातील पायाभूत सोयी-सुविधांवर आधीच ताण आहे. त्यातच हजारो नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार असल्याने आधीच अपुऱ्या असलेल्या सोयी-सुविधांवर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. देवनारवर आणखी किती भार टाकणार, हा मुद्दा उपस्थित होत आहे. पुनर्वसनाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने मानखुर्द मतदारसंघात महाविकास आघाडी या निर्णयाच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. त्यामुळे या भागातील महायुतीच्या उमेदवाराला डोकेदुखीचा सामना करावा लागेल, असे दिसते. 0000

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरील ”  थॉटस् ऑफ आंबेडकर ” पुस्तकाचे प्रकाशन

रमेश औताडे मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक भाषणातील विविध पैलूंची विषयावर रचना असलेले ” थॉटस् ऑफ आंबेडकर ” या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी मुंबई प्रेस क्लब येथे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अर्जुन डांगळे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नामदेव साबळे म्हणाले, हे पुस्तक आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव आणि भारतीय घटनेचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संकलन आहे. बाबासाहेबांचे क्रांतीकारी परिवर्तनवादी विचार हे भारतातल्या शोषित, पिडीत पददलित लोक समुहाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय लढ्यांना ऊर्जा नि प्रेरणा देणारे विचार आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या विचारा शिवाय इथला सर्वहारा वर्ग त्याच्या मनुवादी बामन, बनिया शोषकाविरुद्ध, शोषकांच्या शासनाविरुद्ध आणि या शोषकांचं रक्षण करणाऱ्या समाज व धर्मव्यवस्थेविरुद्ध सर्वंकष निर्णायक लढा उभारू शकत नाही असे नामदेव साबळे म्हणाले. यावेळी दलित पॅंथर एनएलडी चे केंद्रीय अध्यक्ष सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, राजकीय विश्लेषक सुनील कदम, दैनिक सार्वभौम राष्ट्र चे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक साहित्यिक विचारवंत राजू रोटे तर सूत्रसंचालन केतकी प्रकाशन कार्यकारी संपादक पंकज चाळके यांनी केले. 0000

ऍड. वैशाली घरत यांना बळीराजा सेनेतून उमेदवारी जाहीर

राजीव चंदने मुरबाड : ऍड. वैशाली घरत मुरबाड विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बळीराजा सेनेतून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. मुरबाड विधानसभा निवडणुकीत सध्या कोण उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणुका लढवणार हे चित्र स्पष्ट नसले तरी काही पक्षानी उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. यात अपक्ष उमेदवारही मागे राहिलेले नाहीत. ऍड. वैशाली घरत गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे,  त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. ऍड. घरत ह्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक चळवळीत सक्रिय आणि अग्रेसर आहेत.याचा फायदा हा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो असा अंदाज आहे. कोट पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करेन. आतापर्यन्तच्या राजकीय इतिहासात मुरबाडमध्ये विधानसभा निवडणुकीत महिलांना कुणीही न्याय दिला नाही. माझ्या पक्षाने मला उमेदवारी देऊन समस्त नारीशक्तीचा सन्मान केला आहे. शेतकरी, महिला, विदयार्थी यांच्या न्याय हक्कासाठी आमचा पक्ष पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरला आहे. ऍड. वैशाली घरत

 विक्रमगड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

प्रकाश निकम यांच्यासाठी कार्यकर्ते आग्रही   योगेश चांदेकर पालघरः विक्रमगड- विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी व्हायचा असेल, तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडला पाहिजे, असा आग्रह पदाधिकाऱ्यांतून केला जात आहे. त्यासाठी दबाव गटही तयार झाला आहे. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत  भाजपच्या विष्णु सवरा यांच्याकडून युती नसताना निकम यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. तर विक्रमगड मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे सुनील भुसारा आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभेत  डॉ हेमंत सवरा यांचा युती असताना  २१ हजार पेक्षा जास्त  मतांनी सुनील भुसारा यांनी पराभव केला होता, महायुतीच्या विजयासाठी निकमच हवेत गेल्या दोन निवडणुकीचा अनुभव तसेच त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निकम यांनी केलेली गावनिहाय कामे आणि गावोगाव त्यांचा असलेला संपर्क यामुळे या मतदारसंघातून महायुतीला विजय मिळवायचा असेल, तर निकम यांच्यासारख्या नेतृत्वाला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडला पाहिजे, असा आग्रह शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. नगरपंचायत, पंचायतसमिती,ग्रामपंचायतीत वर्चस्व या आग्रहासाठी त्यांनी जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यातील कोणकोणती सत्तास्थाने कोणा कोणाच्या ताब्यात आहेत, याचा संदर्भ दिला आहे. मोखाडा तालुक्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समीती शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत, तर सुमारे ८०% ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे सरपंच आहेत. याशिवाय जव्हार तालुक्यात तीन जिल्हा परिषद गटापैकी १ गट शिंदेच्या शिवसेनेकडे तर १ गट भाजपकडे तर  १ गट अजितपवार गटाकडे आहे. तर जव्हार नगरपरिषद ही शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत तर बऱ्याच ग्रामपंचायतीही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे तसेच विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचा १ गट पंचायत समितीचा १ गण  शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत, आणि  विक्रमगड नगरपंचायतीवर जिजाऊचा झेंडा असला तरी १ नगरसेवक तसेच नंबर २ च्या मतांची संख्या   शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. या तालुक्यातही बऱ्याच  ग्रामपंचायतीही ताब्यात आहेत. मतदारसंघ न सोडल्यास पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत विद्यमान खासदार हेमंत सवरा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते; परंतु त्या वेळी ते त्यांचा पराभव झाला , असे शिंदे गट निदर्शनास आणतो. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे वर्चस्व कसे आहे आणि शिंदे गटाला डावलून हा मतदार संघ महायुतीतील अन्य पक्षाकडे गेल्यास पराभवाची पुनरावृत्ती कशी होऊ शकते, याचे दाखले कार्यकर्त्यांनी दिले आहेत. महायुतीत दबावाचे राजकारण शिवसेनेचा शिंदे गटाला हा मतदारसंघ सोडणे कसे आवश्यक आहे, यासाठी आणि प्रकाश निकम हेच या मतदारसंघातून महायुतीला कसा विजय मिळवून देऊ शकतात, हे पटवून देण्यासाठी शिवसेनेच्या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यास जाणार असून महायुतीच्या जागावाटपत हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटालाच कसा सोडला जावा, यासाठी आग्रह राहणार आहे. महायुतीत अनेक मतदारसंघासाठी दबावाचे राजकारण सुरू असते तसेच दबावाचे राजकारण आता विक्रमगड विधानसभा  मतदारसंघातही सुरू झाले आहे. निकम यांच्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ मिळाला पाहिजे, यावर आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भर आहे. हा मतदारसंघ केवळ प्रकाश निकम यांच्यासाठी सोडला जावा आणि त्यांनी गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागातील केलेल्या विकासकामांची परिणती विजयात व्हावी, असा शिंदे गटाचा आग्रह आहे. लोकसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे होता; परंतु ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडून काढून घेऊन तो भाजपने ताब्यात गेला. त्या वेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असता, तर निकम हे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते; परंतु हा मतदारसंघ त्या वेळी भाजपला गेल्याने निकम यांना थांबावे लागले. या परिस्थितीत किमान आता तरी त्याच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा असा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे. निकम यांचे वरिष्ठांशी चांगले संबंध निकम यांचे शिवसेनेच्या वरिष्ठ तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याने तसेच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस असल्याने या परिस्थितीत विक्रमगड  विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यातून महायुतीकडे आणण्यासाठी प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी, यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कोट जव्हर्स‘मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची मोठी ताकद आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे गट सत्तेवर आहे. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे शिंदे गटाकडे असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला आणि त्यातही उमेदवार म्हणून प्रकाश निकम यांना सोडावा, अशी आमची सर्वांची आग्रही मागणी आहे. -रिकी रत्नाकर, युवासेना लोकसभा प्रमुख पालघर 00000

आमदार निकोले यांना डहाणूतून पुन्हा उमेदवारी

 पालघर जिल्ह्यातील पहिली उमेदवारी जाहीर प्रचार नियोजनही ठरले योगेश चांदेकर   पालघरः जनसामान्यांचा नेता आणि राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून ओळख असलेल्या आ. विनोद निकोले यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची डहाणू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पालघर जिल्ह्यात उमेदवारी जाहीर झालेले निकोले हे पहिलेच उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी आत्तापासूनच प्रचाराचे नियोजन ठरले असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पाच दिवस झाले असले, तरी अद्याप अन्य कुठल्याच पक्षाने अधिकृतपणे कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली नाही; परंतु आ. निकोले यांना मात्र अगोदरच उमेदवारी जाहीर झाली आहे. अतिशय छोट्या घरात राहत असलेल्या आणि अजूनही प्रत्यक्षात परसबागेत आणि छोट्या शेतीत काम करत असलेल्या आ. निकोले यांचे पाय कायम जमिनीवर आहेत. जनतेचा आमदार जनसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने प्रशासन आणि सरकारची संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आदिवासींच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी गेल्या; मात्र त्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली नसल्याने अशा प्रकरणात थेट प्रशासनाशी दोन हात करून संबंधितांना योग्य ती मदत मिळण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कामाची दखल म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पास्कल धनारे यांचा पराभव करून निकोले निवडून आले होते. प्रश्न मांडण्यातही आघाडीवर वर्षानुवर्ष जनसामान्यात राहून चळवळ उभी करणाऱ्या आणि अतिशय कमी खर्चात निवडणूक लढवून ती जिंकणाऱ्या आमदार निकोले यांचे आकर्षण केवळ पालघर जिल्ह्यालाच आहे, असे नाही, तर संपूर्ण राज्यात त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. केवळ साधा, गरीब आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे, असे नाही, तर सामान्यांचे प्रश्न विधानसभेतही तेवढ्याच ताकदीने मांडणारा आणि सातत्याने विधानसभेतील चर्चेत गांभीर्याने भाग घेणारा आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न मांडणारे आणि राज्यात प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक असलेले आ. निकोले धोरणात्मक चर्चेतही तेवढ्याच हिरीरीने भाग घेत असतात. महाविकास आघाडीमुळे पारडे जड टँकरमध्ये बसून सामान्यांपर्यंत पाणी पोहोचवणारा हा आमदार विकासासाठी सातत्याने धडपडतो आहे. त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून राज्यात अन्य मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या, याचा निर्णय महाविकासाकडे घेऊ शकली नसली, तरी डहाणू विधानसभा मतदारसंघाबाबत मात्र महाविकास आघाडीमध्ये त्याबाबत कोणताच संदेह नसल्याने त्यांची उमेदवारी अगोदरच जाहीर करण्यात आली. यापूर्वीच पालघर जिल्हा कमिटीने तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन येथे कार्यशाळा घेऊन या कार्यशाळेत विधानसभा निवडणुकीसाठीची प्रचार यंत्रणा कशी राबवायची याची आखणी केली. त्यात ३६५ हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांचाही त्यात सहभाग होता. माकप आणि महाविकास आघाडीच्या समन्वयामुळे आता डहाणूतील निवडणूक अधिक रंगतदार होणार असून आमदार निकोले यांचे पारडे जड आहे. प्रतिस्पर्धी कोण एवढीच उत्सुकता डहाणू विधानसभा मतदारसंघात वाढवण बंदर होत असून या बंदराचा पुरस्कार भाजप आणि महायुतीने केला असला, तरी महाविकास आघाडी, मच्छीमार संघटना तसेच स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीतही हाच मुद्दा चर्चेला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यात होत असलेले विविध प्रकल्प, त्यासाठी जमिनीचे संपादन आणि त्यात शेतकऱ्याची होत असलेली फसवणूक तसेच विकासाच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या, तरी अद्यापही आदिवासी व अन्य समाज घटकांपर्यंत विकासाचा सूर्य अद्याप उगवलाच नसल्याने त्याबाबत माकप आणि महाविकास आघाडीने उठवलेला आवाज, आदिवासी उपाययोजनातील निधी अन्य घटकांकडे वळवण्याचे प्रकार यावर आता भर असून आमदार निकोले यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागले आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असला, तरी आमदार निकोले यांच्या विजयासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान उठवले असल्याने निश्चितच निकोले यांचे पारडे जड राहणार आहे.

ढगफुटीच्या पावसात निमखेडी बस स्थानकाचा स्लॅब कोसळला

सोयगाव :भरपावसात निमखेडी बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री एक वाजता घडली दरम्यान रात्रीच्यावेळ असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही सोयगाव-बनोटी रस्त्यावर असलेल्या निमखेडी फाट्यावर बस स्थानकाचा भरपावसात स्लॅब कोसळून बस स्थानक धोकादायक झाले आहे त्यामुळे शनिवारी पहाटेपासून प्रवाशांची गैरसोय झाली होती दरम्यान रात्रीची वेळ असल्याने कोणताही अनर्थ घडला नसल्याचे प्रशासन कडून स्पष्ट करण्यात आले आहे सोयगाव परिसरात शुक्रवारी रात्री अतिवृष्टी चा मुसळधार पाऊस झाला दरम्यान या वादळीपावसाने निमखेडी बस स्थानकचा स्लॅब कोसळला आहे शनिवारी महसूल कडून घटनेचा पंचनामा करून संबंधित विभागाला अहवाल पाठविण्यात आला आहे.. 00000

 कापुस मोजणी करतांना झाड कोसळले…

शेतकरीसह पाच मजुर कीरकोळ जखमी… वरठाण शिवारातील घटना   सोयगाव;-. कापुस वेचणी करुन एका निबांच्या झाडाखाली कापसाची मोजणी करीत असतांना अचानकपणे झाड कोसळुन त्या खाली शेतमालक व पाच मजुर दबल्याची घटना वरठाण शिवारात शुक्रवार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नसुन पाचही जणांना  मार लागलेला आहे. वरठाण येथील अशोक धनसिंग सोळंके गट.न १०७  मध्ये शुक्रवारी महीला व पुरुष जवळपास वीस मजुर कीलो प्रमाणे कापूस वेचणी चे काम करीत होते दीवसभर कापुस वेचणी करुन झाल्यावर सायंकाळी पाच सुमारास अचानक वादळीवारा सुटला यावेळी कापुस पावसात ओला होऊ नये यासाठी सर्व गोण्यातील कापूस निबांच्या झाडाखाली आणुन मोजणीचे काम करीत असताना आलेल्या वादळामुळे अचानकपणे निबांचे झाड कोसळले कसे बसे मजुर त्या ठीकाणाहुन पळाले पण यावेळी शेतकरी अशोक सोळंके,मजुर, दीलीप खंडाळे,अजय सुर्यवंशी, शाहरुख तडवी,अनिसा शेख,जया सोनवणे असे झाडाच्या फाद्यांत दबले क्षणाचा विलंभ न करता काही मजुरांनी त्यांना बाहेर काढले जर वेळीच मजुर झाडाखालुन पळाले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती म्हणून देव तारी त्याला कोण मारी असे उद्गागार यावेळी मजुरांचे निघत होते दरम्यान ह्या घटनेत शेतकरीसह पाचही मजुरांना  मार लागलेला आहे.