Category: होम

केंद्रीय वाणिज्य मंत्री खासदार पियूष गोयल यांनी लालबागचा राजाच्या दरबारात नतमस्तक होऊन सर्व देशवासीयांसाठी सुख शांती, समृद्धीची आणि स्वस्थ आरोग्याची कामना केली. यावेळी गोयल यांच्या धर्मपत्नी सीमा गोयल आणि सुपुत्र ध्रुव गोयल सोबत उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन संविधानाचा अपमान केल्याचे निषेधार्थ शिवसेना आमदार  यामिनी जाधव, नगरसेवक दत्ता नरवणकर, नगरसेवक संतोष खरात, एडवोकेट सुशिबेन शहा यांच्या नेतृत्वाखाली वरळी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. छाया केतन खेडेकर

रोटरी तर्फे दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयव वाटप

ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम पाय व कोपरापासून खालील कृत्रिम हाताचे वाटप शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे. हे शिबिर रविवार १३ ऑक्टोबर रोजी होईल. यावेळी ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांच्या पायाची व हाताची मोजमापे घेतली जातील व रविवार, २७ ऑक्टोबर रोजी कृत्रिम पायाचे तसेच हाताचे फिटमेंट तज्ञाकडून केले जाईल.सरस्वती मंदिर ट्रस्टच्या सरस्वती मंदिर शाळेच्या प्रागणांत सकाळी १० ते १.३० वाजेपर्यंत दरम्यान घेण्यात येणार आहे. कृत्रिम पायाचे मोजमाप व कृत्रिम पायाचे व हाताचे फिटमेंट हे पूर्णपणे मोफत असणार असून लाभार्थिनी शाळेत येण्याचा व परत जाण्याचा खर्च स्वतः करावयाचा आहे. गरजू दिव्यांगांनी या योजनेचा जास्तीत फायदा घ्यावा. तसेच नाव नोंदणीसाठी प्रकल्प प्रमुख देवयानी वेद  (९३२४५४६०११), अमोल नाले (९७६९६०३२३९) ,नामदेव चौधरी (९८१९३२३९४७), नामदेव चौधरी (९८१९३२३९४७),प्रफुल्ल  क्षीरसागर (९१६७४४२४४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी यांनी केले आहे.

‘आजन्म शिकावूवृत्ती प्रगतीचा पाया आहे’

 ७३ व्या नाखवा स्मृती पारितोषिक वितरण समारंभात कविता देशपांडे – रेडकर यांचे प्रतिपादन ठाणे : आजन्म शिकावूवृत्ती हा सर्वागीण व्यक्तिमत्व विकासासह प्रगतीचा पाया असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ञ कविता देशपांडे – रेडकर यांनी केले आहे. श्री आनंद भरती समाजाच्या ११४ व्या गणेशोत्सवानिमीत्त आयोजित ७३ व्या नाखवा स्मृती वार्षिक शैक्षणिक गौरव समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करताना, सृजनशीलता, संपर्क- संवाद कौशल्य, दोषदर्शी विचारधारा व जिवाभावाची साथसंगत या चार गोष्टींची कायम कास धरलीत तर जीवनात तुम्ही यशस्वी चौकार माराल. आवड-कल यांचा मागोवा घेताना अपयशाने खचू नका असा मौलिक सल्लाही कविता देशपांडे – रेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. या क्षैक्षणिक गौरव समारंभात सुमारे ९० विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल गौरवण्यात आले. संस्थेच्या ११४ वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत प्राणिशास्त्र (झुआलॉजी) विषयात विद्या वाचस्पती (पीएचडी) ठरलेल्या डॉ. दिलीप वसंत नाखवा यांचा विशेष गौरव करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना डॉ दिलीप नाखवा म्हणाले, प्रपंच सांभाळून राष्ट्रीय कबड्डीपटू बाळाराम नाखवा, ठाणे महापालिकेचे माजी सभागृह नेते आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते ठाणेभूषण कृष्णकुमार कोळी यांनी वकिलीची सनद मिळवली. पीएचडी करताना हे दोघे माझे आदर्श होते. निवृत्तीनंतर वयाच्या ७३ व्या वर्षी हे यश मिळवले. यंदाच्या १० वी शाळांत परिक्षेत ९७.४० टक्के गुण संपादन केल्याबद्दल दुर्वा भाऊ जाधव हिचा ७३ वे कै यशवंत लक्ष्मण नाखवा स्मारक पारितोषिक तर याच परिक्षेत ९०.४० टक्के गुण संपादून संस्थेत सर्वप्रथम आल्याबद्दल आर्यन दुर्गेश डोलकरचा ७२ वे कै दगडू पांडू नाखवा स्मारक पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.सनदी लेखपालची परीक्षा पास होणारा संस्थेचा खेळाडू अभिषेक गुप्ता, एमबीए झालेली सोफिया कोळी आणि आयसीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या आरव ठाकूरला यावेळी गौरवण्यात आले. यावेळी समाजाध्यक्ष हरेश्वर मोरेकर, कार्याध्यक्ष ओमप्रकाश धीरोलिया, उपाध्यक्ष विनोद नाखवा व्यासपीठावर उपस्थित होते.

लक्ष्मी रोडवरील विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांचा मोठा सामाजिक उपक्रम

 श्री गजानन मंडळ आणि श्री गरूड गणपती मंडळ या लक्ष्मी रस्त्यावरील दोन मंडळांची सलग १० व्या वर्षी एकत्र श्री गणेश विसर्जन मिरवणूक. पुणे : पुण्यनगरीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शिरपेचात मानाचे स्थान असलेलं नारायण- सदाशिव पेठेतील लक्ष्मी रोडवरील अग्रणी मंडळ श्री गजानन मंडळ आणि श्री गरुड गणपती मंडळ. या दोन्ही मंडळांनी पुण्यनगरीच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत २०१५ रोजी दोन मंडळे एकत्र करून एकत्रितपणे काढलेली विसर्जन मिरवणूक यंदाच्या सलग १० व्या ही वर्षी मोठ्या आनंदाने काढण्यात येणार आहे, अशी माहिती श्री गजानन मंडळाचे अध्यक्ष राकेश गाडे पाटील, कार्याध्यक्ष अमेय गाडे पाटील आणि श्री गरूड गणपती मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष सुनिल कुंजीर, मंडळाचे मयूर कडू यांनी दिली. विसर्जन मिरवणुकीत पुण्याच्या गणेशोत्सवात शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणूकीत समाजाला एक नवी दिशा देणारे हे दोन्ही मंडळांनी सामाजिकतेचे भान ठेवले आहे. पुणे शहराचे तत्कालीन पुणे शहर पोलिस आयुक्त यांनी केलेल्या आवाहनानुसार येथील दोन्ही मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याचा मानस केला, आणि तेव्हापासून आजपर्यंत सलग १० व्या वर्षी ही दोन्ही मंडळे एकत्रित मिरवणूक काढल्याने मिरवणूकीचा प्रशासनावरील ताण कमी होणार आहे. दोन गणेश मंडळांनी एकत्रित मिरवणूक काढण्याने दोन मंडळांचे ढोल-ताशांचे पथक एकत्र राहणार आहे. दोन श्री गणरायांची मुर्ती एकाच गाड्यांवर असणार आहेत. त्यामुळे दोन मंडळामधील अंतर कमी होणार असून दोन्ही मंडळांचा खर्चावरील त्राण देखील कमी होणार आहे. दोन्ही मंडळांनी धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा कायम जपली आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्यनगरीचा उल्लेख होत असताना सार्वजनिक गणेशोत्सवात अग्रणी असणार्या मंडळात श्री गजानन मंडळ आणि श्री गरूड गणपती मंडळांचे नाव मोठ्या मानाने घेतलं जातं. यंदाच्या २०२४ च्या या वर्षात हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहाने साजरा होत असल्याचे गाडे आणि कुंजीर यांनी सांगितले. त्यामुळे लक्ष्मीरोड वरील मानाचे स्थान असलेल्या हि दोन श्री गजानन मंडळाने दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रणी असल्याचे गाडे, कडू आणि कुंजीर यांनी सांगितले.

गुणवान महिला सायकलपट्टूंसाठी शोधमोहिम

 खेलो इंडीया ‘वुमेन्स लीग’ स्पर्धेअंतर्घत बारामती येथे रोड सायकल स्पर्धेचे आयोजन पुणे :  क्रीडा स्पर्धामधील मुलींचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मुलींसाठी ‘वुमेन्स लीग’ सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. बारामती येथे या स्पर्धा २० ते २१ सप्टेंबर दरम्यान होतील सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने आयोजित केलेल्या या स्पर्धा बारामती येथे संत तुकराम महाराज पालखी मार्गावर होणार आहेत. स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सायकलिंग फेडरेषन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष आणि स्पर्धेचे संघटन सचिव सचिव प्रताप जाधव, यांनी सांगितले की, या स्पर्धेच्या माध्यमातून मुलींच्या क्रीडा गुणांना वाव देणे, स्पर्धांचा सराव होणे आणि त्यामधून गुणवान महिला खळाडूंची निवड करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे. प्रथम विभागीय स्तरावर आणि नंतर राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. सायकलिंग खेळाच्या ‘वुमेन्स लीग’ स्पर्धा रोड आणि ट्रॅक प्रकारात होणार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशा चार विभागात या स्पर्धा होतील. पश्चिम विभागाची रोड प्रकारामधील दुसरी स्पर्धा बारामती येथे पाटस ते लिमटेक गावादरम्यान नवीन तयार होत असलेल्या जगदगुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शुक्रवार २० सप्टेंबर सकाळी ९:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे युवा नेते मा. जयदादा पवार यांच्या शुभहस्ते आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, २१ सप्टेंबरला सकाळी १०:०० वाजता खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते स्पर्धेठिकाणी होणार आहे. या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धेच्या तांत्रिक संचालिका आणि राष्ट्रीय प्रशिक्षक दिपाली पाटील यांनी सांगितले की या स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनीअर अशा वयोगटात होतील. स्पर्धा टाईम ट्रायल आणि मास स्टार्ट या प्रकारात होतील. तसेच सर्व वयोगटात विदेशी किंवा भारतीय बनावटील वापरता येतील. स्पर्धेमधील विजेत्यांना एकूण १ लाख २० हजार रुपयांची पारितोषिके केंद्र सरकारच्यावतीने देण्यात येतील. याप्रसंगी शिवछत्रपती पारोतोषिक सन्मानीत आणि स्पर्धेच्या मुख्य पंच मिनाक्षी शिंदे, मिलींद झोडगे, बिरु भोजने आदी मान्यवर हजर होते.

नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा द्या –  नितीन देशपांडे

 ठामपाच्या ५७२ कोटी रुपयांच्या नवीन इमारतीच्या आवारात   अनिल ठाणेकर ठाणे महापालिकेच्या ५७२ कोटी रुपयांची नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन द्या. अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिकेची नवीन प्रस्तावित इमारत, रेमण्ड कंपनीच्या राखीव भूखंडावर उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. वर्ष-१९८२ मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर, वर्ष-१९८९ मध्ये, पाचपाखाडी येथील सध्याची इमारत कार्यान्वित झाली. मात्र, नंतरच्या काळात ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढल्याने, विद्यमान इमारतीमधून प्रशासकीय कारभार चालविणे गैरसोयीचे ठरु लागले. तसेच, विभागनिहाय कामकाज करण्यासाठी, इमारत अपुरी पडू लागली. याच पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ८ एकरच्या भूखंडावर, तब्बल ३२ मजली भव्य इमारत उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. सुमारे ५७२ कोटी रुपयांची निविदा याकामी काढण्यात येऊन, शासनाकडून २५० कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहेत. आजमितीस ठाणे शहराची लोकसंख्या ही, २० लाखांहून अधिक असून, नगरसेवकांची संख्या १३१ एवढी झालेली आहे. एकंदरीतच ठाणे महापालिका प्रशासनाचा कारभार हा, पूर्वीपेक्षा अधिक विस्तारित झालेला असल्याकारणाने, ठाणे शहराचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त इमारतीची आवश्यकता होतीच, ती आता नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून साध्य होईल. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठविण्यात आले असून, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रात आयुक्तांना सूचित केले आहे की, ठाणे महापालिकेची प्रस्तावित इमारत जरी भव्यदिव्य स्वरुपात उभारण्यात येत असली तरी, प्रशासनाचा वादग्रस्त कारभार, विकासकामांचा खोळंबा, नागरी सोयी-सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार आणि इतर मुलभूत प्रलंबित प्रश्न उपस्थित राहणारच आहेत. परिणामी, करदाते-कष्टकरी ठाणेकर नागरिक व सामाजिक/राजकीय संस्था-संघटनांना, प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविण्याचा, प्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे. तसा अधिकारच भारतीय लोकशाहीने सर्वसामान्य नागरिकांना दिलेला आहे. तोच अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि जनतेचा आवाज, सत्ताधारी व प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, आंदोलनकर्त्यांसाठी प्रस्तावित इमारतीच्या आवारात अधिकृतपणे जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. सदर जागा ही, ‘जनतेचे व्यासपीठ’ किंवा ‘जनता मंच’ म्हणून ओळखली जाईल. अशाप्रकारचा प्रयोग महापालिका प्रशासनाने राबविल्यास, ठाणे शहर हे, एक आदर्श शहर म्हणून नव्याने नावारुपाला तर येईलच, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना, लोकशाहीमार्गाने आंदोलनाचा, निषेध व्यक्त करण्याचा व सनदशीरपणे मोर्चा काढण्याचा अधिकार बहाल करणारी पहिलीवहिली स्वायत्त संस्था म्हणून, ठाणे महानगरपालिका ओळखली जाईल, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. काहीवेळेस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची हातमिळवणी होऊन, घटनाविरोधी ठराव संमत होतात. अशावेळी कर्तव्यदक्ष नागरिकांनी आवाज उठविणे हे, क्रमप्राप्त ठरते. (संदर्भ : ठामपा/शाविवि/वियोग, अंक-९६०/३००० दि. २०/१०/२०१४) यासंदर्भात, मुंब्रा तलाव बुझवून, ट्रांझिस्ट कॅम्प बांधण्याचा ठराव पारित झाला होता. अर्थात, महासभेत घटनाविरोधी ठराव येतो, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हातमिळवणीचे उत्तम उदाहरण असून, आदर्श लोकशाहीस धक्का देणारे आहे, याकडे नितीन देशपांडे यांनी, आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प राबविण्यात येतात किंवा प्रस्तावित असतात, अशा प्रकल्पांच्या प्रतिकृतींचे सुसज्ज असे दालनदेखील, ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीतउभारण्यात यावे, यानिमित्ताने एक चांगला आदर्शवत असा पायंडा पाडला जाईल, याचीही प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी सुचनावजा मागणी, देशपांडे यांनी आपल्या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी प्राधान्याने विचार करुन, ठाणे महापालिकेच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलावीत, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे.

पर्यावरणपूरक गणरायाच्या उत्सवातून अयोध्येचे दर्शन

Photo-8   ठाणे : ठाण्यातील प्रख्यात वास्तू विशारद संजय बोबडे यांच्या निवासस्थानी आयोध्येचे दर्शन घडविणारी पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती साकारली आहे. हिरानंदानी इस्टेट येथे वास्तव्यास असलेले संजय बोबडे हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही असतात. त्यांनी यंदा आपल्या घरात शाडूच्या मातीतून फक्त दोनच रंगांचा वापर करून मूर्ती साकारली आहे. तर मूर्तीच्या सभोवती कागदापासून महिरप तयार केली आहे. या महिरपीवर आयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीप्रमाणेच आरेखन केले आहे. अतिशय सुंदर आणि सुबक पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे परिसरात कौतूक होत आहे. 0000  

ठामपातर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत

 जय भवानी मित्र मंडळ पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा २०२४चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझाद नगर नंबर २ येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तर, सार्वजनिक उत्सव मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण २१ मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त व स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि पत्रकार पंकड रोडेकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविलेल्या जय भवानी मित्र मंडळाने ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी’ हा विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे. तर, द्वितीय क्रमांक महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ यांना मिळाला आहे. त्यांनी ‘कैफियत समाधानाची’ हा विषय मांडला आहे. तृतीय क्रमांक गांधीनगर येथील शिवसम्राट मित्रमंडळ यांच्या ‘सुरक्षितता’ या विषयावरील देखाव्यास मिळाला आहे. चैतन्य मित्र मंडळ, जिजामाता नगर सोसायटी (विविध प्रकारच्या नशेचे दुष्परिणाम) यांना चौथा, सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर (ग्लोबल वॉर्मिंग) यांना पाचवा, ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, गांधीनगर (युवा भारत) यांना सहावा क्रमांक मिळाला आहे. सातवा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ (बटणाचा देखावा) आणि आठवा क्रमांक केदारेश्वर मित्रमंडळ, आनंदनगर (काळाप्रमाणे बदललेली माणसे)  यांना मिळाला. स्वच्छता पुरस्कारात प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ, सावरकर नगर यांना तर, द्वितीय पारितोषिक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, म्हाडा वसाहत, तर, तिसरा क्रमांक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ, सावरकर नगर यांना मिळाला आहे. उत्कृष्ट मूर्तीकार प्रथम पारितोषिक वुिनोद शिळकर – गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा, द्वितिय पारितोषिक राकेश घोष्टीकर – श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, तर, तृतीय पारितोषिक दिपक गोरे – कोलबाड मित्र मंडळ यांनी पटकाविले आहे. पारितोषिक वितरणाची तारिख आणि वेळ मंडळांना लवकरच कळवण्यात येईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी – रोहन घुगे

  ठाणे : प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, कार्यकारी अभियंता कदम आणि केंद्रप्रमुख खोणी हे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथिमक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यात कायमर्यादित अभियान राबवणे आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शाळांमध्ये DIET व VOPA यांच्या मदतीने FLN अंतर्गत प्रोजेक्ट दिशा उपक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी हाती घेतलेला आहे. प्रोजेक्ट दिशाची शाळा स्तरावरील अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल प्रत्यक्ष कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिंपरी, खोणी, नागाव या शाळांना भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात जुलै २०२४ व ऑगस्ट २०२४ या महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये उपक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या शाळा भेटीमध्ये जुलै व ऑगस्ट अखेर निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे तुलनात्मक दृष्ट्या विश्लेषण करून आजची वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. वैयक्तिक, शैक्षणिक कृती आराखडा तयार करताना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Management of Learning Intervention -MOLI) प्रशिक्षण/ वेध उपक्रम सहसंबंध समजावून सांगताना विषय मित्र, गट अध्ययन, सेल्फी विथ सक्सेस, आव्हान देणे, स्वयं अध्ययनास प्रेरणा, जिज्ञासू वृत्तींचा सन्मान, शिकण्याच्या गतीत वाढ व तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे शाळा भेटीमध्ये शाळा यापूर्वी शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाषा, गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचा वापर सकारात्मक आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. वैयक्तिक शिक्षण कृती आराखडा करताना विद्यार्थी एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे कसा संक्रमित होईल यासाठी आराखड्यामध्ये कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात या विषयी शिक्षकांची संवाद साधला.या उपक्रमाची अंमलबजावणी करताना तसेच आराखडा तयार करताना शिक्षकांच्या येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या आणि शिक्षकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृतींचा शनिवार या मालिकेत शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी सुचना दिल्या.