Category: होम

लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांना पोटदुखी

पनवेल : महिला भगिनी आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभर झटत असतात. या बहिणींना ताकद देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली, मात्र ही योजना सुरू झाल्याने विरोधकांच्या पोटात दुखायला लागले आहे. ते ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेले. तरीही ही योजना बंद होणार नाही, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ठणकावून सांगितले. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर महिलांकडून सरकारच्या या योजनेचे स्वागत केले जात आहे. याच महिलांचे आशीर्वाद घेण्यासाठी पनवेलमधील सर्व महिला भगिनींसाठी खेळ पैठणीचा आणि लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून बेलवलीमध्ये हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी भष्टाचारी शेकापवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, तीन वर्ष झाली माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँकेत घोटाळा केल्याने जेलमध्ये आहे. लोकांचे पैसे खाऊन जे तुरुंगात आहेत त्यांच्याच पक्षाने लोक येऊन सांगतात लाडकी बहीण योजना बंद होईल. त्यामुळे खोटं पसरवणारे कोण आहेत हे नीट पाहून घ्या. देशातील सरकार हे महिलांसाठी विविध योजना आणत आहेत, तर राज्यामध्ये महायुतीचे सरकार महिलांच्या हितासाठी काम करत आहे. या सर्व कल्याणकारी योजना सुरू राहण्यासाठी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत यायला पाहिजे. यासाठी तुमचा आशीर्वाद महायुती सरकारच्या पाठिशी राहूद्या, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, अमरीश मोकल, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पं.स. सदस्य निलेश पाटील, जिल्हा चिटणीस भूपेंद्र पाटील, युवा नेते योगेश लहाने, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष कमला देशेकर, सरचिटणीस प्रतिभा भोईर, शिल्पा म्हात्रे, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य योगिता भगत, उपाध्यक्ष समिना साठी, कोषाध्यक्ष ज्योती भोपी, मनिषा बहिरा, माजी नगरसेविका निता माळी, पल्लवी पाटील, मित्तल पाटील, बेलवलीच्या उपसरपंच अप्रिता पवार, सदस्य सविता पाटील, रेश्मा माळी, पूजा पाटील, निता मंजुळे, शिल्पा पवार, संगीता भुतांबरा, सतिश पाटील, अप्पा भागीत, जितेंद्र बताले, संतोष पाटील, नारायण म्हात्रे, अनंता पवार, नासीर शेख, राम भवर, भालचंद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरबाड विधानसभा मतदारसंघात निष्ठावंताच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

निष्ठावंतांच्या पाठीशी उभे राहणार : कपिल पाटील मुरबाड : भाजपा हा सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष असून, मुरबाड तालुक्यातील एका व्यक्तीचा तो पक्ष नाही. अशा व्यक्तींच्या जोखडातून भाजपाला मुक्त करणार असून, पक्षाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. भाजपाच कार्यकर्ता स्वाभिमानी आहे अन, तो स्वाभिमानी राहील, अशी ग्वाही माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिली. भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असून, कोणावरही अन्याय होणार नाही, असा दिलासा कपिल पाटील यांनी दिला. भाजपाच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आज मुरबाड येथील माऊली हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्याला मुरबाड मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपूर्ण हॉल गच्च भरल्यानंतर हॉलचे आवार व हॉलबाहेर कार्यकर्ते उभे होते. या मेळाव्याला माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी भाजपाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, ज्येष्ठ नेते रामभाऊ पातकर, तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव, शरद म्हात्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुभाष घरत, माजी नगरसेवक अण्णा कुलकर्णी, रामभाऊ बांगर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर, दीपक खाटेघरे, नारायण गोंधळी आदी उपस्थित होते. भाजपाचा कार्यकर्ता कसा मोठा होईल, याला आपण प्राधान्य दिले. पदावर नसलो, तरी भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आपण कायम पाठीशी राहू, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी देऊन भाषणाला सुरुवात केली. लोकसभेला केलेल्या कामाप्रमाणेच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी विधानसभेला दुप्पट काम करू, असा विश्वास व्यक्त केला. मुरबाड तालुक्यात विकास प्रकल्पे राबविताना शेतकऱ्यांच्या आपण कायम पाठीशी राहू. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला धमक्या दिल्या जातात. कल्याण-मुरबाड रेल्वे, शहापूर-मुरबाड रस्ता तयार करण्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनीला चांगला मोबदला मिळेल, यासाठी आपण प्रयत्न केले. यापुढील काळातही शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशारा कपिल पाटील यांनी दिला. कल्याण-मुरबाड रेल्वे, माळशेज घाटातील रस्त्याचे काम, शहापूर-मुरबाड रस्ता ही कामे केंद्र सरकारची आहेत. त्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही करु नये, असा टोलाही कपिल पाटील यांनी लगावला. 00000

पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र देशात नंबर वन – एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठाणे खाडी पूल-३ च्या उत्तर वाहिनीचे लोकार्पण व कोकणातील सात खाडी पूलांचे भूमीपूजन संपन्न अनिल ठाणेकर ठाणे : राज्याच्या कुठल्याही भागात गेलात तर सध्या सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवित आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी वाशी येथे केले. सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. 3 च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्घाटन व रेवस ( रायगड ) ते रेडी (सिंधुदूर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री ना.श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाशी येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री ना.श्री. दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मनिषा म्हैसकर-पाटणकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनिलकुमार गायकवाड , सहव्यवस्थापकीय संचालक श्री.राजेश पाटील, मुख्य अभियंता श्री.राजेश निघोट , मुख्य अभियंता श्री.एस.के. सुरवसे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते .ठाणे खाडी पूल क्र.3 च्या उत्तर वाहिनीच्या लोकार्पणाबरोबर रेवस – रेडी सागरी महामार्गावरील धरमतर , कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पूलांचे भूमीपूजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते पार पडले. स्थानिक स्तरावर प्रत्येक खाडी पूलाच्या कामाचे प्रत्यक्ष भूमीपूजन स्थानिक मान्यवर लोकप्रतिनिधींच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या सात खाडी पूलांची एकूण लांबी २६.७० किलोमीटर असून त्यासाठी ७ हजार ८५१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, रेवस ते रेडी सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांची मागणी राज्याच्या स्थापनेपासून होती.ती मागणी आज पूर्ण होतेय. हा योगायोग आहे . या खाडी पूलांमुळे कोकणाचा विकास होईलच, तसेच पर्यटनाला चालना मिळेल. कोकणवासियांसाठी ही दिवाळीची भेटच आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांच्या माध्यमातून  राज्यात पाच हजार किमी लांबीचे द्रुतगती मार्गाचे ग्रीड नेटवर्क उभारणार आहोत. त्यामुळे राज्याच्या कुठल्याही भागातून कुठेही सहा ते सात पोहोचता येईल. ते म्हणाले, पनवेल ते सिंधुदूर्ग दरम्यानच्या कोकण ग्रीन फिल्ड एक्सप्रेस वेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळांने हाती घेतले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येईल .याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री श्री.दादाजी भुसे ठाणे खाडी पूल क्र.३ ची उत्तर वाहिनी या तीन पदरी पूलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास निश्चितच यश येईल, असा विश्वास व्यक्त करून म्हणाले की, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीच्या पूलाचे कामही अत्यंत वेगाने प्रगतीपथावर आहे. आज दुग्धशर्करा योग म्हणजे रेवस-रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांचे भूमीपूजन एकाच वेळी होत आहे. या परिसरातील  निसर्गाला अनुरूप असे केबल स्टे व इतर प्रकारांच्या पूलांची निर्मिती रस्ते विकास महामंडळ अत्यंत कल्पकतेने करणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या शेवटी ठाणे खाडी पूलाची मुंबईहून पुण्याला जाणारी उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी सोमवार, १४ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. चौकट प्रकल्पांची माहिती सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र.3, प्रकल्पामधील कामाचा वाव, प्रत्येकी 3 मार्गिकांचे 2 पूल बांधणे . (मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनीचे काम पूर्ण व पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम प्रगतीपथावर ) प्रकल्पाची एकूण किंमत : रु. 559 कोटी.पूलाची लांबी : 3180 मी. ( पोहोच रस्त्यासह ) सद्य:स्थितीत उत्तर वाहिनी पूलाचे काम पूर्ण करुन ती वाहतुकीसाठी सोमवार, दि.14 ऑक्टोबर पासून खुली करण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या दक्षिण वाहिनीचे काम 80 % पूर्ण झाले आहे.रेवस ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्गाची* एकूण लांबी : 498 किमी.पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा महामार्ग, कोकण किनारपट्टीवरील सर्व सागरी किनाऱ्यांना कॅलिफोर्नियाच्या धर्तीवर गतिमान महामार्गाने जोडणारा प्रकल्प. 00000

दिनेश पवार यांना सुवर्णपदक

 कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धा  मुंबई : द.आफ्रिका येथे सन सिटी या शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत  मास्टर१ (४० वर्षावरील पुरुष) या गटात 75 किलो वजनी गटात रायगडच्या “दिनेश हरिचंद्र पवार’यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिम मध्ये सराव करतात. यापूर्वी सुद्धा त्यांनी  आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकली  आहेत. दिनेश पवार यांच्या यशात त्यांच्या मातोश्री गीता हरिचंद्र पवार आणि पत्नी रेशमा दिनेश पवार यांचा  देखील मोठा  वाटा  आहे. पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे अध्यक्ष गिरीश वेदक यांनी पवार यांचे खास अभिनंदन केले आहे.  महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय प्रतापराव सरदेसाई यांचे  सुद्धा मार्गदर्शन  पवार यांना मिळाले. ००००

श्री गणेश आखाड्याच्या कुस्तीपटूंचे यश

मुंबई : जिल्हा क्रीडा परिषद, रायगड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड आणि पोलिस मुख्यालय, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथे  आयोजित करण्यात आलेल्या  मुंबई विभाग अंतर्गत शालेय कुस्ती स्पर्धेत मिरा भाईंदर महानगर पालिकेच्या सौजन्याने व मिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील मल्लांनी ४ सुवर्ण व ५ कांस्य पदकांची कमाई केली. त्यांच्या ओम जाधव, मनस्वी राऊत, कोमल पटेल, डॉली गुप्ताने सुवर्ण पदक   पटकावली. तर कविता राजभर, स्नेहा गुप्ता, सुप्रिया‌ गुप्ता, शिवांश जालुई आणि आर्दश‌ शिंदे यांनी कांस्य पदके‌ मिळविली. प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या पैलवानांची निवड राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेकरिता करण्यात आली आहे. पदक विजेत्यांना वस्ताद वसंतराव पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. श्री गणेश आखाड्यातर्फे सर्व पदक विजेत्यांचे खास अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांना   पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा देखील देण्यात आल्या.

काम रस्ते सफाईचे, निविदेत अटी मात्र घंटागाडीच्या!

नाशिक महापालिकेत अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार हरिभाऊ लाखे  नाशिक : विधानसभा निवडणुका दृष्टीक्षेपात असताना नाशिक महापालिकेचा अजब कारभार आता समोर आला आहे. महापालिकेचे रस्ते सफाईचे काम असताना निविदेत मात्र घनकचरा संकलनाशी…

षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सुनिता चव्हाण यांच्या क्रीडा कार्याचा झाला गौरव

मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप तर्फे आतापर्यंत यशस्वीपणे साकारलेल्या ९९ बुध्दिबळ स्पर्धा, ४१ कबड्डी स्पर्धा, ८६ क्रिकेट स्पर्धा, ६५ कॅरम स्पर्धा, २२ शरीरसौष्ठव स्पर्धा, २१ व्यायाम स्पर्धा, ७ खोखो स्पर्धा, ४१ क्रीडा प्रशिक्षण शिबीर आदी उपक्रमामध्ये क्रीडाप्रेमींचा मोलाचा वाटा होता. त्यामध्ये उपक्रमा अनुषंगाने बॅकस्टेज सांभाळणाऱ्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांच्या कार्याचा सहभाग देखील महत्वाचा होता. म्हणूनच आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे सुनिता चव्हाण यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीचे औचित्य साधून नुकताच माजी नगरपाल व लायन्स डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सुवर्ण गौरवचिन्ह प्रदान करून क्रीडा कार्याचा सन्मान करण्यात आला. नुकतीच पार पडलेली राज्य स्तरावरील शालेय ६० मुलींची मोफत कॅरम स्पर्धा ही सुनिता चव्हाण यांच्या क्रीडा कार्याची पोचपावती ठरली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे मागील तीन महिन्यात झालेल्या पाचपैकी  तीन शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेत काही तांत्रिक अडचणींमुळे फक्त मुलांची स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे स्पर्धांपासून वंचित झालेल्या ३१ मुलींनी स्पर्धेसाठी जोरदार मागणी केली. परिणामी कार्यालयीन कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय खेळ करणाऱ्या महिला क्रीडा विभाग प्रमुख सुनिता चव्हाण यांनी स्वतःच्या आईच्या स्मरणार्थ आयडियलमार्फत फक्त मुलींसाठी क्रीडाप्रेमी स्व. कमलाबाई कडवे स्मृती विनाशुल्क कॅरम स्पर्धा आयोजित केली. त्यांच्या सक्रीय मार्गदर्शनामुळे आरएमएमएस सहकार्यीत राष्ट्रीय स्तर गाजविणाऱ्या राज्यातील सबज्युनियर कॅरमपटूसह शालेय ६० मुलींच्या सहभागाने यशस्वी झालेली आंतर शालेय मुलींची विनाशुल्क कॅरम स्पर्धा रंगली. परेल येथील स्पर्धेमध्ये सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल-पुण्याच्या तनया पाटीलने अंतिम विजेतेपद तर आर.बी. शिर्के हायस्कूल-रत्नागिरीच्या स्वरा कदमने अंतिम उपविजेतेपद पटकाविले. पहिल्या १६ विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कारासह गौरविण्यात आले. केवळ मुलींसाठी चँम्पियन कॅरम सेटवर मोफत स्पर्धा आयोजित केल्याबद्दल राज्यातील पालक-शिक्षक वर्ग, खेळाडू यांनी सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक करीत मुलींच्या स्पर्धेचे सातत्य राखण्याचे आवाहन केले.

मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचे लोकार्पण

अनिल ठाणेकर ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटलचे उदघाटन शुक्रवारी पार पडले. सर्व वैद्यकीय उपचार व मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा-भाईंदरच्या धर्तीवर घोडबंदर येथील नळपाडा येथे १५० बेडचे सुपर स्पेशालिटी “मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक” या नावाने कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी खासदार नरेश मस्के, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मा. नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, विधानसभा सचिव संदीप डोंगरे, विभागप्रमुख भगवान देवकाते, युवासेनेचे सिद्धार्थ पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कॅशलेस रुग्णालयाचा फायदाओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना घेता येणार आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले असून सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे. लाखो रुपये ज्या ऑपरेशन साठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होण्यास आता सुरुवात होणार आहे. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूना सेवा देणार आहे.  हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने पेशंटच्या साध्या तपासणी पासून, विविध टेस्ट करणे आणि डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत. या हॉस्पिटलच्या उभारणीसाठी मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेबांनी कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू न दिल्याने हे हॉस्पिटल आजपासून लोकांच्या सेवेत दाखल होणार असून हे हॉस्पिटल म्हणजे गरीब – गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरणार आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महापालिकेच्या माध्यमातून बनविण्यात आलेली असून या इमारतीत ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी  कॅशलेस हॉस्पिटल सुरू करावे यासाठी आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी प्रयत्न केले. महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून होणारी वैद्यकीय मदत दिड लाखापासून पाच लाखापर्यंत नेण्यात आल्यामुळे ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, तसेच घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी आवाहन केले.ठाणे शहरातील हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे शहरातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील तिसरे सरकारी कॅशलेस हॉस्पिटल आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे कॅशलेस हॉस्पिटल चालणार आहे. राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व उपचार, कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसविणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्त तपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, 2डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग इ. सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार असून या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिका धारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपलब्ध होणार आहे.

हरित लवादाने १०२ कोटींचा व उच्च न्यायालयाने विकासक आणि ठामपाला दोन लाखांचा दंड ठोठावला!

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांवर कारवाई करावी – नितीन देशपांडे अनिल ठाणेकर ठाणे : महापालिका स्थापन झालेल्या ४३ वर्षाच्या पदार्पणादिवशीच पुणे हरित लवादाने, ठाणे महापालिकेच्या ठाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाला १०२.४ कोटीची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. पर्यावरणीय हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे. देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात, प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यातबद्दल ठामपास हा दंड ठोठावला आहे. त्यानंतर केवळ आठ दिवसांनी ठाण्याचा प्रसिद्ध कोरम माॅलचे नाल्याच्या जागेवर बांधकाम नियमित करण्याचा २००५ सालचा तत्कालीन ठामपा आयुक्तांचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द करून विकासक आणि ठाणे महापालिकेला दोन लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे. ठामपाने नाल्यावर बांधलेले बांधकाम थांबविण्याचे आदेश दिल्यानंतर आदेश झुगारून बेकायदेशीरपणे माॅलचे बांधकाम चालूच ठेवले. काही भाग पाडल्यानंतर ही तेथे नव्याने बांधकाम करण्यात आले.अशी परिस्थिती असताना फेब्रुवारी २००५ आयुक्तांनी विशेषाधिकार वापरून बांधकाम नियमित केले. सार्वजनिक सुविधांशी तडजोड करून खाजगी विकासाचा फायद्यासाठी अधिकार वापरले, हा हेतू फारच भयानक आहे.मात्र, कायद्याने महापालिका आयुक्तांना विशेषाधिकार देण्यात आले असले, तरी महापालिका आणि तिच्या आयुक्तांना त्यांच्याकडील या विशेषाधिकाराचे मालमत्तेचे विश्वस्त या नात्याने केवळ महापालिकेच्या आणि जनतेच्या हितासाठी वापर करणे बंधनकारक आहे. असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. मात्र याबद्दल आपण काहीही कार्यवाही केलेली नाही, आपले सरकार इतके असंवेदनशील आहे का ? ठामपाच्या बेकायदेशीर कृतीमुळे प्रामाणिक करदात्यांवर भुर्दंड का ? कायदे नियम वगैरे जनतेचा सुरक्षिततेसाठी केले आहेत याची विश्वस्त म्हणून आयुक्तांना माहिती असूनही सदर बाब कायदेशीर कसूरीची सर्वोच्च कळस पार करणारी आहे. आपण राज्याचे मुख्यमंत्री असलात तरी ठामपाचे करदाते प्रथम आहात. दंड भरण्याची रक्कम प्रमाणित करदात्यांच्या करातून जाणार आहे. यासाठी वरील बाबतीत आपण कठोर पावले उचलून ठामपा व कायदेशीर कर्तव्यात कसूरी करण्यावर तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा राज्याची प्रतिमा जनतेसाठी नव्हे तर बेकायदेशीर बाबींचे सरंक्षण करणारी उभी राहील आणि याला आपली मान्यता आहे असे समजले जाईल. ठामपाच्या वरील बेकायदेशीर बाबींवर उघड्यावर आल्यामुळे ठामपाच्या गेल्या दोन दशकातील अश्या अनेक बाबींची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी केली आहे.

अन् मातेसह वाचले नवजात अर्भकाचे प्राण

मर्जिया पठाण यांनी दिला मानवतेचा धडा ठाणे : आज माणसे एवढी निग्गरगट् झाली आहेत की शेजारील माणूस वेदनेने तळमळत असतानाही ढुंकूनही पहात नाहीत  मात्र  मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी रस्त्यावर वेदनेने तळमळणाऱ्या गर्भवतीला ओळखपाळख नसतानाही उचलून रूग्णालयात दाखल केले अन् तिचे बाळंतपण केले. मर्जिया यांच्या या मानवतावादी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतूक होत आहे. मुंब्रा येथे राहणारी रोशनी काळे ही गर्भवती महिला मित्तल रोड परिसरात काही कामानिमित्त आली होती. मात्र अचानक तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. प्रचंड वेदना होऊ लागल्याने रोशनी रस्त्यावर पडली मात्र आजूबाजूला कोणीही मदतीसाठी धाऊन गेले नाही. त्याचवेळेस आपल्या अमृतनगर येथील कार्यालयात बसलेल्या मर्जिया शानू पठाण यांना ही माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मित्तल रोड गाठले. तिथे पोहचताच मर्जिया पठाण यांनी आधी रोशनी यांना धीर दिला. स्वतः गाडीमध्ये उचलून बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेदनेमुळे रोशनी हिस गाडीत बसणे अशक्य होत असल्याने एक रिक्षा थांबवून त्यातून रोशनी हिला कौसा रूग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांना पाचारण करून रोशनी हिचे बाळंतपण केले. रोशनी हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला असून मुलीचे वडील कस्तूर यांच्या विनंतीवरून मर्जिया यांनी मुलाचे शिवा असे नामकरण केले आहे. दरम्यान, डोक्यावर सूर्य आग ओकत असल्याने आणखी उशीर झाला असता तर गर्भवती महिला आणि तिच्या बाळाच्या जीवावर बेतले असते. मात्र, मर्जिया पठाण यांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळेच रोशनी आणि तिच्या मुलाचे प्राण वाचले असे डाॅक्टरांनी सांगितले.