Category: होम

नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा द्या –  नितीन देशपांडे

 ठामपाच्या ५७२ कोटी रुपयांच्या नवीन इमारतीच्या आवारात   अनिल ठाणेकर ठाणे महापालिकेच्या ५७२ कोटी रुपयांची नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन द्या. अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. ठाणे महापालिकेची नवीन प्रस्तावित इमारत, रेमण्ड कंपनीच्या राखीव भूखंडावर उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेली आहे. वर्ष-१९८२ मध्ये ठाणे महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर, वर्ष-१९८९ मध्ये, पाचपाखाडी येथील सध्याची इमारत कार्यान्वित झाली. मात्र, नंतरच्या काळात ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढल्याने, विद्यमान इमारतीमधून प्रशासकीय कारभार चालविणे गैरसोयीचे ठरु लागले. तसेच, विभागनिहाय कामकाज करण्यासाठी, इमारत अपुरी पडू लागली. याच पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ८ एकरच्या भूखंडावर, तब्बल ३२ मजली भव्य इमारत उभारण्यास महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली आहे. सुमारे ५७२ कोटी रुपयांची निविदा याकामी काढण्यात येऊन, शासनाकडून २५० कोटी रुपये मंजूरही करण्यात आलेले आहेत. आजमितीस ठाणे शहराची लोकसंख्या ही, २० लाखांहून अधिक असून, नगरसेवकांची संख्या १३१ एवढी झालेली आहे. एकंदरीतच ठाणे महापालिका प्रशासनाचा कारभार हा, पूर्वीपेक्षा अधिक विस्तारित झालेला असल्याकारणाने, ठाणे शहराचे कामकाज चालविण्यासाठी प्रशस्त इमारतीची आवश्यकता होतीच, ती आता नवीन प्रस्तावित प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून साध्य होईल. याच अनुषंगाने, ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठविण्यात आले असून, पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, आपल्या पत्रात आयुक्तांना सूचित केले आहे की, ठाणे महापालिकेची प्रस्तावित इमारत जरी भव्यदिव्य स्वरुपात उभारण्यात येत असली तरी, प्रशासनाचा वादग्रस्त कारभार, विकासकामांचा खोळंबा, नागरी सोयी-सुविधांचा अभाव, भ्रष्टाचार आणि इतर मुलभूत प्रलंबित प्रश्न उपस्थित राहणारच आहेत. परिणामी, करदाते-कष्टकरी ठाणेकर नागरिक व सामाजिक/राजकीय संस्था-संघटनांना, प्रशासनाच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविण्याचा, प्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे. तसा अधिकारच भारतीय लोकशाहीने सर्वसामान्य नागरिकांना दिलेला आहे. तोच अधिकार अबाधित राखण्यासाठी आणि जनतेचा आवाज, सत्ताधारी व प्रशासकीय व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने, आंदोलनकर्त्यांसाठी प्रस्तावित इमारतीच्या आवारात अधिकृतपणे जागा उपलब्ध करुन देण्यात यावी. सदर जागा ही, ‘जनतेचे व्यासपीठ’ किंवा ‘जनता मंच’ म्हणून ओळखली जाईल. अशाप्रकारचा प्रयोग महापालिका प्रशासनाने राबविल्यास, ठाणे शहर हे, एक आदर्श शहर म्हणून नव्याने नावारुपाला तर येईलच, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना, लोकशाहीमार्गाने आंदोलनाचा, निषेध व्यक्त करण्याचा व सनदशीरपणे मोर्चा काढण्याचा अधिकार बहाल करणारी पहिलीवहिली स्वायत्त संस्था म्हणून, ठाणे महानगरपालिका ओळखली जाईल, याबाबत आमच्या मनात कोणताही संदेह नाही. काहीवेळेस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची हातमिळवणी होऊन, घटनाविरोधी ठराव संमत होतात. अशावेळी कर्तव्यदक्ष नागरिकांनी आवाज उठविणे हे, क्रमप्राप्त ठरते. (संदर्भ : ठामपा/शाविवि/वियोग, अंक-९६०/३००० दि. २०/१०/२०१४) यासंदर्भात, मुंब्रा तलाव बुझवून, ट्रांझिस्ट कॅम्प बांधण्याचा ठराव पारित झाला होता. अर्थात, महासभेत घटनाविरोधी ठराव येतो, हे प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या हातमिळवणीचे उत्तम उदाहरण असून, आदर्श लोकशाहीस धक्का देणारे आहे, याकडे नितीन देशपांडे यांनी, आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प राबविण्यात येतात किंवा प्रस्तावित असतात, अशा प्रकल्पांच्या प्रतिकृतींचे सुसज्ज असे दालनदेखील, ठाणे महानगरपालिकेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीतउभारण्यात यावे, यानिमित्ताने एक चांगला आदर्शवत असा पायंडा पाडला जाईल, याचीही प्रकर्षाने नोंद घ्यावी, अशी सुचनावजा मागणी, देशपांडे यांनी आपल्या पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे. याप्रकरणी आयुक्तांनी प्राधान्याने विचार करुन, ठाणे महापालिकेच्या नवीन प्रस्तावित इमारतीच्या आवारात, नागरीहीताच्या आंदोलनांसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊले उचलावीत, अशी विनंती ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली आहे.

पर्यावरणपूरक गणरायाच्या उत्सवातून अयोध्येचे दर्शन

Photo-8   ठाणे : ठाण्यातील प्रख्यात वास्तू विशारद संजय बोबडे यांच्या निवासस्थानी आयोध्येचे दर्शन घडविणारी पर्यावरणपूरक गणरायाची मूर्ती साकारली आहे. हिरानंदानी इस्टेट येथे वास्तव्यास असलेले संजय बोबडे हे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही असतात. त्यांनी यंदा आपल्या घरात शाडूच्या मातीतून फक्त दोनच रंगांचा वापर करून मूर्ती साकारली आहे. तर मूर्तीच्या सभोवती कागदापासून महिरप तयार केली आहे. या महिरपीवर आयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीप्रमाणेच आरेखन केले आहे. अतिशय सुंदर आणि सुबक पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे परिसरात कौतूक होत आहे. 0000  

ठामपातर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत

 जय भवानी मित्र मंडळ पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा २०२४चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत आझाद नगर नंबर २ येथील जय भवानी मित्र मंडळ हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे. तर, सार्वजनिक उत्सव मंडळ, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण २१ मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त व स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि पत्रकार पंकड रोडेकर यांनी केले. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकाविलेल्या जय भवानी मित्र मंडळाने ‘निष्काळजीपणामुळे होणारी जिवितहानी’ हा विषय त्यांच्या देखाव्यातून मांडला आहे. तर, द्वितीय क्रमांक महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्रमंडळ यांना मिळाला आहे. त्यांनी ‘कैफियत समाधानाची’ हा विषय मांडला आहे. तृतीय क्रमांक गांधीनगर येथील शिवसम्राट मित्रमंडळ यांच्या ‘सुरक्षितता’ या विषयावरील देखाव्यास मिळाला आहे. चैतन्य मित्र मंडळ, जिजामाता नगर सोसायटी (विविध प्रकारच्या नशेचे दुष्परिणाम) यांना चौथा, सार्वजनिक उत्सव मंडळ, जय भवानी नगर (ग्लोबल वॉर्मिंग) यांना पाचवा, ओम शक्ती विनायक मित्र मंडळ, गांधीनगर (युवा भारत) यांना सहावा क्रमांक मिळाला आहे. सातवा क्रमांक शिवगर्जना मित्रमंडळ (बटणाचा देखावा) आणि आठवा क्रमांक केदारेश्वर मित्रमंडळ, आनंदनगर (काळाप्रमाणे बदललेली माणसे)  यांना मिळाला. स्वच्छता पुरस्कारात प्रथम क्रमांक सार्वजनिक उत्सव मंडळ, सावरकर नगर यांना तर, द्वितीय पारितोषिक ओंकारेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, म्हाडा वसाहत, तर, तिसरा क्रमांक स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ, सावरकर नगर यांना मिळाला आहे. उत्कृष्ट मूर्तीकार प्रथम पारितोषिक वुिनोद शिळकर – गुणसागरनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा, द्वितिय पारितोषिक राकेश घोष्टीकर – श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ, तर, तृतीय पारितोषिक दिपक गोरे – कोलबाड मित्र मंडळ यांनी पटकाविले आहे. पारितोषिक वितरणाची तारिख आणि वेळ मंडळांना लवकरच कळवण्यात येईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी – रोहन घुगे

  ठाणे : प्रोजेक्ट दिशा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या १०० टक्के शाळांची दरमहा होणार पडताळणी होणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) ललिता दहीतुले, कार्यकारी अभियंता कदम आणि केंद्रप्रमुख खोणी हे उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार, प्राथिमक स्तरावर सन 2026-27 पर्यंत मुलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही, सर्व विद्यार्थ्यांना मुलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यात कायमर्यादित अभियान राबवणे आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत शाळांमध्ये DIET व VOPA यांच्या मदतीने FLN अंतर्गत प्रोजेक्ट दिशा उपक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी हाती घेतलेला आहे. प्रोजेक्ट दिशाची शाळा स्तरावरील अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल प्रत्यक्ष कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिंपरी, खोणी, नागाव या शाळांना भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात जुलै २०२४ व ऑगस्ट २०२४ या महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये उपक्रम यशस्वीपणे राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या शाळा भेटीमध्ये जुलै व ऑगस्ट अखेर निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे तुलनात्मक दृष्ट्या विश्लेषण करून आजची वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. वैयक्तिक, शैक्षणिक कृती आराखडा तयार करताना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन (Management of Learning Intervention -MOLI) प्रशिक्षण/ वेध उपक्रम सहसंबंध समजावून सांगताना विषय मित्र, गट अध्ययन, सेल्फी विथ सक्सेस, आव्हान देणे, स्वयं अध्ययनास प्रेरणा, जिज्ञासू वृत्तींचा सन्मान, शिकण्याच्या गतीत वाढ व तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले.त्याचप्रमाणे शाळा भेटीमध्ये शाळा यापूर्वी शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाषा, गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचा वापर सकारात्मक आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. वैयक्तिक शिक्षण कृती आराखडा करताना विद्यार्थी एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे कसा संक्रमित होईल यासाठी आराखड्यामध्ये कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात या विषयी शिक्षकांची संवाद साधला.या उपक्रमाची अंमलबजावणी करताना तसेच आराखडा तयार करताना शिक्षकांच्या येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या आणि शिक्षकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृतींचा शनिवार या मालिकेत शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी सुचना दिल्या.

गणेश-विसर्जन मिरवणुकीत सळसळती तरुणाई साकारणार ‘ब्रो- ठाणे बदलतंय!’

 सार्वजनिक उत्सव मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठाणे : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारे तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘ठाणे बदलतंय’ या विषयावर स्वातंत्र्यवीर सावरकरनगरातील सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा ५४ व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त अतिशय आगळावेगळा देखावा साकारला आहे. शिवसेना गटनेते व नगरसेवक दिलीप बारटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या देखाव्याला ठाणेकर गणेशभक्तांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत  तरुणाईशी निगडित  विषयांवर विविध समूह आपली कला सादर करतील. यावेळी ठाणेकरांना ‘ब्रो ठाणे बदलतंय’ चलचित्र देखाव्याचा आनंद घेता येईल. सायंकाळी ५ वा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून श्री विश्वेश्वर मंदिरातून विसर्जन मिरवणूक सुरू होईल.  धर्मवीर आनंद दिघे मार्ग, शिवसेना शाखा, स्वा. सावरकर नगर येथून प्रस्थान होऊन  वर्तकनगरपर्यंत ही मिरवणूक निघेल. विविध वेशभूषांनी नटलेली तरुणाई हे या मिरवणुकीचे खास आकर्षण असेल. शिवाय ठाण्यातील १२ तरुण जलतरणपटू यात सहभागी होतील, त्यांनी श्रीलंकेच्या तलाईमन्नार भारतातील रामेश्वरमचे धनुष्कोडी हे सागरी २३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम केला होता. शिवाय नवी दिल्लीत   प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर झालेल्या वंदे भारत संचलनामध्ये ठाण्यातील मुद्रा आर्ट अकादमीच्या भरतनाट्यम आणि लोकनृत्याच्या ११ मुलींना नृत्य सादर करण्याचा बहुमान मिळाला, त्या नृत्यांगना याही सहभागी होतील. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर जिम्नॅस्टीकमध्ये  ठसा उमटवणारे ठाणेकर खेळाडू, आरोग्यासाठी संगीताच्या तालावर विशिष्ट व्यायामप्रकार म्हणजे ॲरोबिक्सचे  प्रात्यक्षिक सादर करणारे क्रीडापटू, ठाणे ते गोवा स्केटिंग करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू,  प्रशिक्षक राहुल पंदिरकर यावेळी उपस्थित राहतील. या मिरवणूक प्रतिनिधीक स्वरूपात पोलिस, नाविक दल, पदवीधर तरुण, परंपरा-संस्कृती-कला आणि आधुनिकता यांची सांगड घालणारी तरुणाई, डॉक्टर, परिचारिका, नृत्यांगना, वकील : क्रिकेटपटू, सैनिक, विकासक,  मतदार, हवाईसुंदरी कथ्थक नर्तिका, वाचक… आदी समूह सहभाग घेतील. या आगळ्यावेगळ्या अशा ‘ब्रो ठाणे बदलतंय’ विसर्जन मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दिलीप चंद्रकांत बारटक्के यांनी केले आहे. 0000

माॅरिशसचे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ यांच्या हस्ते डाॅ. दीपक दळवी संपादित मराठी – इंग्रजी आरती संग्रहाचे प्रकाशन

अनिल ठाणेकर माॅरिशस मराठी मंडळी फेडरेशन तर्फे माॅरिशस मधील ग्लेन पार्क विघ्नेश्वर मंदिर येथे गणेश चतुर्थी राष्ट्रीय सोहळा-२०२४ चे भव्य असे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार, दैनिक ‘महाराष्ट्र जनमुद्रा’चे संपादक डाॅ. दीपक दळवी संपादित मराठी – इंग्रजी आरती संग्रहाचे प्रकाशन माॅरिशसचे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाक्वास-फिनिक्स पालिकेचे महापौर राॅय माईक मॅन्र्फेड मुंगूर, ग्लेन पार्क विघ्नेश्वर मंदिराचे अध्यक्ष प्रीयेशराव बापू, माॅरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्षअसांत गोविंद (सीएसके), माॅरिशस चे पंतप्रधान प्रविण्दकुमार जुगनाॅथ, माॅरिशसचे वाहतूक आणि रेल मंत्री अँलन गनू (जीसीएसके), खासदार अँशले इट्टू, माॅरिशस मराठी सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतळाजी, मराठी स्पिकिंग युनियनचे अध्यक्ष नितीन बापू उपस्थित होते.

रहाटाड येथील कालकथित केशव लोखंडे यांचे निधन

कर्जत : तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि.) रायगडचे विद्यमान कोषाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळाचे सक्रीय सभासद, एकता बौद्ध सेवा संघ रहाटाडचे मार्गदर्शक, बहुजन समाजात वावरणारे बहुआयामी व्यक्तिमत्व, आंबेडकरी चळवळीचे खंदे समर्थक, तळा तालुक्यातील सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील विशेषतः क्रिकेट मधील एक नावाजलेले नाव अर्थात कालकथित केशव लोखंडे यांचे शनिवार, १४ सप्टेंबरला रात्री २.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिकरीत्या कांदिवली मुंबई येथे निधन झाले आहे. मृत्यसमयी त्यांचे वय ५४ वर्षे इतके होते. केशव लोखंडे यांचा स्वभाव अतिशय शांत आणि मनमिळाऊ होता. तळा तालुक्यातील रहाटाड सारख्या छोट्याशा गावात राहून तळा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई सारख्या शहरात त्यांनी आपल अस्तित्व निर्माण केल. पदवी पर्यंत शिक्षण झाल्यावर नामांकित अश्या स्टार स्पोर्ट्स मध्ये प्रोडक्शन हेड म्हणून बरेच वर्ष नोकरी केली. ते स्वतः नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई येथे असले तरी कुटुंब गावी असल्याने व समाजाची सेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती असल्याने आपल्या गावाशी, तालुक्याशी तसेच क्रीडा क्षेत्राच्या निमित्ताने बहुजन वर्गाशी, क्रीडा तरुणांशी त्यांची कायम नाळ जोडली गेली होती. वीस बावीस वर्ष स्टार स्पोर्ट्स सारख्या चॅनल मध्ये नोकरी असल्याने त्यांची तरुणांमध्ये एक वेगळीच इमेज होती. या क्षेत्रात काम करत असताना अनेक तरुणांना देखील त्यांनी या मीडिया क्षेत्रात आणले व त्यांना रोजगार, व्यवसाय उपलब्ध करून दिला. त्यांचे क्रिकेटवर विशेष प्रेम होते. तळा तालुक्यात आपल्या रहाटाड या गावी नेहमी टेनिस बॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा स्वखर्चाने ते भरवत असत. त्यांनी वीस बावीस वर्षापूर्वी तळा तालुक्यात नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा भरविल्या होत्या आणि त्या केबल वर लाईव्ह होत्या. २० वर्षापूर्वी क्रिकेट खेळताना तळ्यातील क्रिकेटर स्क्रीन वर दिसू शकले ते फक्त केशव लोखंडे यांच्या क्रिकेट प्रेमामुळेच. तळा तालुक्यातील तरुणांनी जेव्हा मुंबईत तळा तालुका क्रिकेट असोसिएशन ची स्थापना केली तेव्हा केशव लोखंडे यांना अध्यक्ष करून त्यांचा यथोचित गौरव केला. आज तळा तालुक्यातील एक प्रेमळ, शांत, संयमी व बहुआयामी व्यक्तिमत्व हरपला. त्यांच्या जाण्याने केवळ बौद्ध समाजातच नव्हे तर बहुजन समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मालाड, मुंबई येथे त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध समाजातील, विविध क्षेत्रातील शेकडो मित्रपरिवार, अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कालकथित केशव लोखंडे यांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा तळा, तळा तालुका बौद्धजन सेवा संस्था (रजि) रायगड, त्यांचा मित्र परिवार तसेच तळा तालुकावासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. अचानक झालेल्या या आघातामुळे त्यांच्या कुटुंबियांवर तसेच मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून लोखंडे कुटुंबीयांना सावरण्याचे बळ मिळो हीच बुध्दांचरणी प्रार्थना. त्यांचा पुण्यानुमोदन आणि शोकसभेचा कार्यक्रम सोमवार, दि. २३ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता त्यांच्या मूळ गावी लुम्बिनी बुद्धविहार, रहाटाड येथे त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

संविधानामुळे स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित – प्रशांत ठाकूर

अशोक गायकवाड पनवेल : न्याय, समता आणि बंधूता हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. संविधानामुळे आजही आपले स्वातंत्र्य आणि अधिकार अबाधित आहे. याचे महत्त्व आपण ओळखले पाहिजे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी केले. युवकांना कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित आहेत. त्यानुसार देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राज्यातील ४२४ शाासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) संविधान मंदिराचे आभासी पद्धतीने उद्घाटन झाले. यानिमित्ताने पनवेल येथील आयटीआयमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, विचुंबे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद भिंगारकर, अनंता गायकवाड, किशोर सुरते, संस्थेचे प्राचार्य नितीन चौधरी, उपप्राचार्य विजय टिकोले, प्रा. आकाश ठाकूर, संदीप वेले, गटनिदेशक नितिन देशमुख, अजय मयेकर, प्रभाकर नगरकर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी डॉ. पराग पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संविधान आणि आपला अभिमान या विषयावर मार्गदर्शन केले.

कोपर रेल्वे स्थानकाजवळील बेकायदा गाळ्यांना नोटिसा

 रेल्वे मार्गातील जिना बंद करून गाळ्यांची उभारणी डोंबिवली – कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील जिन्याचा मार्ग बंद करून उभारण्यात आलेल्या तीन बेकायदा गाळ्यांना ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी तातडीने नोटिसा बजावल्या आहेत. या गाळे मालकांना त्यांच्या जमीन मालकी, बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यात सांगण्यात आली आहेत. ही कागदपत्रे येत्या सात दिवसाच्या कालावधीत गाळे मालकांनी सादर केली नाहीतर तिन्ही गाळे पालिकेकडून भुईसपाट केले जाणार आहेत. कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागात (आयरे परिसर) भूमाफियांनी गणपती सुट्टीच्या कालावधीत बेकायदा गाळे उभारल्या आहेत, अशा तक्रारी पालिकेच्या ग प्रभागाकडे आल्या होत्या. गणपतीची पालिकेला सुट्टी असल्याने त्याचा गैरफायदा भूमाफियांनी घेतला असल्याची चर्चा होती. या गाळ्यांना सुशोभित करून तेथे आर. के. एन्टरप्रायझेस हे घर, गाळ्यांची विक्री करणारे कार्यालय माफियांनी सुरू केले आहे. रेल्वे जिन्याच्या मार्गात, प्रवाशांच्या जाण्याच्या मार्गात बेकायदा गाळे उभारण्यात आल्याने या भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी या बेकायदा बांधकामाची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी परिमंडळ उपायुक्त व्दासे यांना या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालण्याचे आदेश दिले. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून बेकायदा गाळे उभारलेल्या जागेची पाहणी केली. स्थानिकांनी हे गाळे जुने असल्याचे आणि कार्यालय सजावट आता केली असल्याचे सांगितले. या गाळ्यांचा कोणीही जमीन मालक, चालक घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्यांची नावे, पत्ते देण्यास स्थानिक रहिवासी असमर्थतता दर्शवत होते. अखेर साहाय्यक आयुक्त कुमावत यांनी तिन्ही गाळे मालकांच्या गाळ्यांवर नोटिसा लावून येत्या सात दिवसात गाळ्यांची जमीन मालकी, बांधकामांची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले. गाळे मालकांनी या कालावधीत पालिकेला संपर्क केला नाहीतर त्यांचे गाळे भुईसपाट करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे पालिका, रेल्वेच्या जागा हडप करून भूमाफिया या गाळ्यांमध्ये कार्यालये सुरू करतात. तेथून चाळ, इमारती मधील बेकायदा घरे, गाळ्यांची विक्री करतात, अशा तक्रारी आहेत. भूमाफियांनी आपले म्हणणे वेळेत सादर केले नाहीतर तातडीने हे बेकायदा गाळे पालिकेने जमीनदोस्त करावेत, अशी स्थानिकांची मागणी आहे. कोपर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ उभारण्यात आलेले गाळे जुने असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या गाळे मालकांना जमीन मालकी, बांधकामाची परवानगी, कर पावती अशी सर्व कागदपत्रे सादर करण्याची नोटीस दिली आहे. ही कागदपत्रे गाळे मालकांनी सादर करण्यास असमर्थतता दर्शवली तर गाळे आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे तातडीने जमीनदोस्त केले जातील. संजयकुमार कुमावत , साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.    

अनंत चतुर्दशी दिनी श्रीगणेशमूर्ती विसर्जनाचे नवी मुंबई महानगरपालिकेचे सुव्यवस्थित नियोजन

नवी मुंबई  : महानगरपालिका क्षेत्रातील श्रीगणेशोत्सव 7 सप्टेंबर पासून अत्यंत उत्साहात संपन्न होत असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महिनाभरापूर्वींच गणेशोत्सवासंबधी आढावा बैठकीप्रसंगी ‘इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करण्यातबाबत नागरिकांना केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद लाभलेला दिसून आला. पीओपी ऐवजी शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करण्यास अनेक नागरिकांनी पसंती दर्शविली. शाडूच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करणा-या गणेशभक्तांना स्वच्छता व पर्यावरणमित्र म्हणून महानगरपालिकेमार्फत प्रशस्तीपत्र देऊन सर्व विसर्जनस्थळी सन्मानित करण्यात आले. नैसर्गिक जलस्त्रोतांचे रक्षण व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 137 इतक्या मोठया संख्येने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जनास मोठया प्रमाणावर पसंती दर्शविली. नवी मुंबई महानगरपालिकेने 22 नैसर्गिक व 137 कृत्रिम अशा 159 विसर्जन स्थळांवर केलेल्या सुयोग्य व्यवस्थेमुळे श्रीगणेशोत्सवातील दीड दिवस, पाच दिवस, गौरीसह सहा दिवस व सात दिवस अशा चारही विसर्जन दिवशी श्रीमूर्ती विसर्जन अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले. या चार विसर्जन दिवशी 35720 श्रीमूर्तीना भावपूर्ण निरोप देण्यात आला. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवांच्या आकाराने मोठ्या मूर्तींचे विसर्जन होणार असल्याने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळांवर अधिक सक्षम व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात स्वयंसेवक व लाईफगार्ड्स कार्यरत असणार आहेत. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवानही कार्यतत्पर राहणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही सर्व विसर्जन स्थळांवरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष असणार आहे. सर्व 22 नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सी.सी.टी.व्ही. लावण्यात आले असून पोलीस विभागाचे याव्दारे गर्दीवर बारीक लक्ष असणार आहे. श्रीमूर्ती विसर्जनाकरिता विसर्जनस्थळी मध्यम व मोठ्या तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती विसर्जनासाठी येतात अशा विसर्जन स्थळांवर फोर्कलिफ्ट / क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. कोपरखैरणे से-19 येथील धारण तलावावर अत्याधुनिक यांत्रिकी तराफ्याची व्यवस्था करण्यात आली असून आकाराने मोठया श्रीमूर्ती विसर्जनासाठी या यांत्रिकी तराफ्याचा श्रम व वेळ वाचण्यात मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे. विसर्जन स्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबूचे बॅरेकेटींग करण्यात आले असून विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करता यावी यादृष्टीने विसर्जनस्थळी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे. संबंधित विभाग कार्यालयांच्या माध्यमातून विसर्जन स्थळांवर सूचना व स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या व्यासपीठामुळे भाविकांची गर्दी मोठी असूनही त्यांना आवश्यक सूचना देणे व गर्दीचे नियोजन करणे शक्य होत आहे नागरिकांमार्फत श्रीमूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य” त्यासाठी स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे “सुके निर्माल्य” स्वतंत्र कलशात टाकावे, आणि कोणत्याही परिस्थितीत या वस्तू पाण्यात टाकू नयेत अशाप्रकारे महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जात आहे व त्याचे पावित्र्य जपत त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे.  त्याचप्रमाणे श्रीमूर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्यवस्तू गरजू मुलांना आणि नागरिकांना वितरण करण्यात येत आहेत. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेश विसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन महानगरपालिका व पोलीस यांच्यामार्फत सुयोग्य व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी उभारण्यात येणा-या मोठ्या मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. नागरिकांकडून मिळणा-या उत्तम सहयोगामुळे यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवातील आत्तापर्यंतचे श्रीमूर्ती विसर्जन चांगल्या रितीने पार पडले असून अनंत चतुर्दशीदिनी मोठ्या प्रमाणात होणारा विसर्जन सोहळाही निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.