Category: होम

ठाणे खाडीत दोन जणांनी घेतली उडी

पुरुषाचा मृतदेह सापडला तर महिलेचा शोध सुरू   ठाणे : मुंबई- नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरून ठाणे खाडीत दोन जणांनी उडी मारली आहे. यातील पुरुषाचा मृतदेह रविवारी पोलिसांना आढळून आला आहे. तर महिलेचा शोध लागू शकला नाही. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बबलू विश्वकर्मा (३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते पत्नी आणि तीन मुलांसह वागळे इस्टेट भागात राहत होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजता साकेत पुलावरून दोनजणांनी खाडीत उड्या मारल्याची माहिती कळवा पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून खाडीत शोधकार्य सुरू होते. रात्री अंधार असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले. रविवारी सकाळी पथकांनी पुन्हा शोधकार्य सुरू केले. त्यावेळी बबलू विश्वकर्मा याचा मृतदेह पथकांना आढळून आला. तर चार तासांच्या शोध कार्यानंतरही महिलेचा शोध लागू शकला नव्हता. त्यामुळे शोधकार्य तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात आले आहे. याप्रकरणाची नोंद कळवा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ०००००

विद्यार्थ्यांना एसटी पास आता थेट शाळेत मिळणार..!

अनिल ठाणेकर   ठाणे : शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट आता त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत. तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे,म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या *पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर* योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पास साठी आता रांगेत  ताटकळत  उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार  एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही. या संदर्भात १८ जुन पासुन एसटी प्रशासनातर्फे ” एसटी पास थेट तुमच्या शाळेत ” हि विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले आहे.  या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना होणार आहे. ००००

 १७ कोटी ६९ लाखांची मदत, गंभीर आजारातील २५८ रुग्णांना मिळाले जीवनदान –  रामेश्वर नाईक

 राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून ठाणे : निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधि – न्याय विभाग अंतर्गत विशेष राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्ष सुरु केले असून या कक्षाच्या माध्यमातून कॅन्सर, लिव्हर – किडनी ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट सारख्या गंभीर आजार असणाऱ्या २५८ रुग्णांच्या शस्त्रक्रिया करुन त्यांना नवीन जीवनदान देण्यात आले आहेत. या शस्त्रक्रियांसाठी १७ कोटी ६९ लाख रुपयांची मदत या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली असल्याची माहिती कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. निर्बल आणि दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयात १० टक्के बेड आरक्षित ठेवण्यात आले असून त्या बेडवर मोफत तसेच सवलतीच्या दरात चांगले उपचार मिळावे म्हणून राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जानेवारी २०२४ पासून हे कक्ष सुरु झाले असून राज्यभरातील धर्मादाय रुग्णालयांनी यात उत्साहाने सहभाग घेतला आहे.  कॅन्सर, लिव्हर – किडनी  ट्रान्सप्लांट, बोनमॅरो ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन सारख्या गंभीर आजाराच्या शस्त्रक्रियासाठी लाखोंचा निधी लागतो त्यामुळे हा खर्च सामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेर असतो. म्हणून अशा रुग्णांना पुन्हा नवीन जीवन मिळावे यासाठी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून उपचार तसेच आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात या कक्षाची स्थापना झाली असून मे महिन्यांपर्यंत २५८ गंभीर आजार असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करुन त्यांना जीवनदान देण्यात आले आहे. या शस्त्रक्रियांसाठी धर्मदाय रुग्णालय तसेच खासगी संस्थेच्या माध्यमातून या २५८ रुग्णांना १७ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी या कक्षाच्या माध्यमातून देण्यात आला. राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले की, केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या विविध योजना यांचा तुलनात्मक अभ्यास केला तर या धर्मादाय योजनेस उपचाराच्या खर्चाची कोणतीही मर्यादा नसल्याने कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, ह्दय प्रत्यारोपन अशा महागड्या शस्त्रक्रीया या योजनेतून निर्धन गटातील रुग्णास मोफत करण्यात येतात, त्यामुळे गोर-गरीब रुग्णांकरीता ही योजना वरदान असल्याचे रामेश्वर नाईक यांनी अधोरेखित केले. चौकट : महीना                      धर्मादाय रुग्णालय मदत                 खासगी ट्रस्टकडून मदत जानेवारी :                २.१६ कोटी                                        ६८ लाख फेब्रुवारी  :                ३.१५ कोटी                                         १.१४ कोटी मार्च  :                      ३.१७ कोटी                                       १.३२ कोटी एप्रिल :                    १.६१ कोटी                                         ७० लाख मे       :                   १.६७ कोटी                                         २.९ कोटी एकूण :                    १७ कोटी ६९ लाख रूपये 00000

वर्षाऋतु मधील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती

माथेरान : वर्षाऋतुमध्ये मुंबई पासून अगदी जवळ असलेल्या माथेरान सारख्या सुंदर पर्यटनस्थळाची भ्रमंती  म्हणजे पर्यटकांना एक पर्वणीच असते.त्यामुळे पर्यटक आवर्जुन हजेरी लावत असतात.अन्य पर्यटन स्थळांच्या तुलनेत केवळ वाहतुकीची खर्चिक बाब वगळता अगदीच स्वस्त दरात राहण्याची सोय लॉजिगच्या माध्यमातून त्याचप्रमाणे हॉटेलमध्ये होत असते. वर्षाऋतु मध्ये इथल्या नैसर्गिकरित्या साकारणा-या अदभूत निसर्गाच्या चमत्काराची सप्टेंबर महिन्यात खऱ्या अर्थाने अनुभुती पहावयास मिळते. बारा महिन्यांतील पवित्र समजला जाणाऱ्या श्रावण महिन्यात इथे निसर्ग निर्मितीचा अलौकिक आंनद आणि अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी आणि श्रावण तापीच्या कोवळ्या उन्हात पॉईंट्सची सैर करण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. सप्टेंबर महिन्यात डोंगर रांगात सभोवताली आणि पॉईंट्स परिसरात सोनकीची पिवळी फुले आच्छादलेली असतात त्यामुळे भूमातेच्या गर्भातून सोन्याचा उदय झाला आहे की काय असा भास झाल्याशिवाय राहत नाही. चोहोबाजूंनी गर्द झाडी आणि त्यातून पायी चालत जाण्याची मजा सुध्दा काही औरच असते. पावसाळी हवामानात गर्द धुक्यातून मार्गक्रमण करतांना अगदी समोरचं दृश्य देखील दृष्टीक्षेपात येत नाही.नैसर्गिक सौंदर्य धुक्यात हरवल्यामुळे ही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील विहंगमय  दृश्ये न्याहाळण्यासाठी पर्यटक विविध पॉईंट्स वर गर्दी करतात.पॉईंट वरील हे दाट धुक्याचे नैसर्गिक आवरण मनाला मोहीत करते.धुके विरळ झाल्यावर क्वचितच इंद्रधनूची कमान धुक्या आड दिसल्यावर मन प्रसन्न होते.शारलोट लेक वरील ओसंडून वाहणाऱ्या पाण्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक आतुर झालेले असतात. महत्त्वाचे जवळपास पंधरा पॉईंट्स असून इको पॉईंट, लुईझा पॉईंट, वन ट्री हिल, लिटिल चौक पॉईंट, सनसेट, रामबाग, हनिमून पॉईंट, मलंग पॉईंट असे काही महत्त्वाच्या स्थळांना भेटी दिल्यावर खरोखरच मनाला आलेली ग्लानी दूर होते निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा निघून जातो याचे भान रहात नाही. पावसात भिजल्यावर कुठल्या स्टॉल वर गरमागरम भजी चहाचा आस्वाद घेत तर कुठं निखार्यावर भाजलेला गरमागरम मका खाण्याचा मोह सुध्दा आवरता येत नाही. कुणी घोड्यावर तर आबालवृद्ध हातरीक्षाच्या साहाय्याने पॉईंट्स वरील नयनरम्य देखावे पाहण्यासाठी जात आहेत. एकंदरीत पूर्वीचे आणि आताचे वर्तमानातील माथेरान यात जमीन अस्मानाचा फरक प्रकर्षाने जाणवतो.तीन दशकांपूर्वी पावसाळ्यात इथले संपूर्ण व्यवहार बंद असायचे.हॉटेल्सआणि जुन्या बंगल्याना गवताच्या झडी लावून चार महिने या सर्व वास्तू बंदिस्त असायच्या परंतु इथे वर्षाऋतुमध्ये पर्यटकांची रेलचेल वाढू लागल्याने आता हे सुंदर स्थळ बाराही महिने पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज असते. पावसाळ्यात चार महिने माथेरानची मिनिट्रेन बंद असते त्यासाठी (दस्तुरी ) अमन लॉज स्टेशन पासून गावात येण्यासाठी मिनिट्रेनची शटल सेवा उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे इथे शनिवार आणि रविवार त्याचप्रमाणे अन्य सुट्टयांच्या हंगामात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. राहण्यासाठी लॉजिंग तसेच हॉटेल्स मोठया प्रमाणावर उपलब्ध असल्याने आगाऊ बुकिंग करण्याची सहसा आवश्यकता भासत नाही. अत्यंत स्वस्त दरात या सोयी इथे उपलब्ध आहेत. नेरळ स्टेशन वरून इथे येण्यासाठी चोवीस तास टॅक्सी सेवा उपलब्ध असते माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर उतरल्यावर पाच मिनिटांच्या अंतरावर अमन लॉज रेल्वे स्टेशन पासून माथेरान स्टेशन पर्यंत येण्यासाठी माफक दरात शटल सेवा सुरळीत सुरू आहे.हौशी पर्यटक घोड्यावरून येतात तर नव्याने दाखल झालेल्या पर्यावरण पूरक ई रिक्षा सुध्दा रात्री दहा वाजेपर्यंत सेवेसाठी उपलब्ध असल्याने सर्वाना उत्तम प्रकारे सेवा आणि व्यावसायिकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग ‘बकरी ईद’साठी सज्ज

ठाणे : बकरी ईद सण आनंदाने साजरा करण्यात यावा यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून ठाणे जिल्ह्यात मुब्रा, भिवंडी, ठाणे, खोणी या ठिकाणी बकरी ईद निमित्ताने कुर्बानी देण्यात येते. त्यासाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद मार्फत तात्पुरत्या कत्तलखान्याला परवानगी देण्यात आली आहे. प्रादेशिक सह आयुक्त मुबई विभाग डॉ. प्रशांत कांबळे यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्याप्रमाणे जिल्ह्यात नियोजन करण्यात आले आहे.‌ पशुसंवर्धन विभागामार्फत बकरी ईद सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कुर्बानीसाठी आलेल्या म्हैस वर्गाचे कत्तली पूर्व तपासणीसाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व पशुधन विकास अधिकारी तसेच सिंधुदुर्ग, रायगड व पालघर जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बकरी ईद १७ जून ते १९ जूनपर्यंत साजरा करण्यात येत असून या सणानिमित्त मुस्लिम बांधव मोठ्या म्हैस वर्गीय पशुधनाची खरेदी करतात. या पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर ईयर टॅगिंग करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची नियुक्ती तीन दिवसांसाठी करण्यात आली आहे. परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, जिल्हा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ठाणे डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ठाणे डॉ. समीर तोडणकर, सहाय्यक आयुक्त बदलापूर डॉ. लक्ष्मण पवार, सहाय्यक आयुक्त जि.प.स.चि.शेलार डॉ. अजित हिरवे, सहाय्यक आयुक्त ता.ल.प.स.चि कल्याण डॉ. दीपक कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेशोत्सवाप्रसंगी उत्साहाने स्वागत

नवी मुंबई : उन्हाळी सुट्टीनंतरचे नमुंमपा कार्यक्षेत्रातील शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष उत्साहात सुरू झाले असून शाळेच्या पहिल्या दिवशी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांइतकेच पालकही उत्साही दिसत होते. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 434 शाळा…

मुंबईच्या तलावांच्या क्षेत्रात पावसाची एन्ट्री

मुंबईकरांना दिलासा !   मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची एन्ट्री झाली आहे. सरासरीने अधूनमधून पाऊस पडू लागला आहे. पावसाने तलावक्षेत्रात हजेरी लावल्याने मुंबईकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. गेल्या चार दिवसात सर्वात जास्त १३५ मिमी पाऊस तुळशी तलावात, त्यापाठोपाठ विहार तलावात १३४ मिमी, भातसा तलावात ८८ मिमी, मध्य वैतरणा तलावात ७३ मिमी, मोडक सागर – ६५ मिमी, तानसा – ६४ मिमी आणि अप्पर वैतरणा तलावात सर्वात कमी म्हणजे ४२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सातही तलावात गेल्या ९ जूनपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.मुंबईत यंदा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई शहरात दरवर्षी किमान २,२०० ते २,७०० मिमी इतका पाऊस पडतो. मात्र मुंबई महापालिकेकडे या पावसाचे पाणी साठवून ठेवण्याबाबत वेगळे असे नियोजन नाही. तसेच, सन २००६ पासून राज्यात मोठ्या जागेतील इमारतीच्या ठिकाणी ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग ‘ योजना राबविण्याबाबत कायदा करण्यात आलेला असताना त्याची अंमलबजावणी करण्यात पालिकेला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळेच पावसाचे हे पाणी मुंबईतील तुळशी आणि विहार या दोन तलावात त्यांच्या क्षमते एवढेच जमा होते. तर पवई तलावात पावसाचे पाणी काही प्रमाणात साठवले जात असले तरी या तलावातील पाणी क्षारयुक्त असल्याने ते पिण्यासाठी वापरता येत नाही. त्यामुळे त्या पाण्याचा वापर आरे कॉलनी व जवळच्या काही कंपन्यामध्ये पिण्याच्या व्यतिरिक्त पाण्याची गरज भागविण्यासाठी करण्यात येतो. त्यामुळे मुंबईत पावसाळ्याच्या चार महिन्याच्या मोसमात पडणारे जवळजवळ २२,०० ते २,७०० मिमी इतक्या पावसाचे पाणी विनावापर समुद्रात वाया जात असते. मुंबईची दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतकी आणि ठाणे, भिवंडी महापालिकेची दररोज १५० दशलक्ष लिटर इतकी पाण्याची तहान ठाणे, पालघर, नाशिक जिल्हा परिसरातील अप्पर वैतरणा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा आणि भातसा हे प्रमुख ५ तलाव भागवत असतात. त्यामुळे हे ५ प्रमुख तलाव आणि मुंबई उपनगर परिसरातील तुळशी आणि विहार हे दोन तलाव असे एकूण सात तलाव पावसाळ्याच्या शेवटपर्यंत म्हणजे १ ऑक्टोबरपर्यंत भरलेले (१४,४७,३६३ दशलक्ष लिटर) असणे आवश्यक असते. दरम्यान सध्या सात तलावात बुधवारी सकाळी ६ पर्यंत फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर (५.५४ टक्के) इतका म्हणजे पुढील २० दिवस १ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत तलाव क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा मुंबईकरांना आहे. सध्या सात तलावात फक्त ८०,१४० दशलक्ष लिटर ००००

प्रशासनाच्या निष्क्रियतेची पर्यटकांना शिक्षा

माथेरान : कामाच्या अन दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दोन दिवस मनाला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून बहुतांश पर्यटक हे माथेरानला पसंती देतात. परंतु येथील सर्वच संबंधीत  प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेबाबाबत सुयोग्यपद्धतीने नियोजन नसल्याने दरवेळेस येथील घाटरस्त्यात आणि दस्तुरीच्या वाहनतळावर वाहनांची प्रचंड गर्दी होताना दिसून येत आहे.त्यामुळे खाजगी वाहने पार्किंग अभावी घाटातून माघारी जात आहेत तर अनेकदा त्यांना आपल्या किमंती गाडया घाटातील रस्त्यावर पार्क करून दस्तुरी पर्यंत आपल्या लहान मुलांना आणि सामानाच्या बॅगा घेऊन पायपीट करावी लागत आहे. एकंदरीत इथल्या निष्क्रिय प्रशासनाच्या चुकांची शिक्षा पर्यटकांना सोसावी लागत आहे. दस्तुरी पार्किंग ह्या वनखात्याच्या जागेत मोठया प्रमाणावर अतिक्रमणे झालेली असल्याने त्याठिकाणी वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. तर पॅनोरमा पॉईंट्सच्या रस्त्यावर जवळपास पन्नास गाडया पार्क होऊ शकतात परंतु तेथे पोलीस प्रशासन हरकत घेत आहे असे बोलले जात आहे. दस्तुरी येथील एमपी हा प्लॉट अद्यापही नगरपरिषदेच्या ताब्यात आलेला नाही अन्यथा जवळपास दोनशे गाडयाची पार्किंगची सोय सहजपणे होऊ शकते त्याठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यास प्रशासन का कमकुवत ठरत आहे हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे.दरवेळी सुट्ट्यांच्या हंगामात माथेरान घाटरस्ता फुल होऊन जातं आहे. येथील प्रतिष्ठित व्यक्तींना देखील याबाबत सर्व कल्पना आहे परंतु शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्यास कुणीही पुढाकार घेताना दिसत नाही. माथेरान मधील काही महत्वाकांक्षी राजकीय पक्षांच्या मंडळींनी एकवेळ या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण बाजुला ठेऊन सकारात्मक विचार केला तरच इथे पर्यटन क्रांती घडू शकते परंतु श्रेयवादाच्या लढाईत स्थानिकांना भरडले जात आहे.

हज कमिटीच्या गैर व्यवस्थापनामुळे सौदीत हज यात्रेकरूंचे हाल…

राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांचे, सीईओ लियाकत अफाकी यांच्यावर आरोप   ठाणे : भारतातुन सौदी अरेबिया येथे हज यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचे तेथे हाल सुरु आहेत. यात्रेकरूंना भोजन, प्रवासाची आणि निवासाचीही व्यवस्था नसुन याला हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच जबाबदार आहेत. असा आरोप राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी केला आहे. प्रत्येक यात्रेकरूकडुन साडेतीन लाख रुपये घेऊनसुद्धा काहीही सुविधा दिलेल्या नसल्याने हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचेही बबलु शेख यांनी म्हटले आहे. शनिवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बबलु शेख यांनी हज यात्रेकरूंच्या हालअपेष्टांचे व्हीडीओ माध्यमांसमोर दाखवले. बकरी ईदच्या दरम्यान हज यात्रा संपन्न होत असते. आयुष्यात प्रत्येक मुस्लिम बांधवांची एक वेळेस तरी हज यात्रा करण्याची इच्छा असते. त्यानिमित्ताने देशभरातून सुमारे दीड ते पावणेदोन लाख भाविक जात असतात. १५ ते १६ जून आणि नंतर दोन दिवस सौदी येथे हज यात्रा संपन्न होत आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रसह इतर राज्यांतील भाविकांचा समावेश असणार आहे. महाराष्ट्रातील २१ हजार भाविक यात्रेस गेले आहेत. मात्र, सौदी अरेबियामध्ये भाविकांना हज यात्रेसाठी कुठलीच सुविधा नाही. वाहनाची, भोजनाची आणि निवासाचीही व्यवस्था नसल्याने हज यात्रेकरूचे हाल सुरु आहेत. २१ हजार लोकांसाठी केवळ ९० जणांचे पथक व्यवस्थेसाठी तैनात ठेवले आहे. हज यात्रेकरूंच्या दुर्दैवी हालाच्या सौदी अरेबिया येथुन पाठवलेल्या चित्रफिती दाखवुन राज्य हज कमिटीचे सदस्य बबलु शेख यांनी हज कमिटीचे सीईओ लियाकत अफाकी हेच याला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यात्रेकरूंनी तसेच हज कमिटीच्या सदस्यांनी फोन केल्यानंतर फोनही उचलत नाहीत. लियाकत अफाकी यांनी सर्व कारभार आपल्याच हाती ठेवला असुन लाखो रुपये उकळुनही सुविधा न दिल्याने हा एक प्रकारे सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप बबलु शेख यांनी केला आहे. तेव्हा,केंद्र सरकारने याची दखल घेऊन त्वरीत कारवाई करावी. अशी मागणी बबलु शेख यांनी केली आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या छाप्यात १ कोटी रूपयांचा गांजा जप्त

अशोक गायकवाड रायगड : आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली, गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक होणार आहे अशी माहिती मिळाल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने तळोजे, नवी मुंबई येथे पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकून कारवाई केली.आरोपींच्या ताब्यातून एकुण १ कोटी १३ लाख ९० हजार रुपये किमतीचा गांजा, वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त करून गुन्हयाच्या पुढील तपासासाठी अटक करण्यात आली आहे. आरोपीविरूध्द एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये. कलम ८ (क), २० (ब) (II), २९ तसेच भा. द. स. कलम ३२८ अन्वये त्यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला. पनवेल मुंब्रा हायवेच्या डाव्या बाजुस स्टार वेल्डींग वर्कसच्या समोर, तळोजे पाचनंद, से. नं. ४०, तळोजे, नवी मुंबई येथे गांजा या अंमली पदार्थाचा मोठासाठा वाहतुक होणार आहे अशी कार्यालयास माहिती मिळाली. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या भरारी पथक क्रमांक २, पनवेल यांनी मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून १२ जून २०२४ रोजी सांयकाळी छापा टाकला. यावेळी एक महिन्द्रा कंपनीची एक्सयूव्ही ५०० गाडीमध्ये दोन आरोपी आरिफ जाकीर शेख वय २५ वर्षे रा. रूम नं. १२, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८, कोकरी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई व परवेझ बाबुअली शेख वय २९ वर्षे रा. रूम नं. १३, तळ मजला, ब्लॉक नं. ए ७८ कोकनी आगर जवळ म्हाडा चाळ सायन कोळीवाडा मुंबई यांच्या ताबे कब्जात पांढऱ्या रंगाच्या नायलॉन गोण्यामध्ये ४१४ किलो अं. १ कोटी रूपयांपेक्षा जास्त किमंतीचा गांजाचा साठा मिळून आला. या गुन्हयामध्ये अंतरराज्यीय टोळी असण्याची दाट शक्यता असून ही कारवाई करताना डॉ. विजय सुर्यवंशी (भा. प्र. से.) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, प्रसाद सुर्वे संचालक (अ. व. द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, प्रदिप पवार उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग ठाणे, आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे, निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक डी. सी. लाडके, दुय्यम निरीक्षक एन. जी. निकम, दुय्यम निरीक्षक प्रविण माने, तसेच सहा. दु. नि. जी. सी. पालवे, महिला जवान आर. डी. कांबळे, . निशा ठाकुर, जवान ज्ञानेश्वर पोटे, सचिन कदम, हे सहभागी होते. गुन्हयाचा पुढील तपास आर. आर. कोले, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, रायगड-अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. डी. पाटणे हे करत आहेत.