Category: मुंबई

Mumbai news

लाल फितीत रखडल्या २२०० लाल परी

मुंबई : सरकारी काम आणि सहा महिने थांब’ ह्या म्हणीचा सामान्य जनतेला नेहमीच अनुभव येतो. तसाच प्रकार एस. टी. महामंडळालाही आला आहे. महामंडळासाठी बसेस खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या निधीच्या फाईलवर मुख्यमंत्र्यानी सही केली नसल्याने एसटीला मिळणाऱ्या २२०० गाड्‌या रखडल्या आहेत. साहजिकच त्याचा फटका एसटी कर्मचारी व प्रवासी यांना बसत आहे फाईल वेळेवर पाठऊन सुद्धा सही न होण्यामागील कारण काय ? असा सवाल  महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. गाड्या खरेदी संदर्भात बरगे यांनी पत्रकार परिषद घेतली त्या वेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला संघटनेचे कार्याध्यक्ष दिलीप जगताप हे सुद्धा हजर होते. एसटीच्या जवळपास १० हजार बस ह्या मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे दुरुस्तीचे काम करुन यांत्रिकी कर्मचारी हैराण झाले आहेत. याशिवाय ह्या गाड्या रस्त्यावर चालवताना चालकांना खूप त्रास होत आहे. एसटी महामंडळाने अशोक लेलैंड कंपनीकडून बॉडी बांधणीसह तयार २२०० बसेसची निविदा मंजूर केलेली आहे. पण त्यासाठी लागणारा निधी मात्र सरकारकडून आलेला नाही. वर्कऑर्डर दिल्याशिवाय गाड्या ताब्यात येऊ शकणार नाहीत आणि निधी प्राप्त झाल्याशिवाय महामंडळ वर्कऑर्डर देऊ शकत नाही. कारण सरकारकडून बजेट मध्ये तरतूद करण्यात आलेला निधी कधीच वेळेवर मिळत नाही. व त्यामुळे विनाकारण पुरवठादार व महामंडळ यांच्यात संघर्ष उभा राहतो. असे बरगे म्हणाले. या पूर्वीचा अनुभव पाहता कधी कधी अशी प्रकरणे न्यायालयात जातात व साहजिकच त्याचा परिणाम महामंडळाच्या एकंदर आर्थिक स्थितीवर तसेच कामकाजावर होतो. अश्या वेळी सरकारी अधिकारी मात्र हात झटकून मोकळे होतात.असे बरगे म्हणाले.

बहुतेक सोशल मीडियावर हवामान अंदाजाची अफवा असते – आय एम डी प्रमुख सुनील कांबळे

रमेश औताडे मुंबई : बहुतेक सोशल मीडियावर हवामान संदर्भातील हवामान अंदाजाची माहिती देत असतात. मात्र ही माहिती अचूक नसते व त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे अशा माहितीवर विश्वास ठेऊ नये असे मत प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख सुनील कांबळे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लब व प्रादेशिक हवामान विभाग तसेच असर या संस्थेने यांच्या संयुक्त विद्यमाने उष्णतेच्या लाटा व हवामान बदल याबाबत परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी कांबळे बोलत होते. वातावरण बदल व पर्यावरणाचा समतोल याबाबत जनतेत म्हणावी तेवढी जनजागृती नाही. आता एवढे उष्ण वातावरण आहे तरीही लोक पर्यावरणाबाबत गंभीर नाहीत. वातावरणातील बदलामुळे हवामान खात्याचे अंदाज काही वेळेस मागे पुढे होतात. मात्र समाज माध्यमावर ब्रेकिंग व टी आर पी च्या गोंधळात अचूक माहिती मिळत नाही. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो. आय एम डी या संकेतस्थळावर अचूक माहिती अपडेट होत असते. मात्र वातावरण बदलामुळे काही अंशी माहिती बदलू शकते. शेतकरी व हवामान खाते यांचा अतूट संबंध असतो. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याचे संकेतस्थळ महत्वाची भूमिका बजावत आहे.

‘संवेदना’ उद्यानाबाबत महापालिका ‘असंवेदनशील’

नवी मुंबई : कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या सानपाडा सेक्टर १० येथील ‘संवेदना’ उद्यानाची दुरवस्था झाल्यामुळे दिव्यांगांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी निवेदन दिले. उद्यानांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सानपाडा सेक्टर १० येथे ‘संवेदना’ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या मानवाच्या पंचेंद्रियांवर आधारित संकल्पनेवर संवेदना उद्यान विकसित करण्यात आले असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. उद्यानांमध्ये दिव्यांग मुलांसाठी खेळणी, व्हीलचेअरचा झोपाळा, वाळूचा हौद, बोगदा, लेस बांधण्यासाठी बूट, वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, दगड, लाकूड, लादी, गोटे बसविलेला मार्ग, सापशिडीचा खेळ, स्पिकिंग ट्यूब, बेल ट्री, फुली गोळ्याचा खेळ, सेल्फी फ्रेम, बुद्धिबळ चौकटी, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक इत्यादी सुविधांचा समावेश असून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा व लहान मुलांसाठी विविध खेळणी बसविण्यात आली असून विशेष सुविधेसह दोन स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत. सौंदर्याला बाधा उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. उद्यानातील लोखंडी फलक, लहान मुलांची तुटलेली खेळणी उद्यानात पडलेली दिसत आहेत. तसेच कारंजे बंद पडले असून पाण्याचे हौद पाण्याअभावी ओस पडले असून झाडेही सुकून गेली आहेत. विद्युत दिवेसुद्धा तुटले असून त्यांचा खच एका कोपऱ्यात पडलेला आहे. स्वच्छतागृहातील नळ खराब झाले असून शौचास बसण्यासाठी असलेले भांडेसुद्धा तुटून पडले आहे. पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीमुळे उद्यानाचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उद्यानात सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सानपाडा येथील संवेदना उद्यानातील दुरुस्ती करण्याबाबत शहर अभियंता यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जी काही कामे आहेत ती अभियांत्रिकी विभागाकडून केली जातील. – दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग

महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे, खासदार अरविंद सावंत, काँग्रेसचे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष रवी बावकर, अश्फाक सिद्दीकी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

पत्राचाळवासीयांना खुशखबर !

जुलैमध्ये घरांचा ताबा मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसित इमारतींचे काम अंतिम टप्प्यात आहे. या इमारतींचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम मे अखेर पूर्ण करण्याचे…

ग्रामीण रुग्‍णालयांकडे रुग्‍णांची पाठ

मुंबई : एकीकडे शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा मिळवण्यासाठी रुग्णांच्या कुटुंबीयांना मोठी धडपड करावी लागत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण रुग्णालयातील केवळ ४० टक्के खाटांचाच वापर होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आरोग्य आढावा अहवालात ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, डॉक्टरांसह इतर सुविधांअभावी ग्रामीण रुग्णालयांतील अशी वेळ असल्याचे समोर आले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत ३६४ ग्रामीण रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी आरोग्य सेवा संचालनालयाची आहे. या ३६४ रुग्णालयांमध्ये सुमारे १० हजार खाटा आहेत. त्यापैकी केवळ ४० टक्के म्हणजेच ४ हजार खाटा रुग्णांकडून वापरल्या जात आहेत. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा आढावा अहवाल आशियाई विकास बँकेने तयार केला आहे. ग्रामीण रुग्णालयांचा पूर्ण क्षमतेने वापर होत नसल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. तज्ज्ञांची कमतरता आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, रुग्णालये पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात किमान एक एमडी मेडिसीन आणि सर्जनची नियुक्ती करावी. मात्र, प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात एक महिला तज्ज्ञ, एक बालरोगतज्ज्ञ आणि एक भूलतज्ज्ञ असतो. इतर सौम्य आणि गंभीर प्रकरणांसाठी रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले जाते. सुविधा वाढवली जात आहे नांदेड दुर्घटनेनंतर असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, प्राथमिक स्तरावर लोकांना संपूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यास जिल्हा आणि तृतीय श्रेणी रुग्णालयांवरील भार कमी होऊ शकतो. याअंतर्गत ग्रामीण रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्याअंतर्गत येथे एमडी मेडिसीन आणि सर्जरीच्या डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यायला हवी, असे आरोग्य सेवा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सी-व्हिजिलवर आचारसंहितेच्या २४५ तक्रारी

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘सी विजिल’ हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात १६ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत २४५ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील १३५ तक्रारींचे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे मुख्य उद्दिष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार ‘सी विजिल’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी- व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून १३५ तक्रारींचे निवारण केले. शंभर मिनिटांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत उर्वरित १८३ तक्रारीचा निपटारा करण्यात आला. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. मतदारसंघनिहाय तक्रारी अंधेरी पूर्व- १६, अंधेरी पश्चिम- ८, अणुशक्तीनगर- ७, भांडुप पश्चिम- ५, बोरिवली- १३, चांदिवली- २६, चारकोप- १४, चेंबूर- १४, दहिसर- ८, दिंडोशी- ५, घाटकोपर पूर्व- ३, घाटकोपर पश्चिम-२, गोरेगाव-१०, जोगेश्वरी पूर्व-५, कलिना-८, कांदिवली पूर्व-८, कुर्ला-५, मागठाणे-२४, मालाड पश्चिम -११, मानखुर्द शिवाजीनगर-१, मुलुंड- १६, वांद्रे पूर्व- ७, वांद्रे पश्चिम- ८, वर्सोवा- ३, विक्रोळी- १६, विलेपार्ले- ५ अशा एकूण २४५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

घाटकोपरमध्ये फेरीवाल्‍यांना हटवले

पोलिस प्रशासन पालिकेची संयुक्‍त कारवाई मुंबई : मुंबईतील अनेक रस्ते अनधिकृत फेरीवाल्‍यांनी व्यापल्याने नागरिकांना चालणे खूपच कठीण झाले आहे. यासंदर्भात बेकायदा आणि विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. त्‍यामुळे पोलिस प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्‍त कारवाई करीत फेरीवाल्‍यांना हटवले. घाटकोपर पश्चिम श्रद्धानंद रोड आणि हिराचंद देसाई रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येते. वारंवार कारवाई होऊनही फेरीवाले हटत नाहीत. याबाबत नागरिक सातत्याने स्‍थानिक पोलिस, पालिका विभाग कार्यालयात तक्रारी दाखल करतात. घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांविरोधात नागरिकांनी एकत्र येत कारवाईसंदर्भात मोहीम सुरू केली आहे. रेल्वे प्रवाशांना फेरीवाल्यांची अडचण घाटकोपर रेल्वे प्रवासी आणि मेट्रो स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्‍थानक परिसरात अनधिकृतरीत्या बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो. संध्याकाळच्या वेळेस फेरीवाले रस्ते आणि पदपथ अडवत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना नाकीनऊ येते. मागच्या काही महिन्यांपासून पालिकेने स्‍थानक परिसरात ‘नो हॉकर्स झोन’चे फलक परिसरात लावले आहेत. तरीदेखील फेरीवाले बिनधास्त आपले बस्तान मांडून असतात. त्‍यामुळे फेरीवाल्‍यांविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. रेल्‍वे स्‍थानक परिसरात बस्तान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर संयुक्तरीत्या कारवाई करत रस्ते मोकळे केले आहेत. – शरद शेटे, पोलिस उपनिरीक्षक

वाढत्या उन्हाचा पक्ष्यांनाही फटका

वाशी –  दिवसेंदिवस वाढत्‍या उष्णतेचा त्रास अनेक नागरिकांना होत असताना, पक्ष्यांनादेखील त्‍याचा फटका बसत आहे. तापमानात वाढ होत असल्‍याने पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होत असून हवेत उडताना ते गळून कोसळण्याचे प्रकार नवी मुंबईत घडत आहेत. मागील काही दिवसांत नवी मुंबईतील तापमान ४० अंश इतके होते. त्‍यामुळे वाढत्‍या उष्मामुळे याचा अनेक नागरिकांना त्रास झाला होता, तर पक्ष्यांनादेखील या गरमीचा फटका बसत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना ते गळून कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पक्षी उष्ण रक्ताचे असून त्यांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ पिरॅमिड अंश इतके असते. शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतात. त्यामुळे ते उन्हाळ्यात बऱ्याचदा आपली चोच उघडून बसलेले असतात. त्यांचे शरीर अनेक प्रकारच्या पिसांनी आच्छादलेले असले तरी दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. अशा वेळी त्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते आणि ते गळून पडतात. गेल्‍या काही दिवसांपासून नवी मुंबईत पक्षी गळून पडण्याचे प्रमाण वाढल्‍याचे पक्षीप्रेमी विशाल मोहिते यांनी सांगितले. पशूदया महत्त्वाची पोटातील पाण्याचा अंश कमी झाला की हवेत उडताना पक्षी खाली कोसळतात. रस्त्यात एखादा पक्षी मुर्च्छीत होऊन पडलेला असेल किंवा जखमी असेल तर अशा पक्ष्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवून शक्य झाल्यास टरबूज वा कलिंगडासारखी फळे खायला द्यावीत. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी बाल्कनी, टेरेस अथवा जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करावेत, असे आवाहन निसर्गप्रेमी सागर कांबळे यांनी केले आहे.

आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा

रवी कटकधोंड, राजकीय पक्षांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड यांनी केले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील कापडणीस, सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांच्यासह नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी कटकधोंड म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. तसेच प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलिसांचीही परवानगी घ्यावी. उमेदवारांनी दैनंदिन खर्च अहवाल सादर करणे अत्यावश्यक असून निवडणूक अर्ज भरण्याअगोदर स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार असल्याचे कटकधोंड यांनी या वेळी सांगितले. अधिसूचना शुक्रवारी निघणार ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी निर्गमित होणार आहे. या मतदारसंघात एकूण १५ लाख २४ हजार ९३९ इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख २७ हजार १७८, महिला मतदार ६ लाख ९७ हजार ७१८ आणि इतर ४३ मतदार आहेत; तर मतदान केंद्र १,५२७ आहेत.