Category: मुंबई

Mumbai news

विविध आयुधांचा उपयोग करून सभागृहाचा जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर- जितेंद्र भोळे

मुंबई : राज्याचे कायदेमंडळ हे सार्वभौम आहे. जनतेच्या हिताचे कायदे करणे, त्यांचे प्रश्न सोडविण्याचे कार्य कायदेमंडळाच्या  माध्यमातून होत असते. विविध संसदीय आयुधांचा उपयोग करून सदस्य जनतेचे प्रश्न, समस्या, भोवतालच्या परिस्थितीची माहिती सभागृहाला देतात. या माहितीच्या आधारावर कार्यवाही करून सभागृहात जनतेचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येतो. सभागृहातील या कार्यवाहीची माहिती जनतेला देण्याचे महत्वाचे काम प्रसारमाध्यमे करीत असतात, असे प्रतिपादन विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे यांनी आज केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात ‘माध्यम साक्षरता अभियान’अंतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात ‘विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना’ या विषयावर सचिव (1) श्री. भोळे यांनी मार्गदर्शन केले. प्रथम सत्रावेळी व्यासपीठावर मातिही व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते. विधिमंडळाला आर्थिक, कायदे निर्मिती व माहिती घेण्याचा अधिकार असल्याचे सांगत सचिव (1) श्री. भोळे म्हणाले, सदस्य आपआपल्या मतदासंघातील प्रश्न सभागृहात तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, औचित्याचे मुद्दे, स्थगन प्रस्ताव, अल्पकालीन चर्चा, नियम 293 अन्वये चर्चा आदींच्या माध्यमातून मांडत असतात. कामकाजातील या सर्व प्रकारांमध्ये विधेयक हे सर्वात महत्वाचे असते. विधेयक विधानसभेने मंजूर केल्यानंतर विधान परिषदेकडे पाठविली जातात. आवश्यकता असल्यास संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठविण्यात येते. वित्तीय बाबींशी संबधित विधेयक हे सर्वप्रथम विधान सभेत मांडण्यात येते. धन विधेयक ठरविण्याचा अधिकारी विधानसभा अध्यक्षंना असतो. सचिव (1) श्री. भोळे पुढे म्हणाले, सभागृहातील वित्तीय कामकाज महत्वाचे असते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विनियोजन विधेयक पारीत करावे लागते. विधेयक पारीत न झाल्यास अर्थसंकल्पीय तरतूदींचा विनियोग करता येत नाही. तसेच शासकीय विधेयकांसोबत अशासकीय विधेयकेसुद्धा मांडण्यात येतात. शासकीय विधेयकाप्रमाणेच अशासकीय विधेयक राजपत्रात प्रसिद्ध होत असते. सभागृहात सदस्यांना विशेषाधिकार मिळालेले असतात. त्यांना भाषण स्वातंत्र्य असते. तसेच अधिवेशन काळात त्यांना अटक करता येत नाही. यासोबतच विधीमंडळाच्या विविध प्रकारच्या समित्या कार्यरत असून सध्या 40 समित्या आहेत. या समित्यांचे कामकाज वर्षभर सुरू असते. समित्या शासनाला शिफारशी करू शकतात. कामकाजाचे वार्तांकन करताना प्रसार माध्यम प्रतिनिधींना या आजच्या कार्यशाळेचा लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माध्यम साक्षरता अभियानांतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

कायद्याची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याची प्रसार माध्यमांची मोठी जबाबदारी- प्रधान सचिव ब्रिजेश सिंह मुंबई : विविध राज्यांचे विधिमंडळ व संसद आवश्यकतेनुसार कायद्यांची निर्मिती करीत असते. या कायद्यांच्या अंमलबजावणीतून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा उद्देश असतो. नवीन कायदा, वेळोवेळी कायद्यात झालेले बदल आणि बदलाची असणारी आवश्यकता याबाबतची माहिती समाजापर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचविण्याची मोठी जबाबदारी प्रसार माध्यमांची असल्याचे प्रतिपादन करीत या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना निश्चितच उपयोग होणार असल्याचा विश्वास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.  उद्घाटनीय कार्यक्रमात महासंचालक श्री. सिंह बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून विधिमंडळ सचिवालयाचे सचिव (1) जितेंद्र भोळे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (माहिती) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते. जगभरात बातमीचा प्राथमिक स्त्रोत समाजमाध्यमे झाली असल्याचे सांगत महासंचालक श्री. सिंह म्हणाले, केवळ बातमीचाच नाही, तर बातमीच्या खात्रीचा स्त्रोतही समाजमाध्यमे झाली आहेत. समाज माध्यमांवर पोस्ट केलेल्या मजकूराप्रती समाजमाध्यम जबाबदार नसते, तर प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या बातमीप्रती माध्यमे जबाबदार असतात. त्यामुळे समाज माध्यमांच्या गर्दीतही वृत्तपत्रे, वाहिन्या यांचे महत्व अबाधित आहे. माध्यम प्रतिनिधींना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना सदस्यांच्या विशेषाधिकाराला धक्का लागणार नाही, याची दक्षताही घ्यावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोड म्हणाले, माध्यमांमध्ये आलेल्या नवपत्रकारांना विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करताना माहितीअभावी  बऱ्याच अडचणी येत असतात. अशा नवपत्रकारांना या कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा निश्चितच वार्तांकन करताना लाभ होणार आहे. कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना पात्रता ठरविणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात संचालक हेमराज बागुल म्हणाले,  लोकशाहीच्या गुणात्मक वाढीसाठी चौथा स्तंभ असलेल्या प्रसार माध्यमांच्या गुणवत्ता वाढ होणे गरजेची आहे. विधिमंडळातील कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्याची माध्यमांची जबाबदारी मोठी आहे. माध्यमांची गुणवत्ता वाढल्यास लोकशाही गुणात्मकदृष्ट्या सुदृढ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचलन पल्लवी मुजुमदार यांनी तर आभार वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी मानले. कार्यक्रमास माध्यम प्रतिनिधी, महासंचालनायाचे अधिकारी उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांकरिता कबड्डी प्रशिक्षण शिबिर संपन्न

मुंबई : सचिंद्र आयरे फाउंडेशन व लालबागचा राजाच्या आशिर्वादाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शनि. व रवि. दिनांक ०१ व ०२ जून २०२४ रोजी कबड्डी खेळाचे दोन दिवसांचे ‘विनामूल्य प्रशिक्षण शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता अर्जुन पुरस्कार सौ. माया मेहेर यांच्या हस्ते झाले. तदप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार तारक राऊळ, महाराष्ट्राचे राष्ट्रीय खेळाडू रवींद्र सुर्वे, द्रोणाचार्य पुरस्कार भार्गव कदम, सचिंद्र फाऊंडेशनचे सचिंद्र आयरे, प्रशिक्षक मिलिंद कोलते, संदीप काणेकर, अशोक लोटणकर, सुरेश गोरिवले आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना रविंद्र सुर्वे म्हणाले की, शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी तुम्ही मनसोक्त खेळा. खेळात प्रगती करताना ध्येय निश्चित करा, पण शॉर्ट – कट मारू नका. या खेळाडूंना मिलिंद कोलते, मोरे यांनी खेळाचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन राष्ट्रीय खेळाडू पांडुरंग भोगले यांनी केले.

शक्तीप्रदर्शन करत ॲड. अनिल परब यांची उमेदवारी दाखल

महविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी लावली हजेरी  नेते सुभाष देसाई यांची उपस्थिती मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी मंत्री ॲड. अनिल परब यांनी आज सोमवारी दि. ३ जून रोजी नवी मुंबईतील कोकण भवन येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. हि निवडणूक प्रचंड मताधिक्यांनी जिंकण्याचा विश्वास यावेळी ॲड. अनिल परब यांनी व्यक्त केला. गेली १८ वर्षे विधान परिषदेत शिवसेनेचे आमदार असलेले ॲड. अनिल परब यावेळी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ॲड. परब सकाळी ११ वाजता वांद्रे येथील निवासस्थानातून बाहेर पडले. एमआयजी क्लब येथेून हजारो शिवसैनिकांसह ते नवी मुंबईत आले. यावेळी ॲड. परब यांच्याबरोबर मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, पदवीधर मतदार यांच्यासह हजारो कार्यकर्ते सोबत होते. यावेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणांनी बेलापूरचा परिसर दुमदुमून गेला होता. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ॲड.परब म्हणाले, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने मी मुंबई पदवीधर मतदारसंघात आज उमेदवारी दाखल केली. मी शिवसैनिकांच्या बळावर बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेला विजय मिळवून देईन. महामुंबईमध्ये शिवसैनिकांनी ज्याप्रमाणे मतदार नोंदणी केली त्याच्या जोरावर प्रचंड मताधिक्यानी विजयी होण्याचा मला विश्वास आहे, असा विश्वास ॲड. परब यांनी व्यक्त केला. त्यापुढे बोलताना ॲड परब म्हणाले कि, समोर प्रतिस्पर्धी कोणीही असला तरी त्यांचा टिकाव लागणार नसल्याचा दावा केला. मी प्रत्यके लढाईत पूर्ण ताकतीनिशी उतरतो. प्रत्येक लढाई हि माझ्या, पक्षाच्या, शिवैनिकांच्या ताकतीवर आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादावर लढत असतो. त्यामुळे समोर प्रतिस्पर्धी कोण, तो किती तुल्यबळ आहे, याची तमा न बाळगता शिवसैनिक ताकतीने लढत असतो. शिंदे गट किंवा भाजप कोणीही माझ्यासमोर येऊ देत. बाळासाहेबांच्या आशीर्वादासमोर आणि शिवसैनिकांच्या ताकतीसमोर कोणीही टिकणार नाही याचा मला पूर्ण विश्वास आहे, असे ॲड परब म्हणाले. यावेळी खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, शेकापचे आमदार जयंत पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, आमदार सुनील प्रभू, आमदार अजय चौधरी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, उपनेते अमोल कीर्तिकर, आमदार विलास पोतनीस, आमदार रमेश कोरगावकर, आमदार प्रकाश फातर्फेकर इत्यादी उपस्थित होते. शिवसेनेचे विलास पोतनिस यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ ७ जुलै रोजी संपत आहे. त्या जागी ॲड. परब यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उमेदवारी दिली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात यावेळी १ लाख १६ हजार ९२३ मतदार आहेत. ७ जून उमेदवारी दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ असे मतदान आहे. १ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

वस्ताद वसंतराव पाटील यांचा गौरव

मुंबई : सांगली येथील ईगल फाऊंडेशनने भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद वसंतराव पाटील यांनी कुस्ती खेळात चार दशके केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन त्यांची २०२४च्या राष्ट्रीय गरुडझेप पुरस्कारासाठी निवड केली आहे. येत्या ९ जून रोजी ईगल फाऊंडेशनच्यावतीने होणाऱ्या वर्धापनदिन सोहळ्यात पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कार वितरण समारंभ डांगे शैक्षणिक संकुल, आष्टा, ता. वाळवा, जिल्हा सांगली येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, समाज कल्याण आयुक्तालय, पुणे, उप संचालक श्रीमती निशादेवी बंडगर (वाघमोडे), दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर पाटील, आर एस पी अधिकारी डॉ. मनिलाल शिंपी, डॉ. मीना श्रीवास्तव,  पत्रकार सुनिल पाटील, अमोल पांढरे, बाळासाहेब कोळेकर, अविनाश रामचंद्र यांचादेखील समावेश आहे. वसंतराव पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री गणेश आखाड्यातील सर्व कुस्तीपटू, प्रशिक्षक आणि पालकवर्गानी त्यांचे खास अभिनंदन केले आहे.

आज अवजड वाहनांसाठी अटल सागरी सेतू बंद

नवी मुंबई: लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या असून चार जून रोजी मतमोजणी होत आहे. मुंबईतील शिवडी आणि दक्षिण मुंबई मतदार संघाची मतमोजणी शिवडी बंदर परिसरात होणार आहे. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेसाठी अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मंगळवारी सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत अटल सेतू वाहतूक जड अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे तर हलक्या वाहनांची वाहतूक सुरु असली तरी त्यांना शिवडी येथे थांबता येणार नाही. वडाळा वाहतूक विभागाच्या हद्दीत शिवडी वेअर हाऊस, हे बंदर रोड, शिवडी पुर्व मुंबई येथे ३१ दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघ व ३० दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाचा स्ट्रॉग रूम आहे. चार जून रोजी या ठिकाणी मत मोजणी असल्याने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अटल सेतू शिवडी बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झिाट) येथे कोणत्याही प्रकारची अवजड वाहने तसेच माल वाहतूककरणारी वाहने यांना अटल सेतू दक्षिण वाहिनी येथून येण्यास मनाई करण्यात आली आहे. या  मार्गावर हलकी वाहने येण्यास परवानगी असेल. परंतु, त्यांना शिवडी एक्झीट येथे उतरण्यास मनाई करण्यात आली असून, त्यांना थेट कुलाबा एक्झीट व वडाळा एक्झीट येथून पर्यायी मार्गाने वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यावेळी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला मार्ग मंगळवारी चार जून  रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा दरम्यान बंद असणार आहे. नवी मुंबई एमटीएनएल दक्षिण वाहिनी ते शिवडी बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग अवजड वाहनासाठी पर्यायी मार्ग नवी मुंबई वाशी खाडी पूल मार्गे तर हलकी वाहनासाठी पर्यायी मार्ग – कुलाबा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) व वडाळा बाहेर जाण्याचा मार्ग (एक्झीट) असणार आहे. सदरची वाहतूक नियंत्रण अधिसुचना ही इतर जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, अग्निशमन बंब , रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागु होणार नाही.

नवी मुंबई, ठाणे परिसरात पूर्वमोसमी पावसाची हजेरी

मुंबई : ठाणे, नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी पावसाने हजेरी लावली असून यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, राज्यात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नवी मुंबईतील खारघर, कामोठे परिसरात सोमवारी १२ वाजता पावसाने हजेरी लावली. तसेच ठाण्यातही दुपारी १२.३० नंतर पाऊस पडायला सुरुवात झाली. याचबरोबर पश्चिम उपनगरातील पवई, सांताक्रूझ, बोरिवली परिसरात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, राज्यातील काही भागात सोमवारपासून पूर्व मोसमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे. काही दिवसांत मोसमी वारे राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.  

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं

मंत्रालयासमोरची घटना मुंबई : मुंबईतल्या IAS अधिकाऱ्याच्या मुलीने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने इमारतीच्या १० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. मंत्रालयाच्या समोर ही इमारत आहे याच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारुन या मुलीने आयुष्य संपवलं. रस्तोगी यांची मुलगी वकिलीचं शिक्षण घेत होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे. या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारली तेव्हा ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. लिपी रस्तोगी ही LLB करत होती. वयाच्या २७ व्या वर्षी तिने इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं आहे. त्याआधी तिने एक चिठ्ठी लिहिली आहे असंही कळतं आहे मात्र त्याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आयएस अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने या घटनेची चर्चा होते आहे. या मुलीची आई राधिका रस्तोगी या चलन विभागात सचिव आहेत. मुंबईत मंत्रालयासमोर सुनीती नावाची इमारत आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी घेत लिपी रस्तोगीने आत्महत्या केली. ज्या इमारतीत लिपी आणि तिच्या आई वडिलांसह राहात होती तिथे आयएएस अधिकारी आणि काही मंत्र्यांची घरं आहेत. पहाटे तीनच्या सुमारास लिपीने उडी मारली, ज्यानंतर तिला जीटी रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी अनसैर्गिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.

तंबाखूविरोधी दिनानिमित्ताने कार्यक्रम

मुंबई : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मंत्रालयात प्रमोद जाधव, सह आयुक्त, समाज कल्याण संचालनालय, पुणे यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी व  मुंबईकरांना दिली तंबाखूमुक्तीची शपथ – “तंबाखूला नाही म्हणा”. यात धुम्रपानविरोधी कार्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. “जागतिक तंबाखू विरोधी दिन” निमित्ताने मंत्रालयात सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन व नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आय़ोजित करण्यात आला.  व्यसनांचे विदारक रुप प्रकट करणारे कटआऊट, बँनर्स, पोस्टर्स प्रदर्शनी याचे उदघाटन यावेळी प्रमोद जाधव, सह आयुक्त, समाज कल्याण संचालनालय, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उप सचिव रविंद्र गोरवे, कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर, नशाबंदी मंडळाचे उपाध्यक्ष एकनाथ तांबवेकर, सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस अमोल मडामे हे उपस्थित होते. प्रमोद जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यसन आणि वाढते प्रमाण यांना आळा घालण्यासाठी प्रचार, प्रसार, प्रबोधनाची त्रिसुत्री अवलंबून युवा पिढीचे तंबाखूजन्य पदार्थापासुन आपण रक्षण करण्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त केला. जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, जर तंबाखूचे व्यसन थांबविले नाही तर सन 2020 ते 2030 पर्यंत जगातील सुमारे शंभर कोटी लोक तंबाखू पासून होणाऱ्या रोगांमुळे मृत्यू पावतील. त्यामध्ये 20 ते 30 वर्षे वयोगटातील 40 टक्के लोक असू शकतात. हा तंबाखूचा अतिरेकी हल्ला नाही का ? म्हणून या आयोजनात सर्वांनी सहभागी व्हावे व स्वतःला तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी तंबाखूमुक्तीची शपथ घ्यावी असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे ज्यांनी 2011 साली व्यसनमुक्तीचे धोरण बनवले आहे. 2020 महाराष्ट्र राज्याचे साठावे वर्ष आहे. महाराष्ट्र सरकारने या निमित्ताने व्यसनमुक्त महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल उचलावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी केले. तसेच येणाऱ्या वर्षात शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, धार्मिक स्थळे यांच्या 100 मीटर पासून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री बंद व्हावी या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती कायदा अंमलबजावणीची मोहीम जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद यामध्ये मोहीम राबविण्यात येईल व याठिकाणी तंबाखूमुक्ती ची शपथ मंडळाच्या संघटकांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणार असल्याचे चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी मांडले. वाढते व्यसनांचे प्रमाण आणि त्यात अडकत झालेली तरुणाई यांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि शरीराची होणारी परवड लक्षात घेऊन या मुलांना परावृत्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात ही प्रदर्शनी, व्यसनमुक्ती सापसिडी बघण्यासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी व मुंबईकर यांचे लक्ष वेधुन घेऊन सर्वांना तंबाखूला नाही म्हणा असे संदेश देत होते. सदर कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्तालय, सार्वजनिक आरोग्य विभाग, तंबाखू नियंत्रण उपक्रम कार्यक्रम, सलाम मुंबई फाऊंडेशन, नरोत्तम सेखसरिया फाउंडेशन, किन्नर मॉ, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थांनी सहभाग घेऊन कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शनीचे आयोजन करून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. तंबाखूजन्य कायद्याची माहिती दर्शविणारे कटआऊट, प्रदर्शनी, पोस्टर्स, पत्रकांच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ व विक्री कायदा २००३ चा प्रचार, प्रसार व अंमलबजावणीसाठी आयोजित या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी आपला सहभाग नोंदवत तंबाखू मतलब खल्लास तंबाखू मुक्त महाराष्ट्र चा नारा देत तंबाखूजन्य पदार्थ पासून दूर राहण्याचा संकल्प केला अशी माहिती नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व चिटणीस अमोल स. भा. मडामे यांनी दिली. सदर कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने कार्यकारीणी सदस्य प्रिया पाटील, दिपक पाटील, पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील, मुंबई शहर संघटक विवेक साळवी, व मुंबई उपनगर संघटिका दिशा कळंबे, स्वयंसेवक चेतना सावंत या सर्वांनी उपस्थिती दर्शवुन कार्यक्रम पार पाडला. कार्यक्रम प्रसंगी व्यसनमुक्ती सापसिडी चे पण आयोजन करण्यात आले होते याचा आंनद सर्वांनी घेतला. सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थितांचे आभार नशाबंदी मंडळाचे सदस्य प्रिया पाटील यांनी मानले. तसेच संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल मडामे, चिटणीस, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केले.

ध्यानमग्न मोदींना ८०० जागा मिळतिल- राऊत

मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये ध्यानधारणा सुरू केली. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि एक्झिट पोलच्या निकालावर भाष्य…