Category: मुंबई

Mumbai news

श्री नारायण गुरु कॉलेज कॅरम स्पर्धेत पौरस करगुटकर विजेता

मुंबई : खालसा कॉलेजच्या पौरस करगुटकरने श्री नारायण गुरु कॉलेज ऑफ कॉमर्स-चेंबूर व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतर कॉलेज एकेरी कॅरम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. विविध जिल्ह्यातील राष्ट्रीय ख्यातीच्या ज्युनियर कॅरमपटूनी निर्णायक फेऱ्यांमध्ये चुरशीचा खेळ केल्यामुळे स्पर्धा रंगतदार झाली. अंतिम फेरीत पौरस करगुटकरने मॉडेल कॉलेज-डोंबिवलीच्या समृध्दी घाडीगावकरचे आव्हान २-० असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाला गवसणी घातली. श्री नारायण गुरु कॉलेज समितीचे अध्यक्ष एम.आय.दामोदरन व जनरल सेक्रेटरी ओ.के. प्रसाद, उपप्राचार्य डॉ. जयश्री व्यंकटअचलम यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी स्पोर्ट्स डायरेक्टर प्रोफेसर पूनम मुजावर, स्पोर्ट्स प्रोफेसर रेश्मा खुदाबक्ष, प्रोफेसर नाहीद शेख, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व प्रॉमिस सैतवडेकर, कॅरम मार्गदर्शक सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. निर्णायक फेरीतील पहिल्या सेटमधील पहिलाच बोर्ड ५-० असा घेत समृध्दी घाडीगावकरने पौरसविरुध्द दमदार प्रारंभ केला. परंतु त्यानंतर सावध व अचूक खेळ करून प्रत्येक बोर्ड घेत पौरस करगुटकरने पहिला सेट ८-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये राणीवर सतत कब्जा मिळवीत पौरसने सुरुवातीपासून आघाडी घेतली आणि १५-२ असा विजय मिळवीत अंतिम फेरी जिंकली. राष्ट्रीय ख्यातीचे उदयोन्मुख कॅरमपटू अंकित मोहिते व निलांश चिपळूणकर यांना हरवून समृध्दी घाडीगावकरने निर्माण केलेली विजेतेपदाची दावेदारी अखेर फोल ठरली आणि तिला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पौरस करगुटकरने पोद्दार कॉलेजच्या रुची माचीवलेचा ७-१०, १३-०, १३-७ असा तर समृध्दी घाडीगावकरने हिंदुजा कॉलेजच्या निलांश चिपळूणकरचा ८-६, ९-४ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. विविध जिल्ह्यातील कॉलेज कॅरमपटूना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडापटू गोविंदराव मोहिते अमृत महोत्सवी चषक आंतर कॉलेज कॅरम स्पर्धेचे आयोजन २९ जूनला आयडियलतर्फे होणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते व संयोजक लीलाधर चव्हाण यांनी दिली.

पॉवरलिफ्टिंग खेळाचा प्रशिक्षण वर्ग

मुंबई : येत्या ६ ते २० मे दरम्यान ठाणे (पूर्व) येथील धि युनायटेड स्पोर्ट्स क्लबमध्ये सर्व वयोगटातील मुला-मुलींसाठी पॉवरलिफ्टिंग खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. छत्रपती पुरस्कार प्राप्त नामवंत पॉवरलिफ्टिंग खेळाडू अनंत चाळके यांच्यातर्फे या खेळाचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. जास्तीत जास्त युवा खेळाडूंनी या खेळाकडे आकर्षित व्हावे हा या प्रशिक्षण वर्गाचा मूळ हेतू आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक ९३२४५०६०६६ अथवा ९७०२१७१००४ यावर संपर्क साधावा.

नवी मुंबईतील स्वच्छताकर्मीही करताहेत मतदान करण्याविषयीचे आवाहन

नवी मुंबई : 25 ठाणे लोकसभा निवडणूक 20 मे रोजी संपन्न होत असून या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावावा यादृष्टीने व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती मोहिमेमध्ये विविध प्रसार माध्यमांचा वापर करण्यात येत असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. नवी मुंबई हे स्वच्छतेत देशामध्ये अग्रमानांकित असणारे शहर असून येथील सेवाभावी वृत्तीने काम करणारे स्वच्छताकर्मी दैनंदिन स्वच्छता कार्याप्रमाणेच विविध लोकोपयोगी उपक्रमातही मनापासून सहभागी होत असतात. या अनुषंगाने स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले (Badges) लावून त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश प्रसारण करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छताकर्मींच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत असून, त्यावर असलेल्या ‘मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार’ – अशा मजकुरातून अभिनव पद्धतीने मतदान करण्याविषयीचे आवाहन केले जात आहे. याशिवाय महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारीही मतदान करण्याविषयीच्या जनजागृतीपर संदेशांचे प्रसारण करीत आहेत.

मुंबई कोस्टलचे ‘मिशन महाकाय’ यशस्वी !

मुंबई : कधी सागरांच्या लाटांचा तडाका तरी कधी धरणीमातेंनी घेतलेली सत्वपरिक्षा अशा अग्निदिव्यातून पुर्णत्वाच्या दिशेने निघालेला मुंबई कोस्टल रोडवरील सर्वात महत्वाचे आणि एतिहासिक असे मिशन महाकाय अखेर शुक्रवारी २६ एप्रिलच्या पहाटे 3 वाजून 25 मिनिटांनी यशस्वी झाले.…

राज्यात हिवताप रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून मुंबईसह राज्यातील हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली असून हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे हे शक्य झाले आहे. राज्य सरकार हिवतापाच्या साथीला प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबवीत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. या मोहिमेला मागील काही वर्षांपासून यश मिळताना दिसत आहे. यामुळे हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत आणि मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. राज्यात २०२१ मध्ये हिवतापाने १४ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र २०२२ मध्ये हिवतापामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २६ वर पोहोचली. यात २०२३ मध्ये घट होऊन ती १९ वर आली. २०२४ मध्ये आतापर्यंत हिवतापाचे २ हजार ६५० रुग्ण सापडले असून, एकाही मृत्यू दगावलेला नाही. ॲनोफिलिस डासामुळे हिवतापाचा प्रसार ॲनोफिलिस डास चावल्याने हिवतापाचा प्रादुर्भाव होतो. हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून सोसायटी व इमारतीमधील पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात येत आहेत. तसेच नागरिकांमध्ये जागरूकता करण्यात येत आहे.

व्हीलचेअरवरील क्रिकेट अपंग वीरांची प्रीमियर लीग

करीना कपूर ची खास उपस्थिती रमेश औताडे मुंबई : व्हीलचेअर स्पोर्ट्स असोसिएशन मुंबईच्या वतीने खार जिमखाना येथे मुंबई हिरोस, मुंबई राइनोज आणि मराठवाडा टायगर्स यांच्यात मुंबई व्हीलचेअर क्रिकेट प्रीमियर लीग 2024 चे आयोजन करण्यात आले होते. व्हीलचेअर क्रिकेट खेळाडू 70% ते 90% शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत, ते व्हीलचेअर वर फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करतात. या संघात पोलिओ, अँप्युटी, पाठीच्या कण्याला दुखापत आणि सेरेब्रल पाल्सी यासारख्या विविध अपंगत्व असलेल्या सर्व खेळाडूंचा समावेश आहे.  मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघातील काही खेळाडू भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाकडूनही खेळले आहेत. भारतीय महिला संघाच्या माजी क्रिकेटपटू आणि BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्या मिस सुलक्षणा नाईक या लीगसाठी प्रमुख पाहुण्या होत्या तसेच अभिनेत्री करीना कपूर खान देखील उपस्थित होती . अंतिम सामना मराठवाडा टायगर्सने मुंबई राइनोजवर ११ धावांनी जिंकला.  मराठवाडा टायगर्सच्या अंतिम सामन्यात विश्वनाथ गुरव सामनावीर ठरला. साहिल सय्यदला सर्वोत्कृष्ट फलंदाज, राहुल कारचे याला सर्वोत्कृष्ट ब्लोअर आणि संतोष रांजगणे याला लीगचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. दिव्यांग व्यक्तींना अधिकाधिक क्रिकेट सामने खेळण्याची संधी देण्यासाठी आम्ही या स्पर्धेचे आयोजन केले आहे आणि नजीकच्या काळात मुंबई क्रिकेट असोसिएशनने व्हीलचेअर क्रिकेटपटूंसाठी अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा आयोजित करावी अशी आमची इच्छा आहे. असे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार राहुल रामुगडे यांनी सांगितले.

देशाच्या अमृतकालमध्ये प्रत्येक महिलेला उच्च शिक्षण देता यावे- कुलगुरु उज्वला चक्रदेव

मुंबई : देशात येत्या 25 वर्षात अमृतकाल साजरा करू, त्यावेळी आपल्या देशातील एकही महिला अशिक्षित राहणार नाही, प्रत्येक महिलेला हवे ते उच्च शिक्षण देता यावे, यासाठी आपली आणि एसएनडीटी विद्यापीठाचीही क्षमता वाढावी असे आपण स्वप्न पाहू या, असे प्रतिपादन विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांनी केले. विद्यापीठातील डॉ. बाबाासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात त्या अध्यक्षीय भाषणात बोलत होत्या. यावेळी अध्यासनाचे प्रमुख डॉ. संजय शेडमाके, विद्यापीठ कर्मचारी परिषदेचे पदाधिकारी, प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. चक्रदेव पुढे म्हणाल्या, महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यां महापुरूषांनीसमाज बदलायला हवा हे जाणले, यासाठी प्रत्येकानी विविध मार्ग स्वीकारले त्यात महिला ही एक केंद्रबिंदू आहे. शिक्षणाचे महत्व केवळ समाज बदलदंड होणे या पलीकडे माणूस बदलणे हा एक आहे. मी कोण आहे, माझे काय अधिकार आहेत, हे यातून कळते, यातून शिकता येते. भगवतगीतेतील दहाव्या अध्यायातील ३४व्या श्लोकातील तिसऱ्या ओळीत भगवान श्रीकृष्णाने महिलांसाठी सात गुण सांगितलेले आहेत. हे सात गुण आपण जाणलो नाही तर आपण आपले अधिकार जाणू शकत नाही, यामुळे आपले महत्व जाणून घेणे आवश्यक असल्याचेही त्या म्हणाल्या. महिलांच्या सबलीकरणासंदर्भात कुलगुरू डॉ. चक्रदेव म्हणाल्या, सबलीकरण हे आतून येते ते शिक्षणातून घडते. आपल्या विद्यापीठात शिक्षणातून महिलांचे सबलीकरण तोच विद्यापीठाचा उद्देश आहे. मात्र, यासाठी सगळ्यांनी एकमेकांचे हात पकडून सहकार्य करावे, ज्यावेळी संधी मिळते, त्यावेळी तिचा पूर्ण लाभ, काळाचा उपयोग करून घ्यावा, महिलांच्या मनामध्ये तू सबल आहेस, तुझ्यासारख्या अनेक महिला भारताममध्ये आहेत, त्यांना तुझी गरज आहे, असे सांगणे आवश्यक असून हाच आपल्या विद्यापीठाचाही उद्देश असल्याचेही त्या म्हणाल्या.

आम्ही आमचा झेंडा घेऊन लढणार – जमशेद अमीर खान

मुंबई :सर्व राजकीय पक्षांची ७० वर्षांची गुलामगिरी संपवून आता आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन ” अखिल भारतीय मुस्लिम लिग ( सेक्युलर ) ची लोकसभा लढाई लढणार आहोत. हिंदू , मुस्लिम, शीख, इसाई इतर सर्व धर्माचे पंथाचे सामान्य लोक एकत्र येऊन या लिग ची स्थापना केली आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी दिली. मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्या जोगव्यासाठी वापर केला जात आहे. आमचा आवाज संसद मधे कोण उठवणार ? हा प्रश्न आम्हाला वेळोवेळी सतावत होता. त्यामुळे आता आम्ही अखिल भारतीय मुस्लिम लिग ( सेक्युलर ) या पक्षाच्या माध्यमातून आमचाच पक्ष, आमचाच झेंडा, आमचाच उमेदवार अशी आम्ही लढाई सुरू केली आहे असे खान यांनी सांगितले. हायातुल्ला अब्दुल्ला शेख, मनान अब्दुल हक, निजाम खान, इमतियाझ, अली रहीम शेख असे पाच उमेदवार लोकसभेसाठी मुंबईतून उभे केले आहेत अशी माहिती लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी यावेळी दिली.

‘कोटपा’ कारवाईत  ई- चलनानेच व्यसनमुक्ती

रमेश औताडे मुंबई : तंबाखूच्या सेवनाचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम, तंबाखू कंपन्याकडून तरुण वर्ग आणि शालेय विद्यार्थ्याना ग्राहक म्हणून लक्ष्य करणे सुरु आहे. त्यामुळे सार्वजनिक धूम्रपान विरोधात ” कोटपा ” कारवाईची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच शासनाने कोटपा कारवाईत ई- चलन अंतर्भूत करावे, अशी आग्रही मागणी राज्यभरात तंबाखूच्या दुष्परिणामावर कार्यरत असलेल्या अशासकीय संस्थाच्या समन्वय बैठकीत शासनाकडे करण्यात आली. मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद, विटाल स्ट्रॅटेजिस्ट, टाटा मेमोरिअल सेंटर, राज्य राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कोटपा कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी राज्यभरातील अशासकीय संस्थांची समन्वय बैठक मंगळवारी टाटा मेमोरिअल सेंटर खारघर येथे संपन्न झाली. या बैठकीत आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ.दिनेश सुतार, डॉ. प्रकाश गुप्ता, नगरपरिषद प्रशासन उपायुक्त सुवर्णा शिंदे, डॉ. राणा सिंग, डॉ. अर्जुन सिंग आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शन भाषणात राज्यात सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी तसेच कोटपा २००३ कायद्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व अशासकीय संस्थानी सहकार्य करावे. कोटपाची कारवाई करताना चलनाचा प्रश्न निर्माण होतो. त्याबाबत शासन स्तरावर ई चलन कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे आरोग्य सेवा सहायक संचालक डॉ. दिनेश सुतार यांनी सांगितले. या बैठकीत राज्यभरातील तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणाच्या जनजागृतीसाठी कार्यरत संस्था सहभागी झाल्या होत्या. यावेळी तंबाखू कंपन्यांकडून सुरु असलेल्या छुप्या जाहिराती विरोधात जनहित याचिका दाखल करण्यावर सर्वांचे एकमत झाले. तसेच तंबाखूमुक्त शाळा, शैक्षणिक संस्था, परिसर करण्यासाठी कृती आरखडा तयार करण्यात आला. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत.  सार्वजनिक धूम्रपान गुन्हा आहे. तसेच कोणत्याही शैक्षणिक संस्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी करताना चलनाचा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी ई चलन प्रक्रिया शासनाने सुरु करावी अशी मागणी करण्यात आल्याचे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था  प्रकल्प संचालक अप्पासाहेब उगले यांनी सांगितले.

महाकाय तुळई समुद्रात स्थापन,

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची जोडणी यशस्वी मुंबई : किनारी रस्ता आणि वांद्रे – वरळी सागरी सेतूला सांधणाली पहिली महाकाय तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) जोडण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत आज शुक्रवार, २६ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी ही तुळई जोडण्यात आली. मध्यरात्री सुरू केलेल्या या कामाच्या वेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते. खुल्या समुद्रात भरती-ओहोटीचा अंदाज घेऊन तुळईद्वारे या दोन मार्गांना जोडण्याचे नियोजनमहानगरपालिकेने हाती घेतले होते. भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्याने महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. पहाटे २ वाजल्यापासून सुरू झालेले हे काम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडले. या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी आणि महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी गगराणी यांनी मुंबई किनारी रस्ता प्रकल्प पथकाचे अभिनंदन केले. एकूण १०.५८ किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूची सांधणी. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध योजना तयार केली. या दोन्ही टोकांना सांधणारी पहिली तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) गुरुवारी २५ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता वांद्रे-वरळी सागरी सेतू जवळ आणली होती. संयम आणि कौशल्य पणाला लावणारी १ तास २५ मिनिटे प्रवाहकीय हवामानानुसार अंदाज घेवून पहाटे २ वाजेपासून गर्डर स्थापनेची कार्यवाही सुरू करण्यात आली. त्यानंतर बार्जच्या मदतीने टप्प्याटप्प्याने तुळई मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या मधोमध आणली. सागरी लाटांचा आणि वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्य पणाला लावत सुयोग्य स्थितीत तळईला स्थिर केले. मुंबई किनारी रस्त्याच्या कडेला दोन आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटींग युनिट तयार करण्यात आले आहेत. त्या मेटींग युनिटमध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेले पांढऱ्या रंगाचे मेटींग कोन ठिक ३ वाजून २५ मिनिटांनी अचूकपणे बसविण्यात आले. चारही मेटींग कोन आणि मेटींग युनिटची सांगड बसताच उपस्थित अधिकारी, अभियंते आणि कामगारांनी ‘हिप हिप हुर्रे’ म्हणत आणि टाळ्यांचा गजरात मोहीम फत्ते झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यानंतर तुळई खाली असलेला रिकामा तराफा बाजूला करण्यात आला. तुळईचा अंबाला ते मुंबई प्रवास ही महाकाय तुळई वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आली आहे. तुळई दोन हजार मेट्रीक टन वजनाची असून, १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. अंबाला (हरियाणा) येथे या तुळईचे छोटछोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत. तेथून तब्बल ५०० ट्रेलरच्या मदतीने हे सुटे भाग दाखल आले. सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा बंदरातून तराफाच्या मदतीने ही तुळई वरळी येथे आणली. तुळईवर होणार सिमेंट क्राँक्रिटीकरण मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या तुळईवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत.