Category: रायगड

raigad news and updates

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १२ ठिकाणी होणार आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे १२ ठिकाणी होणार आयोजन तहसीलदार धनंजय जाधव, उप अधिक्षक भूमि अभिलेख नितीन आटाळे यांची उपस्थिती अशोक गायकवाड कर्जत : महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार कर्जत उपविभागत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ टप्पा-क्र. १ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ७ मार्च ते १५ मे २०२६ या कालावधीत उपविभागातील कर्जत-खालापूर या दोन्ही तालुक्यांतील १२ मंडळ स्तरांवर ही शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांच्या महसूलविषयक दैनंदिन अडचणींना तात्काळ दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांचा वेगाने निपटारा करून तक्रारींचे ऑन-द-स्पॉट निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. शिबिरांमधील प्रमुख सेवा पुढील प्रमाणे — प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निकाली काढणे , अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क , लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत तात्काळ सेवा अकृषिक तरतुदींवरील मार्गदर्शन, कलम ४२ मधील सुधारणा ,अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक नसणे, कलम ४२अ, ४२व, ४२क, ४२ड अंतर्गत संपुष्टात आलेल्या सनद प्रणालीबाबत मार्गदर्शन , एकवेळ अधिमूल्य भरण्याची नवीन व्यवस्था , भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत करणे. व्यवसाय सुलभता अंतर्गत एक खिडकी व्यवस्था, ई-मोजणी, अँग्रीस्टॅक, पीएम किसान, तक्रार निवारण व पाणंद रस्ते विषयक सुविधा तुकडेबंद कायद्याविरुद्ध जमीन खरेदी-विक्री व हस्तांतरण व्यवहारांबाबत मार्गदर्शन अभियानाच्या प्रभावी नियोजनासाठी कर्जत प्रशासकीय भवन उपविभागीय अधिकारी कार्यालयात, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद पार पडली. तसेच विविध विभागांमध्ये समन्वय राखण्यासाठी मंडळ स्तरावर समिती गठीत करण्यात आली असून शिबिरांच्या आयोजनातील अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी दिले. सकपाळ यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी

माथेरान पाणीपट्टी अभय योजना लागू करावी विरोधी पक्षनेते सिताराम कुंभार यांची मागणी मुकुंद रांजणे माथेरान : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महामंडळ यांच्या माथेरान पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरवठा अभय योजना लागू…

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानानिमित्त जिल्ह्यात १११ शिबिर

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानानिमित्त जिल्ह्यात १११ शिबिर जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती अशोक गायकवाड अलिबाग: महाराष्ट्र शासन यांच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १ अंतर्गत जिल्ह्यात एकूण १११ शिबिरे आयोजित करण्यात आली. १८ फेब्रुवारीला घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील प्रत्येक मंडळामध्ये ही शिबिरे पार पडणार आहेत. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचे तात्काळ निराकरण करणे हा होता. प्रलंबित फेरफार निकाली काढणे, सातबारा अभिलेख दुरुस्ती, अभिलेख हेल्प डेस्क, लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा, अकृषक परवानगी मार्गदर्शन, भूसंपादन प्रकरणांतील कमी-जास्त पत्रके तयार करणे तसेच गाव दप्तर अद्ययावत करणे या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तुकडेबंदी, फेरफार मंजुरी आणि सातबारा दुरुस्ती यासंदर्भातील प्रकरणांना विशेष प्राधान्य देण्यात आले. १५ दिवसांच्या नोटीस कालावधीमुळे प्रलंबित राहिलेली प्रकरणे मार्गी लावण्यावर भर देण्यात येईल. तसेच लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत महसूल विभागाच्या सुमारे ९५ सेवांचे एकत्रीकरण करून उत्पन्न दाखला, विविध प्रमाणपत्रे यासाठी मदत कक्ष स्थापन करण्यात येतील. हे अभियान मार्च ते मे या तीन महिन्यांत दर महिन्याला दोन दिवस मार्च मध्ये ७,१४ आणि २५ —एप्रिलमध्ये १०,१४ व १७, तर मेमध्ये १, ८ व १५ असे प्रत्येक तालुक्यातील एका मंडळात राबविण्यात येतील. तक्रार निवारणासाठी स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित असून प्रत्येक तालुक्यासाठी संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, निवासी जिल्हाधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके व तहसीलदार (महसूल) चंद्रसेन पवार आदी अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे प्रशासन अधिक लोकाभिमुख बनत असून आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना योजनांचा लाभ सुलभपणे मिळण्यास गती मिळाली आहे.

 माथेरान झाले चकाचक

७८५ श्रीसदस्यांकडून भव्य स्वच्छता अभियान, ६ टन कचऱ्याचे संकलन, पर्यटन वाढीस मदत मुकुंद रांजाणे माथेरान : महाराष्ट्र भुषण थोर निरूपणकार तिथरूप आदरणीय  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त १मार्च रोजी माथेरान शहरात   सदस्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या अत्यावश्यक अभियानासाठी माथेरान मधील सदस्यांसह कर्जत तालुक्यातील कडाव,नसरापूर,चिंचवली,मानिवली, भडवळ, डीकसळ,किरवली येथून जवळपास ६५० श्रीसदस्य दाखल झाले होते.सकाळी आठ वाजता या अभियानास श्रीराम चौकातून सुरुवात करण्यात आली तत्पूर्वी  नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेला कार्यक्षम  नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, गटनेते शिवाजी शिंदे,उप नगराध्यक्ष संतोष शेलार, नगरसेवक सचिन दाभेकर, सिताराम कुंभार, किरण पेमारे,सुनील शिंदे,केतन रामाणे,गौरंग वाघेला,सोहेल महापुळे,किशोर मोरे,नगरसेविका अनिता रांजाणे, अनुसया ढेबे,रिझवाना शेख, लता ढेबे, कमल गायकवाड, सुरेखा साळुंखे,अर्चना भिल्लारे, ऐश्वर्या शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. माथेरानच्या एकूण ५२ किलोमीटर परिसरातील जंगल भागात सुक्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. प्लास्टिक बाटल्या, वेफर्स ,गुटखा पाकिटे तसेच इतर प्लास्टिकजन्य सुका कचरा यावेळी सदस्यांकडून गोळा करण्यात आला. त्याचप्रमाणे नागरी वस्तीमध्ये सुध्दा काही भागातील लोकांची आजही स्वच्छते बाबतीत मानसिकता नसल्याने आजूबाजूला गटारात कचरा टाकला जातो तो सर्व गोळा करण्यात आला. मुख्य रस्त्यावरील गटारे स्वच्छ करून पालापाचोळा,काचेच्या बाटल्या एकत्रित केल्या आहेत.मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाका, पार्किंग या भागात जवळपास ६५ गोणी कचऱ्याचे संकलन करण्यात आले.जमा करण्यात आलेला एकूण पाच ते सहा टन कचरा नगरपरिषदेच्या कंत्राटी कामगारांमार्फत हातगाडी मधून डंपिंग ग्राउंडवर नेण्याची व्यवस्था नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली होती. या भव्य अभियानाच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे सदस्य जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण कार्य करीत आहेत.याठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम कचरा नेहमीच पहावयास मिळतो. यातील नैसर्गिक कचरा हा झाडांचा पाला असून कृत्रीम कचरा प्लास्टिक बाटल्या,पिशव्या वगैरे असतो.यासाठी सर्वांनी संकल्प करून यापुढे कापडी पिशव्यांचा वापर केल्यास निश्चितच काहीअंशी का होईना प्लास्टिक मुक्त माथेरान होण्यास सुरुवात होईल. रिझवाना शेख—नगरसेविका माथेरान

भूमी अभिलेख कार्यालयात रजा आंदोलन आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय

भूमी अभिलेख कार्यालयात रजा आंदोलन आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय अशोक गायकवाड कर्जत: विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक अर्जित रजा आंदोलन सुरू केल्याने कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. कर्मचारी कार्यालयाबाहेर असहकार आंदोलन करत उभे राहिल्याने सोमवारी सकाळपासून मोजणी, नकाशे, उतारे व इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना निराश होऊन परत जावे लागत आहे . त्यामुळे शेतकरी, बांधकाम व्यावसायिक तसेच सर्वसामान्यांची मोठी गैरसोय होत आहे. कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकावर ‘भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती (महाराष्ट्र राज्य)’ यांच्या वतीने आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार कर्जत कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. १८ व २० फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून मोजणीची कामे बंद ठेवण्यात आली होती. काळ्या फिती लावून कामकाज केल्यानंतर आता सामूहिक रजा आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आज २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथे जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. दरम्यान, काही नागरिकांनी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत आंदोलनावर टीकाही केली. चौकट : तांत्रिक वेतन श्रेणीचा प्रश्न २०१२ पासून भूमी अभिलेख विभागातील पदांसाठी तांत्रिक शैक्षणिक अर्हता लागू करण्यात आली असली तरी कर्मचाऱ्यांना अद्याप कारकून संवर्गाप्रमाणेच वेतन मिळत असल्याची तक्रार आहे. या संदर्भातील समितीचा अहवाल शासनाकडे सादर होऊनही निर्णय न झाल्याने असंतोष वाढला असून, आंदोलन तीव्र करण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. २३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक अर्जित रजा टाकून असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे. २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. कर्जत येथील उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दररोज किमान १४ मोजणी प्रकरणांमध्ये मोजणी प्रक्रिया होत असते परंतू कार्यालयांमध्ये ०७ रोवर मशीन उपलब्ध असल्यामुळे कर्मचारी वेळेवर साईट वर पोहोचू शकत नसल्यामुळे जनतेच्या तक्रारी निर्माण होतात त्यामुळे कर्जत कार्यालयास उपलब्ध भूकरमापक यांच्या संख्यानुसार रोवर मशीन मेळाव्यात तसेच लॅपटॉप देखील मिळावेत. —शैलेश जाधव – शिरस्तेदार, कर्जत भूमिअभिलेख कार्यालय

  जिल्हा कारागृहात त्वचारोग तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न

जिल्हा कारागृहात त्वचारोग तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांची उपस्थिती अशोक गायकवाड अलिबाग: समता फांऊडेशन मुंबई या सामाजिक संस्थेमार्फत सामाजिक बांधीलकी जपत अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी अलिबाग जिल्हा कारागृहात “त्वचारोग तपासणी शिबीर” कार्यक्रम संपन्न झाला. या आरोग्य शिबीरात डॉ.सुयश विरकर (त्वचारोगतज्ञ) यांनी बंदी बांधवांना त्वचारोगाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच त्वचारोग निदान आणि मोफत उपचार यावर भर देण्याच्या अुनषंगाने कारागृहात दाखल २९ बंद्यांची त्वचारोगबाबतची तपासणी करण्यात आली. हे आरोग्य शिबीर अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधार सेवा,पुणे डॉ. सुहास वारके (भा.पो.से) व विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा पुणे योगश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या शिबिर कार्यक्रमाकरिता जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल, डॉ.सुयश विरकर (त्वचारोगतज्ञ) जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग, डॉ.निशिगंधा माळी (वैद्यकीय अधिकारी) अलिबाग, जिल्हा कारागृह, सतिश प्रभाकर जुंबळे, सोमनिंग कट्टेपा कांबळे (कारागृह शिपाई) इत्यादी कारागृह अधिकारी/ कर्मचारी उपस्थित होते.

  महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न

महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन-२०२६ कार्यशाळा संपन्न जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे विशेष मार्गदर्शन  अशोक गायकवाड   अलिबाग :विकास आयुक्त (उद्योग) यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एमएसएई क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची…

ई रिक्षांच्या बेमुदत बंदमुळे शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट

ई रिक्षांच्या बेमुदत बंदमुळे शालेय विद्यार्थ्यांना करावी लागतेय पायपीट मुकुंद रांजाणे माथेरान : श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे आणि त्यांना महत्वाची साथ ही ई रिक्षा समर्थकांनी दिलेल्या आर्थिक योगदानामुळे…

 गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार; राष्ट्रभक्तीचा जागर

कर्जतच्या भालिवडी कन्या आश्रमशाळेत जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत  गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त अखंड भारताची मानवी प्रतिकृती साकार; राष्ट्रभक्तीचा जागर अशोक गायकवाड रायगड-कर्जत : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त सामूहिक गीताचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण अंतर्गत विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्यासोबत कर्जतचे तहसिलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प, पेण प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांचे आगमन होताच आश्रमशाळेतील लेझीम पथकाने पारंपारिक थाटात त्यांचे जंगी स्वागत केले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री गुरु तेग बहादूर यांच्या स्वप्नातील ‘अखंड भारताच्या’ नकाशाची साकारलेली हुबेहूब मानवी प्रतिकृती होती. यावेळी सहभागी विद्यार्थिनींनी तिरंगी रंगांच्या टोप्या व फुगे घेऊन अखंड भारताच्या नकाशाच्या सीमारेषेवर उभे राहून प्रत्यक्ष तिरंग्याचेच स्वरूप साकारले होते. या प्रदर्शनात एका विद्यार्थिनीने श्री गुरु तेग बहादूर यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामूहिक गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते आकाशात तिरंगी फुगे सोडून या दिनाचा उत्साह द्विगुणित करण्यात आला. याच सोहळ्यादरम्यान विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी या आयोजनामागचा उद्देश आणि महत्त्व स्पष्ट केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी विद्यार्थिनींना थोर पुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत मोलाचे मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

वन समितीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत

वन समितीच्या माध्यमातून स्वच्छता राखण्यास मदत मुकुंद रांजाणे माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या सत्ताधारी गटाच्या माध्यमातून वन संरक्षण समिती कार्यरत असते. सत्ताधारी गटाच्या मर्जीतील विश्वासू कार्यकर्ते या समितीवर उत्तम प्रकारे विकास कामे करण्यासाठी नेहमीच सज्ज असतात.एकूण वीस सदस्यांची या समितीवर निवड केली जाते. जोपर्यंत सत्ताधारी गट नगरपरिषदेच्या सभागृहात अस्तित्वात असतो तोवर नेमून दिलेले कार्यकर्ते यामध्ये पन्नास टक्के महिला सदस्य असतात.ही सर्व मंडळी एकदिलाने कामे करत असतात. दस्तुरी वाहन पार्किंगच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न या समितीला प्राप्त होते. त्यातूनच काहीवेळा वृक्षारोपण, ठराविक पॉईंट्सची सुरक्षा व्यवस्था, कचराकुंडी लावणे अशी महत्वपूर्ण कामे समितीचे पदाधिकारी, सदस्य करीत असतात. विशेष म्हणजे ही सर्व मोठया रक्कमेची  कामे करताना कोणत्याही प्रकारची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात नाही. समितीचे पदाधिकारी,सदस्य ह्यांच्या सामोपचारातुन कामे पूर्ण करून गावाच्या विकास कामात मदत होत असते. लाखो रुपयांची शिल्लक आजही जमा असल्याने यावेळी गावातील एकूण पाच गरजवंत महिलांना स्वच्छता कामे दिली आहेत.याकामी दर महिन्याला साठ ते सत्तर हजार रुपये पगाराच्या रूपाने या पाच महिलांना दिला जात आहे.प्लास्टिक मुक्ती त्याचप्रमाणे अन्य कचरा गोळा करण्यासाठी वन संरक्षण समितीने पुढाकार घेतला असून स्वच्छता राखण्यासाठी मदत होत आहे.यापुढे नव्याने स्थापन होणाऱ्या समितीवर सत्ताधारी गटाने बारकाईने लक्ष केंद्रित करून गावाच्या हिताच्या दृष्टीने जी काही लाखो रुपयांची शिल्लक रक्कम आहे त्याचा सदुपयोग विकास कामांसाठी करावा अशी स्थानिकांमधून मागणी केली जात आहे.