नाल्याच्या कामासाठी तोडला नविन काँक्रीटचा रस्ता
एमआयडीसी निवासीतील रहिवाशी संतापले कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये काँक्रीट रस्ते हे नियोजनविना घाईने बनविले गेले. त्यामुळे आता गटार, नाले, विद्युत, पाणी इत्यादी वाहिन्या यासाठी रस्ते तोडण्याचे काम सतत चालू असल्याने हे नविन बनविलेले सर्व काँक्रीट रस्ते आता खराब झाले आहेत. याचा फटका नागरिकांना व वाहनधारकांना येत्या पावसाळ्यात बसणार आहे. आतापर्यंत विद्युत, पाणी वाहिन्या टाकण्यासाठी पूर्ण आडवा रस्ता तोडायचा असेल तर जास्तीसजास्त दोन फुटाचा छेद मारून काँक्रीट रस्ता तोडला जायचा. पण आता एका नविन नाल्याचे बांधकामसाठी अंदाजे ४० फुट रुंदीचा काँक्रीट रस्ता आणि त्याला १० फुटाचा छेद देऊन हा रस्ता एमआयडीसी ठेकेदार कडून पूर्ण तोडण्यात आला आहे. हे काम मिलापनगर मधील गणेश विसर्जन तलाव रस्त्यावर ग्रीन्स स्कुल/श्रीराम वरदायीनी सोसायटी जवळ चालू आहे. यामुळे येथील रस्ता वाहतूकसाठी आणि पादचाऱ्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आला असून पुढे अनेक दिवस तो बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनधारक, पादचारी आणि शालेय विद्यार्थी याना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. तर काही विद्यार्थी, पालक व रहिवाशी हा वळसा वाचविण्यासाठी त्यातूनच कसरत करीत वाट काढून पुढे जात आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित मोठी दुखापत होऊन इजा होऊ शकते. एसएससी दहावी आणि बारावीचा परीक्षा चालू असून ग्रीन्स स्कुल हे त्याचे एक परीक्षा केंद्र आहे. प्रशासनाने या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात आणि होळी/रंगपंचमी/शिवजयंती/गुढीपाडवा या उत्सवात हे काम चालू करायला नव्हते पाहिजे होते. हे नाल्याचे काम तातडीने करणे गरजेचे नसतानाही थोडे दिवस थांबले असते तरी काय फरक पडला नसता असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आता अजून कमीतकमी एक महिना हे काम पूर्ण होणार नसल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. या काँक्रीट रस्त्यावरील नाल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर हा काँक्रीट रस्ता पूर्वीप्रमाणे ठाकठीक करण्यात येईल का ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. येत्या पावसाळ्यात या नविन बनविलेल्या सर्व काँक्रीट रस्त्यांची परिस्थिती पूर्वीप्रमाणे खड्डेमय खराब होण्याची शक्यता असून नाले/गटार कामाच्या वेळी अनेक झाडांच्या खोडाला, मुळाना धक्के बसल्याने पावसाळ्यात अशी झाडे पडू शकतात. एकंदरीत प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नाही. कमीतकमी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.
